text large_string |
|---|
पुणे, 15 नोव्हेंबर : पुणे जिल्ह्यातील पेरणे फाटा (ता. हवेली) येथे शिवबा संघटनेचे पदाधिकारी गोविंद भिवाजी कुमकर (वय 40) यांच्यावर आज सकाळी अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला व अपहरण करून त्यांचा खून केला. लोणीकंद पोलिसांनी हल्ला, अपहरण आणि खूनप्रकरणी पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी सुषमा गोविंद कुमकर यांनी फिर्याद दिली असून याबाबत लोणीकंद पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आज सकाळी दहाच्या सुमारास गोविंद कुमकर हे घरातून बाहेर पडून पेरणेफाटा येथे पुणे-नगर रस्त्यालगत संतकृपा कॉम्प्लेचे समोर आले होते. त्यावेळी अचानक अज्ञात चार ते पाच हल्लेखोरांनी त्यांच्यावर सशस्त्र हल्ला चढवला. तसेच स्कॉर्पियो जीपमधून त्यांचे अपहरणही केले. भरदिवसा अचानक घडलेल्या या घटनेने परिसरात घबराट उडाली. घटनास्थळी उभी असलेली त्यांची होंडा सिव्हीक मोटार (क्र. एम. एच. 12जी. के. 8176), संतकृपा बिल्डींगमध्ये जाणाऱ्या पायऱ्यांवर सांडलेले रक्त, हातावरील घड्याळ, एक चष्मा, व एक मोबाईल या साहित्यासह पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहे. पोलिसांनी पाच संशयितांना तपासासाठी ताब्यात घेवून तपास पथकेही तयार केली आहेत. या हल्ल्यामागे नेमके कोण व हल्लेखोरांचा काय उद्देश होता, याचा पोलीस पथक शोध घेत आहे. दरम्यान सायंकाळी उशिरा कुमकर यांचा मृतदेह वाडेबोल्हाई गावच्या पुढे पिंपरी सांडस परिसरात वनविभागाच्या हद्दीत आढळून आला. अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हनुमंत पडळकर हे करत आहेत. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर. |
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दोन वर्षांत देशाचा चौफेर विकास होत आहे, असा दावा लोक जनशक्ती पक्षाचे प्रमुख व केंद्रीय अन्नपुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी शनिवारी येथे केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दोन वर्षांत देशाचा चौफेर विकास होत आहे. केवळ उच्च जातीच्या किंवा उच्चशिक्षित माणसालाच नव्हे, तर तळागाळातील आणि वंचितांनाही विकासाची संधी मिळत आहे, असा दावा लोक जनशक्ती पक्षाचे प्रमुख व केंद्रीय अन्नपुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी शनिवारी येथे केला. त्याचवेळी देशातील आरक्षण आणि रेशन व्यवस्था कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नसल्याचे पासवान यांनी स्पष्ट केले. मोदी सरकारच्या दोन वर्षांतील कामगिरीची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आयोजित 'विकास पर्व' मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय उद्योग राज्यमंत्री गिरिराज सिंह व भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस भूपेंद्रसिंह यादव, आमदार अमल महाडिक प्रमुख उपस्थित होते. मेळाव्यास भाजप व पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाचे कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. यावेळी महेश मोरे, दीपक काटकर, युवराज खंडागळे व संतोष गुरव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांनी स्वागत केले. व्यासपीठावर भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके, ज्येष्ठ नेते बाबा देसाई, महेश जाधव, लोक जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शमीम हवा, पश्चिम महाराष्ट्रप्रमुख प्रमोद कुदळे, मुंबई प्रदेशाध्यक्ष रवी गरुड, काका खंबाळकर व शेतकरी संघटनेचे भगवान काटे प्रमुख उपस्थित होते. अशोक देसाई यांनी सूत्रसंचालन केले. |
जळगाव : अण्णासाहेब बेंडाळे प्रतिष्ठानची वार्षिक सभा ऑनलाईन नुकतीच उत्साहात पार पडली. ही सभा अण्णासाहेब बेंडाळे प्रतिष्ठानचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी संस्थेचे कोषाध्यक्ष शशिकांत वडोदकर, सचिव प्रा. अशोक राणे, प्राचार्य संजय भारंबे, प्रणिता झांबरे, चंद्रकांत भंडारी, प्राचार्य झोपे आदी उपस्थित होते. सुरुवातीला अण्णासाहेब बेंडाळे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नंतर वार्षिक सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. २०१९-२० वर्षाचा जमाखर्च, नफातोटा ताळेबंद मंजूर करण्यात आला. अण्णासाहेब बेंडाळे प्रतिष्ठानच्या पुढील वर्षाच्या कार्याची रूपरेषा ठरवण्यात आले. प्राचार्य डॉ. के. एम. पाटील यांनी प्रतिष्ठानला दिलेल्या देणगीतून साने गुरुजी व्याख्यानमाला निरंतर सुरू ठेवण्यात येईल याबाबत चर्चा झाली. प्राचार्य डॉ. गौरी राणे यांनी महाविद्यालयीन मुलींसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे या संदर्भात विचार मांडले. या सभेत कोषाध्यक्ष वडोदकर यांनी मार्गदर्शन केले. |
बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियावरून ती विविध सामाजिक कार्यात सहभागी होत असते. अनेकदा आयराला नेटकऱ्यांकडून ट्रोल केलं जातं. मात्र नेटकऱ्यांची बोलती कशी बंद करायची हे आयराला चांगलच ठाऊक आहे. नुकत्याच आयराने घेतलेल्या एका सेशनमध्ये तिला एका नेटकऱ्यानी विचित्र प्रश्न विचारला. नेटकऱ्याच्या या प्रश्नावर आयराने सडेतोड उत्तर दिलंय. आयरा अनेकदा तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून नेटकऱ्यांशी संवाद साधत असते. मानसिक आरोग्यासाठी ती जनजागृतीचं काम करते. यासंदर्भातील अनेक पोस्ट ती सोशल मीडियावर शेअर करते. सोमवारी आयराने इन्स्टाग्रामवर एक लाईव्ह सेशन घेतलं. यात तिने मला स्वतःबद्दल काय करावं हे सुचत नाहीय असा सवाल करत तुम्हाला काही माहित आहे का? असा सवाल केला होता. आयराने उपस्थित केलेल्या या मुद्द्यवर एक नेटकरी तिला म्हणाला, "तू तर आमिर खान सरांचा मुलगा आहेस ना?". नेटकऱ्याच्या या प्रश्नावर लगेचच आयराने त्याला उत्तर दिलंय. ती म्हणाली, " नाही मी त्यांची मुलगी आहे. पण हे जेंडर नाउन्स कशाला आहेत ? असं म्हणत लैंगिंक भेदभाव करणाऱ्या या नेटकऱ्याला आयराने उत्तर दिलंय. आयरा आमिर खानचा फिटनेस ट्रेनर नुपूर शिक्रेला डेट करतेय. यावरूनच या सेशनमध्ये एका युजरने तिला तुला मराठी येते का असा प्रश्न विचारला होता. यावर "नाही..पण मी समजू शकते" असं आयराने मराठीत उत्तर दिलंय. आयरा खान आमिर खानची मुलगी असली तरी तिला अभिनया क्षेत्रात येण्याची इच्छा नाही. हिंदूस्तान टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीत आयरा म्हणाली होती, "मला पडद्यामागे राहून काम करायला जास्त आवडतं. मला अभिनय क्षेत्रात येण्याची इच्छा नाही. मात्र एखादा अॅक्शन सिनेमा असेल तर मी तो नक्की करेल कारण त्यामुळे मला सर्व स्टंट शिकायला मिळतील. तसं तरी मी सिनेमा न करता ही स्टंट शिकू शकते नाही का?" असं म्हणत आयरा बॉलिवूडमध्ये तिला येण्याची इच्छा नसल्याचं सांगितलं आहे. |
भारतीय अंतराळ संशोधन संस्थे (इस्त्रो) मध्ये नोकरीची संधी आहे. इस्त्रोने वैज्ञानिक आणि इंजिनिअर पदासांठी अर्ज मागवले आहेत. इस्त्रोची अधिकृत वेबसाइट isro. gov. in वर या पदासाठी अर्ज करता येईल. 21 पदासांठी ही भरती आहे. अर्ज ऑनलाइन जमा करण्याची अंतिम तारीख 14 ऑक्टोंबर 2019 आहे व या पदासाठी 12 जानेवारी 2020 ला परिक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. 14 ऑक्टोंबर 2019 पर्यंत उमेदवाराचे वय हे 35 वर्षांपेक्षा अधिक नसावे. अनुसुचित जनजातीच्या उमेदवारांसाठी वयामध्ये 5 वर्षांची सुट आहे. ओबीसीसाठी 3 वर्षांची सुट आहे. अर्जासाठी तुम्हाला 100 रूपये भरावे लागतील. तसेच महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, माजी सैनिक, बेंचमार्क दिव्यांग आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी अर्ज शुल्कामध्ये सुट आहे. किमान वेतन 56100 रूपये आहे. उमेदवाराकडे बीई अथवा बीटेकची डिग्री असणे आवश्यक आहे. तसेच ग्रेज्युएशनमध्ये कमीत कमी 65 टक्के मार्क्स किंवा 6. 84/10 सीजीपीए असायला हवा. |
माणमध्ये सुरु असलेल्या वाळू उपशाबाबत एका स्थानिक वृत्तपत्राने सातत्याने आवाज उठवला होता. काही महिन्यांपूर्वी घडलेल्या कॉल रेकॉर्डिंग प्रकरणाची दखल घेत तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी तहसीलदार सूर्यकांत येवले यांची उचलबांगडी करत त्यांना साताच्यात नेमणुकीविना ठेवले होते. शिवाय याच प्रकरणात पाच तलाठ्यांवर ही निलंबनाची कारवाई झाली होती. वाकी येथील नदीपात्रात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार प्रांताधिकारी व पोलीस पथकाने कारवाई करत वाळू मफियांना रंगेहाथ पकडले होते. त्यावेळी माफिया तसेच तहसीलदार, निलंबित तलाठी यांच्यात वाहने सोडण्याबाबत व देण्या घेण्याबाबत झालेल्या संभाषणाच्या ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्या होत्या. त्यावेळी याबाबत खुलासा न देता आल्याने येवले यांनी 'उचलबांगडी करण्यात आली होती. हाच प्रश्न विधानसभेत उपस्थित झाला होता. काही महिन्यांनी येवले परत माण तालुक्यात रुजू झाले होते. त्यामुळे वाळू माफिया खुश होते. पुन्हा उपसा देखील सुरू झाला होता. याच दरम्यान सरकार बदलले आणि नवे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशी अहवालानुसार येवले यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. |
भुसावळ (प्रतिनिधी) :- महिलेस अश्लील शिविगाळ केल्याप्रकरणी रीपाइं आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशीसह दीपक सूर्यवंशी व सोबतच्या अन्य तिघा अनोळखींविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. २७ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास निधी गौरव वाघ शारदा बिल्डींग, शिवाजी नगर, भुसावळ,त्यांच्या सासू रेखा वाघ व जेठाणी नेहा नितीन वाघ यांना संशयीत आरोपींनी अश्लील शिवीगाळ करीत फिर्यादीच्या पतीला जिवंत ठार मारण्याची धमकी दिली. फिर्यादीचे पती गौरव वाघ हे प्रभागात चांगले काम करतात व ते सूर्यवंशीविरुद्ध उभे राहतील या कारणावरून आरोपींनी अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तपास भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे एएसआय अनिल अडकमोल हे करीत आहे. |
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात काही महिन्यांपूर्वी ब्राह्मोस मिसाईलचे मिसफायर झाले होते. या प्रकरणी हवाई दलाने मोठी कारवाई केली आहे. हवाई दलाच्या तीन अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. या तीन अधिकाऱ्यांमध्ये ग्रुप कॅप्टन, एक विंग कमांडर आणि एक स्क्वाड्रन लीडर यांचा समावेश असल्याची माहिती आहे. ९ मार्च २०२२ रोजी चुकीमुळे भारतामधून पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात ब्राह्मोस मिसाईल गेले होते. याप्रकरणी पाकिस्तानकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तपास पथक नेमण्यात आले होते. दरम्यान, पाकिस्तानच्या हद्दीत ब्राह्मोस मिसाईल गेल्याप्रकरणी तीन अधिकारी दोषी आढळले असून त्यांच्यावर हवाई दलाकडून कारवाई करण्यात आली आहे. कारवाई करण्यात आलेल्या तीन अधिकार्यांची सेवा केंद्र सरकारने तात्काळ संपुष्टात आणली आहे. २३ ऑगस्ट रोजी या अधिकार्यांना पदावरून काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे हवाई दलाच्या पत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे. ब्रम्होस मिसफायर घडले, त्यावेळी संरक्षण मंत्रालयाने ती घटना अत्यंत खेदजनक असल्याचे म्हटले होते. त्यानंतर घटनेची सखोल चौकशी सुरू करण्यात आली होती. हे ही वाचाः जागतिक वडापाव दिनः मुंबईची ओळख असणाऱ्या वडापावचा जन्म कसा झाला झाला? डान्सर सपना चौधरीला होणार अटक? ९ मार्च २०२२ रोजी संरक्षण दलाच्या हरियाणा येथील तळावरून ब्राह्मोस मिसाईल थेट पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात गेले होते. या घटनेनंतर पाकिस्तानमधून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी देखील या घटनेची दखल घेतली होती. |
धुळे : दर सोमवारी विद्याथ्र्यासोबत सेल्फी घेऊन ती माहिती शासनाला सादर करण्याच्या निर्णयाविरोधात प्राथमिक शिक्षण विभागाच्या 18 संघटनांबरोबरच माध्यमिक शिक्षण विभागाच्या 11 संघटनाही एकवटल्या आहेत. शैक्षणिक गुणवत्तेवर होणारे परिणाम व इतर परिणामांचा विचार करता या निर्णयावर बहिष्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात रविवारी नकाणे रोड येथे आयोजित शिक्षण क्षेत्र संघटना समन्वय समितीच्या बैठकीतही सेल्फीच्या संदर्भात सविस्तर चर्चा झाली. या वेळी माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ, माध्यमिक शिक्षक संघ, कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघ, शिक्षक परिषद, शिक्षकेतर कर्मचारी संघ, शिक्षक लोकशाही आघाडी, द. आ. पु. शिक्षक संघ, ओबीसी शिक्षक सेल, क्रीडा शिक्षक संघ, कला अध्यापक संघ, विज्ञान अध्यापक संघ आदी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी वि. मा. भामरे, एस. बी. गोसावी, डी. के. पवार, विजय बोरसे, बी. डी. भदोरिया, विलासराव पाटील, डी. बी. साळुंखे, प्रा. डी. पी. पाटील, प्रा. प्रदीप दीक्षित, एस. डी. मोरे, आर. आर. साळुंखे, आर. बी. अमृतकर, देवानंद ठाकूर, पी. जी. साळुंके, महेश मुळे, के. सी. साळुंखे आदी उपस्थित होते. राज्यातील प्रत्येक शाळेचा विचार केला असता आदिवासी, दुर्गम भागातील तसेच अपुरे तंत्रज्ञान आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीच्यावेळी तांत्रिक अडचणी येऊ शकतात. तसेच शाळेतील मुलींच्या पालकांचा याला विरोध आहे. यामुळे दैनंदिन अध्यापन आणि विद्याथ्र्याच्या गुणवत्तावाढीवर फार मोठा दुष्परिणाम होणार आहे. त्यामुळे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रम या निर्णयावरसुद्धा दुष्पपरिणाम होणार आहे. यामुळे वेळेचा अपव्यय आहे. गुणवत्ता विकासाकडे दुर्लक्ष होणार आहे. शिक्षणाच्या मुख्य हेतुलाच हारताळ फासला जाऊ शकतो. शिक्षकांकडे सध्या शिक्षकांकडे अशैक्षणिक कामे जास्त आहेत. ग्रामीण भागात नेटचा प्रॉब्लेम आहे. सोमवारी महत्त्वाचा अध्यापनाचा वेळ वाया जाणार आहे. या आदेशाच्या अंमलबजावणीच्यावेळी येणाःया सर्व जाचक अडचणींचा विचार करता कोणीही सेल्फी काढू नये. या उपक्रमात कोणत्याही शाळेने, मुख्याध्यापकांनी, शिक्षकांनी सहभागी न होण्याचे आवाहन समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले. |
खासदार राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांचा व्हायरल झालेला व्हिडिओ स्वतःच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. गया - बिहारमधील गया येथे रेल्वेच्या परीक्षेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी केलेले आंदोलनाला अधिकच हिंसक वळण लागले होते. हजारो विद्यार्थ्यांनी गया जंक्शन येथे जमा होत तीव्र आंदोलन केले. तसेच आंदोलक विद्यार्थ्यांनी सुरुवातीला गया जंक्शनवर उभ्या असलेल्या श्रमजीवी एक्स्प्रेसवर आणि पोलिसांवरही दगडफेक केली. तत्पूर्वी विद्यार्थ्यांनी रेल्वे ट्रॅकवर चक्क राष्ट्रगीत म्हटले. प्रजासत्ताक दिनादिवशीच संतप्त विद्यार्थ्यांनी हे आंदोलन पुकारले होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. खासदार राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांचा व्हायरल झालेला व्हिडिओ स्वतःच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. तसेच, प्रजासत्ता दिनी ही घटना घडल्याने राहुल यांनी व्हिडिओसोबत तसेच कॅप्शन दिले. आपल्या अधिकारांबाबत आवाज उठविण्यासाठी प्रत्येक युवक स्वतंत्र आहे. जे विसरले आहेत, की भारत लोकशाहीचा देश आहे. प्रजासत्ताक होता, प्रजासत्ताक आहे. . . असे ट्विट राहुल यांनी केले आहे. जो भूल गए हैं, उन्हें याद दिला दो कि भारत लोकतंत्र है, करीमगंज रेल्वे स्थानकावर जमलेल्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी लाठीमार करून पांगवले. त्यामुळे, संतप्त विद्यार्थ्यांनी स्टेशनवर आधीपासून उभ्या असलेल्या एका ट्रेनच्या डब्यांना आग लावली. गया जंक्शनवर गोंधळ घातल्यानंतर या विद्यार्थ्यांनी करीमगंजजवळ आधीपासून उभ्या असलेल्या रिकाम्या ट्रेनला लक्ष्य केले. त्यामध्ये ट्रेनचे काही डबे जळाले. दरम्यान घटनेचे गांभीर्य लक्षात आल्याने जिल्हा पोलीस आणि रेल्वे पोलिसांनी मोर्चा सांभाळला आहे. आंदोलनकर्ते विद्यार्थी सातत्याने रेल्वेच्या परीक्षेत गडबड झाल्याचा आरोप केला. यावेळी, पोलिसांकडून आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. |
मुंबई : अंबानीं यांच्या घराबाहेर ठेवण्यात आलेल्या स्फोटकाप्ररकणी अटकेत असलेल्या सचिन वाझेने लिहिलेल्या पत्रावरुन एकच खळबळ उडाली होती. आता या प्रकरणी भाजपा नेते आणि खासदार यांनी एक भविष्यवाणी वर्तवली आहे. शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांना एनआयए उचलून नेणार, असं विधान नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. सचिन वाझेच्या लेटर बॉम्ब प्रकरणी अनिल परब यांची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. मात्र वाझेच्या पत्रानंतर आपण स्वतः चौकशीला तयार आहोत, असे परब यांनी पत्रकार परिषद घेऊन आधीच जाहीर केले होते. मात्र यावर नारायण राणे यांनी राज्यपालांच्या परवानगीने अनिल परब यांची चौकशी होईल असे विधान त्यांनी केले आहे. ते पत्रकार परिषदेत म्हणाले की, अनिल परब यांना एनआयए तपासासाठी घेऊन जाईल. एनआयएकडून फक्त राज्यपालांची परवानगी घेतली जाईल. अनिल परब चौकशीला तयार नसतील तर ते त्यांना उचलून नेतील, असं विधान राणे यांनी केलं आहे. त्यामुळे देशमुख यांच्यापाठोपाठ परब यांचीही चौकशी होणार का? , अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. |
हार-जीत हा कोणत्याही खेळाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे कोणत्याही स्पर्धात्मक खेळात यशाची चव चाखतांना अपयशही पचवायला शिकले पाहिजे असा सल्ला आ. आशुतोष काळे यांनी दिला. कोपरगाव तालुक्यातील सांगवी भुसार येथे जय बजरंग स्पोर्ट क्लबच्या यांच्या वतीने आयोजित डे नाईट ढकली व्हॉलीबॉल स्पर्धेचे उदघाटन आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महानंदचे माजी संचालक राजेंद्र जाधव, विजयराव जाधव, भास्करराव बगाटे, वसंतराव देशमुख, बाळासाहेब कासार, प्रशांत मोरे, अशोकराव जाधव, रोहिदास शिंदे, भाऊसाहेब शिंदे, विजयकुमार जाधव,अण्णासाहेब बगाटे आदी मान्यवर उपस्थित होते. आ. काळे म्हणाले, खेळात यश-अपयश येणारच. यशाचे वाटेकरी अनेक असतात मात्र अपयशाची जबाबदारी कोणीच घेत नाही. त्यामुळे अपयश आल्यावर आपल्या सभोवताली असलेली गर्दी देखील कमी होते. अशावेळी न डगमगता यश मिळविण्याचा खेळाडूंनी पुन्हा प्रयत्न केल्यास हमखास यश मिळत. त्यामुळे अपयश आले तरी यश मिळविण्यासाठी अपयश पचवायला शिका असे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले. यावेळी भाऊसाहेब जाधव, ठकणराव शिंदे, शिवाजीराव गायकवाड, विलास कासार, सुनील बेंद्रे, प्रल्हाद थोरात, सिताराम जाधव, दिलीप गायकवाड, किशोर जाधव, अण्णासाहेब शिंदे, राजेंद्र वाबळे, साहेबराव जाधव, जगदीश जाधव, भीमराज गायकवाड, सरपंच रमेशराव आहेर, उपसरपंच मोहन कासार, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक महेश काळे आदी मान्यवरांसह ग्रामस्थ खेळाडू व व्हॉलीबॉल शौकीन प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वारी पुलाचा प्रश्न प्रलंबित होता. अडचणी दूर करण्यात यश मिळाल्यामुळे वारी पुलासाठी 20 कोटी रुपये निधी आणला. सुरेगाव-सांगवी पुल करणार असल्याचा शब्द दिला आहे. वारी गावच्या पुलासाठी रस्त्याची दरजोन्नती करण्यात यश आले त्याच धर्तीवर सुरेगाव सांगवी पूल होण्यासाठी कोळपेवाडी- कोळगावथडी- सुरेगाव-सांगवी या रस्त्याची दरजोन्नती करून सुरेगाव सांगवी पूल निर्मितीसाठी प्रयत्नशील आहे. |
