text
stringlengths
0
6.48k
'तू तो मरे हुए जानवरकी चमडी घिसनेवाला तबलिया है ना?
तू क्या राग बाग जानेगा?
वो तेरे बसकी बात नही है.
' जसराज दुखावले गेले खरे.
परंतु त्यांच्या अंतर्मनात एका प्रेरणेचा स्फुल्लिंग प्रज्वलित झाला.
आपण तबलावादन सोडून गायक कलाकारच बनायचं, असा मनोनिग्रह त्यांनी केला.
जसराजांना आपले वडील मोतीराम यांच्याकडून शिकण्याची फारशी संधी मिळाली नाही.
परंतु आपले ज्येष्ठ बंधू मणिराम यांच्याकडून ते गाणं शिकले.
शिवाय प्रताप नारायण यांचंही मार्गदर्शन त्यांना लाभत होतं.
'शुद्ध वाणी, शुद्ध मुद्रा आणि शुद्ध सूर' असा प्रमुख गुरुमंत्र जसराजांना मिळाला आणि त्यांनी तो तंतोतंत अंमलात आणला.
मला तर असं वाटतं की एक कलाकार म्हणून जसराजांच्या यशाचं रहस्य या गुरुमंत्रात आहे.
त्यांना देखणा आणि रेखीव चेहरा लाभला होता.
त्यांचे कुरळे केस, भालप्रदेशावर रेंगाळणारी झुलपं, या चेहऱ्याला अधिक आकर्षक बनवत.
त्याशिवाय त्यांचा पेहेराव, तो तर दृष्ट लागण्यासारखाच असे.
रंगीबेरंगी पितांबर नेसून त्यावर रंगीत कुडता आणि तसंच नेत्रवेधक जाकीट.
इंग्रजीत ज्याला 'स्टाइल स्टेटमेंट' म्हणतात असा, त्यांचा जामानामा व एकूण व्यक्तिमत्त्व होतं.
त्यांचा आवाज भावदर्शक होता.
मंद्र सप्तकातले सूर जितके मुलायम आणि मखमली लागत, तितकेच तारसप्तकातले सूर प्रकाशमान लागत आणि मध्य सप्तकात तर आवाज भरीव आणि गोलाईयुक्त लागत असे.
दोन किंवा अधिक स्वरांमधील श्रुतींना स्पर्श करीत जाणारी मिंड ते वारंवार घेत असत.
कण स्वर आणि गमकाच्या तानेचा प्रमाणशीर वापर ते करीत असत.
द्रुत गतीच्या ताना घेताना ते जलद चीजेच्या अंतऱ्याबरोबर त्या गुंफत असत आणि उत्स्फूर्तपणे त्यांची बरसात करीत.
त्यामुळे श्रोता खिळून बसत असे आणि या ताना बऱ्याचशा सपाट धर्तीच्या असत.
सपाट ताना आणि मिंडकाम हा त्यांच्या गाण्यावरचा ग्वाल्हेर घराण्याचा संस्कार आणि सरगम हा पतियाळा घराण्याचा प्रभाव.
जसराजांच्या घराण्याचं नाव मेवाती.
हे घराणं तुलनेनं अज्ञातच.
प्रत्येक घराण्यात एखादा ताकदवान कलाकार पैदा होतो आणि त्याच्या गायनात चुंबकीय आकर्षणाचा अंश असतो, तेव्हा त्या घराण्याचं नाव होतं.
आग्रा घराण्याचं नाव फैयाझ खान खाँसाहेबांमुळे, जयपूर अत्रौलीचं केशरबाई केरकरांमुळे किंवा पतियाळाचं बडे गुलाम अली खान खाँसाहेबांमुळे; तसंच 'मेवाती'चं नाव संगीत जगताला परिचित झालं ते जसराजांमुळेच.
'मेवात' ही जागा आज हरयाणा राज्यात आहे.
परंतु 'मेवात' हा प्रदेश आहे आणि त्याचा काही भाग राजस्थानात, काही उत्तर प्रदेशात, तर काही हरयाणात आहे.
'मेवाती' ही बोलीभाषा आहे.
मेवाती लोकसंगीत आणि कथाकथनाची एक परंपरा आहे आणि तिथल्या 'मिरासी' जमातीने ती जतन केली आहे.