मॅच सुरू असताना त्याची प्रकृती खालावली. त्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तेथे तपासणीत त्याला व्हायरल इन्फेक्शन झाल्याचं समोर आलं. त्यानंतर रात्रभर हॉस्पिटलमध्येच राहण्याचा सल्ला देण्यात आला होता. मॅच सुरू असताना त्याची प्रकृती खालावली. त्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तेथे तपासणीत त्याला व्हायरल इन्फेक्शन झाल्याचं समोर आलं. त्यानंतर रात्रभर हॉस्पिटलमध्येच राहण्याचा सल्ला देण्यात आला होता. औरंगाबाद : खोटी केस का केली विचारल्यावर जोरदार भांडण, अन् जबरदस्तीने औषध पाजत.. नवी दिल्ली, 01 ऑक्टोबर : क्रिकेटविश्वातील एक धक्कादायक गोष्ट पाकिस्तानविरुद्ध इंग्लंड या मॅचमध्ये पाहायला मिळाली. कारण ही मॅच सुरू असतानाच पाकिस्तानच्या एका खेळाडूला मैदानातून थेट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. हैदर अली असं या खेळाडूचं नाव आहे. या प्रकारानंतर मात्र पुन्हा एकदा खेळाडूंच्या फिटनेसबद्दल चर्चा सुरू झाली असून, टी-20 वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धा सुरू होण्यापूर्वी पाकिस्तानच्या टीमला बसलेला हा मोठा धक्का मानला जातोय. पाकिस्तानच्या टीमवर मोठं संकट आलंय. इंग्लंडविरुद्धच्या सहाव्या टी-20 मॅचदरम्यान पाकिस्तानचा खेळाडू हैदर अलीची प्रकृती इतकी बिघडली की, त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. अलीची प्रकृती आधीच थोडी खराब होती. त्यानंतरही त्याला टीममध्ये घेण्यात आलं. मॅच सुरू असताना त्याची प्रकृती खालावली. त्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तेथे तपासणीत त्याला व्हायरल इन्फेक्शन झाल्याचं समोर आलं. त्यानंतर अलीला रात्रभर हॉस्पिटलमध्येच राहण्याचा सल्ला देण्यात आला होता. हैदर अलीला जी मॅच सुरू असताना हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आलं ती पाकिस्तानची टीम हरली. प्रथम बॅटिंग करताना पाकिस्तानने 6 विकेट गमावत 169 धावा केल्या. पाकिस्तानने या मॅचमध्ये त्यांचा स्टार बॅट्समन मोहम्मद रिझवानला विश्रांती दिली आणि त्याच्या जागी पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझमसोबत मोहम्मद हरिस ओपनिंगला आला. पण पाकिस्तानची सुरुवात अत्यंत खराब झाली. टीमचे 15 रन असतानाच हरिस आणि शान मसूदच्या विकेट पडल्या. यानंतर बाबरला हैदरची साथ मिळाली, पण दोघांची भागीदारी फार काळ टिकली नाही. हैदरला केवळ 18 रन करता आल्या, तर बाबरने 87 धावांची खेळी केली, आणि 20 ओव्हरमध्ये पाकिस्ताननं 169 रन करीत इंग्लंडसमोर 170 रनांचं लक्ष्य ठेवलं. हे वाचा - वर्षभरात 5 टी20, वर्ल्ड कपमधूनही आऊट, बुमराचं स्ट्रेस फ्रॅक्चर म्हणजे नक्की काय? इंग्लंडने हे लक्ष्य 2 विकेट गमावत व 33 बॉल शिल्लक असतानाचा सहज पूर्ण केलं, व इंग्लंडने 7 सामन्यांच्या सीरिजमध्ये 3-3 अशी बरोबरी साधली. इंग्लंडचा फलंदाज फिल सॉल्टने स्फोटक बॅटिंग केली, त्याने 41 बॉलमध्ये 13 चौकार आणि 3 षटकार मारत 88 धावा केल्या. पाकिस्तानी टीममधील हैदर अलीशिवाय नसीम शाह याचीही तब्येत खराब आहे. नसीमला कोरोना झाला असून तो इंग्लंडविरुद्धच्या सीरिजमधून बाहेर पडला आहे. त्याला या पूर्वी न्यूमोनिया झाला होता, त्यातून तो सावरण्यापूर्वीच त्याला कोरोनानं गाठले. दरम्यान लवकरच टी-20 वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धा सुरू होत आहे. त्यातच पाकिस्तानच्या टीमला एका पाठोपाठ एक धक्के बसत आहेत. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर. |
अनुक्रमें केकिरव, सुदन्त, प्रियंवदा, द्रुतपदा, ऋषभ, मत्तेभविक्रीडित आणि महास्रग्धरा हीं वृत्ते सिद्ध झाली आहेत. प्रथमाक्षराप्रमाणेच अितरत्रहि अका गुरूच्या ठिकाणी दोन लघू घालून अपेन्द्रवज्रा, अिन्द्रवंशा, वंशस्थ, शार्दूलविक्रीडित आणि स्वागता या वृत्तांपासून अनुक्रमें कोल, लक्ष्मी, सद्रत्नमाला आणि चन्द्रवर्त्म हीं वृत्ते सिद्ध झालीं आहेत. ( २ ) अलटपक्षी, प्रमिताक्षरा नि द्रुतविलम्बित यांच्या आरम्भींचे दोन लघू, आणि शिखरिणींतील अपान्त्य दोन लघू, यांच्या ठिकाणीं अकओक गुरु घालून अनुक्रमें अत्थापनी, अच्युत आणि प्रवरललिता हीं वृत्ते सिद्ध झालीं आहेत. ( ३ ) जिन्द्रवज्रा, अपेन्द्रवज्रा, स्वागता, कनकप्रभा, आणि वसन्ततिलका यांच्या अन्त्याक्षरापूर्वी अंक लघु वाढविल्याने अनुक्रमें अिन्द्रवंशा, वंशस्थ, यूथिका, कमलिनी आणि मृदङ्ग हीं वृत्ते सिद्ध होतात. (४) रथोद्धता, स्वागता नि प्रमिताक्षरा यांच्या आरम्भी दोन लघु वाढविल्याने अनुक्रमें कनकप्रभा, कुटजा नि प्रमदा हीं वृत्तें सिद्ध होतात. ( ५ ) रथोद्धता, शालिनी नि यूथिका यांच्या आरम्भी अंक गुरु वाढविल्याने अनुक्रमें ललिता, वैश्वदेवी नि अभ्रक हीं वृत्तें सिद्ध होतात. ( ६ ) रुचिरा, पृथ्वी नि कुटिलगति यांच्या अन्तीं अक गुरु वाढविल्याने अनुक्रमें रुक्मिणी, रतिलीला नि नन्दीमुखी हीं वृत्तें होतात. ( ७ ) प्रियंवदा, द्रुतपदा, स्वागता, मङ्गला या वृत्तांत पाचवें अक्षर लघु आह तें गाळल्याने अनुक्रमें 'अभीष्ट, ' 'लङ्का,' मणिराग, "प्रगुणीकृता' ह्रीं वृत्तें सिद्ध होतात. ८ ) कित्येक वृत्ते अितर वृत्तांचे विभाग जोडून सिद्ध होतात. ( -) वा (-----) आणि ( ~ ( - ) वा ( १ ) यांच्या जोडणीने आणि केव्हा केव्हा या जोडणीला (--), (~-~~-~-) आणि (--) यांच्यापैकी अखादा गण शेवटीं जोडून कितीतरी वृत्ते झालीं आहेत ! |
मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि गुजरात येथील जिज्ञासूंना कृतीप्रवण करणारे ऑनलाईन 'गुरुप्राप्ती शिबिर' चैतन्यमय वातावरणात पार पडले ! मुंबई - ईश्वराचे पृथ्वीवरील सगुण साकार रूप म्हणजे श्रीगुरु ! कुठल्याही मार्गाने साधना करत असतांना गुरुकृपेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. 'गुरुविण नाही दुजा आधार । ' जसे लोखंडाला परिसाचा स्पर्श झाल्यावर त्याचे सोने होते, तसे गुरु जीवनात आल्यावर साधक किंवा शिष्य यांचे जीवन आमूलाग्र पालटते. शिष्याच्या जीवनातील असमाधान आणि दुःख दूर होऊन त्याच्या जीवनामध्ये आनंद, तसेच भक्तीचा ओलावा निर्माण होतो. अशा थोर गुरूंप्रती आपण कृतज्ञता व्यक्त करावी तेवढी थोडीच आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला समजलेली साधना आणि मिळालेले ज्ञान अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवणे, हीच गुरुतत्त्वाप्रतीची खरी कृतज्ञता आहे. त्यासाठी सर्वांनी गुरुपौर्णिमेनिमित्त समष्टी साधनेत खारीचा नव्हे, तर सिंहाचा वाटा उचलूया, असे चैतन्यमय मार्गदर्शन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु. ) अनुराधा वाडेकर यांनी केले. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यांसह गुजरात राज्यातील जिज्ञासूंसाठी गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित ऑनलाईन 'गुरुप्राप्ती शिबिरा'त त्या मार्गदर्शन करत होत्या. या शिबिराचा एकूण २५१ जिज्ञासूंनी लाभ घेतला. या वेळी काही जिज्ञासू आणि 'सनातन प्रभात'चे वाचक यांनी ते करत असलेल्या साधनेच्या प्रयत्नांविषयी मनोगत व्यक्त केले. सनातन संस्थेच्या गुजरातमधील साधिका सौ. ऋचा सुळे यांनी विहंगम प्रसाराची विविध माध्यमे आणि सत्सेवेविषयीच्या सूत्रांविषयी उपस्थितांना अवगत केले. शिबिराचे सूत्रसंचालन सनातन संस्थेच्या सौ. सोनाली पोत्रेकर यांनी केले. जिज्ञासूंचे अनुभवकथन ! १. श्री. गिरीश ढवळीकर, पनवेल - नामजप आणि सेवा यांमधील साधनेची पातळीही समजली. सद्गुरु (कु. ) अनुराधाताईंचे मार्गदर्शन ऐकल्यावर अधिक सेवारत होण्यासाठी उत्साह वाढला. असे सत्संग आणि सद्गुरूंचे मार्गदर्शन सतत लाभल्याने साधना मार्गावर अधिक पुढे जाता येईल, हे जाणवले. २. सौ. मीना वास्के, ठाणे - माझ्या संसारात, तसेच साधनेत पुष्कळ अडचणी होत्या; पण नामजप आणि सेवा केल्यामुळे त्या अडचणी कशा सुटल्या, हे कळलेच नाही. ३. सौ. श्रद्धा विजय नारकर, मीरा रोड, पालघर - सध्याच्या कठीण परिस्थितीत मनाची स्थिरता कशी ठेवायची, ते मी सत्संगातून शिकले. याविषयी मी घरातील सगळ्यांना सांगितले. त्यामुळे मनःस्थिती स्थिर होती आणि देवावरची श्रद्धा अधिक दृढ झाली. ४. सौ. तन्वी कानडे, परळ, मुंबई - मार्गदर्शन ऐकून सेवेची गोडी निर्माण झाली आहे. मी प्रतिदिन सेवा करण्याचे नियोजन केले आहे. ५. सौ. मीरा डिचोलकर, मुलुंड, मुंबई - गेल्या वर्षीच्या दळणवळण बंदीच्या काळात मी सनातनशी जोडले गेले. सध्या मी सामाजिक संकेतस्थळाच्या माध्यमातून प्रसार आणि समाजात साधना सांगणे अशा सेवा चालू केल्या आहेत. माझी मुलगीही सनातनच्या वतीने घेण्यात येणारे बालसंस्कारवर्ग ऐकते. ती तिच्या मैत्रिणींना 'सनातन चैतन्यवाणी एप' डाऊनलोड करायला सांगते. मुलीच्या वाढदिवसाच्या दिवशी आम्ही सनातनची 'संस्कार वही' भेट म्हणून दिली. त्यामुळे काही जण स्वतःहून वह्यांची मागणी देत आहेत. ६. सौ. सरिता लोखंडे, ऐरोली, नवी मुंबई - सनातनच्या वतीने घेण्यात येणारी 'ऑनलाईन' प्रवचने आणि कार्यक्रम यांचे निमंत्रण मी माझ्या नातेवाइकांना पाठवते. 'त्यातून उपयुक्त माहिती मिळाली', असे अनेकांनी कळवले. |
बदलापूर : राज्य सरकारने लागू केलेला लॉकडाऊन अधिक कडक करण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर बदलापूर पालिकेने घेतला आहे. पालिकेच्या या निर्णयाला जिल्हाधिकाऱ्यांनीही शुक्रवारी रात्री उशिरा मंजुरी दिली. आमदारांसोबत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत मेडिकल स्टोअर, बँक आणि रुग्णालय सेवा वगळता सर्व अत्यावश्यक सेवा या आठवडाभर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी शनिवारपासून सुरू झाली. एकीकडे राज्य सरकार नागरिकांना कमीत कमी त्रास होईल त्या अनुषंगाने लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणत नवनवीन प्रयोग करीत आहे, तर दुसरीकडे बदलापुरातून कोरोना हद्दपार करण्याच्या उद्देशाने पालिका प्रशासनाने शहरात कडक लॉकडाऊन करण्याच्या अनुषंगाने प्रयत्न सुरू केले आहेत. शनिवारपासून पुढील सात दिवस शहरात कडक लॉकडाऊन असेल. नागरिकांना घरातच राहण्याचा सल्ला प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. बदलापूर शहरात लॉकडाऊन लागावा यासाठी आमदार किसन कथोरे यांनी पालिका सभागृहात सर्वपक्षीय सदस्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत लॉकडाऊन संदर्भातील निर्णय घेऊन प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला होता. या निर्णयाला जिल्हाधिकार्यांनीही समर्थन दर्शवीत बदलापुरात कडक लॉकडाऊन जाहीर केला. लॉकडाऊनसाठी कथोरे यांनी पुढाकार घेतल्याने इतर पक्षांनी मात्र आता या कडक लॉकडाऊनला विरोध करण्यास सुरुवात केली आहे. कडक लॉकडाऊनमुळे नागरिकांचे हाल होणार असल्याचे मत शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी व्यक्त केले आहे. हे लॉकडाऊन रद्द करावे, या मागणीसाठी म्हात्रे यांनी शनिवारी पालिका सभागृहात ठाण मांडून आपला निषेध व्यक्त केला, तर पोलिसांनी लॉकडाऊनच्या अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. |
पुणे, दि. २९ (पीसीबी) - लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणारे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या खांदयावर आता पुण्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजते. पालकमंत्री गिरीश बापट खासदार म्हणून निवडून आल्याने हे पद रिक्त झाले आहे. या पदावर मंत्री पाटील यांची वर्णी लागण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवली जात आहे. पुणे जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा बालेकिल्ला मानला जातो. आगामी विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यातून जास्तीतजास्त आमदार निवडून आणण्याची रणनिती भाजपने आखली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला शह देण्यासाठी पाटील यांच्याकडे पालकमंत्रीपद दिले जाऊ शकते. लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोर भाजपने कडवे आव्हान उभे केले होते. त्यामुळे शरद पवारांना बारामतीत अडकवून ठेवण्याची मुख्यमंत्री फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांची खेळी यशस्वी ठरली होती. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर भाजपने आता विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. विधानसभा निवडणुकीत देखील शरद पवार आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना बारामती विधानसभा मतदारसंघात अडकवून ठेवण्याची रणनीती भाजपने आखली आहे. याचा भाग म्हणून चंद्रकांत पाटील यांची पुण्याच्या पालकमंत्री पदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, पुण्याच्या पालकमंत्री पदासाठी मावळचे आमदार बाळा भेगडे, चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांची नांवे चर्चेत आहेत. |
जळगाव लाईव्ह न्यूज । २७ फेब्रुवारी २०२२ । पारोळा तालुक्यातील विचखेडे येथे ३० वर्षीय तरुणाचा अकस्मात मृत्यू झाला. ही घटना २५ रोजी रात्री १० वाजता घडली. पाराेळा ते धुळे रस्त्यालगत साेपान निकम (वय ३०) हा तरुण पडला असल्याची माहिती विचखेडा येथील वैभव पाटील यांनी ज्ञानेश्वर निकम यांना दिली हाेती. त्यानंतर ज्ञानेश्वर निकम हे तेथे पाेहाेचले, त्यांनी साेपन निकम यांना पाराेळा कुटीर रुग्णालयात दाखल केले. तेथे डाॅक्टरांनी रात्री ११ वाजता त्यांना मृत घाेषीत केले. हृदयविकाराने त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. - शरद पवारांना विठ्ठल म्हणाल तर रस्त्यावर उतरु : भाजपचा अजित पवार गटाला ईशारा ! - मंत्री आनिल पाटील यांनी का दाखवले एकनाथ शिंदेना काळे झेंडे? ऐका त्यांचे उत्तर ! - मंत्री अनिल पाटील पहिल्यांदाच जळगावात येताच केला मोठा दावा ; वाचा सविस्तर. . |
फलटण : फलटण तालुक्यातील मराठा क्रांती मोर्चा यशस्वी केल्यानंतर आता फलटणमधील सकल मराठा समाज बांधवांनी सातारा येथे दि. ३ आॅक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या मराठा महामोर्चात सहभागी होण्याचा निर्धार केला आहे. या पार्श्वभूमीवर मराठा बांधव महामोर्चाच्या तयारीला लागले असून, या नियोजनासाठी शनिवारी (दि. २४) रोजी सकाळी ठिक दहा वाजता महाराजा मंगल कार्यालय, फलटण येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत मराठा क्रांती मोर्चाची पुढील दिशा तसेच समाजाचे आभार व फलटण येथे झालेल्या मराठा क्रांती मोर्चाचा सर्व तपशील, आढावा दिला जाणार आहे. तसेच सातारा येथील मोर्चात सहभागी होण्यासाठी आवश्यक माहितीही या बैठकीत या बैठकीत दिली जाणार आहे. तरी सर्व मराठा समाज बांधवांनी या नियोजन बैठकीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी) ४आदर्की : फलटणला काढण्यात आलेला मराठा क्रांती मोर्चा यशस्वी केल्यानंतर आता फलटण तालुक्यातील हिंगणगाव, सालपे, सासवड, बिबी, आदर्की बुद्रुक, आदर्की खुर्द, टाकोबाईचीवाडी, आळजापूर या गावांनी सातारा येथील मराठा महामोर्चात सहभागी होऊन हा महामोर्चा ऐतिहासिक करण्याचा निर्धार केला आहे. या पार्श्वभूमीवर आठ गावांमध्ये मराठा बांधवांकडून घरोघरी जाऊन जनजागृती केली जात आहे. शेतकऱ्यांनीही ३ आॅक्टोबर रोजी शेतीची सर्व कामे बंद ठेवून महामोर्चात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. (वार्ताहर) ४भादे : सातारा येथे ३ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या सातारा मराठा महामोर्चात सहभागी होण्यासाठी भादेसह परिसरातील मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्णय घेतला असून, मोर्चाच्या नियोजनासाठी शनिवार, दि. २४ सप्टेंबर रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. भादे येथील भैरवनाथ मंदिरात सायंकाळी ७. ३० वाजता होणाऱ्या या बैठकीस मराठा बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (वार्ताहर) ४मायणी : सातारा येथे आयोजित सातारा मराठा महामोर्चाच्या नियोजनसाठी मायणी ग्रामपंचायत कार्यालयाजवळ मराठा क्रांती मोर्चाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. ४येथील श्री सिद्धनाथ मंदिरामध्ये सातारा मराठा महामोर्चाच्या संदर्भात नियोजन बैठक झाली. त्यामध्ये सातारा येथे होणाऱ्या महामोर्चासाठी सहभागी होणे, जायचे कसे, याबाबत नियोजन करण्यात आले. तसेच यावेळी अनेकांनी सहकार्य करण्याचे जाहीर केले. ४येथील ग्रामपंचायतीजवळ संपर्क कार्यालयाचे उद्घाटन मराठा कन्यांच्या हस्ते करण्यात आहे. यावेळी मायणीसह परिसरातील शेकडो मराठाबांधव उपस्थित होते. (वार्ताहर) |
म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे रेल्वे विभागाने उत्पन्नवाढीसाठी सुरू केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. खडकी रेल्वे स्टेशन येथून गुरुवारी रात्री १४ कोचची पहिली कार्गो विशेष ट्रेन इलेक्ट्रॉनिक वस्तू घेऊन हावडा येथील 'एसजीटीवाय' स्टेशनला रवाना झाली. यामधून पुणे रेल्वेला १५ ते १६ लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. पुणे रेल्वे विभागात मोठ्या प्रमाणात औद्योगिक परिसर आहे. पण, पुण्यातून रेल्वेला म्हणावा असा पार्सलसाठी प्रतिसाद मिळत नव्हता. बहुतांश कंपन्या त्यांचा माल मुंबई विभागातून पाठवत होत्या. पार्सलसाठी जो काही माल मिळत होता, तो त्या-त्या भागात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना मालवाहू कोच जोडून पाठविला जात होता. यामधून गेल्या वर्षी पुणे रेल्वे विभागाला २७ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. या पार्श्वभूमीवर पार्सलमधून उत्पन्न वाढावे यासाठी रल्वेने प्रयत्न केले होते. त्यानुसार विविध कंपन्यांसोबत रेल्वे विभागाकडून चर्चा सुरू होती. त्याला अखेर यश आले असून, पहिली कार्गो विशेष रेल्वे खडकी येथून गुरुवारी सोडण्यात आली. यामध्ये ९० टक्के इलेक्ट्रॉनिक वस्तू असणार आहेत. या वस्तू रांजणगाव, चाकण एमआयडी येथील इलेक्ट्रॉनिक कंपन्यांमधील आहेत. विशेष कार्गेमध्ये १४ कोच असून, ३३० टन माल आहे. पुणे रेल्वे विभागात असणाऱ्या 'एमआयडीसी'मध्ये मोठ्या प्रमाणात पार्सलची क्षमता आहे. येथील कंपन्यांच्या मागणीनुसार पुण्यातून सहा ते सात विशेष कार्गो रेल्वे गाड्या सोडल्या जाऊ शकतात. त्या दृष्टीने रेल्वेकडून नियोजन केले आहे. या गाड्यांमध्ये खडकी, चिंचवड आणि लोणी स्टेशनवर रेल्वेमध्ये माल भरला जातो. येत्या काळात महिन्याला सहा ते सात विशेष गाड्या सोडण्याचे उद्दिष्ट रेल्वेकडून ठेवण्यात आले आहे. |
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने घटस्थापनेच्या मुहूर्तावर ५१ उमेदवारांची पहिली यादी रविवारी जाहीर केली. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, यांच्यासह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण वगळता बहुतेक मावळत्या आमदारांचा पहिल्या यादीत समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेससोबत केलेल्या आघाडीसह काँग्रेस १२५ जागांवर निवडणूक लढवित आहे. जाहीर झालेल्या पहिल्या यादीवर राज्यातील पक्षाच्या बड्या आणि स्थानिक नेत्यांच्या घराणेशाहीचा ठसा उमटला असून, मातापित्यांच्या पूर्वपुण्याईच्या जोरावर सोळा जणांना उमेदवारी लाभली आहे. त्यात अमित देशमुख, प्रणिती शिंदे, वर्षा गायकवाड, विश्वजीत कदम, यशोमती ठाकूर, अशोक पाटील, शिरीष नाईक, शिरीष चौधरी, अमर काळे, संग्राम थोपटे, ऋतुराज पाटील यांचा प्रामुख्याने समावेश आहे. ? ? ? |
वसईः पेशवेकालीन इतिहासाचा साक्षीदार असलेले वसईतील श्री सिध्दीविनायक मंदिर आजही सुस्थितीत ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे १५५ वर्षांपूर्वी मुंबई ब्रिटीश गव्हर्नरांनी गणपती मंदिराला ७२ रुपये आणि हनुमान मंदिराला १९ रुपयांची सनद दिल्याची मोडी आणि इंग्रजी भाषेत मजकूर असलेली सनद मंदिराचे पुजारी नारायण केशव फडके यांनी अजून जपून ठेवत ऐतिहासिक दस्ताऐवज जतन करण्याचे काम केले आहे. वसई प्रांतातील अर्थात उत्तर कोकणातील प्राचीन, शिलाहारकालीन, पेशवेकालीन (नव्याने जीर्णोद्धार झालेली) व ब्रिटिश कालखंडात (नव्याने सनदा उपलब्ध झालेली) देवस्थाने अभ्यासकांच्या व संशोधकांचा नेहमीच कुतूहलतेचा विषय ठरलेली आहेत. यात विशेषतः श्री हनुमान, श्री गणपती, श्री शंभू महादेव, श्री आदिशक्ती ही दैवते प्रामुख्याने लक्ष वेधतात. इ. स १७३९ च्या मराठयांच्या वसई मोहिमेतील गौरवशाली विजयानंतर वसई, आगाशी, गोखिवरे, निर्मळ, पालघर, तुंगार, बाजीपुर प्रांतातील अनेक लहानमोठ्या देवस्थानांची पुनर्बांधणी, जीर्णोद्धार केल्याची उदाहरणे आहेत. उत्तर कोकण मोडी लिपी मंडळाचे अभ्यासक श्रीदत्त राऊत व विष्णुप्रिया कुलकर्णी यांनी वसई प्रांतातील देवस्थाने व इतर इतिहास विषयक घटनांशी संबंधित मोडी लिपी पत्रांचा सातत्याने मागोवा घेत आहेत. यातच वसईच्या पेशवेकालीन इतिहासाची साक्ष जपणार्या श्री फडके गणपती मंदिराचा इतिहास आता प्रथमच प्रकाशित होत आहे. सद्या वसईकरांना गणपती श्री सिद्धिविनायक गणेश स्थळ रमेदी धोवली या नावानेच परिचित आहे. खासगी मालकीच्या जागेत जपलेले व सुस्थितीत असणारे हे पेशवेकालीन श्री गणेशाचे मंदिर पुजारी नारायण केशव फडके (नाना) व समस्त फडके कुटुंबियांनी अत्यंत उत्तमरीतीने सांभाळले आहे. सध्या याठिकाणी फडके कुटुंबियांची पाचवी पिढी कार्यरत आहे. विशेष म्हणजे फडके कुटुंबियांनी मोडी लिपीत असणार्या श्री गणपती व श्री हनुमान देवस्थानाची इ. स. १८६७ सालची सनद जपून ठेवली आहे. या सनदेला सप्टेंबर 2022 रोजी तब्बल 155 वर्षे पूर्ण झाली आहेत. या सनदेत मुंबई ब्रिटिश गव्हर्नर यांचा उल्लेख असून श्री गणेश देवस्थानास ७२ रुपये व श्री हनुमान देवस्थानास १९ रुपयांची सनद नेमणूक केल्याचे नमूद केलेले आहे. यावर १० सप्टेंबर १८६७ असे इंग्रजीतून तारीख नमूद आहे. या सनदेचे एक वेगळेपण म्हणजे यात एकाच पानावर एका बाजूस मोडी लिपीतील मजकूर व दुसर्या बाजूस इंग्रजी लिपीतील मजकूर लिहीण्यात आला आहे. वसईतील या पेशवेकालीन श्री गणपती व श्री हनुमान देवस्थानाचा इतिहास पुरावा दस्तऐवज फडके कुटुंबियांनी अत्यंत निष्ठेने जपलेला आहे. पंचक्रोशीतील स्थानिक भाविकांचे, स्थानिकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरात माघात पाच दिवस उत्सव, किर्तनाची परंपरा अखंडपणे सुरू आहे. सनदेवर ब्रिटिशकालीन इ. स १८६७ च्या नेमणुकीबाबत मजकूर असला तरी त्यात सुरुवातीस नमूद केलेली ओळ माजी राज्याचे वेळेपासून नेमणूक ही लक्षात घेणे गरजेचे आहे. कारण, वसई विजयानंतर स्थिरतेच्या कालखंडात अनेक प्राचीन व नवीन देवस्थानाची उभारणी व नेमणुकीबाबतची पत्रे उपलब्ध आहेत. यातच सदर देवस्थानाची १७ व्या शतकाच्या उत्तरार्धातील काही पत्रे लिप्यंतर व प्रकाशित व्हावी यासाठी करण्यात येणारे काम अंतिम टप्प्यात आहे. |
नुकत्याच ऑस्ट्रेलियात लागलेल्या भयंकर आगीच्या झळा सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभर पोहोचल्या. या आगीत भस्मसात झालेल्या प्राणी अन् पक्ष्यांचे छायाचित्र पाहून कोटय़वधींचे हृदय हेलावले. या कोटय़वधी नागरिकांनी निसर्गाकडे, देवाकडे तेथील अनाकलनीय स्थिती आटोक्यात यावी, म्हणून तर परम ईश्वराकडे प्रार्थना केली. तर, ऑस्ट्रेलियातील नागरिकांनीही एकत्र येत परम ईश्वराचा धावा केला. अखेर, या सर्वाची प्रार्थना त्याने ऐकली अन् ऑस्ट्रेलियात वरुण राजाचं आगमन झाले. मात्र हा केवळ योगायोग असेल की दैवी शक्तीची कृपा? मानवी आणि यांत्रिक शक्तीमध्ये हे सारे थांबविण्याची क्षमता आहे का? त्यामुळे आपल्या कक्षेत आणि क्षमतेत नसलेल्या पर्यावरणाचे रक्षण करून वसुंधरेच्या मरणयातना जाणून घेण्याची आज वेळ आली आहे. ऑस्ट्रेलियात दक्षिण गोलार्धातील सूर्याच्या प्रवेशाने ऑस्ट्रेलियात आगीचा हंगाम सुरू झाला. त्यामध्ये मोठय़ा प्रमाणात वन्यजीवांचा जीव गेलाय. येथील जंगलात लागलेल्या आगीने अनेकांचा बळी घेतला. या निसर्गचक्राच्या फे-यात जवळपास ५० कोटी प्राणी अन् पक्ष्यांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामध्ये हजारो-लाखो प्राण्यांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियातील या आगीची तीव्रता पाहून जगभरातील लोकांनी प्राणी-पक्षी अन् माणसांसाठी प्रार्थना केली. 'वो' सब की सुनता है. . असंच काहीसं दिसून आलं. प्रार्थनेच्या काही तासांतच ऑस्ट्रेलियात पावसाचं आगमन झालं. या पावसाच्या आगमनाने तेथील मनुष्य, प्राणी अन् पक्ष्यांनी अत्यानंद साजरा केला. या पावसाच्या स्वागतात चक्क कंगारूंनी नाचून नाचून पावसाच्या सरी आपल्या अंगावर घेतल्या. तर, मदत व बचावकार्य करणा-या तेथील जवानाने दोन्ही हात आभाळाच्या दिशेने उंचावत निसर्गाचे धन्यवाद मानले. तेथील सोशल मीडियावर हे दोन्ही फोटो शेअर होत आहेत. तर, ट्विटरवरूनही ऑस्ट्रेलियातील पावसाचा आनंद साजरा होत होता. दरम्यान, युनिव्हर्सिटी ऑफ सिडनीच्या इकोलॉजिस्ट यांच्या संशोधनानुसार या आगीत ४८० मिलियन्स म्हणजेच जवळपास ४८ कोटी प्राणी आणि पक्ष्यांचा जीव गेला आहे. दक्षिण गोलार्धातील सूर्याच्या प्रवेशाने ऑस्ट्रेलियातील जंगलात आगीच हंगाम सुरू झाला असून यामध्ये मोठय़ा प्रमाणात वन्यजीवांचे प्राण गेले आहेत. पर्यावरणाला जर आपण आज वाचवू शकलो नाही तर भविष्यात पृथ्वीवरील मानवीय जीवन संपुष्टात आल्याशिवाय राहणार नाही. आग, जी लाखो जीव कशी बेचिराख करते पाहा आणि पर्यावरणाचे मंदिरातील देवाप्रमाणे पूजन करा. चुकूनही कुठे आग लावण्याचा प्रयत्न करू नका. ऑस्ट्रेलियात लागलेल्या आगीत सुमारे ५० कोटी जनावरांचा मृत्यू, हे चित्र ऑस्ट्रेलियामध्ये काय घडत आहे, त्याचा सारांश देते. यामुळे निसर्गाची काळजी घेतली पाहिजे, मग निसर्ग आपली काळजी घेईल. हे सांगायचे कारण इतकेच, की उन्हाळ्यात आपल्याकडेही डोंगर पेटतात. झाडांच्या बुंध्याला आग लावली जाते. निसर्गाच्या नियमित चालणा-या चक्रात स्वार्थापोटी प्रचंड हस्तक्षेप केला जातो. झाडांची अमानुषपणे केली जाणारी कत्तल, बेसुमार होणारा वाळू उपसा, ठिकठिकाणी बोअर घेऊन जमिनीची होत असलेली चाळणी ही सारी उद्याच्या नाशाचीच करणे आहेत. याला शासन आणि प्रशासन आळा घालण्यात अपयशी ठरत असते, असे म्हणण्यापेक्षा यातून मिळणा-या 'घबाडा'चा लालसेपोटी निसर्गाची लूट थांबता थांबत नाही, हे वास्तव आहे. झाडांची कत्तल करून आजचा माणूस सिमेंटची जंगले निर्माण करत आहे. या सिमेंटच्या जंगलात प्रत्येक घरांत आणि इमारतींमध्ये बसविण्यात आलेल्या वातानुकूलित यंत्रणेमुळे निसर्गाचे तापमान वाढते. थोडक्यात माणसाच्या गरजा पूर्ण करता करता निसर्गाच्या पोटात असलेला ज्वालामुखी कधी भडकेल, याचा काही नेम राहिलेला नाही. आध्यात्मिक ग्रंथांमध्ये या पृथ्वीच्या विनाशाची कारणे आणि प्रक्रिया सांगितली आहे. मात्र या आध्यात्मिक ग्रंथांचा आधार घेण्याची कोणाची मानसिकता राहिलेली नाही. केवळ स्वार्थभावनेने वसुंधरेची लूट हाच एककलमी कार्यक्रम लावण्यामुळे मानव जातीचा विनाश अटळ असल्याचे निश्चित आहे, हे सांगायला कोणा ज्योतिषाची गेज नाही. शेवटी हेच सांगावंसं वाटतं, आपलं काही जळालं नाही, आपल्याला काही त्रास नाही, आपण सुखी आहोत, असा स्वार्थी, संकुचित विचार न करता पर्यावरणाच्या रक्षणाला महत्त्व द्या. बेसुमार गौण खनिज उपसा बंद करा, वातानुकूलित यंत्रांचा वापर टाळा आणि वसुंधरेचे आरोग्य अबाधित कसे राहील, याची काळजी घ्या. थोडक्यात काय, तर पर्यावरणाच्या सुरळीत चालणा-या चक्रात तुम्ही आणि आम्ही हस्तक्षेप केला नाही, तर पर्यावरण रक्षणाचं बरचंसं कार्य पार पडेल. |
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रगत शेतीसाठी शाश्वत सिंचनावर नेहमीच भर दिला आहे. सरकारनेदेखील त्या दृष्टीने अनेक योजना केद्र सरकारच्या सहकार्याने राबविल्या आहेत. याच प्रयत्नांचा भाग म्हणून राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेमुळे शाश्वत सिंचनाच्या सुविधा उपलब्ध होण्याबरोबरच शेती उत्पादनातही वाढ होत आहे. जिल्ह्यात ही योजना प्रभावीपणे राबविण्यात आली असून, २१ हजार शेतकऱ्यांच्या शेतात सूक्ष्म सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली आहे. राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात पाण्याची उपलब्धता करणे आणि पाण्याच्या प्रत्येक थेंबातून जास्त उत्पन्न मिळावे, या उद्देशाने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना २०१५-१६ पासून सुरू करण्यात आली. त्यात पूर्वीची केंद्रपुरस्कृत सूक्ष्म सिंचन योजना समाविष्ट करण्यात आली आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देण्यासाठी योजनेंतर्गत सर्व पिकांचा समावेश करण्यात आला आहे. जिल्हा बागायती शेती आणि भाजीपाला उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. द्राक्षे आणि डाळिंबासह शेतात पिकणारा भाजीपाला मुंबई आणि पुणे येथे मोठ्या प्रमाणात पाठविला जातो. एकूणच भौगोलिक रचना आणि पावसाचे असमान वितरण यामुळे ऑक्टोबरनंतर धरणाद्वारे होणाऱ्या सिंचनावर बऱ्याचदा अवलंबून राहावे लागते. पाण्याचे प्रमाण मर्यादित असल्याने शेतात अधिक उत्पादन घेण्यावरही मर्यादा येतात. मात्र सूक्ष्म सिंचन सुविधेमुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होणार आहे. अर्थातच त्यामुळे अधिक क्षेत्राला सिंचनाखाली आणणे शक्य होणार आहे. ठिबक सिंचनाद्वारे ४० ते ५० टक्के आणि तुषार सिंचनामुळे ३० ते ४० टक्के पाण्याची बचत होते. सूक्ष्म सिंचन योजना राबविण्यास सुरुवात झाल्यापासून ई-ठिबक प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. या प्रणालीद्वारे www.mahaagri.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी केल्यानंतर ३० दिवसांत सूक्ष्म सिंचन सुविधा बसविण्यात येते. किमतीनुसार अल्पभूधारकांना ६० टक्के आणि सर्वसाधारण भूधारकांसाठी ४५ टक्के अनुदान देण्यात येते. जास्तीत जास्त पाच हेक्टरपर्यंत सूक्ष्म सिंचनाचा लाभ देण्यात येत आहे. जिल्ह्यात कृषी विभागाने विविध प्रशिक्षण कार्यक्रमांद्वारे सूक्ष्म सिंचनाचे महत्त्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविले. शेतकऱ्यांना शेतावर जाऊन मार्गदर्शनही करण्यात आले. त्याचा चांगला परिणाम दिसून आला आहे. द्राक्ष, कांदा, कापूस, डाळिंब, टोमॅटो, मिरची, शेवगा, मका, सोयाबीन आणि ऊस आदी पिकांना याचा फायदा झाला आहे. गेल्या तीन वर्षांत एकूण २१ हजार २०९ लाभार्थ्यांना एकूण ४७ कोटी १९ लाख रुपयांचे अनुदान सूक्ष्म सिंचनासाठी देण्यात आलेले आहे. त्यामुळे १४ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आलेले आहे. २०१७-१८ या वर्षासाठी आतापर्यंत सात हजार ६५८ लाभार्थ्यांना सोळा कोटी ५७ लाखांच्या अनुदानासाठी पूर्वसंमती देण्यात आली आहे. शाश्वत आणि योग्य सिंचन पद्धतीच्या उपयोगामुळे वाढणारे शेती उत्पादन शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती उंचावणारे ठरले आहे. |
उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या विरोधात उठाव करत भाजपाच्या मदतीने शिवसेना पक्षावर दावा केलेल्या एकनाथ शिंदे यांच्या ४० आमदार आणि १३ खासदारांच्या गटाला शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्य बाणचिन्ह देण्याचा निर्णय नुकताच केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहिर केला. त्यानंतर शिंदे गटाच्या शिवसेनेची आज पहिल्यांदाच राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक झाली. मात्र या बैठकीत मंजूर करण्यात आलेले ठराव उध्दव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाचे असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे पक्ष नाव आणि निवडणूक चिन्ह मिळूनही शिंदे गटातील नेते पक्षिय पातळीवर अद्यापही चाचप़डत असल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेच्या या राष्ट्रीय कार्यकारणीत महाराष्ट्रातील उद्योगांमध्ये ८० टक्के स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. मात्र या अनुषंगाने २०१९ च्या निवडणूकीच्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सर्वात आधी याविषयीचा घोषणा केली होती. तसेच ही घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहिरनाम्यातही आश्वासन दिले होते. आता पुन्हा तोच ठराव शिंदे गटाच्या शिवसेना राष्ट्रीय कार्यकारणीत मंजूर करण्यात आला. याशिवाय मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. याविषयीची सर्वात आधी मागणी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात करण्यात आली होती. मात्र त्यानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना ठासून केली होती. त्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या कार्यालयाला पत्रही पाठविण्यात आले होते. त्यानंतर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावी अशी मागणी भाजपाकडूनच करण्यात आली होती. मात्र या मागणीवरून विविधस्तरावर टीकेचा भडीमार सुरु होताच देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात नंतर आस्ते कदम घेण्यात आले. त्यानंतर राज्यात पुन्हा महाविकास आघाडी सरकारच्या काळात भाजपाकडून पुन्हा याबाबत मागणी करण्यात येऊ लागली. त्यावेळी उध्दव ठाकरे यांनी भाजपाच्या या मागणी टीका करताना म्हणाले होते की, केंद्रात सरकार तुमचे आहे तुम्हीही पाच वर्षे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात कार्यरत होतात. त्यावेळी का नाही सावरकरांना भारतरत्न मिळावा यासाठी प्रस्ताव पाठवित मंजूर करून आणला नाही असा पलटवार केला होता. त्यानंतर सावरकरांचा मुद्दा थंड बसत्यात पडला. त्यानंतर आता निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाने हा विषय आपल्या अजेंड्यावर न घेता तो शिंदे गटाच्या शिवसेनेमार्फत राज्याच्या राजकारणात पुन्हा आणण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे दिसून येते. त्याचबरोबर उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत पक्षाचे सर्वाधिकार पक्षप्रमुख म्हणून उध्दव ठाकरे यांनाच देण्यात आले होते. अगदी त्याच धर्तीवर आज झालेल्या राष्ट्रीय कार्यकारणीत एकनाथ शिंदे हे मुख्य नेते पदी निवड करण्यात आली. तसेच पक्षाचे सर्वाधिकार एकनाथ शिंदे यांनाच देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. त्यामुळे शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत इतर पक्षांचे ठराव आपल्या पक्षाच्या अजेंड्यावर घेण्यात आले. या राष्ट्रीय कार्यकारणीत फक्त नव्या ठरावात आगामी संघटनात्मक वाटचाल करण्यासाठी शिस्तपालन समितीची स्थापन करण्यात आलीय. त्याचं अध्यक्षपद मंत्री दादा भुसे यांना देण्यात आलंय. यामध्ये मंत्री शंभूराज देसाई आणि संजय मोरे यांचा सदस्य म्हणून स्थान देण्यात आलंय. तसेच पक्षांतर्गत शिस्तभंगाची कारवाई, पक्षाच्या विरोधात काही लोकांनी कारवाई करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर शिस्तभंग होईल का याची छाननी करण्यासाठी या समितीची आखणी करण्यात आलीय. विशेष म्हणजे उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह ठाकरे समर्थक आमदार-खासदारांवर काय कारवाही करता येईल याची चाचपणी करण्याच्या अनुषंगाने ही समिती काम करणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली. शिवाय शिंदे-फडणवीस सरकारने जे आठ महिन्यांत काम केलंय, त्या कामाची नोंद बैठकीत घेण्यात आली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आल्याचेही उदय सामंत यांनी सांगितले. वीर माता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, छत्रपती संभाजी महाराज यांची नावं राष्ट्रीय पुरुषांच्या यादीत यावे, असाही ठराव झाला, अशीदेखील माहिती त्यांनी यावेळी दिली. गड-किल्ल्यांचं संवर्धन व्हावं, यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, असा ठराव या बैठकीत झाला. चर्चगेट रेल्वे स्थानकाला माजी केंद्रीय मंत्री चिंतामणराव देशमुख यांचं नाव देण्याचा ठराव या बैठकीत करण्यात आला. तसेच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या मराठी मुलांना पाठिंबा देण्याबाबतचाही ठराव करण्यात आल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली. |
सरसकट सहा हजार रुपये वसूल करून ग्रामपंचायतींची सर्रास आर्थिक लूट केली जात आहे. वाशिम : 'आपले सरकार सेवा'तर्फे ग्रामपंचायतींकडून संगणक परिचालकांचे मानधन हे उपस्थितीनुसार न घेता, सरसकट सहा हजार रुपये वसूल करून ग्रामपंचायतींची सर्रास आर्थिक लूट केली जात आहे. परंतू, 'आपले सरकार सेवा' मात्र संगणक परिचालकांना हजेरीनुसार मानधन देत आहे. दुसरीकडे १० ते १५ ग्राम पंचायतींमधील संगणक आॅपरेटर सोडून गेलेले असताना तसेच १५ ते २० ग्रामपंचायतींमध्ये वीजपुरवठा खंडीत असतानाही, ग्रामपंचायतींकडून दरमहा सहा हजार रुपये घेत लूट करीत आहेत. ग्रामपंचायतींमधून मिळणारे विविध प्रकारचे दाखले आॅनलाईन पद्धतीने मिळावे, कामात सुसूत्रता यावी, प्रशासकीय दिरंगाई होऊ नये म्हणून ग्रामपंचायतींच्या कारभाराला आॅनलाईनची जोड देण्यात आली. जिल्ह्यात ४९१ ग्रामपंचायती असून, येथे आपले सरकार सेवा सुरू करण्यात आली. नियमित मानधन मिळत नसल्याने १० ते १५ ग्रामपंचायतींमधील संगणक आॅपरेटर तीन, चार महिन्यात सोडून गेले तर १५ ते २० ग्रामपंचायतींचा वीजपुरवठा खंडीत असल्याने तेथे आपले सरकार सेवा प्रभावित आहे. दुसरीकडे संगणक परिचालकाचे मानधन, चालकाचा प्रशिक्षण खर्च, कंपनी व्यवस्थापन आदींसाठी प्रत्येक ग्राम पंचायतीला दरमहा १०४५० व जीएसटी १८ टक्के असे एकूण १२३३१ रुपयाचे धनादेश जिल्हा परिषदच्या नावाने जमा करावे लागतात. संगणक परिचालकासाठी दरमहा सहा हजार रुपये ग्रामपंचायतींकडून वसूल केले जातात. परंतू, आपले सरकार सेवाद्वारे संगणक चालकांना उपस्थितीनुसारच पैसे देत आहेत. परंतु ग्रामपंचायतीकडून पूर्ण महिन्याचे पैसे घेतले जात असल्याने ही एकप्रकारे ग्रामपंचायतींची लूट असल्याच्या प्रतिक्रिया सरपंच संघटनेमधून उमटत आहेत. ग्रामपंचायतींना आॅनलाईनची जोड मिळाली ही बाब स्तुत्य आहे. परंतू, बहुतेक ग्रामपंचायतीचे उत्पन्न खूप कमी आहे. उत्पन्न कमी असतानाही आपले सरकार सेवा यासाठी दरमहा १२ हजार रुपये द्यावे लागतात. संगणक आॅपरेटरच्या मानधनासाठी ग्रामपंचायतीकडून दरमहा सहा हजार रुपये घेतले जातात. दुसरीकडे व्यवस्थापनाकडून आॅपरेटरला उपस्थितीनुसार मानधन दिले जाते. |