मेवाती घराण्याचं कलासंगीत हे मुख्यतः कंठसंगीत असलं, तरी सतारवादनाची परंपराही तिथे आहे.
जोधपूरच्या दरबारात घग्गे नझीर खान हे गवई होते.
ते या घराण्याचे मूळ पुरुष.
ते नंतर अलवार दरबारी गेले.
तिथे आपला तबलावादक शिवप्रसाद यांचे मुलगे नाथुलाल आणि चुनीलाल यांना घग्गे नझीर खाननी गाणं शिकविलं.
चुनीलाल अल्पायुषी होते.
पण नाथुलालांनी ही गायन परंपरा जिवंत ठेवली.
चिमणलालांचा मुलगा मोतीराम यांना त्यांनी शिकविलं.
मोतीरामांनी मणिरामांना आणि प्रताप नारायणांना शिकविलं.
मोतीरामांचा सर्वात धाकटा मुलगा म्हणजे जसराज.
त्यांना मुख्यतः मणिरामांनी शिकविलं.
ध्रुपद, धमार, ख्याल, टप्पा वगैरे गीत-प्रकार या घराण्यात गायले जात असत.
जसराजांना या गाण्याची तालीम मिळाली.
त्यात त्यांनी आपली पुष्कळ भर घातली हे महत्त्वाचं.
ग्वाल्हेरच्या बडे मोहम्मद खान खाँसाहेबांच्या नावाशी ही परंपरा जाऊन भिडते.
त्यांच्या गायकीतला जोश आणि ओज जसराजांनी टिकवला.
बंदिशींच्या साहित्यिक अंशाकडे आणि काव्यगुणांकडे अधिक लक्ष पुरविण्यावरही त्यांचा भर होता.
हवेली संगीत आणि पुष्टीमार्गी रचनांना त्यांनी या रागदारी संगीताच्या परिघात आणलं.
काही मोजक्या रागांवर रियाझ मारून मैफल कब्जात घेण्याचा काही कलाकारांचा खाक्या असतो, जसराजांचं तसं नव्हतं.
त्यांना अनेक राग अवगत होते.
सुरुवातीला त्यांच्या गायनातून अमीर खाँसाहेबांचा भास होत असे.
विशेषतः आवाजाचा लगाव आणि विलंबित ख्यालाची लय ऐकून.
पण त्यासंबंधी प्रताप नारायण वेगळाच मुद्दा सांगत.
त्यांच्या वडिलांचं, म्हणजे मोतीरामांचं वास्तव्य इंदौरला असे.
मोतीरामांना शामीर खान हे सारंगीवर साथसंगत करीत.
हे शामीर म्हणजे अमीर खाँसाहेबांचे वडील.
मोतीरामांना साथ करताना शामीर खान यांनी मोतीरामांचं गाणं उचललं आणि ते अमीर खानना शिकविलं, असं प्रताप नारायण म्हणत.
जसराजांचं सुरुवातीचं म्हणजे १९६० ते १९७०च्या दशकातलं गाणं आणि अमीर खान यांच्या गाण्यातलं साम्य या साथसंगतीमुळे आहे, असा त्यांचा दावा होता.
संगीताच्या दुनियेत दावे आणि प्रतिदावे यांना खरोखरच अंत नसतो.
जसराज 'मेरो अल्ला मेहेरबान' (भैरव), 'अजब तेरी दुनिया' (दरबारी) वगैरे सूफी रचना तन्मयतेने गात असत.
सादरीकरणातल्या लालित्यामुळे त्यांचं गाणं सर्वसामान्य श्रोत्याला भावत असे.
आपल्या व्यक्तिमत्त्वाभोवती आध्यात्मिकतेचं एक आवरण विणणं संगीतकारांना अत्यावश्यक वाटतं.
जसराज हे साणंदच्या जयवंतसिंगांचे भक्त होते.
कला आणि कलासंगीत हे स्वायत्त असतं.
किंबहुना तसं असलं पाहिजे.
त्यांना दिखाऊ अध्यात्माचा टेकू लावण्याची गरज काय?
दिखाऊ अथवा प्रदर्शनी अध्यात्म म्हणजे एक 'मार्केटिंग' तंत्र आहे की काय अशी शंका घेण्यास यातून वाव मिळतो.
जसराजांच्यासमोर ओंकारनाथ ठाकूरांचा आदर्श असावा.