नागपूर : बहुजननामा ऑनलाईन - राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत बाळासाहेबांनी दोनवेळा पवार साहेबांचे ऐकले. तर मी का नाही ऐकणार, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना टोला लगावला. वैयक्तिक धर्म पाळणे हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. मात्र, त्यामुळे इतर धर्मांबद्दल तिरस्कार करता कामा नये, असे प्रतिपादन माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी केले. प्रतिभाताई यांच्या ८५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने नागपुरात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र नागपूरच्यावतीने नागरिक सत्कार समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते . या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. यावेळी शरद पवारांनीही प्रतिभा पाटील यांचे तोंडभरून कौतुक केले. आपल्या पदाचा देशाला व महाराष्ट्राला कसा उपयोग होईल याचा मी सातत्याने विचार केला. प्रामाणिकपणे आणि सन्मानाने राष्ट्रपतीपदाची जबाबदारी पार पाडली. प्रतिभाताईंना आपण पाच वर्ष ज्युनिअर आहोत. मात्र, आपण मुख्यमंत्री असताना प्रतिभाताई यांनी विरोधीपक्ष नेता म्हणून आपले वेगळेपण सिद्ध केले, असे शरद पवार यांनी म्हटले. |
Thirty Thirty Scam: राज्यभरात गाजलेल्या तीस-तीस घोटाळ्याची माहिती 'ईडी'ने (ED) मागवल्याने खळबळ उडाली आहे. त्यातच आता यात आणखी एक मोठा गौप्यस्फोट करणारी माहिती समोर आली आहे. तीस-तीस घोटाळ्याचा मुख्य आरोपी संतोष राठोड सध्या हर्सूल कारागृहात असून, त्याला फोन पुरवला जात असल्याचे समोर आले आहे. तर त्याने केलेल्या एका फोन कालच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ज्यात 'ईडी'ने माहिती मागवल्याबाबत चर्चा झाली आहे. त्यामुळे संतोष राठोड न्यायालयीन कोठडीत असताना त्याला मोबाईल फोन कोण पुरवत आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. फोनवरील संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यावर 'एबीपी माझा'च्या प्रतिनिधीनी हर्सूल कारागृहाच्या प्रशासनाशी संपर्क साधून, याबाबत मुख्य अधिकारी अरुणा मुगूटराव यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. त्यावेळी त्यांनी कॅमेरावर बोलण्यास नकार दिला. मात्र 16 तारखेला संतोष राठोड याला सकाळी 11 ते 7 वाजेपर्यंत कोर्टात हजर करण्यासाठी नेण्यात आले होते. त्यावेळी हे संभाषण झाले असावे असे त्यांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे 16 तारखेलाच 'एबीपी माझा'वर तीस-तीस घोटाळ्याची माहिती 'ईडी'ने मागवल्याची बातमी प्रसारित झाली होती. त्यामुळे हे संभाषण कारागृहातून झाले असेल किंवा न्यायालयात हजर करताना झाला असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर संतोष राठोडला न्यायालयात घेऊन जात असताना औरंगाबाद शहर पोलिसांचा एक अधिकारी आणि चार कर्मचारी असतात त्यामुळे त्यांनी हे संभाषण करु दिले का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे आता याचे उत्तर कारागृह प्रशासन किंवा औरंगाबाद शहर पोलीसच देऊ शकतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष राठोड याने संभाषण केलेला व्यक्ती, त्यांचा नातेवाईक आहे. तसेच पैठण तालुक्यातील बिडकीन गावातील हा व्यक्ती आहे. विशेष म्हणजे या व्यक्तीची राजकीय पार्श्वभूमी असून, एका मंत्र्याचा जवळचा असल्याचे देखील बोलले जात आहे. त्यामुळे आता या सर्व प्रकारची पोलीस चौकशी करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. गेल्या वर्षी गाजलेल्या मराठवाड्यातील तीस-तीस घोटाळ्यात 'ईडी'ची एन्ट्री झाली आहे. औरंगाबाद ग्रामीण पोलिसांकडून ईडीच्या पथकाने घोटाळ्याची सर्व माहिती मागून घेतली आहे. त्यामुळे आगामी काळात याप्रकरणी ईडीकडून चौकशी केली जाऊ शकते. मात्र तीस-तीस घोटाळ्यात अचानकपणे ईडीची एन्ट्री झाल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे. तर यात अनेक राजकीय नेत्यांची देखील नावं असल्याचे खळबळ उडाली आहे. |
ठरविलं. ती नटी झाली ! मात्र तिनं नटीचा पेशा पत्करला तरी घर सोडलं नव्हतं. तिचं नटी होणं नाटकाच्या पहिल्या अंकाच्या अखेरीस घडलेलं आहे, पण तिचं घर सोडून जाणं तिसऱ्या अंकाच्या म्हणजे एकंदर नाटकाच्या अखेरीस नाटककर्त्यानं घडवून आणलं आहे. उल्का प्रकाशच्या नाटकात काम करूं लागल्यापासून अवघ्या तीन महिन्यातच नायिका व अभिनेत्री म्हणून तिच जिकडे तिकडे नावलौकिक झाला. तिची ही रंगभूमीची सेवा आणि आत्मविकासाचं कार्य चालू असतांना दिवाकारानं तिला विरोध केल्याचा अगर त्रास दिल्याचा उल्लेख नाटकात कुठेहि नाही. यावरून सहाजिकच असा तर्क करावा लागतो की, नवन्याचा हुकूम न मानण्याचं आणि सात वर्ष दडपण्यात आलेले आपल्या अंगचे अलौकिक गुण जगाला दाखवून स्त्रीस्वातंत्र्याचं निशाण फडकविण्याचं जे कार्य उल्केला करायचं होतं ते अबाधितपणे, व्ययस्थित, सुरळीत, दिवाकराची पत्नी म्हणून त्याच्या घरात राहून सतत तीन महिने म्हणजे नव्वद दिवस आणि नव्वद रात्री पार पडलं होतं. त्यासाठी तिनं आता घराबाहेरच पडलं पाहिजे असा काही प्रसंग तिच्या नवऱ्यानं आणला नव्हता. तिची धाकटी तान्ही मुलगी नाटकाच्या सुरुवातीपासून फिट्सनी आजारी होती. परंतु या बाईची नाटयकलेची निष्ठा व उपासना अशी जबरदस्त, की 'घटकेत काय होईल नियम नाही' अशा प्रकारे आजारी असलेल्या मुलीला घरातल्या काम करीत गड्याकडे सोपवून ती प्रकाशच्या पहिल्या नाटकात होती, व त्यानं लिहिलेल्या दुसऱ्या नाटकाच्या तालमीनाहि हजर रहात होती. इतकंच नव्हे, तर एकदा रात्री बेबीला नुकतीच भयंकर फिट येऊन गेलेली असतांना तिला खोलीतल्या पाळण्यात निजवून बाहेरच्या दिवाणखान्यात तिनं प्रकाशबरोबर त्याच्या आगामी नाटकातला चांगला पाऊण तास लांबीचा 'लव्ह सीन ' केला. या 'लव्ह सीन 'मध्ये उल्का प्रकाशच्या गळ्यात गळा घालणार इतक्यात आत निजविलेल्या बेबीला फिट आली, व तीच अखेरची ठरली. उल्केच्या खांद्यावर तिचा प्राण गेला. मुलगी मेलेली पाहून दिवाकराला दुःखाचा व संतापाचा झटका आला. उल्का व प्रकाश यांना तो म्हणाला, 'तुम्ही दोघांनी माझी मुलगी ठार मारलीत. आता मलाहि विष देऊन असंच ठार करा, आणि मग जन्मभर गळ्यात गळा घालून नाटकं करीत बसा. ' मात्र हे सांगितल्यावर तो घरात राहिला नाही; त्या दोघांना शिव्या देत 'तोंड पाहणार नाही तुमचं' असं सांगून तो चालता झाला. म्हणजे बायकोऐवजी नवन्याचाच 'धरावाहेर झाला ! पण नाटककाराला तर उल्केला घराबाहेर काढायचं आहे, तेव्हां दुसऱ्या अंकाच्या अखेरीस घराबाहेर पडलेल्या दिवाकराला त्यानं तिसन्या अंकात पुन्हा घरात खेचून आणलं आहे. मात्र तो आता पुन्हा घरात येतो तो दारूनं बेहोष होऊन व एका हलकट बाईला बरोबर घेऊन येतो. इतकं झाल्यावर मात्र उल्का घराबाहेर पडून प्रकाशकंडे राहावयास जायचं ठरविते. ती निधालेली पाहताच दिवाकर तिच्यावर उसळतो. तिला धमक्या देतो, खून पाडीन म्हणतो, काठीनं बडवायलादेखील निधतो. पण उल्का पुन्हा एकदा नवरेशाही, भांडवलशाही, स्त्रियांची गुलामगिरी, जागृत झालेल्या नव्या स्त्रीची नवशक्ति इत्यादि गोष्टींवर मोठाली व्याख्यानं झोडते आणि मी या धरातून जाणारच असं बजावते. दिवाकर तिला विचारतो, 'तुझं प्रकाशवर प्रेम आहे का ? बोल.' परंतु बोलूनचालून राष्ट्राची सेवा करण्यास - म्हणजे ज्यात 'जय हिंद' वगैरे आरोळ्या आहेत अशा नाटकातून काम करण्यास - धडाडीनं निघालेली, जागृत झालेली एक तेजस्वी स्त्रीच ती ! ती काय नवन्याच्या प्रश्नाला डरणार ? 'बोल, तुझं प्रकाशवर प्रेम आहे की नाही ?' असं नवयान विचारताच ती म्हणते, 'शंका वाटते की काय तुम्हांला ?' यावर तिचा नवरा म्हणतो, 'अरेरे, नाही ऐकवत मला हे !' ती सांगते, 'ऐकवत नसेल तर बांगड्या भरा. ' ही हमरीतुमरी कळसाला पोहोचते तोच उल्केचा बाप दीनानाथ त्या ठिकाणी दाखल होतो. मग या म्हातान्यापुढे दिवाकर आणि उल्का आपापल्या कैफियती मांडतात. आणि हे गृहस्थ किसानांचे पुढारी असल्यामुळेच की काय अखेर निर्णय देतात की, उल्केनं घराबाहेर पडावं हेच उत्तम ! उल्का घराबाहेर जाणार म्हणजे कुठे जाणार ? तर प्रकाशकडे ! कोणत्या नात्यानं ? बायको म्हणून की प्रेयसी म्हणून ! एकंदर नाटकाचा रोख पाहिला - विशेषतः दुसन्या अंकातला उल्का व प्रकाश यांचा भरगच्च 'लव्ह सीन' आणि माझं प्रकाशवर प्रेम आहे,' अशी उल्केनं तिसऱ्या अंकात नव-याजवळ दिलेली तर वाचकांचा साहजिकच कयास कबुली या दोन गोष्टी लक्षात घेतल्या होतो, की उल्का जी घराबाहेर पडणार ती प्रकाशच्या घरी यापुढे त्याच्यावर प्रेम करीत बसण्यासाठी जाणार. परंतु असं घडण्याऐवजी नाटकाच्या अखेरीस एक एक अकल्पितच प्रसंग घडतो. उल्काची मैत्रीण वर्षा हिच्याशी आपण लग्न करणार आहोत असं प्रकाश सांगतो, व ते ऐकताच उल्केचा बाप आशीर्वाद देतो, 'शाबास, वीरपुत्रा ! जवाहरलाल नेहरूंसारखे, नेताजी सुभाषचन्द्र बोससारखे वीरपुत्र तुमच्या दोघांच्या पोटी जन्माला येवोत ! ' परंतु एवढा आशीर्वाद दिल्यावर टाळी पडेल अशी या किसानांच्या पुढा-याला खात्री नाही. म्हणून लगेच उल्केकडे वळून तो आशीर्वाद देतो, 'जा, घराघरातून, शेताशेतातून, गावागावातून, शहराशहरातून, गिरण्यागिरण्यामधून, कारखान्यातून स्फूर्तीची गाणी गा ! पोवाडे म्हणा ! क्रांतीची नाटकं करून दाखवा ! जनतेला खडबडून जागे करा ! पारतंत्र्याचे पाश तोडून टाका ! आणि चाळीस कोटींचा हा प्रचंड देश जिवंत करा ! जय हिंद ! जय हिंद !! जय हिंद ! ! ! ' या ठिकाणी मात्र टाळी पडेल अशी नाटककर्त्याला खात्री वाटली व म्हणून त्यानं नाटकाचा शेवटचा पडदा पाडला ! 'जग काय म्हणल ?' या अत्र्यांच्या नव्या नाटकाचा सारांश फक्त नायिका उल्का या एकाच पात्राच्या अनुषंगानं मी सांगितला आहे. कारण हे नाटक म्हणजे उल्केची गोष्ट आहे. या पात्राच्या निमित्तानं जुलमी नवऱ्याची हुकुमशाही पार आभाळात उडवून देऊन धराबाहेर पडा, असा संदेश लेखकाला द्यावयाचा जाहे. संदेश काही वाईट नाही. अगदी मराठी वाङ्मयातसुद्धा अत्रे तो प्रथमच देत आहेत अशातलाहि भाग नाही. परंतु अत्र्यांच्या या नाटकातून हा संदेश पुरोगामी विचाराच्या माणसांना तरी पटावा अशा प्रकारे निघाला असता तर तो स्वागतार्ह व परिणामकारक ठरला असता ! परंतु यासाठी नाटक फार व्यवस्थित लिहिलं जायला हवं होतं, आणि विशेषतः नाटकाची नायिका उल्का हिच्याबद्दल वाचकांना व प्रेक्षकांना कमालीची सहनुभूति नाटकाच्या आरंभापासून शेवटपर्यंत वाटेल अशी दक्षता घेऊन मोठ्या कौशल्यानं तिचं स्वभावचित्र अत्र्यांनी रंगवायला हवं होतं. परंतु अशी दक्षता अत्र्यानी काडीमात्र घेतलेली नाही. त्यांचं उल्केचं पात्र हजार प्रकारच्या विसंगतीनी भरलेलं असल्यामुळे चिकित्सक मनाला पटत नाही. तिचं दुःख खरं वाटत नाही. तिची अडचण विनतोड वाटत नाही. आणि त्यामुळे तिनं केलेलं बंड कोणाच्याहि मनाला पटणंच शक्य नाही. ते नाटकी आणि वेगडी वाटतं. उल्का हे पात्रच संभाव्य वाटत नाही. दिवाकराशी लग्न करताना त्याच्या बाँबगोळयाच्या थापांना ती भाळली असं ती सांगते. परंतु दिवाकर तर स्वतः तिसऱ्या अंकाच्या प्रारंभी सांगतो, की लग्नाच्या आधी तो एका हलकट बाईच्या नादी लागला होता, त्या बाईनं त्याला उल्लू बनविलं होतं, तिनं त्याला भलभलती व्यसनं लावली होती, आणि रेसचाहि नाद लावला होता. जो मनुष्य अशा तऱ्हेनं एका हलकट बाईच्या नादांत राहून रेसच्या व्यसनात मग्न होता त्याची आणि राजकारणाच्या चळवळीत मग्न असणाऱ्या उल्केसारख्या मुलीची गाठ पडावी हेच मुळी अशक्य आहे, पडली तरी त्यांची ओळख वाढणं शक्य नाही, आणि वाढली तरी त्याच्या दारूबाज तोंडातल्या बाँबगोळ्यांच्या थापा पेपरमिटाच्या गोळयांप्रमाणे या मुलीनं चघळून खन्या मानाव्या हे शक्य नाही. पण नाटककाराच्या सोईसाठी आपण गृहीत धरूं की दिवाकराच्या दहशतवादाच्या थापा उल्केला खऱ्या वाटल्या व म्हणून तिनं त्याच्याशी लग्न केलं. पण तीच आपल्या तोंडानं सांगते की लग्न झाल्या दिवसापासून दिवाकराच्या तोंडून राजकारणाचा एकहि शब्द तिनं कधी ऐकला नाही. त्याचा व्यसनीपणा व बदफैलीपणा मात्र तिच्या नजरेस येऊ लागला. मग प्रश्न असा उत्पन्न होतो की, जर उल्का अगदी जातिवंत तेजस्वी वाघीण होती, 'जळती आग आहे ती, सहजासहजी कुणाला पचायची नाही' असं तिचं वर्णन जर तिचा बाप करतो, तर दिवाकराच्या घरात सात वर्ष ती राहिली कशी ? घराबाहेर पडण्याचा विधि तिच्यासारख्या मुलीनं सात दिवसातच करायला हवा होता, आणि जुलमी नवरेशाही अटम बाँबनं आकाशात उडवून द्यायचा पराक्रम जगाला दाखवायला हवा होता. परंतु ही वाघीण अशी काही गोगलगाय बनली की नवऱ्याचा बदफैलीपणा उघड्या डोळ्यांनी पहात त्याची चूल फुंकीत ती तब्बल सात वर्ष राहिली ! इतकंच नव्हे तर तिला दोन मुलंसुद्धा झाली ! 'आभाळातील उल्का उल्का स्वतःच आपली मैत्रीण वर्षा हिला सांगते, जमिनीवर कोसळली आणि मातीत मिळाली. ' वाक्य ठीक आहे. परंतु तिला अशा प्रकारे मातीत मिळविण्यापूर्वी तिचा नवरा दिवाकर याचा राहो, परंतु तिचा जनक जो नाटककार त्याचा हात थोडा तरी कचरायचा होता ! उल्का नावाची एक अत्यंत तेजस्वी मुलगी होती, व पशुतुल्य नव-याबरोबर तिनं सात वर्षं मुकाट्यानं संसार केला होता, हे या नाटकाचं गृहीत कृत्यच मुळी - म्हणजे पार्श्वभूमीच शुद्ध वेडेपणाची वाटते. अर्थात् यातून लेखकानं निर्माण केलेला नाट्यप्रसंग खोट्या कोल्हाटउडीसारखा वाटतो. नव-याची हुकुमशाही धाब्यावर बसवून नाटकात जाण्याचं उल्का ठरविते ते काय म्हणून, तर दोन गोष्टी घडतात म्हणून. एक ही की डॉक्टर व प्रकाश तिला नाटकात काम करण्याचा आग्रह करतात, आणि दुसरी ही की आपली मैत्रीण वर्षा हिला आपल्या नवऱ्यानं प्रेमपत्रं लिहून भंडावून सोडलं होतं हे तिला वर्षाकडून कळतं. परंतु लेखकानं जो भडका उडविला आहे त्याला या दोन गोष्टींची दारू मुळीच पुरेशी नाही. आपला नवरा एक अत्यंत सच्चरित्र गृहस्थ आहे अशा भ्रमात राहून उल्कानं त्याच्या नवरेपणाच्या अधिकाराखाली सात वर्षं काढली असं अत्र्यांनी दाखविलं असतं तर या दोन गोष्टींनी तिचे डोळे एकदम उघडले हे म्हणणं कदाचित् पटलं असतं. परंतु तशातली मुळीच स्थिति नाही. दिवाकराचा व्यसनीपणा व बदफैलीपणा या गोष्टी एखाद्या रहस्यासारख्या उल्केला अज्ञात नव्हत्या. त्या तिला पूर्ण माहीत होत्या. इतकंच नव्हे तर त्या नरकातून व जुलमातून बाहेर पडण्यासाठी उल्केची सारखी धडपड चालली होती असं काही नाटककर्ता आम्हाला सांगत नाही. उलट त्याचं सांगणं असं, की उल्का अगदी पुरती गोगलगाय बनली होती. दिवाकराबरोबरचं आयुष्य सात वर्ष कंठून तिनं पत्करलं होतं. तिचा बाप मारे सांगतो की, 'जळती आग आहे ही. सहजासहजी कुणाला पचायची नाही. ' पण दिवाकरानं ती सहजासहजी नुसती पचविली नव्हती, तर तिची पार थंड राखुंडी करून टाकली होती. अशा स्थितीत नुसत्या प्रेमपत्रांचा पुरावा हाती आल्यावर उल्का एकदम |
सर्व जगात चर्चा आहे 'टेस्ला रोडस्टर' ही स्पोर्ट्स. या कारला अंतराळात पाठवले होते. मात्र आता पुन्हा ती चर्चेत आली आहे. उद्योगपती इलॉन मस्क या अब्जाधीश अमेरिकी उद्योगपतीने स्पेसएक्स कंपनीने मंगळ ग्रहाभोवती फेरी घालण्यासाठी पाठविलेली 'टेस्ला रोडस्टर' ही स्पोर्ट्स कार मार्गभ्रष्ट होऊन अंतराळात भरकटली आहे. त्यामुळे ती आता पुन्हा मार्गावर येईल का यावर प्रश्न निर्माण झाले आहे. का झाले असे , कशामुळे कार भरकटली रस्ता? या कारच्या मूळ योजनेनुसार ही स्पोर्ट्स कार व त्यातील डमी ड्रायव्हर यांना मंगळ-पृथ्वी यांच्या दरम्यानच्या कक्षेत जात स्थिर व्हायचे होते. मात्र पण ही कार इच्छित मार्ग सोडून पुढे आणखी अंतराळात जात आहे. त्यामुळे ग्रहमालेला लागून असलेल्या उल्का आणि राखेने भरलेल्या पट्ट्याच्या दिशेने ती जात आहे. रॉकेटच्या इंजिनाचा अपेक्षेहून जास्त रेटा मिळाल्याने असे झाले असावे असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आता पृथ्वीवर थोड्या प्रमाणत प्रयत्न केले जात आहेत. |
सीबीएसईतील प्रकरण : नागपूर : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीतील गणित, जीवशास्त्र व रसायनशास्त्र विषयाच्या परीक्षेमध्ये चुकीचे प्रश्न विचारल्या गेल्यामुळे दिल्ली विभागातील सर्व विद्यार्थ्यांना सरसकट २६ गुण देण्यात आले आहेत. परंतु, इतर विभागातील विद्यार्थ्यांना या गुणांपासून वंचित ठेवण्यात आले, असा दावा एका विद्यार्थिनीने केला आहे. यासंदर्भात तिने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. आयुषी दीक्षित असे विद्यार्थिनीचे नाव आहे. न्यायालयाने बुधवारी याचिकेवर सुनावणी केल्यानंतर मंडळाला नोटीस बजावून १९ जूनपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. १० गुणांचे गणिताच्या तर, प्रत्येकी ८ गुणांचे जीवशास्त्र व रसायनशास्त्राच्या परीक्षेमध्ये चुकीचे प्रश्न विचारण्यात आले होते. परिणामी विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले. दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मंडळाने दिल्ली विभागातील विद्यार्थ्यांना सरसकट २६ गुण दिले आहे. परंतु, इतर विभागातील विद्यार्थ्यांना या गुणांपासून वंचित ठेवण्यात आले आहे. मंडळाची ही वागणूक भेदभावपूर्ण आहे, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. आयुषीतर्फे अॅड. भानुदास कुलकर्णी यांनी बाजू मांडली. |
नमस्कार मंडळी !! कळविण्यास आनंद होतो की, यावर्षी खालील आठ दिवाळी अंकांमध्ये माझ्या कथा प्रकाशित झाल्या आहेत. ८. प्रतिलिपी ऑनलाईन दिवाळी अंक - 'शेवटची चोरी' ही थरारक कथा (अनुक्रमणिकेत Chapter ४४ ला आहे) मिपा परिवारात एकापेक्षा एक दिगग्ज लेखक आहेत. त्यांच्यापैकी कुणाकुणाचं साहित्य कोणकोणत्या दिवाळी अंकांमध्ये आलं आहेत, ते प्रतिसादात कळवता येईल. तसेच यावर्षी दिवाळी अंकातल्या आवडलेल्या साहित्याबद्दलही कळवा. म्हणजे त्या कथा/कविता/लेखदेखील मिळवून वाचता येतील. |
एमपीसी न्यूज - शिवसेना नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांनी कौतुकास्पद निर्णय घेतला असून सामाजिक बांधिलकी जपत यापुढील 22 महिन्याचे नगरसेवकपदाचे सर्व मानधन कोरोनाच्या लढाईसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. सात महिन्याचे एक लाख रुपयांचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस आणि उर्वरित महिन्यांपैकी एक लाख रुपयांचे मानधन 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 'जनकल्याण' समितीला आणि दोन स्वयंसेवी संस्थांना खासगी खात्यातील धनादेशाद्वारे दिले आहेत. या निर्णयामुळे नगरसेविका चिंचवडे यांचे कौतुक होत आहे. याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्र दिले असून सात महिन्याचे दरमहा मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस वर्ग करण्याबाबत कळविले आहे. कोरोनाने जगात थैमान घातले आहे. भारतात देखील कोरोनामुळे काही जणांचा बळी गेला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात देखील कोरोनाचे रूग्ण आढळले आहेत. कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी आणि स्थिर-स्थावर होण्यासाठी दिर्घ कालावधी लागणार आहे. त्यापार्श्वभुमीवर शिवसेना नगरसेविका अश्विनी चिंचवडे-पाटील यांनी यापुढील दर महिन्याला मिळणारे 15 हजार रुपये मानधन हे 22 महिन्याचे 3 लाख 30 हजार रुपये कोरोनाच्या लढाईसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. सात महिन्याचे एक लाख रुपयांचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस तर, उर्वरित महिन्यांपैकी एक लाखाचे मानधन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीच्या निधीस आणि दोन स्वंयसेवी संस्थांना प्रशासकीय अडचण येऊ नये यासाठी खासगी खात्यातील धनादेशाद्वारे दिले आहेत. सर्व मानधन कोरोनाच्या लढाईसाठी देणा-या त्या एकमेव नगरसेविका आहेत. |
आता कोठे उजाडते आहे! इंडोनेशियातील आशियाई स्पर्धेमध्ये भारताने चमकदार कामगिरी केली आहे. 'पेला अर्धा रिकामा,' म्हणणारे या यशातही खोट काढतील. जागतिक स्पर्धेत या स्पर्धांचे स्थान काय, त्यामध्ये किती जागतिक विक्रम झाले, चीन आणि जपानच्या तुलनेमध्ये भारत कुठे आहे, तैवानसारखा छोटा देशही आपल्यापुढे आहे अशा प्रश्नांची सरबत्ती ते करतील. पण भरलेल्या अर्ध्या पेल्याकडे बघायचे तर मात्र भारताने या स्पर्धेत चांगली कमाई केल्याचे दिसेल. कबड्डी आणि हॉकीसारख्या नेहमी वरचष्मा बाळगणाऱ्या खेळांमध्ये भारताला 'सुवर्ण' कामगिरी करता आली नसली, तरी भारताने मिळविलेल्या दीड डझन सुवर्णपदकांचे मोल यामुळे कमी होत नाही. या स्पर्धेत एकाही खेळाडूने वैयक्तिकपणे दोन सुवर्णपदके मिळविलेली नाहीत. सर्व विजेत्यांची पार्श्वभूमी पाहिल्यास, ग्रामीण भागातून व कनिष्ठ आर्थिक स्तरातून केवळ जिद्दीच्या जोरावर पुढे येऊन त्यांनी ही कामगिरी केल्याचे दिसेल. क्रिकेटने पछाडलेल्या भारतात ऑलिंपिक खेळांमध्येही पदक विजेते निर्माण व्हावेत, ही आस निर्माण झालेली यातून दिसेल. स्वतःला सिद्ध करून दाखविण्यासाठी एखाद्या खेळात चांगली कामगिरी केल्यास आयुष्यभराचा पोटापाण्याचा प्रश्न मिटतो; पण प्रतिष्ठाही मिळते हे आपल्या गावकऱ्यांनाही कळू लागले आहे, हेच पदकविजेत्यांची यादी दाखविते. देशात क्रिकेट हीच क्रीडासंस्कृती आहे, असे ठासून म्हणणाऱ्यांना हे चोख उत्तर आहे. देशात क्रीडासंस्कृती रुजत असल्याची शुभचिन्हे दिसू लागली आहेत. भारतामध्ये गुणवत्ता कमी नाही; पण संधी कमी आहेत, क्रीडासुविधा नाहीत, प्रशिक्षक नाहीत हेच आपण कायम ऐकत आहोत. ऑलिंपिक किंवा आशियाई स्पर्धा आल्या की किती पदके मिळाली असा हिशेब मांडणारे पुढच्या चार वर्षांमध्ये त्यासाठी काही करत नाहीत; पण गेल्या दोन दशकांमध्ये हे चित्र बदलते आहे. विविध राज्यांमध्ये झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या निमित्ताने आज बहुतेक राज्यांमध्ये किमान राजधानीच्या ठिकाणी तरी उत्तम क्रीडा सुविधा निर्माण झाल्या आहेत. 'स्टेडियम अथॉरिटी ऑफ इंडिया' म्हणून ओळख निर्माण झालेली 'साई' ही संस्था नावाप्रमाणे काम करू लागली आहे. स्पर्धेपूर्वी काही दिवस जागे होणारे सरकारी क्रीडा खाते कधी नव्हे तर स्पर्धेपूर्वी वर्षभर खेळाडूंच्या प्रशिक्षणाची तयारी करू लागले आहे. केंद्रीय क्रीडामंत्रीही एक ऑलिंपिक पदक विजेता खेळाडू आहे. ऑलिंपिक विजेते हे एका दिवसात तयार होत नाहीत. काही पिढ्यांची मेहनत त्यामागे असते. कोट्यवधींचा खर्च त्यासाठी करावा लागतो हे आता आपल्या देशाला पटू लागले आहे. खेळातही उत्तम कारकीर्द घडू शकते, हा मंत्र आता किमान मध्यमवर्गीय पालकांपर्यंत तरी पोहोचला आहे. आशियाई स्पर्धेतील यश हा या सगळ्याचा परिपाक आहे. एखादा खेळाडू विजय सोपानावर चढून सुवर्णपदक मिळवितो त्याच्या मागे फक्त त्याचे कष्ट, जिद्द नसतात, तर त्याच्यासाठी प्रशिक्षकापासून ते संघटनेतील अधिकाऱ्यांपर्यंत आणि पंचांपासून ते प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांचे समन्वित कष्ट व प्रयत्न असतील, तरच त्याला ती पायरी चढणे शक्य होते. या दृष्टीने या सगळ्याकडे पाहिले जाणे आवश्यक आहे. अर्थात, अजून बरीच मजल मारायची आहे. या स्पर्धेतील यश हे येणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये पुन्हा मिळवावे लागेल. अधूनमधून अपयश आले तर त्याचा अभ्यास करून या सगळ्या प्रक्रियेमध्ये सुधारणा कराव्या लागतील. त्याचबरोबर जगात या क्षेत्रामध्ये येणाऱ्या नवनवीन तंत्र आणि मंत्र आत्मसात करावे लागतील. फक्त पदक विजेत्यांनाच नाही, तर राष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करणाऱ्या सगळ्याच खेळाडूंना उत्तम सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागतील. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या खेळांकडे फक्त सरकारनेच नव्हे तर सामान्य नागरिकांनीही ममत्वाने पाहावे लागेल. त्याबरोबरच, विविध आंतरराष्ट्रीय क्रीडा संघटनांमधील भारताचे वर्चस्व वाढविण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करावे लागतील. सुदैवाने, आता आपला देश आर्थिक आघाडीवर चांगलाच प्रगतिपथावर आहे. त्यातून मिळणारी आर्थिक ताकद या खेळांच्या मागे विविध स्तरांवर उभी करावी लागेल. फक्त खेळाडू तयार करून पदके मिळत नाहीत. कारण एक साधा नियमबदल आपल्या सगळ्या तयारीवर पाणी टाकू शकतो. याचा फटका आपल्याला हॉकीसारख्या खेळांमध्ये बसलाही आहे, हे लक्षात ठेवावे लागेल. अर्थात हे सगळे करण्यासाठी येणारा भविष्यकाळ आपल्या हातात आहे. आजचा दिवस मात्र 'आता तर कुठे उजाडते आहे,' असे म्हणण्याचा आणि दिलखुलास आनंद व्यक्त करण्याचा आहे, इतके नक्की! |
तुमच्या 'प्लेट'मधील तूप-लोणी भेसळीचे तर नाही ना? पुणे : तुम्ही जर डेअरींमधून सुटे तूप आणि लोणी (बटर) खरेदी करीत असाल तर सावधान. . . तुम्ही हॉटेल्स, स्नॅक्स सेंटर आणि हातगाडीवर पावभाजी वा अन्य खाद्यपदार्थ खात असाल तर सावधान. . . कारण तुमच्या प्लेटमध्ये असलेले तूप आणि बटर 'भेसळी'चे असण्याची शक्यता आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने कोंढव्यातील एका कारखान्यावर छापा टाकून बनावट तूप व बटर तयार करणाऱ्या टोळीला गजाआड केले आहे. या ठिकाणी तीन खोल्यांमध्ये भेसळीचा गोरखधंदा सुरू होता. कोंढव्यातील गोकुळनगरमध्ये बनावट तूप तयार केले जात असल्याची माहिती पथकाचे सहायक फौजदार संभाजी भोईटे यांना मिळाली होती. त्यानुसार, पथकाने या कारखान्यावर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह छापा मारला. या तीन खोल्यांमध्ये मोठमोठ्या पिंपांमध्ये बटर आणि तूप भरून ठेवण्यात आलेले होते. यासोबतच मोठ्या पातेल्यांमध्ये तूप, बटर गरम करण्याचा उद्योगही सुरू होता. एवढ्या मोठ्या प्रमाणावर बनावट तूप होत असल्याचे पाहून पोलीसही अचंबित झाले. तूप, सोयाबीन तेल आणि वनस्पती तूप (डालडा) समप्रमाणात एकत्र करून तुपाची भेसळ केली जात होती, तर दुधाचे क्रीम, पाणी आणि सोयाबीन तेल एकत्र करून त्यापासून बनावट लोणी तयार केले जात होते. या पदार्थांची शहरातील विविध हॉटेल्स आणि डेअरींमध्ये विक्री केली जात होती. या रॅकेटने शहरातील जवळपास सोळा डेअरींमध्ये या मालाची विक्री केली आहे. त्याची यादी पोलिसांच्या हाती लागली असून त्यामध्ये सिंहगड रस्ता, मार्केट यार्ड, कात्रज, कोंढवा, घोरपडी पेठ, भारती विद्यापीठ, नऱ्हे, कर्वेनगर, धायरी येथील डेअरींचा समावेश आहे. आतापर्यंत या टोळीने जवळपास वीस लाखांचे पदार्थ शहरात विकले आहेत. एक वर्षापासून या ठिकाणी बेकायदेशीरपणे हा व्यवसाय सुरू होता. पोलिसांनी केसरसिंग रुपसिंग राजपूत (वय २८), शेरसिंग रामसिंग राजपूत (वय २६), गंगासिंग सुखसिंग राजपूत (वय ३०, सर्व रा. श्री सद्गुरु स्वामी समर्थ बिल्डिंग, गोकुळनगर, कोंढवा) यांना अटक केली आहे. हे सर्व जण दोन वर्षांपासून या ठिकाणी राहून बनावट तूप तपार करीत होते. पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाच्या मदतीने ही कारवाई केल्यानंतर शहरात असे भेसळीचे आणखी किती कारखाने असतील, याचा शोध घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. वास्तविक अशा व्यवसायांवर अंकुश ठेवण्याची मोठी जबाबदारी अन्न व औषध प्रशासनाची आहे. या टोळीने शहरातील अनेक हॉटेल्स आणि डेअरींमध्ये हा बनावट माल विकला आहे. केवळ २४० रुपये किलोने डेअरीमध्ये तूप विकले जाते. डेअरीमधून हेच बनावट तूप ४०० ते ४५० रुपये दराने ग्राहकांना विकले जात आहे. हॉटेल्समध्ये, स्नॅक्स सेंटरमध्ये रोटी, नान, पावभाजी आदी पदार्थांवर घालण्यात येणारे लोणी (बटर) भेसळीचे नसेलच, याची खात्री देता येत नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. विशेषतः हातगाडीवर आणि बाहेरील पदार्थ खाताना ग्राहकांच्या प्लेटमधील बटर आणि तूप भेसळीचे नाही ना, याची खात्री करण्याची आवश्यकता आहे. कारण अनेकदा स्वस्तात मिळते म्हणून व्यावसायिक अशा भेसळीच्या पदार्थांवर ग्राहकांना संतुष्ट करतात. चव उत्तम लागत असल्याने ग्राहकांनाही त्याचा संशय येत नाही. मात्र, भेसळीचा हा गोरखधंदा करून व्यावसायिक ग्राहकांच्या आरोग्याशी आणि प्रसंगी जीविताशी खेळ करीत असल्याचे चित्र आहे. |
बाराभाटी : अलिकडे मनोरंजनाच्या खेळातून पैसे कमविण्याचे दिवस गेले आहेत. मात्र पर्याय नसलेले कलावंत वेगवेगळ्या कसरती दाखवून आणि प्रसंगी जीवावर उदार होऊन लोकांचे मनोरंजन करतात. यातून मिळणाऱ्या अल्प मिळकतीवर त्यांचा संसार चालतो. येरंडी या गावात कसरतीचा खेळ दाखविण्यासाठी आलेला गफूर सय्यद हा त्यापैकीच एक. संपूर्ण महाराष्ट्रात कसरतीचा खेळ दाखवता-दाखवता तो गोंदिया जिल्ह्यातील येरंडीमध्ये दाखल झाला. तब्बल दोन तास तो गावकऱ्यांचे मनोरंजन करतो. गफूर काशीम सय्यद (४१) हा मालेगाव जि. नाशिकचा रहिवासी आहे. सोबत पत्नी आक्सिमा, मुलगा सुलतान व दोन लहान मुली असा कुटूंबाचा गाडा घेऊन तो या गावातून त्या गावात जातो. आतापर्यंत अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सहा गावांत त्याने कसरतीचे खेळ दाखविले. गणेश उत्सव, शारदा-दुर्गा उत्सवात सुद्धा कसरतीचे खेळ सुरू होते. या कसरतीमध्ये गफूर हा १०-१० प्रकारची कलाकारी करुन दाखवितो. हातावर चालणे, हवेत उडी मारणे, १० फूट उंच उडी मारणे, शेरो-शायरी करणे, ढोलक वाजवून मनोरंजन करणे, केसांनी गोल-गोल सायकली फिरविणे, केसांनी मुलांना फिरवणे, केसांनी ट्रॅक्टर जीप (मोठे वजन) ओढणे, केसांनी दगड उचलणे, डोळ्यांच्या पापणीने खुर्ची उलचणे, टायगर जम्प घेणे अशा सर्व प्रकारच्या कसरती त्याच्यासह सुलतान नावाचा त्याचा मुलगाही करतो. पत्नी ढोलक वाजवते. त्याचा खेळ हा कसरतच नसून जगण्यासाठीचे साधन बनला आहे. (वार्ताहर) |
राज्यात आज १५६१ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ४६ हजार ७८ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ३६०७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ४७ हजार ९६८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहितीही टोपे यांनी दिली. मुंबईः राज्यात आज दगावलेल्या १५२ रुग्णांपैकी ९७ रुग्ण हे एकट्या मुंबईतील आहेत. मिरा-भायंदर येथे ९, कल्याण-डोंबिवलीत ७, नवी मुंबईत ४, वसई-विरारमध्ये २, नाशिकमध्ये ५, औरंगाबादमध्ये ६, लातूरमध्ये २, पुणे आणि सोलापुरात प्रत्येकी ८, रत्नागिरी, हिंगोली, जालना आणि नांदेडमध्ये प्रत्येकी एक रुग्ण दगावला आहे. आज दगावलेल्या रुग्णांमध्ये १०२ पुरुष आणि ५० महिलांचा समावेश आहे. तसेच मृतांपैकी ६० वर्षांवरील ८५, ४० ते ५९ वयोगटातील ५४ आणि ४० वर्षांखालील १३ रुग्णांचा समावेश आहे. दगावलेल्या रुग्णांपैकी १०७ रुग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग आदी आजार होते, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.राज्यातील करोना रुग्णांच्या मृतांचा आकडा दिवसागणिक वाढतच आहे. आज राज्यात दिवसभरात १५२ करोनाबाधित दगावले असून राज्यात मुंबईत सर्वाधिक ९७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृतांची संख्या ३ हजार ५९० झाली आहे. राज्यात आज ३ हजार ६०७ नवे रुग्ण सापडल्याने एकूण रुग्णसंख्या ९७ हजार ६४८वर गेली आहे. त्याशिवाय आज १ हजार ५६१ रुग्ण करोनामुक्त झाल्याने करोना आजारातून बरे झालेल्यांची संख्या ४६ हजार ७८ झाली आहे. १५२ मृतांपैकी ३५ रुग्णांचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. तर इतर रुग्णांचा मृत्यू १ एप्रिल ते ८ जून या कालावधीतील आहेत. या कालावधीत ११७जण दगावले. त्यात मुंबईतील ८७, मिरा भाईंदर येथील ८, कल्याण-डोंबिवली आणि सोलापूर येथील प्रत्येकी ७, नवी मुंबईतील ४, नाशिकमधील ३ आणि वसई-विरारमधील एकाचा समावेश आहे. |
लोणंद येथे रविवारी अचानक आलेल्या पुराच्या पाण्यातून तिघेजण रस्ता पार करत होते. त्यातील अतुल सखाराम भंडलकर (वय ३५ रा. ठोंबरेमळा, लोणंद) हे बपत्ता झाले. त्यांचा मृतदेह तब्बल सोळा तासांनंतर सोमवारी सकाळी नऊ वाजता आढळून आला. लोणंद , दि. १६ : लोणंद येथे रविवारी अचानक आलेल्या पुराच्या पाण्यातून तिघेजण रस्ता पार करत होते. त्यातील अतुल सखाराम भंडलकर (वय ३५ रा. ठोंबरेमळा, लोणंद) हे बपत्ता झाले. त्यांचा मृतदेह तब्बल सोळा तासांनंतर सोमवारी सकाळी नऊ वाजता आढळून आला. घटनास्थळापासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर बाभळीच्या झाडात अडकलेल्या अवस्थेत सापडला. परंतु या पुराने बहीण-भावाची कायमची ताटातूट केली. वाई तालुक्यातील मांढरगडावर रविवारी सायंकाळी ढगफुटी झाली. यामुळे पावसाचे पाणी खंडाळ्यासह लोणंद परिसरात आल्याने पूर परिस्थिती ओढावली. अचानक आलेल्या पुरातून जात असताना पुष्पा शिवाजी जाधव (४५) व प्रशांत शिवाजी जाधव (२८) तसेच अतुल भंडलकर हे वाहून जाऊ लागले. यावेळी उपस्थित तरुणांनी साखळी करून व दोरीच्या साह्याने पुष्पा जाधव व प्रशांत जाधव या मायलेकरांना वाचविले. परंतु अतुल भंडलकर हे पुराच्या पाण्यात वाहून गेले. नातेवाईक, ग्रामस्थ व पोलिस भंडलकर यांचा रात्रभर शोध घेत होते. परंतु पावसाचा जोर, पाण्याचा प्रवाह व अंधारात शोधकार्यात अडथळे येत होते. सकाळी नऊच्या सुमारास पुराचे पाणी कमी झाल्यानंतर अतुल सखाराम भंडलकर यांचा मृतदेह आढळून आला. |
बऱ्याच काळापासून चित्रपटसृष्टीपासून दूर असलेला बॉलिवूड अभिनेता इम्रानखान पुन्हा एकदा चर्चेत आलाय. कारण, इम्रानवर सध्या अभिनंदनाचा वर्षाव होतोय. चित्रपट किंवा पुरस्कार मिळाल्यामुळं नाही तर, पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी निवड झाल्यामुळं पाकिस्तानातून त्याला शुभेच्छा संदेश येत आहेत. त्याचं झालं असं की, पाकिस्तानमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत इम्रान खान यांच्या तेहरीक-ए-इंसाफ या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या. तसंच १४ ऑगस्टला ते पंतप्रधानपदाची शपथ घेणार असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. त्यामुळं नामसाध्यर्मामुळं चाहत्यांचा काहीसा गोंधळ उडाल्याचं पाहायाला मिळत आहे. या गोंधळामुळं अभिनेता इम्रानला शुभेच्छा देणारे अनेक मेसेज आणि ईमेल आले आहेत. इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून इम्राननं हे कन्फ्यूजन दूर केलं आहे. इमराननं एका चाहत्यानं पाठवलेल्या ईमेलचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. 'प्रिय पंतप्रधान इम्रान खान साहेब, एक यशस्वी नेता योग्यवेळी योग्य निर्णय घेतो. त्याला त्याच्या खऱ्या सहकारी, समर्थकांची ओळख असते आणि तो विश्वासू लोकांची टीम बनवतो. मी तुमच्या टीममध्ये येण्यास उत्सूक आहे. ' असं या इमेलमध्ये लिहिलं आहे. हा फोटो शेअर करताना इमराननं 'आता मी जास्त वाट पाहू शकत नाही, याच आठवड्यापासून मी नवीन निती बनवण्यास सुरूवात करत आहे. याबाबत मी तुम्हाला वेळोवेळी माहिती देत राहील. ' असं उपहासानं म्हटलं आहे . |
कोल्हापूर : बेस्ट ऑफ फाईव्ह सूत्र आणि अंतर्गत गुणांमुळे यावर्षी दहावीच्या विद्यार्थ्यांची एकूण टक्केवारी वाढली आहे. त्यामुळे अकरावी प्रवेशाचा कटऑफ वाढण्याची शक्यता आहे. मात्र, कटऑफ वाढला, तरी प्रवेशाची चिंता करण्याची गरज नाही. कारण, शहरातील उपलब्ध प्रवेश क्षमता १४८६० आहे. या तुलनेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ८०६८ आहे. शहरातील विविध ३५ महाविद्यालयांमधील कला, वाणिज्य (मराठी, इंग्रजी), विज्ञान शाखेची एकूण प्रवेश क्षमता १४,६८० आहे. त्यासाठी गेल्यावर्षी १२,६९१ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केले होते. त्यामधील ९५८८ विद्यार्थ्यांना निवड यादीनुसार पहिल्या फेरीत प्रवेश मिळाला होता. मात्र, पहिल्या आणि दुसऱ्या फेरीमध्ये एकूण ६,८७३ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले, तर ७,८०७ इतक्या जागा रिक्त राहिल्या. कोरोनामुळे यावर्षी दहावीची परीक्षा रद्द झाली आणि इयत्ता नववी, दहावीतील अंतर्गत गुणांच्या आधारे दहावीच्या विद्यार्थ्यांचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. यंदा दहावीच्या परीक्षेसाठी कोल्हापूर शहरातील नोंदणी केलेले सर्व ८,०६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मात्र, हे सर्वच विद्यार्थी अकरावीला प्रवेश होत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या टक्केवारीतील वाढीमुळे यावर्षी कटऑफ वाढला, तरी अकरावी प्रवेशापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहणार नसल्याचे दिसून येते. महाविद्यालयीन शिक्षणासाठी शहरातील महाविद्यालयांना प्राधान्य देणाऱ्या करवीर तालुक्यातील ६,३६५, कागलमधील ४,०८३, राधानगरीतील २,६४७ आणि गगनबावडा तालुक्यातील ५३० विद्यार्थी उत्तीर्ण आहेत. यातील बहुतांश विद्यार्थी हे आयटीआय, पॉलिटेक्निक प्रवेशाला प्राधान्य देतात. त्यासह अकरावीसाठी अर्ज करून ठेवतात. त्यामुळे अकरावीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीकडील अर्जांच्या संख्येत वाढ दिसून येते. विद्यार्थ्यांच्या कल आणि खुल्या प्रवर्गामध्ये एसईबीसी प्रवर्गातील १२ टक्के जागा वर्ग झाल्याने गेल्यावर्षी शहरातील अकरावीच्या विज्ञान विद्याशाखा आणि वाणिज्य इंग्रजी माध्यमाच्या प्रवेशाचा कटऑफ तीन टक्क्यांनी वाढला. त्यात विज्ञानापेक्षा वाणिज्य इंग्रजीचा कटऑफ अधिक आहे. वाणिज्य इंग्रजी माध्यमाचा कटऑफ ९३. ४० टक्के, विज्ञानचा ९३ टक्के, वाणिज्य मराठीचा ८३. २० टक्के, तर कला इंग्रजीचा ६९. २० आणि मराठी माध्यमाचा ६१. ८० टक्के कटऑफ लागला आहे. |