विशेषतः उत्तरायुष्यात त्यांच्यासमवेत चार तंबोरे, हार्मोनियम, व्हायोलिन, गायनसाथ देणारा शिष्यवर्ग यांचा भलामोठा ताफा मंचावर उपस्थित असे.
त्यामुळे हे एकल गायन आहे की समूहगायन आहे, असा संभ्रम निर्माण होत असे.
त्यांचा शास्त्रांचा अभ्यास चांगलाच होता.
मुकुंद लठ या विद्वान संस्कृती-अभ्यासकाच्या बरोबरीने त्यांनी शास्त्रांचा व्यासंग केला होता.
लठ हे त्यांचे शिष्यही होते.
काळबादेवीच्या बडा मंदिरचे श्याम गोस्वामी हेही एक व्यासंगी विद्वान त्यांच्या मित्रपरिवारात होते.
त्यातूनच त्यांची 'जसरंगी जुगलबंदी' ही संकल्पना निघाली असावी.
त्याला ते 'भविष्यकालीन संगीत' (म्युझिक ऑफ द फ्युचर) म्हणत.
परंतु एका वेळी एका मुखातून एकाच रागाचा आस्वाद घेण्याची श्रोत्यांना मुख्यतः आवड असते.
शेकडो वर्षांची ही सवय बदलणं आणि मोडणं अवघड असतं.
जसराजांच्या गाण्यातून भावगीत किंवा गजलसारख्या गीतप्रकारांमध्ये शोभणाऱ्या मुरक्या आणि हरकतीही डोकावत असत.
त्यामुळे कृतकभाव अधिक प्रमाणात दिसत असल्याची टीकाही त्यांच्यावर होत असे.
कला रामनाथसारखी आघाडीची व्हायोलिनवादक त्यांची शिष्या बनली.
'छायानट रागातली 'प'पासून सुरू होणारी आणि 'रे'वर विसावणारी मिंड किती सूक्ष्मपणे घेता येते, ते गुरुजी तासन् तास समजावून सांगत असत', असं ती सांगते.
स्वतःच्या कार्यक्रमांमध्ये मश्गुल राहणाऱ्या कलाकारांना इतरांना शिकवायला कुठे वेळ असतो?
पण जसराजांनी संजीव अभ्यंकर, प्रीतम भट्टाचार्य, रमेश नारायण, अंकिता जोशी, गौतम काळे वगैरे तरुणांना तयार केलं.
चंद्रशेखर स्वामी, गिरीश वझलवार आणि परेश नायक हे तर त्यांचे ज्येष्ठ शिष्य.
तरुण कलाकारांचं कौतुक करण्याची उदार वृत्ती त्यांच्यापाशी होती.
कलाकारांना एखाद्या तत्त्वासाठी राजकारण्यांच्या विरोधात उभं राहण्याची इच्छा नसते.
परंतु प्रसंगी जसराजांनी हेही धैर्य दाखवलं, हे नमूद करायला हवं.
१९९०च्या दशकात मुंबईत 'महानगर' या वृत्तपत्राच्या कचेरीवर शिवसैनिकांनी हिंसक केला.
त्याचा निषेध म्हणून शिवसेना भवनसमोर निदर्शनं करण्याची हिंमत देशभरातल्या पत्रकारांनी दाखवली होती.
जसराज या निदर्शनात सहभागी झाले होते, हे विशेष!
अत्यंत ममताळू पिताही त्यांच्यात दडलेला होता.
अन्यथा कॉलेज शिक्षणात गुंतलेल्या आपल्या अंकितासारख्या शिष्येला परीक्षेच्या दूरवरच्या केंद्रावर जातीने सुरक्षितपणे सोडायला कोणता गुरू जाईल?
असे अनेक रंग त्यांच्या रंगतदार व लोभस व्यक्तिमत्त्वात सामावले होते.
...(लेखक ग्वाल्हेर घराण्याचे गायक/लेखक आहेत.
)
नवी दिल्लीः काँग्रेससह विरोधी पक्षांनी pm cares fund वर प्रश्न उपस्थि केलेत.
आता माहिती अधिकाराच्या (RTI) अंतर्गत या फंड संदर्भात पंतप्रधान कार्यालयाकडून (PMO) माहिती मागवण्यात आली होती.
त्यावर पीएमओने उत्तर दिलंय.