आगामी OnePlus 6T मोबाईल फोनचा स्पेशल एडिशन 10GB रॅम सह लॉन्च केला जाऊ शकतो, हा डिवाइस OnePlus 6T MacLaren Edition म्हणून लॉन्च केला जाऊ शकतो. जसे OnePlus ने आपल्या इतर काही स्मार्टफोन्स सोबत पण केले आहे तसेच काहीसे कंपनी आपल्या OnePlus 6T मोबाईल फोनचा लॅव्हेंडर पर्पल एडिशन लॉन्च करून पण केले होते. तसेच आता असे समोर येत आहे कि OnePlus 6T चा एक स्पेशल एडिशन लवकरच लॉन्च केला जाऊ शकतो. हा वर्जन को MacLaren सोबत भागेदारी करून लॉन्च केला जाणार असल्याच्या बातम्या येत आहेत. या फोन बद्दल माहिती पण लीक झाली आहे. असे बोलले जात आहे कि या मोबाईल फोन मध्ये 10GB चा रॅम असणार आहे. नुकताच OnePlus 6T मोबाईल फोनचा थंडर पर्पल कलर ऑप्शन पण भारतात लॉन्च केला गेला आहे, याआधी हा मोबाईल फोन चीन मध्ये लॉन्च केला गेला होता. OnePlus 6T मध्ये 6.41 इंचाचा ऑप्टिक AMOLED 19.5:9 डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याचे रेजोल्यूशन 2340 x 1080p पिक्सल आहे आणि याची पिक्सल डेंसिटी 402 PPI आहे. स्क्रीनला नवीन कोर्निंग गोरिला ग्लास 6 प्रोटेक्शन देण्यात आले आहे आणि वनप्लस चे म्हणणे आहे कि या नवीन नॉच मुळे डिवाइसचा स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो 86 टक्के होतो जो OnePlus 6 मध्ये 83.8 टक्के होता. OnePlus चे म्हणणे आहे कि कंपनी ने डिस्प्लेची ब्राइटनेस लेवल, कलर एक्यूरेसी आणि कलर रेंज सुधारण्यासाठी पण काम केले आहे. वनप्लस 6T क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 845 SoC द्वारा संचालित आहे आणि याचा क्लॉक स्पीड 2.8GHz पर्यंत आहे तसेच हा डिवाइस 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज सह येतो. ऑप्टिक्स बद्दल बोलायचे तर OnePlus 6T मध्ये मागील OnePlus 6 सारखाच कॅमेरा सेटअप आहे. डिवाइसच्या रियर वर 16 आणि 20 मेगापिक्सलचा डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जे क्रमशः Sony IMX 519 आणि Sony IMX 376K सेंसर्स आहेत. 16MP च्या प्राइमरी कॅमेऱ्याचा अपर्चर f/1.7 आहे आणि हा 1.22µm पिक्सल साइज सह येतो तर दुसरा 20 मेगापिक्सलचा सेंसर f/1.7 अपर्चर आणि 1.0µm पिक्सल साइज सह येतो. फ्रंट कॅमेरा बद्दल बोलायचे तर हा 16 मेगापिक्सलच्या Sony IMX 371 सेंसर सह येतो ज्याचे अपर्चर f/2.0 आहे आणि हा EIS व 1.0µm पिक्सल साइज सह येतो. OnePlus 6 प्रमाणे OnePlus 6T मध्ये पण फोनच्या सेटिंग्स मध्ये जाऊन नॉच हाईड करता येते. OnePlus 6T मध्ये 3700mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. |
"तू चल तेरे वजूद की समय को भी तलाश है. . ! " त्यातच माझ्या जीवनाच यश सामावल आहे...! " सुप्रसिद्ध लेखक रणजीत देसाई यांनी 'राधेय' कांदबरीत लिहिलेल्या या ओळी आमदार अस्लम शेख यांच्यासाठीच लिहिल्या असाव्यात असं वाटावं एवढे राजकीय हल्ले त्यांनी आजपर्यंतच्या राजकीय आयुष्यात पचवले आहेत. तरीही प्रत्येक प्रतिकुल परिस्थितीला धीरोदात्तपणे सामोरे जात या माणसाने आपला सदसद्विवेक व संयम कधीही ढळू दिला नाही. कोणत्याही भूभागाला परिस्थितीला, काळाला त्याचा नायक हवा असतो. त्या नायकाच्या लेखणीतूनच नियतीला काळाच्या उदरात विलक्षण असं काही लिहून ठेवायचं असतं. मालाडच्या विशिष्ट अशा भूभागाला, तत्कालिन परिस्थितीला आणि काळाला त्याचा नायक मिळाला तो अस्लम शेख यांच्या रुपानं. अस्लम शेख हे फक्त एक राजकीय व्यक्तिमत्त्व नव्हतं, अस्लम शेख ही तत्कालिन मालाडची गरज होती. नव्हे तर तत्कालिन परिस्थितीतीचं ते अपत्य होते. मालाडच्या मातीत फुटलेला हा अंकुर पुढे जाऊन राज्याचं राजकारण ढवळून काढेल असं त्या काळी कितीही मोठ्या भविष्यवेत्याने सांगितलं असतं तरी त्यावर कोणी विश्वास ठेवला नसता. कारण पूर्वजांची प्रतिष्ठा, बुद्धिवैभवाचा बडेजाव, प्रचंड पैसा ह्यापैकी कशाचीही पार्श्वभूमी या माणसाच्या मागे नव्हती, तरीही या माणसाने अवघ्या २५-३० वर्षांच्या आपल्या राजकीय कारकिर्दीत नव्हत्याचे होते करुन दाखवले. आणि म्हणूनच ज्यांना मानवी क्षमतांच्या गुढतेविषयी नेहमी कुतुहल वाटत आलय, त्यांना अचंबित करुन टाकणारा अस्लम शेख यांचा सामाजिक, राजकीय जीवन प्रवास आहे. विविध धर्मांनी नटलेल्या मालाड पश्चिम विधानसभा क्षेत्रामध्ये आपल्या २५-३० वर्षांच्या राजकिय कारकिर्दीत एकही धार्मिक किंवा जातिय दंगल होऊ न देणं हे अस्लम शेख यांच्या नेतृत्वाचं खरं यश आहे. सर्व धर्मिय बांधवांना धर्मनिरपेक्षतेच्या, प्रेमाच्या आणि बंधुत्वाच्या धाग्यामध्ये गुंफण्याचा करिश्मा या अवलियाने करुन दाखवला. गेली ३० वर्ष ही ऐकोप्याची माळ त्यांनी तुटू दिली नाही. २०१४ च्या मोदी लाटेत कॉंग्रेसच नव्हे तर मोठ-मोठ्या राजकीय घराण्यांची साम्राज्ये पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे ढासळत होती, तेव्हा मोदींच्या विजयी अश्वमेधाच्या मार्गात हिमालयाप्रमाणे उभा राहणारा हाच तरुण होता. खरतर अस्लम शेख कुठल्या एका राजकीय पक्षाचे उमेदवार म्हणून या अश्वमेधाच्या समोर उभे नव्हते. तर ते उभे होते प्रतिक बनुन धर्मनिरपेक्षतेच्या विचाराचे. ज्या विचाराची पेरणी दशकभर आधी मालाडमध्ये अस्लम शेख यांनीच करायला सुरूवात केली होती. त्यांनी पेरलेली विचारांची बिजं २०१४ पर्यंत वटवृक्षात रुपांतरीत झाली होती. मुळं जमिनीला खोलवर घट्ट पकडून होती. याचाच परिणाम असा झाला की, जगातला सर्वात मोठा पक्ष असा दावा करणाऱ्या पक्षाच्या सर्व चाणक्यांची समिकरणं मालाडमध्ये सपशेल फसली. सांप्रदायिक विचारांचे पाईक असणाऱ्यांचे सर्व मनसूबे मालाडच्या या मातीत गाडले गेले. खरतर ही २०१४ साली अस्लम शेख यांचा मोदी लाटेत साकारलेला विजय हा त्या धर्मांधांना संदेश होता की, जेव्हा-जेव्हा तुम्ही आपल्या मदमस्त सत्तेच्या विजयी अश्वमेधाचा घोडा असा उन्मत्तपणे पळवाल तेव्हा-तेव्हा कोणी ना कोणी अस्लम शेख तुमचे मनसुबे फस्त करण्यासाठी तुमच्या मार्गात असाच एका पर्वताप्रमाणे उभा राहिल. पण अस्लम शेख यांचा हा विजय फक्त मालाड पश्चिम विधानसभा क्षेत्रापूरताच मर्यादीत राहिला नाही. या विजयातच मुंबईतील नव्या राजकीय संघर्षाची ठिणगी पेरली गेली होती. ज्या शक्तिंना देशातील धर्मनिरपेक्षतेचा विचार संपवायचा होता, त्या शक्तिंसाठी अस्लम शेख यांचा हा विजय मोठा धक्का होता. इथूनच या शक्तिंचं मिशन मालाड सुरु झालं. पण आपल्या तत्त्व, मुल्य आणि विचारांशी प्रामाणिक असलेल्या अस्लम शेख यांनी २०१९ साली पुन्हा या धर्मांधांचे मनसुबे फस्त करत विजय साकारला. राज्याच्या राजकारणाची समिकरणं बदलली आणि अस्लम शेख यांची राज्याच्या राजकारणात एन्ट्री झाली. अस्लम शेख कॅबिनेट मंत्री झाले. वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय, बंदरे या खात्यांसोबतच मुंबई शहराच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारीही त्यांच्या खाद्यांवर पडली. मंत्रीपद भूषविण्याची पहिलीच वेळ असताना देखील ते आपल्या कार्यकर्तुत्वाचा ठसा त्यांच्यावर जबाबदारी असलेल्या सर्व खात्यांवर उमटवण्यात यशस्वी ठरले. आपल्या मंत्रीपदाच्या प्रारंभीच्या काळातच कोरोनासारख्या वैश्विक आपत्तीला सामोरं जाताना त्यांनी धारावीसारख्या आशिया खंडातल्या सर्वात मोठ्या झोपडपट्टीत कोरोनावर नियंत्रण मिळवलं. अर्थातच त्यांच्या या यशात बृहन्मुंबई महानगरपालिका व संबधित यंत्रणांचा सिंहाचा वाटा होता. पण पहिल्यांदाच मंत्रीपद भूषवत असलेल्या अस्लम शेख यांच्या प्रशासकीय कौशल्याचा देखील या काळात प्रचंड कस लागला. मत्स्यव्यवसाया सारख्या वर्षानुवर्ष दुर्लक्षित असलेल्या विभागात अस्लम शेख यांनी दैदीप्यमान असं काम करुन दाखवलं. अनधिकृत मासेमारीला चाप लावणारा आणि पारंपरिक मच्छीमारांच्या हिताचा कायदा त्यांनी आणला. ४० वर्ष हा कायदा आणण्याचं धाडस विभागाच्या यापूर्वीच्या कोणत्याही मंत्र्याने दाखवलं नव्हतं. म्हणूनच हा कायदा मत्स्यव्यवसाय क्षेत्रामधला मैलाचा दगड ठरला. 'क्यार' व 'महा' चक्रीवादळग्रस्त मच्छीमारांसाठी त्यांनी ६५ कोटींचं आर्थिक पॅकेज मंजूर केलं. मत्स्यव्यवसायातून रोजगारनिर्मिती करण्यासाठी माशांच्या कातडीपासून खाद्यपदार्थ व विविध वस्तू बनविण्याच्या प्रयोगास त्यांनी चालना दिली. ओएनजीसीच्या भूगर्भ सर्वेक्षणामुळे आर्थिक नुकसान झालेल्या मच्छीमारांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळावेत, यासाठी मंत्री असतानाही समुद्रात आंदोलन करण्याचा इशारा ओएनजीसीला दिला. मच्छीमारांच्या नुकसान भरपाईबाबत धोरण निश्चित करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमली. देशातील पहिली-वहिली 'वॉटर टॅक्सी'सेवा सुरु करण्याचं श्रेय देखील अस्लम शेख यांना जातं. वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी वीजबिल दर सवलीचे प्रस्ताव त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत आणले. वस्त्रोद्योग क्षेत्राला उर्जितावस्था प्राप्त व्हावी यासाठी उपाययोजना करण्यासाठी त्यांनी तज्ज्ञांच्या समित्या नेमल्या. मंत्रालय आपल्या दारी हा उपक्रम राबवत वातानुकुलित दालनांमध्ये बसून धोरणनिर्धारणाची प्रक्रिया खंडीत केली. एक मंत्री म्हणून मळलेल्या वाटेने चालण्यापेक्षा त्यांनी स्वतःच्या नव्या वाटा तयार केल्या. त्यांच्यावर जबाबदारी असलेल्या प्रत्येक खात्यात त्यांनी नव-नवे प्रयोग केले. आज साहेब मंत्री नाहीत. पण मंत्रीपद जाण्यापेक्षा आपल्या कार्यकाळात अंतिम टप्प्यात असलेल्या परंतू सत्तांतर झाल्यामुळे अपूर्ण राहिलेल्या कामांमुळे ते व्यथित झाले. त्यांच्या मनातील ही खंत ते कित्येकदा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये बोलूनही दाखवत असतात. आज सत्ता नसली तरीही अस्लम शेख यांच्या कार्याचा झंजावात कुठेही कमी झालेला नाही. पण प्रत्येक सामर्थ्यशाली माणसाला आयुष्यात ज्या संघर्षाला सामोरं जावं लागतं त्याच संघर्षाला अस्लम शेख यांना आज सामोरं जावं लागतय. सामर्थ्यशाली माणसाच्या पराक्रमाकडे कोणाचं लक्ष नसतं मात्र त्याच्या रथाचं चाक कधी जमिनित रुततं ह्याची अनेकांना प्रतिक्षा असते. आज बदललेली राजकीय परिस्थिती हेरुन पुन्हा एकदा या धर्मनिरपेक्ष नेत्याची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू झालेत. खरतर अस्लम शेख हे तर फक्त निमित्तमात्र आहेत. ह्या शक्तींना मालाडच्या मातीत रुजलेला सर्वधर्म समभावाचा विचार संपवायचा आहे. पण जोपर्यंत या भागाचे नेतृत्व अस्लम शेख करत आहेत, तोवर या शक्तींना हा डाव साधणं कठीणच नव्हे तर अशक्य आहे. आज अस्लम शेख यांचा जन्मदिवस. मालाडच्या सर्वधर्मिय नागरिकांना धार्मिक एकात्मतेच्या धाग्यामध्ये गुंफणारा, मालाडच्या राजकीय क्षितिजावर तेजस्वी सूर्याप्रमाणे तळपणाऱ्या ह्या नेत्याला वाढदिवसाच्या कोटी-कोटी शुभेच्छा. . ! ज्या माणसांना स्वतःच्या सामार्थ्यावर विश्वास असतो, जी माणसं स्वतःशी प्रामाणिक असतात त्यांची पाऊलं कोणत्याही परिस्थितीत डगमगत नाहीत. ही व्यक्तिमत्त्व रात्रीच्या काळोखात अग्निचा वारसा पेरणाऱ्या सूर्याप्रमाणे बंधुत्त्वाचा, सहिष्णूतेचा आणि प्रेमाचा विचार समाजात पेरत राहतात. अशी व्यक्तिमत्त्व विलक्षण सुंदर असतात. वाढदिवसाच्या अभिष्टचिंतनपर लेखाचा शेवट करताना एवढच म्हणेन, "तू खूद की खोज में निकल तू किस लिए हताश है, तू चल तेरे वजूद की समय को भी तलाश है. " |
अकलूज, दि. १७ (पीसीबी) - ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांची ५० वर्षाची राजकीय कारकीर्द आहे. त्यामुळे विजयसिंह मोहिते पाटील यांचा सत्कार करण्याचा मान मला मिळाला, हे माझे भाग्य समजतो, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपप्रवेश केला आहे. त्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील पहिल्यांदाच भाजपच्या व्यासपीठावर आले होते. अकलूज येथे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मोदींच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या व्यासपीठांवर मोहिते पाटील यांचा सत्कार मोदींच्या हस्ते करण्यात आला. मोदी म्हणाले की, विजयसिंह मोहिते पाटील यांचा सन्मान करणे हे माझे भाग्य आहे. मी स्वतःला भाग्यशाली समजतो. सार्वजनिक जीवनात त्यांनी कुठल्याही पक्षात काम केलेले असो, त्यांचे काम मोठे आहे. त्यांना उत्तम स्वास्थ्य आणि दिर्घाआयु ष्य लाभो आणि त्यांना देश आणि महाराष्ट्राची सेवा करण्याची आणखी शक्ती लाभो, अशी कामना मोदी यांनी यावेळी केली. |
- डॉ. लेख): आठ वर्षांपासून घेत आलो. आजपर्यंत पाळत आलो. साहित्यिक, सांस्कृतिक, भाषिक, कला, लोकजीवन, सामाजिक, धर्मकारण, राजकारण, शैक्षणिक, सुधारक, प्रबोधनात्मक, पर्यावरण, वैश्विक घटना, अतिरेकविरोध, शेती, म्हणता येणार नाही. हे लेख केव्हाही वाचताना विशिष्ट संदर्भात 'कालाय' ठरावेत असा दृष्टीकोन ठेऊन लिहिले आहेत. लेखांवरून नजर फिरवली तर त्यातल्या विषयांची विविधता लक्षात येईलच, पण एखादा विषय पुन्हा चर्चेला आला तरी त्याचा आशय पूर्णपणे वेगळा आहे. काहीतरी आतून सांगायचं असतं. वर्णन मी शब्दांत मांडू शकत नाही. लेखन या पुस्तकाच्या मिमित्ताने एकत्र वाचून वाचकांना नक्कीच समाधान मिळेल. वाचकांच्या अभिप्रायांमुळे, प्रतिक्रियांचं सुध्दा स्वागत करत असतो. ) कायम स्वागत करत आलो. धन्यवाद. नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती. ) |
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. मद्य उत्पादन धोरण घोटाळाप्रकरणी सीबीआयने त्यांच्याविरोधात लुकआऊट जारी केलं आहे. त्याचबरोबर यासंबंधीचे सर्व कागदपत्रे सीबीआयने ईडीला सोपवले आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. यावरून मनिष सिसोदिया यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. सीबीआयचे लुकआउट परिपत्रक जारी झाल्यानंतर मनीष सिसोदिया यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली. ते म्हणाले की, काय नौटंकी आहे? मी दिल्लीत बिनधास्त फिरतोय, सांगा कुठे येऊ? त्याचबरोबर सिसोदिया यांनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना पंतप्रधान मोदींचे एक विधानही शेअर केले आहे, ज्यामध्ये ते सीबीआयच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. मनीष सिसोदिया यांनी ट्विट करून लिहिले की, "तुमच्या सगळ्या धाडी फेल गेल्या आहेत. त्यात काही सापडले नाही. एका पैशात हेराफेरी सापडली नाही. आता तुम्ही लुक आऊट नोटीस जारी केली आहे की मनीष सिसोदिया सापडत नाहीत. ही काय नौटंकी आहे मोदी जी? मी मुक्तपणे फिरतोय. दिल्लीत कुठे यायचे ते सांगा ? असा सवाल त्यांनी विचारला. लुकआऊट नोटीस जारी होण्यापूर्वी सिसोदिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये लिहिले होते, माना कि धीरे धीरे तो, मौसम भी बदलते रहते हैं, आपकी रफ़्तार से तो, हवाएं भी हैरान हैं साहब, असा सिसोदिया यांनी टोला लगावला. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी आज तकशी बोलताना सांगितले की, सीबीआयच्या छाप्यात काहीही सापडले नाही, तेव्हा लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली याचे मला आश्चर्य वाटते. मोदींनी छापेमारी करण्यापेक्षा महागाई आणि बेरोजगारीचा विचार करावा. यासोबतच ते म्हणाले की, सीबीआयचे वास्तव मोदींकडून ऐकून घेतले पाहिजे. माझ्या घरून एक पैसाही मिळाला नाही, ऑफिसच्या फाईल्स घेतल्या आहेत. मद्य धोरणावर सिसोदिया म्हणाले की, कोणताही घोटाळा झाला नाही. सीबीआय चौकशीची गरज नाही. यासोबतच अटकेच्या प्रश्नावर ते म्हणाले की, हा घोटाळा नाही, त्यामुळे अटक करणार. या घोटाळ्याची काळजी असती तर गुजरातमधील अवैध दारूची चौकशी झाली असती. अरविंद केजरीवाल यांना रोखण्यात त्यांचे हित आहे. नवीन उत्पादन शुल्क धोरणाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली नसल्याच्या आरोपावर सिसोदिया म्हणाले की, यात कोणताही गैरप्रकार झालेला नाही, सखोल चौकशीनंतरच छापा टाकण्यासाठी आले होते. भाजप नेते कपिल मिश्रा यांनी ट्विट करून सिसोदिया यांना लुकआउट नोटीसचा अर्थ सांगितला आहे. मिश्रा यांनी ट्विट केले आहे की, "दिल्लीचे शिक्षणमंत्री इतके अशिक्षित आणि मूर्ख आहेत का की त्यांना लूक आऊट नोटीसचा अर्थ कळत नाही? लूक आऊट नोटीसचा अर्थ असा आहे की तुम्ही आता देशाबाहेर पळून जाण्याचा प्रयत्न केल्यास तुम्हाला रोखले जाईल. तुमच्या या घोटाळ्यातील दोन गुन्हेगार परदेशात पळून गेले आहेत. |
गांधीनगर : गांधीनगरमधील वादग्रस्त जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसविल्याने निर्माण झालेल्या वादामुळे सिंधी बांधवांनी सलग पाचव्या दिवशीही गांधीनगर बाजारपेठ बंद ठेवली. दरम्यान, याप्रश्नी तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष महेश जाधव, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, प्रा. शहाजी कांबळे व सिंधी बांधवांची दुपारी सर्किट हाऊसमध्ये बैठक झाली, पण ही चर्चा अंतिम निर्णयापर्यंत पोहोचली नाही. या बैठकीदरम्यान अनेक पर्याय सुचविण्यात आले. त्यामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या प्रतिनिधींनी गांधीनगरमध्ये पर्यायी जागा सुचवावी, जेणेकरून त्या ठिकाणी डॉ. बाबासाहेबांचा पुतळा बसविता येईल. त्यावर पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे सुचविले. त्यानंतर बैठकीची सांगता झाली. दरम्यान, सायंकाळी भाजपचे जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांनी गांधीनगर येथे येऊन व्यापारी व सिंधी बांधवांना शांततेचे आवाहन केले. तसेच शनिवारपर्यंत यावर तोडगा निघेल, असेही सांगितले. याप्रश्नी ठोस निर्णय न झाल्याने व्यापाऱ्यांनी 'बेमुदत बंद'ची हाक कायम ठेवली आहे. मुळची महाराष्ट्र शासनाची ही आरक्षित जागा आहे. त्या जागेवर 'सार्वजनिक शौचालयासाठी आरक्षित' असा उल्लेख आहे. तरीही याच जागेवर दुर्गामातेचे मंदिर अनधिकृत उभा केले आहे. त्यावेळी इतका विरोध झाला नाही, पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी का विरोध होतो, अशी भावना 'लोकमत'शी रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बोलून दाखविली. सिंधी बांधव, कोल्हापूर जिल्हा भाजपचे सरचिटणीस श्रीचंद्र पंजवाणी म्हणाले, ही जागा महामानवाच्या स्मारकासाठी योग्य नाही. याठिकाणी भाजी मार्केट तसेच फळांच्या गाड्या उभ्या असतात. कोणीही कचरा याठिकाणी टाकल्यास ते योग्य ठरणार नाही. त्यामुळे आमचा विरोध पुतळा उभारणीला नाही, तर तो वादग्रस्त जागेवर उभारणीला आहे. रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यानी सांगितले, वातावरण दूषित न करता सामाजिक सलोखा राहण्यासाठी दैनंदिन व्यवहार सुरू ठेवून न्यायालयाच्या आदेशाची वाट पहावी. |
अहमदनगर : येथील रमेश फिरोदिया कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात रेड रिबन क्लब अंतर्गत मंगळवारी (दि. २२) मोफत एच. आय. व्ही. तपासणी शिबिर घेण्यात आले. उद्घाटन प्रा. डॉ. सचिन घोलप यांच्या हस्ते झाले. यावेळी शंकरराव खेमनर व दीपक फिरोदिया उपस्थित होते. २१ व्या शतकात मानव जातीला एड्स ही एक भेडसावणारी समस्या निर्माण झाली आहे. जागतिक अहवालानुसार ८५ टक्के बाधित हे १५ ते ४९ या वयोगटातील आहेत. या शिबिरात ५० जणांची एच. आय. व्ही. तपासणी करण्यात आली. यासाठी साकुर ग्रामीण रुग्णालयाचे समुपदेशक डॉ. विकास वाळुंज यांचे साहाय्य लाभले. यावेळी उपप्राचार्य प्रा. आर. आर. गिरी, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. एम. टी. खेमनर, ग्रंथपाल प्रा. राशिनकर, प्रा. कुलकर्णी, प्रा. हिंगे, प्रा. पी. आर. खेमनर, प्रा. एस. ए. मुन्तोडे यांच्यासह प्राध्यापक-प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. खेमनर यांनी केले व प्रा. प्राजक्ता बिडवे यांनी आभार मानले. रमेश फिरोदिया महाविद्यालयात एचआयव्ही तपासणी शिबिराचे उद्घाटन डॉ. सचिन घोलप यांच्या हस्ते झाले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी. अहमदनगर : येथील नगर महाविद्यालयाजवळील युनियन बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय कार्यालय व महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत कर्ज वितरण मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात महापालिका उपायुक्त दिनेश सिनारे व बँकेचे क्षेत्रीय प्रमुख सुनीलकुमार जदली यांच्या हस्ते नागरिकांना कर्जाचे वाटप करण्यात आले. या कर्ज वितरण मेळाव्यात सचिन राऊत, अवधेश ठाकूर, बँकेचे प्रबंधक संदीप वाळवलकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. युनियन बँकेचे क्षेत्रीय प्रमुख सुनीलकुमार जदली म्हणाले, कोरोना काळात अनेकांचे रोजगार बुडाले, तर काहींच्या नोकऱ्या गेल्या. साधनसामग्री उपलब्ध करून स्वतःचा व्यवसाय थाटण्यासाठी पंतप्रधान स्वनिधी या योजनेचा फायदा होणार आहे. सध्या बिकट आर्थिक परिस्थितीची जाणीव ठेवून सरकारने गोरगरिबांसाठी कर्ज प्रक्रिया चालू केली आहे. हे कर्ज घेऊन पूर्णपणे व्यवस्थित फेड केली असता पुढच्या वेळेस अधिक कर्ज मिळणार आहे. महापालिका उपायुक्त दिनेश सिनारे यांनी या योजनेचा जास्तीत जास्त गरजवंतांनी लाभ घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमासाठी युनियन बँकेचे क्षेत्रीय उपप्रमुख विजया सारधी, मुख्य प्रबंधक ज्ञानेश्वर साळुंखे, मनोज कुमार उपस्थित होते. सूत्रसंचालन शुभांगी सदाफळ यांनी केले. यशस्वितेसाठी सचिन शिरसाठ, समीर शेख, मुशीर खान, अच्युत देशमुख यांनी परिश्रम घेतले. युनियन बँक ऑफ इंडिया व महापालिका यांच्यातर्फे आयोजित कर्ज वितरण मेळाव्यात कर्जाचे वाटप करताना उपायुक्त दिनेश सिनारे. समवेत बँकेचे क्षेत्रीय प्रमुख सुनीलकुमार जदली, सचिन राऊत, अवधेश ठाकूर, प्रबंधक संदीप वालवलकर, विजया सारधी, ज्ञानेश्वर साळुंखे आदी. |
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' या खासगी निवासस्थानात हनुमान चालिसा पठण करण्याच्या घोषणेसह दोन समुदायांत तेढ निर्माण होईल, अशी वक्तव्ये केल्याने राजद्रोहाच्या कलमासह अन्य कलमांखाली खासदार नवनीत राणा व त्यांचे पती आमदार रवी राणा (Navneet Rana And Ravi Rana) यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर अडचणीत सापडलेल्या राणा दाम्पत्याने आज तातडीने मुंबई हायकोर्टात (Mumbai High Court) धाव घेतली. एफआयआर रद्द करण्याच्या विनंतीची फौजदारी रिट याचिका केल्यानंतर त्यावर हायकोर्टात सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने नवनीत राणा आणि रवी राणा यांनी दाखल केलेली याचिका फेटाळून लावली आहे. राणा दाम्पत्याचे वकील अॅड. रिझवान मर्चंट यांनी तातडीचा विषय असल्याचे सांगत सुनावणी घेण्याची विनंती केल्यानंतर न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे व न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठाने दुपारी सुनावणी घेण्याची तयारी दर्शवली. यावेळी याचिका फेटाळत असताना कोर्टाने अत्यंत महत्वपूर्ण निरीक्षण नोंदवलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानात किंवा निवासस्थानाबाहेर म्हणजेच रस्त्यावर हनुमान चालिसा म्हणू, अशी राणा दाम्पत्याची घोषणाच अन्य व्यक्तीच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचे उल्लंघन करणारी आहे, असं मुंबई हायकोर्टाने आपल्या आदेशात म्हटलं आहे. हायकोर्टाने एफआयआर रद्द करण्याची याचिका फेटाळल्याने राणा पती-पत्नीचा तुरुंगातील मुक्काम वाढणार आहे. राणा दाम्पत्य आणि ठाकरे सरकार संघर्ष; नेमकं काय आहे प्रकरण? राणा दाम्पत्याविरोधात पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम १५३-अ खाली दोन समुदायांत तेढ निर्माण केल्याच्या आरोपाखाली एफआयआर नोंदवला होता. तसंच कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याच्या आरोपाखाली बॉम्बे पोलीस कायद्याखालील कलमेही लावली. त्यानंतर पोलिसांनी राजद्रोहाचे १२४-अ हे कलमही वाढवले. त्यामुळे राणा दाम्पत्याच्या अडचणी वाढल्या. 'पोलिसांची ही कारवाई पूर्णपणे राजकीय हेतूने प्रेरित आहे आणि राजद्रोहाचे कलमही त्याच उद्देशाने लावण्यात आलं आहे. त्यामुळे हे कलम रद्द करण्याचे आणि एफआयआरही रद्द करण्याचे निर्देश पोलिसांना द्यावेत', अशी विनंती राणा दाम्पत्याने याचिकेत केली होती. |
ठाणे :- मुंबई परिसरात बेस्ट सेवा संपामुळे बंद असून याचा परिणाम सर्व परिसरात पाहायला मिळत आहे. नागरिक लोकलने जास्त प्रमाणात प्रवास करत आहेत. परंतु शुक्रवार मध्यरात्री आणि शनिवारी इगतपुरीजवळ ब्लॉक असल्याने याचा त्रास लोकल सेवेवर होणार आहे. रेल्वे प्रशासनातर्फे इगतपुरी स्थानकावर फूट ओवर ब्रिज गर्डर बसविण्यासाठी विशेष ट्रॉफिक आणि पावर ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे भुसावळ-मुंबई पॅसेंजर रद्द करण्यात आली. काही गाड्या उशिराने धावल्या, तर काहींच्या वेळात बदल करण्यात आला. यामुळे शनिवारी सकाळपासून प्रवाशांचे हाल सुरू झाले आहेत. या पायभूत संरचना उन्नत करणार्या ब्लॉकमुळे गाड्यांचे परिचालन नियमानुसार होणार आहे. या ब्लॉकमुळे शुक्रवारी भुसावळ-मुंबई पॅसेंजर रद्द करण्यात आली असून १२ आणि १३ ला देखील रद्द करण्यात आली आहे. पहिला ब्लॉक शुक्रवार मध्यरात्रीपासून शनिवार मध्यरात्रीपर्यंत असणार आहे. यामुळे शुक्रवार सकाळी ३.४५ वाजल्यापासून सकाळी १०.२५ वाजेपर्यंत एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. १२ जानेवारीला जी गाड्यांचे पुनःनिर्धारण गाडी क्र. १५६४५५ लोकमान्य टिळक टर्मिनस-गुवाहटी एक्सप्रेस पुनः निर्धारित वेळेनुसार ९.१० वाजता सुटणार आहे. गाडी क्रमांक १७६१७ सीएसएमटी मुंबई-हुजुर साहेब नांदेड तपोवन एक्सप्रेस पुनः निर्धारित वेळेनुसार ९.०५ वाजता सुटणार आहे. १२ रोजी गाड्यांचे डायवर्शनः ११०६७/२१०६७ लोकमान्य टिळक टर्मिनस-फैजाबाद/राय बरेली एक्सप्रेस दिवा-वसई रोड-जळगाव मार्गे जाणार आहे. १२८५९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-हावडा गीतांजली एक्सप्रेस कल्याण-दौंड-मनमाड मार्गे जाईल. १५०१७ लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर काशी एक्सप्रेस दिवा-वसई रोड-जळगाव मार्गे जाणार आहे. दुसरा ब्लॉक शनिवार मध्यरात्री ते रविवार सकाळ १० वाजून २५ मिनीटापर्यंत असणार आहे. गाडी क्रमांक १२५१९ लोकमान्य टिळक टर्मिनस-कामख्या एक्सप्रेस पुनः निर्धारित वेळेनुसार ९.१० वाजता वाजता सुटेल. गाडी क्रमांक १२३३६ लोकमान्य टिळक टर्मिनस-भागलपूर एक्सप्रेस पुनः निर्धारित वेळेनुसार ९.३० वाजता सुटेल. गाडी क्रमांक १७६१७ छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस-हुजुर साहेब नांदेड एक्सप्रेस पुनः निर्धारित वेळेनुसार ९.०५ वाजता सुटेल. १३ रोजी गाड्यांचे डायवर्शनः २२१२९ लोकमान्य टिळक टर्मिनस-अलाहाबाद एक्सप्रेस दिवा-वसई रोड-जळगाव मार्गे जाणार आहे. १२८५९ छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस-हावडा गीतांजली एक्सप्रेस कल्याण-दौंड-मनमाड मार्गे जाणार आहे. १५०१७ लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर काशी एक्सप्रेस दिवा-वसई रोड-जळगाव मार्गे जाणार आहे. या ब्लॉक मुळे आज आणि उद्या एक्स्प्रेसने वाहतूक करणाऱ्या नागरिकांचे हाल होणार आहेत. यामुळे शुक्रवारी सकाळ पासून लोकल सेवा ५ मिनिटे उशिरा धावत आहेत. |
पुणे आरटीओने गेल्या वर्षभरात 18 हजार 95 वाहनांवर कारवाई केली. त्यापैकी 6 हजार 272 वाहनांवर फिटनेस तपासणी नसल्यामुळे कारवाई करण्यात आली. यात इतर नियमभंगापेक्षा फिटनेस तपासणी नसणाऱ्याच वाहनांची संख्या जास्त आहे. यावरून पुणेकर वाहनचालक आपल्या वाहनाची वेळेत फिटनेस तपासणी करत नसल्याचे दिसत असून, यामुळेच की काय, रस्ते अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे, असा प्रश्न वाहतूक तज्ञांना पडला आहे. पुणे शहरात 43 लाखांपेक्षा अधिक वाहने आहेत. या सर्व वाहनांकडून नियमांचे व्यवस्थितरित्या पालन व्हावे आणि शहरातील वाहतूक सुरळीत चालावी, याकरिता आरटीओकडून वायुवेग पथकाच्या सहाय्याने कारवाई केली जाते. 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022 या कालावधीत आरटीओने पुणे शहरात 18 हजार 95 वाहनांवर कारवाई केली. त्यातून आरटीओला 7 कोटी 82 लाख 45 हजार रूपयांचा महसूल मिळाला आहे. इन्शुरन्स नसलेल्या वाहनांनवरही सर्वाधिक कारवाई आरटीओकडून मोटार वाहन कायद्यानुसार विविध नियमाअंतर्गत वाहनांवर कारवाई केली जाते. 2021 ते 2022 या आर्थिक वर्षात आरटीओने फिटनेस नसलेल्या वाहनांसोबतच इन्शुरन्स नसलेल्या वाहनांवर सुध्दा मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली आहे. यात 6 हजार 274 वाहनांकडे इन्शुरन्स नसल्याने वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईतून आरटीओला 72 लाख 39 हजारांचा महसूल मिळाला. |
राज्यातील कचरा कोंडीच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने नवीन बांधकाम परवानग्या रोखल्या होत्या; मात्र महापालिकेच्या घन व्यवस्थापन प्रकल्पाची व्यवस्था आणि त्यासाठी केली जाणारी शास्त्रीय पूर्तता यामुळे शासनाच्या आदेशाप्रमाणे विकासकामांच्या परवानग्या देण्यास प्रारंभ झाला आहे. नाशिक : राज्यातील कचरा कोंडीच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने नवीन बांधकाम परवानग्या रोखल्या होत्या; मात्र महापालिकेच्या घन व्यवस्थापन प्रकल्पाची व्यवस्था आणि त्यासाठी केली जाणारी शास्त्रीय पूर्तता यामुळे शासनाच्या आदेशाप्रमाणे विकासकामांच्या परवानग्या देण्यास प्रारंभ झाला आहे. राज्यातील कचरा कोंडीमुळे उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले होते. त्याचप्रमाणे नवीन बांधकामांवर निर्बंध घातल्याने त्याचा फटका महापालिकेला बसला होता. वस्तुतः नाशिक महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणारा घन कचरा प्रकल्प राज्यात उत्तम मानला जातो. रोज सुमारे ५२५ टन कचरा संकलित केला जातो आणि त्यावर प्रक्रिया करून सेंद्रिय खत तसेच कांडी कोळसा तयार केला जातो. महापालिकेचा प्रकल्प उत्तम असतानाही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे नाशिकच्या विकासकांची कोंडी होत होती. यासंदर्भात महापालिकेच्या घन कचरा व्यवस्थापनाचा अहवाल राज्य शासनाला पाठविण्यात आला होता. राज्य शासनानेदेखील त्यासंदर्भात सर्वाेच्च न्यायालयात बाजू मांडली होती, अखेरीस नाशिक महापालिकेस नवीन विकासकामांना परवानगी देण्याचे आदेश प्राप्त झाले असून, गेल्या आठ ते पंधरा दिवसांपासून त्याची कार्यवाही सुरू झाल्याचे नगररचना विभागाच्या सूत्रांनी सांगितले. महापालिकेच्या हद्दीत दररोज वेगवेगळे विकासकामांचे प्रस्ताव सादर होत असतात. रोज सहा ते सात नवीन बांधकाम परवानग्या दिल्या जातात. आता हे काम पूर्ववत सुरू झाल्याने विकासकांनादेखील दिलासा मिळाला आहे. यापूर्वी महापालिकेच्या घन कचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या प्रदूषणामुळे पुणे येथील हरित लवादाने महापालिकेस बांधकाम परवानग्या थांबविण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे नऊ महिने शहरातील बांधकामे ठप्प झाली होती. यंदा तर सर्वाेच्च न्यायालयानेच थेट आदेश दिल्याने विकासक अस्वस्थ झाले होते. |
मुंबई,(प्रतिनिधी)- आज शिंदे सरकारनं बहुमत सिद्ध केलं असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळाच्या दुसऱ्या दिवसाच्या समारोपाच्या भाषणावेळी 'तीन'मोठ्या घोषणा करून जोरदार पणे कामाची सुरवात केली आहे. राज्यात महाविकास सरकार कोसळल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले होते, आज अखेर शिंदे सरकारने बहुमत सिद्ध केल्याने शिंदे गोटात उत्साहाचे वातावरण होतं दरम्यान पहिल्याच अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वाच्या तीन घोषणा केल्याने जनसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. १)शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याचा शिवसेना-भाजप युती सरकारचा निर्धार, राज्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी इंधनावरील व्हॅट कमी करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी 21 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज ड्युटी कमी केली. त्याच धरतीवर आता राज्यातील पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करण्यात येईल. त्यामुळे त्याचा फायदा हा राज्यातील सामान्य जनतेला होणार आहे. येत्या कॅबिनेटमध्ये हा निर्णय घेण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. |
Akola Tree Collapsed : अकोला जिल्ह्यातील पारस येथे बाबूजी महाराज मंदिरात आरती सुरू असतानाच मंदिराच्या शेडवर झाड कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला असून आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. फडणवीस ट्वीटमध्ये म्हणाले आहेत की, "अकोला जिल्ह्यातील पारस येथे एका धार्मिक समारंभासाठी काही लोक एकत्र आले असता, टिनाच्या शेडवर झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेत काही भाविकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त वेदनादायी आहे. मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. " फडणवीस पुढे म्हणाले की, "जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली असून जखमींवर वेळेत उपचार व्हावेत यासाठी ते समन्वय ठेवून आहेत. आम्ही सातत्याने त्यांच्या संपर्कात आहोत. काही जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून किरकोळ जखमींवर बाळापूर येथे उपचार करण्यात येत आहेत", अशी माहिती फडणवीसांनी दिली आहे. मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकार तसेच मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी यांनी घेतला आहे असेही त्यांनी सांगितले. रविवारी सायंकाळी ८ वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे हे झाड मंदिराच्या शेडवर कोसळलं. यादरम्यान शेडखाली ४० ते ५० जण दबले गेले. यापैकी ६ जणाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तर या घटनेत ८ जण गंभीर जखमी आहेत. मात्र हा आकडा वाढण्याची भीती आहे. |
स्वप्नांना भविष्यासाठी मदत करणार्या काही संधींपैकी एक आहे. असंख्य स्वप्नांच्या पुस्तकांबद्दल धन्यवाद, आपण भविष्यातील समस्या आणि आनंदी बदलांविषयी तसेच सध्याच्या धोक्यांबद्दल जाणून घेऊ शकता. मटारांचे स्वप्न काय आहे? एक स्वप्न जिथे एक मनुष्य मटार खाल्ले, मजबूत आरोग्य आणि त्याच्या भौतिक परिस्थितीत सुधारणा सुन्न. वाळलेल्या सोयाबीनचे जीवनसृष्टीत "काळे" बँड सुरू होण्याचे संकेत देणारे प्रतिकूल चिन्ह आहेत. रात्रीचा दृष्टीकोन, जेथे आपण मटार पासून काहीतरी शिजवलेले आहे, हे दुःखाने चे प्रतीक आहे कॅन केलेला वाटाणा कशाबद्दल स्वप्न पाहत आहे हे स्वप्नवत अर्थ सांगते की आशा आणि आशावादी असला तरीही त्यांचे यशस्वी अंत होण्याची संधी आहे. आपण मटार पेरला तर नियोजित योजना आणि इच्छा पूर्ण होऊ शकतात. दुसर्या स्वप्नातल्या एका पुस्तकात अशा स्वप्नांचे अश्रूंचे अभिवचन आहे. झोप, जेथे आपण मटार खरेदी, एक चेतावणी म्हणून कार्य करते की जीवनात काहीतरी महत्वाचे गमावले धोका आहे. आपण सोयाबीन विकले तर - एक चिन्ह, लवकरच आपण एक अप्रिय व्यक्ती आमंत्रित करावे लागेल वाटाणा पसरवा, याचा अर्थ असा होतो की हे काम यशस्वी झाले आहे, पण घरी आराम आणि शांतता. त्यात एक उलट माहिती आहे, ज्याच्या मते अशा प्लॉटमुळे असे संकेत मिळते की सध्याचे क्वार्टरमध्ये इतरांशी केवळ फॉल्ट आहे. का आपण शेंगा मध्ये हिरव्या मटार स्वप्न नका? असा स्वप्न म्हणजे आनंद आणि एक स्थिर आर्थिक परिस्थिती. शेंगा शेतात कसे वाढतात हे पहाणे म्हणजे आपण व्यवसायात आणि कामामध्ये भाग्य वर अवलंबून राहू शकता. एखाद्या मुलीसाठी, हे स्वप्न प्रेमाच्या क्षेत्रात यशस्वी होण्याचे एक स्वप्न आहे. झोप, जेथे आपण कोळुपाली आहात आणि हिरवे वाटाणे खाल्ले आहे, सर्व गोष्टींमध्ये भाग्य उपस्थितते सूचित करते. मटार निवड का स्वप्न? कोणीतरी गोळा फुलांचा गोळा करत असेल, तर लवकरच आपण आपल्या स्वतःच्या कामाच्या परिणामांचा आनंद घेण्यास सक्षम असाल. अशी स्वप्नं अशीही माहिती आहे की अशा स्वप्नांच्या गंभीर संकटाची बातमी याव्यतिरिक्त, आपण आपल्या आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी अपेक्षा करू शकता. |
संभाव्य पूरपरिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी यंत्रणा सज्ज! बजेटचा कोल्हापूरी तांबडा-पांढरा रस्सा, मिसळ, आणि चप्पलला होणार फायदा ! कोल्हापूर : झारीतल्या शुक्राचार्यांमुळे मटका, जुगार खुलेआम सुरू ! कोल्हापूर-मिरज मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण, पण दुहेरीकरण होणार का? मद्यपान हानिकारकच;' आम्ही वाईन प्या, असं म्हणणार नाही. . ! दहावीचा निकाल आज जाहीर होणार; कधी, कुठे व किती वाजता पाहाल रिझल्ट? Sangli News घरात घुसून ४२ हजारांचे दागिने लंपास! संभाव्य पूरपरिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी यंत्रणा सज्ज! दहावीचा निकाल आज जाहीर होणार; कधी, कुठे व किती वाजता पाहाल रिझल्ट? संभाव्य पूरपरिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी यंत्रणा सज्ज! सेवा जमतच नाही त्यावेळेस करा हे काम स्वामींची कृपा होईल! |
जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातील सावंगी अवघडराव या गावातील मुलगा प्रतिकूल परिस्थितीत जिद्दीने शिकला. आत्मविश्वासाने परीक्षा दिली आणि उपजिल्हाधिकारी झाला! घरी अठराविश्वे गरिबी. वडील चहाची टपरी चालवून कशीबशी पाच जणांच्या कुटुंबाची गुजराण करणारे. अशा परिस्थितीत अधिकारी होण्याचे स्वप्नही कोणी बघू धजत नाही, पण जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातील सावंगी अवघडराव या गावातील मुलगा प्रतिकूल परिस्थितीत जिद्दीने शिकला. आत्मविश्वासाने परीक्षा दिली आणि उपजिल्हाधिकारी झाला! दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील तरुण आता अधिकारी होण्याच्या ईर्ष्येने यूपीएससी आणि एमपीएससीची तयारी जिद्दीने करू लागले आहेत, पण अतुल चोरमारे याची जिद्द कित्ता गिरवण्याजोगी. गावात दहावीची परीक्षा दिल्यानंतर कोणताही आधार नसताना त्याने २०१२मध्ये थेट औरंगाबाद गाठले. स्पर्धात्मक परीक्षा देऊन अधिकारी होण्याचे स्वप्न इथेच साकार होईल, हा त्याचा दुर्दम्य विश्वास होता. घरून कोणतीही मदत मिळणार नाही, याची कल्पना होती. त्यामुळे त्याने कॉल सेंटरमध्ये नोकरी करून राहण्याचा आणि अभ्यासाचा खर्च भागवला. कोचिंग क्लासची फी देण्याची ऐपत नसल्यामुळे घरीच पुस्तके आणून अभ्यास केला. ज्या खोलीत तो भाड्याने राहात होता, तेथील एक शेजारी कृष्णा गोरे (शिक्षक) त्याची धडपड जवळून पाहत होते. त्यांनी त्याला धीर दिला. वडिलकीची थाप दिली. त्याला शक्य ती मदत केली. अतुलचे वडील, तो उपजिल्हाधिकारी झाल्यानंतरही चहाचा गाडा घेऊन गावोगाव आठवडी बाजारात व्यवसाय करतात. आई गृहिणी आणि दोन धाकटे भाऊ शिक्षण घेतात. अतुलच्या घर सोडण्याच्या हट्टापुढे कुटुंबीयांचेही काही चालले नाही. घर, गाव सोडून अनोळखी नि महागड्या शहरात जाऊन आपले स्वप्न साकारण्यासाठी शेकडो विद्यार्थी ग्रामीण भागातून स्थलांतर करीत आहेत. जागा मिळेल तिथे राहून, पडेल ते काम करून ते शिक्षण घेत आहेत आणि परिस्थितीवर मात करून यशही मिळवत आहेत. अशा विद्यार्थ्यांकडे पाहून बिहारमध्ये आनंद कुमारने सुरू केलेल्या 'सुपर ३०' उपक्रमाची आठवण होते. गरीब विद्यार्थ्यांना आयआयटीमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी त्याने पाटण्यात मोफत कोचिंग क्लास २००२ मध्ये सुरू केला आणि गेल्या वर्षीपर्यंत त्याच्या क्लासमधील ३९०पैकी ३३३ गरीब विद्यार्थ्यांना आयआयटीमध्ये प्रवेश मिळाला. शिकण्याची जिद्द आणि चिकाटीतून अतुलने मिळवलेले यश नेत्रदीपक आहेच, पण त्याच्यासारख्या शेकडो विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे आहे. अशा विद्यार्थ्यांच्या मूलभूत गरजा मोठ्या शहरांमधून भागवण्याचे प्रयत्न झाले आणि 'सुपर ३०'सारखे उपक्रम राबवले गेले, तर यूपीएससीमधील मराठी टक्का वाढेलच, पण एमपीएससीमध्ये यश मिळविण्याचे अभ्यासू मुला-मुलींचे स्वप्नदेखील पूर्ण होईल. अतुलच्या यशाने ही गरज अधोरेखित केली आहे. |
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात काही दिवसांपूर्वी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियामध्ये झालेल्या मारामारी प्रकरणामुळे विद्यापीठाची सुरक्षाव्यवस्था ऐरणीवर आली आहे. विद्यापीठाला सुरक्षेसाठी २५० सुरक्षारक्षकांची गरज असताना केवळ ६० ते ७० सुरक्षारक्षक सुरक्षेचे काम पाहत आहेत. सुरक्षारक्षक पुरविणाऱ्या गार्डबोर्ड व मेस्को या संस्थांच्या अडचणींमुळे सुरक्षारक्षकदेखील मिळत नाहीत. त्यामुळे सध्या विद्यापीठातील सुरक्षा रामभरोसे असल्याचे चित्र आहे. |
आज माविआच्या उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांनी धुळे शहरातील (Dhule city) जिल्हा परिषदेच्या एका शाळेवर जाऊन मतदान केले. तर अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर तांबेंनी माध्यमांशी संवाद साधत मोठे वक्तव्य केले आहे. यावेळी तांबे म्हणाले की, नाशिक पदवीधर (Nashik Graduate Constituency) मतदारसंघातील लोकांचे प्रेम बघून मन भरून येत आहे. तसेच हा मतदारसंघ अतिशय मोठा मतदारसंघ असून यामध्ये ५४ तालुक्यांचा आहे. तर चार हजारपेक्षा जास्त गावांचा या मतदारसंघात समावेश आहे. याशिवाय उत्तर महाराष्ट्र, खानदेशसह इतर भागातून लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे लोकांच्या ऋणात राहणे पसंत करून येणाऱ्या काळामध्ये याठिकाणच्या लोकांचा विश्वास सार्थ करण्याचे काम करेल, असे त्यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले की, मी अपक्ष उमेदवार असून अपक्षच राहील. याच्यापेक्षा जास्त कुठलेही राजकीय भाष्य आजच्या तारखेला करणार नाही. लवकरच जे मागचे दहा पंधरा दिवसांमध्ये राजकारण झालं. ज्याच्यातून परिवाराला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला. याच्यावर जे अर्धसत्य ठेवून ज्या पद्धतीने एकच बाजू मांडली गेली. त्यामुळेच मुद्दाम कुठली प्रतिक्रिया दिली नाही. कारण शब्दाने शब्द वाढू नये आपण ज्या पक्षांमध्ये आयुष्यभर राहिलो. त्या पक्षाला अजून लोकांसमोर वाईट करू नये म्हणून खरं बोललो नाही. वेळ आल्यावर या सगळ्या प्रश्नांना उत्तर देणार असल्याचे तांबेंनी म्हटले. |
नागपूर : ऑनलाईन गुंतवणूक केल्यास जास्त नफा होईल, असे आमिष दाखवत एका व्यक्तीची ५. ५७ लाखांनी फसवणूक करण्यात आली. राणाप्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. राजू शेखर कातोडे (४५, त्रिमूर्तीनगर) असे फसविल्या गेलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांना २७ जानेवारी रोजी ९९५७६५४१२६ या क्रमांकावरून एक फोन आला व समोरील व्यक्तीने गुंतवणूक केल्यास कमी वेळेत जास्त फायदा होईल, असे आमिष दाखविले. समोरील व्यक्तीने त्यांच्या मोबाईलवर लिंक पाठवून पाच हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यानंतर त्याचा ७ हजार इतका परतावादेखील दिला. त्यानंतर १० हजार रुपये घेऊन १५ हजार रुपये परत केले. यामुळे कातोडे यांचा त्याच्यावर विश्वास बसला. त्यानंतर आरोपीने त्यांच्याकडून ५. ५७ लाख रुपये ऑनलाईन माध्यमातून घेतले. मात्र त्याचा कुठलाही नफा त्यांना दिला नाही व मूळ रक्कमदेखील परत केली नाही. कातोडे यांनी त्याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र तोदेखील होऊ शकला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी राणाप्रतापनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. |
एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आणि त्यांची पत्नी क्रांती रेडकर यांनी त्यांच्या विरोधात प्रसारीत होणाऱ्या बदनामीकारक वृत्तांना आणि कॉंमेंटना रोखण्यासाठी थेट गुगल, फेसबुक आणि ट्विटर या सामाजिक प्रसार माध्यमांना अटकाव करावा यासाठी दिंडोशी न्यायालयात धाव धेत एक सिव्हील सुट आज दाखल केला. जवळपास मागील एक महिन्याहून अधिक काळ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सातत्याने एनसीबी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे, ज्ञानदेव वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्रावरून आणि समीर वानखेडे यांच्या कार्य पध्दतीवरून आरोप करत आहेत. मलिक यांनी केलेले आरोप समाज माध्यमातील गुगल, ट्विटर आणि फेसबुकवर प्रसारीत होत आहेत. तसेच सदरचे आरोप हे खोटे आणि बदनामीकारक असल्याने या सर्व रोखण्यासाठी या तिन्ही सामाजिक माध्यमांवरील अशा प्रकराचा गोष्टी रोखाव्यात अशी मागणी या सिव्हील सूटच्या माध्यमातून वानखेडे पती-पत्नीने केली. त्याचबरोबर जो कोणी वानखेडे यांच्या विरोधात खोटे आणि बदनामीकारक वृत्त प्रसारीत करेल त्या वृत्तास या तिन्ही समाजमाध्यमांनी तातडीने ब्लॉक करावे अशी मागणीही या याचिकेच्या माध्यमातून करण्यात आली. वानखेडे पती-पत्नीच्यावतीने रेक्स लिगॅलिस् या फर्मकडून यासंदर्भात याचिका दाखल केली आहे. समीर वानखेडे यांची मुंबईत पोस्टींग झाल्यापासून वानखेडे यांचा सातत्याने फिल्म जगतातील लोकांशी आणि पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क येत आहे. तरीही काहीजणांकडून मुख्य प्रसार माध्यमाकडून आणि तिन्ही समाज माध्यमातून बदनामीकारक वृत्त प्रसारीत कऱण्यात येत असल्याचा दावा समीर वानखेडे यांच्यावतीने याचिकेत करण्यात आला आहे. तर त्यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी अनेक न्युज चॅनलकडून अनिर्बंधप्रमाणात समाज माध्यमातून आमच्या प्रतिवादीकडून पुरविण्यात येत असलेल्या बदनामीकारक आणि खोटी माहिती प्रसारीत करत आहेत. समीर वानखेडे यांच्याकडून ज्यांच्या विरोधात तपास कऱण्यात येत आहेत, त्यांना त्याचा त्रास होत असल्यानेच त्यांच्याकडूनच अशा पध्दतीचे खोटी आणि बदनामीकारक माहिती प्रसारीत करण्यात येत आहे. या अशा पध्दतीच्या गोष्टींना रोखण्यासाठी समाजमाध्यमांची यंत्रणा कमी पडत आहे. त्यामुळे यासंदर्भात न्यायालयाने या गोष्टींना रोखण्याचे निर्देश द्यावे अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली. |
येथील जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूककोंडीचे सत्र अद्याप सुरूच असून, त्यामुळे मुख्य महामार्गावरील वाहनांना तासन्तास ताटकळत उभे राहावे लागत आहे. महामार्गालगतच्या रहिवाशांना या वाहतूककोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कामशेत - येथील जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूककोंडीचे सत्र अद्याप सुरूच असून, त्यामुळे मुख्य महामार्गावरील वाहनांना तासन्तास ताटकळत उभे राहावे लागत आहे. महामार्गालगतच्या रहिवाशांना या वाहतूककोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कामशेत हद्दीत वाहतूककोंडीची समस्या गंभीर बनली असून, यातून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहेत. पुणे व उपनगरमधील पर्यटक लोणावळा, खंडाळा भागात वर्षाविहारासाठी जात असून, त्यांना परतीच्या वेळी वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. शनिवारी दुपारी चारनंतर ते रविवारी रात्री उशिरापर्यंत वाहतूक कोंडीचे सत्र सुरू होते. याकडे स्थानिक पोलिसांचे दुर्लक्ष होत असून, प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पवनानगर फाटा येथे महामार्ग ओलांडताना होणाऱ्या अपघातांचे प्रमाण पाहता येथे उड्डाणपूल व्हावा यासाठी स्थानिक नागरिक व सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलने केली. यातूनच मागील वर्षीच्या जानेवारी महिन्यात येथे उड्डाणपुलाचे काम सुरू झाले. सुरुवातीला अत्यंत संथ गतीने सुरू असलेले हे काम कामाची मुदत जवळ येताच वेगात सुरू झाले. मात्र स्थानिक नागरिक व महामार्गावरील वाहनचालक यांच्या सुरक्षेसंदर्भात कोणतीच उपाययोजना करण्यात आली नाही. मुख्य महामार्गाची वाहतूक सेवा रस्त्याने वळवण्यात आली. त्यामुळे येथे पूर्वीपेक्षा जास्त अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यातच पवनानगरकडे जाणारा अंडर पास मार्ग अपूर्ण असताना तो महामार्ग ओलांडण्यासाठी खुला करण्यात आल्याने शिवाय वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी येथे वाहतूक पोलीस अथवा तत्सम उपाययोजना न झाल्याने महामार्गावरील कोंडीत भर पडली आहे. महामार्गाच्या सेवारस्त्याची रुंदी वाढवली नाही. पवनानगर फाटा हा वाहतुकीचा मुख्य फाटा असून येथे अनेक प्रवासी वाहने थांबतात. नोकरदार वर्ग वाहनांना हात करून येथून प्रवास करतात. त्यामुळेही वाहतूक कोंडीत भर पडत आहे. तसेच महामार्गाच्या पलीकडे सेवारस्त्यावर गेली अनेक वर्षे मजूर अड्डा भरत असून येथे चार-पाचशे मजूर रोज उभे असतात. सकाळी सातपासून ते दहापर्यंत व सायंकाळी येथे मजुरांची मोठी गर्दी असते. त्यांना नेण्यासाठी व सोडण्यासाठी येणारे बांधकाम व इतर विभागाचे ठेकेदार रस्त्याच्या मध्येच वाहन लावतात. याच भागात दारूची दुकाने व चायनीज सेंटर असल्याने गर्दी असते. येथील मजूर अड्डा हलवून तो छत्रपती शिवाजीमहाराज चौकात करावा, अशी मागणी होत आहे. महामार्गावरून कामशेतमध्ये येणाºया मार्गाने अनेक पर्यटक वाहने आल्याने कामशेत शहरातील वाहतूक व्यवस्थेचे तीन तेरा वाजले होते, तर याचा स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. त्यात कामशेत पोलीस ठाण्याच्या पुढे मुंबई-पुणे लेनवर एक चारचाकी वाहन अर्धे खड्ड्यात गेले होते. या वाहनात पती, पत्नीसह त्यांचा एक वर्षाचा मुलगा होता. रात्री उशिरापर्यंत वाहतूककोंडी कायम होती. मागील रविवारपेक्षा या रविवारी तिप्पट वाहतूककोंडी झाल्याने वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. या मार्गावर अनेक समस्या असल्याने या फाट्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. याकडे स्थानिक पोलीस प्रशासन व इतर संबंधित विभागांचे दुर्लक्ष होत असल्याने दोन्ही लेनवर दहा-दहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागत आहेत. पवनानगर फाटा येथे नागरिकांच्या सोर्ईसाठी उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. मात्र मुदत संपून दीड महिना झाला, तरी हे काम पूर्ण होत नाही. वाहतूककोंडीची समस्या गंभीर बनली आहे. या भागात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वर्षाविहारासाठी पुणे व उपनगरचे व इतर भागातील पर्यटक लोणावळा, खंडाळा व मावळ परिसरात येत असतात. शनिवार, रविवारी या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होते. या पर्यटकांच्या परतीच्या वेळी त्यांची वाहने कामशेतमधील वाहतूककोंडीत अडकतात. त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. रविवारी (दि. ८) दुपारी चारपासून या भागात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दोन्ही बाजूंकडे सुमारे १५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा होत्या. या वाहतूककोंडीत लोणावळा, खंडाळा भागात पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांचे प्रमाण जास्त होते. त्यामुळेच भुशी डॅमचे पर्यटक कामशेतच्या वाहतूककोंडीत अडकले. |
जिव्हाळा ज्येष्ठ नागरिक संघ आणि श्री अग्रसेन क्लिनीक मोफत धर्मदाय दवाखाना यांनी संयुक्तपणे दिवाळी पाडवा, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज सणानिमित्ताने विद्यानगर प्रभागातील ज्येष्ठ नागरिक महिलांना माजी नगरसेवक प्रकाश बाबर यांच्या हस्ते साडी आणि भेट वस्तुंचे वाटप केले. मोठ्या संख्येने महिलांनी याचा लाभ घेतला. कोरोना संसर्ग परस्थितीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान संकटात सापडले आहे. आर्थिक चणचण भासू लागल्याने यावेळची दिवाळी साजरा करणे नागरिकांना सुकर व्हावे, यासाठी त्यांना आवश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले. विद्यानगर प्रभागातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने श्री अग्रसेन क्लिनिक, मोफत धर्मदाय दवाखाना आणि जिव्हाळा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने मोफत रक्त, लघवी तपासणी शिबिर घेण्यात आले. यातील रुग्णांवर अनुभवी वैद्यकीय डाॅक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार करण्यात येत आहेत. रोज सकाळी आणि दुपारच्या सत्रात 40 ते 50 रूग्ण नागरिक उपचार घेत आहेत. मोफत रक्त, लघवी तपासणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तरी गरजू नागरिकांनी याचा लाभ घ्यावा. हा उपक्रम घेण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी, अध्यक्ष देविचंद किशनलाल अग्रवाल, डाॅ. संतोष अग्रवाल, डाॅ. शितल कुंभार (ढवळे) , डाॅ. निलोफर सिकिलकर, डाॅ. रमेश बन्सल, प्रकाश बाबर, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष शहाबुद्दीन शेख, उपाध्यक्ष शिवाजी माने, खजिनदार श्रीशैल जिडगे, सचिव जयवंत थिटे तसेच संघाचे पदाधिकारी, सभासदाचे सहकार्य लाभले. |
सुपरस्टार रजनीकांत यांनी रविवारी सकाळी चेन्नईतील श्री राघवेंद्र मंडपम् सभागृहात चाहत्यांशी संवाद साधताना आपल्या राजकीय प्रवेशावर शिक्कामोर्तब केले. ज्या क्षणी त्यांनी घोषणा केली त्याच्या पुढच्याच क्षणाला चेन्नईतील त्या सभागृहाबाहेर एकच जल्लोष पाहायला मिळाला. आपण नव्या राजकीय पक्षाची स्थापना करणार असून, आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये सर्व जागा लढवण्याचा मानस असल्याचे रजनीकांत यांनी यावेळी स्पष्ट केले. राजकारणात प्रवेश करण्याची घोषणा करण्यासोबतच त्यांनी आणखी एक महत्त्वाची गोष्ट जाहीर केली. गेल्या कित्येक वर्षांपासून रजनीकांत यांना चाहत्यांची साथ लाभली आहे. अशा असंख्य चाहत्यांच्या सर्व 'फॅन क्लब'ना एकत्र आणून पक्षाच्या कार्यकर्त्यांची भक्कम फौज उभी करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. कोणत्याही पक्षासाठी कार्यकर्त्यांची भक्कम फळीही तितकीच महत्त्वाची असते. हीच बाब अचूकपणे हेरत आपल्या लोकप्रियतेची वापर करत रजनीकांत यांनी चाहत्यांनाही राजकीय प्रवासात आपल्यासोबत मार्गस्थ होण्याची संधीच देऊ केली आहे, असे म्हणायला हरकत नाही. रजनीकांत यांच्या चाहत्यांचा आकडा आणि त्यांचे 'फॅन क्लब' पाहता जास्तीत जास्त चाहत्यांना संघटित केले जाणार असून, त्यांच्यामध्ये पक्षाच्या दृष्टीने महत्त्वाच्या कामांची विभागणी करुन देण्यात येणार आहे. आपल्या राजकीय प्रवासात चाहत्यांची महत्त्वाची भूमिका असल्याचेही रजनीकांत यांनी स्पष्ट केले. मी पैसा, प्रसिद्धी किंवा कोणत्याही स्वार्थासाठी राजकारणात येत नाहीये. किंबहुना चाहत्यांनी नेहमीच मला अपेक्षेहून जास्त प्रेम देऊ केले आहे, असे त्यांनी सांगितले. |
चाट्(पाणिपुरी, भेळपुरी, पापडीचाट), पावभाजी, २-३ इंडियन चायनीज, इडली, डोसा असे १४-१५ प्रकार असतात. डेझर्ट म्हणून २-३ वेळेला आंबा कुल्फी (हो अनलिमिटेड) आणि खीर होती. एकदा गाजर हलवा आणि कुल्फी होती. मिंग्स पण आलं ना आता वेस्टबोरो ला. बॉलीवूड ग्रिल पण चांगलयं. कबाब फॅक्टरी, बुखारा. बॉस्टन मधली बरीच देशी रेस्टॉरंटस पालथी घातलीयेत. वेस्ट्बरो मधे शाळेच्या जवळ एक कोरियन बार्बेक्यू प्लेस आहे. तिथे आपल्या टेबलवर बार्बेक्यू करत नाहीत, पण जेवण मस्त आहे. त्यांच्या किमचीच्या व्हरायटीसुद्धा छान आहेत. पोंगल आणि रितु कि रसोई पण चांगली आहेत. पोंगल चा buffet छान असतो. रितू मधे वडापाव, रगडा types गोष्टि मिळतात, fast food joint आहे mainly. रीतू कि रसोई दिसायला फास्टफूड जोईंट आहे पण प्रत्यक्षात जास्त आहे. सध्याचे बॉस्टन परिसरातले सगळ्यात लोकप्रिय होऊ घातलेले रेस्टॉरंट आहे. एका शनिवारी रात्री १ तास वेळ लागला मला इतकी गर्दी होती. |
चेन्नई सुपर किंग्सचा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेने त्याची बालपणीची मैत्रीण नाभाबरोबर 12 जून रोजी साखरपुडा केला आहे. तुषारने सोशल मीडियावर त्याच्या साखरपुड्याचे फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे. तुषारने नाभासोबतच्या साखरपुड्याचे फोटो पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की '12. 06. 23 तिला माझी शाळेतील क्रशपासून आता माझी होणारी पत्नी (FIANCÉ) म्हणून बढती मिळाली आहे. ' तुषारने शेअर केलेल्या फोटोमध्ये तो आणि नाभा पांरपारिक वेषात गोड दिसत आहेत. त्यांचा चेंडूवर अंगठ्या ठेवून काढलेला फोटो चांगलाच व्हायरलही होतोय. त्यांच्या साखपूड्यासाठी तुषारचा चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई संघाती संघसहकारी शिवम दुबेही पत्नीसह उपस्थित होता. तुषारच्या होणाऱ्या पत्नीचे नाव नाभा गद्दमवार आहे. नाभा आर्टिस्ट असून ती गिफ्ट्सही डिझाईन करते. आयपीएल 2023 दरम्यान देखील नाभा तुषारला पाठिंबा देण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित होती. |
भङगाव शिवारातील गिरणा नदीच्या पाञातुन अवैधरित्या वाळु वाहतुक करणार्या ३ ङंपर वाहने पकङुन जमा करण्याची कार्यवाही. पाचोरा उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांच्या नेतृत्वाखाली भङगाव व पाचोरा महसुल विभागामार्फत संयुक्तरित्या करण्यात आली. तसेच पारोळा रस्त्यालगतच्या राजाराम बापु मेगँसीटी जवळील बिनशेती गट नं. ६०४ मध्ये ५० ब्रास वाळु साठा व ५० ब्रास वाळुचे बांधकाम व ३५ ब्रास मुरुम साठ असा ा वाळुसाठा व मुरुमसाठा आढळुन आला. महसुल प्रशासनाने तसा पंचनामा केला आहे. ३ वाहनांसह वाळु व मुरुम साठाबाबतही शासनाच्या नियमानुसार दंङात्मक कार्यवाही करण्यात येणार आहे. अशी माहीती पाचोरा उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे व भङगावचे निवाशी नायब तहसिलदार मुकेश हिवाळे यांनी दिली. या कार्यवाहीमुळे अवैधरित्या वाळू वाहतुक करणार्यांचे धाबे दणाणले आहे. याबाबत माहीती अशी कि, भङगाव शिवारातील गिरणा नदी पाञातुन अवैधरित्या वाळु चोरी होत असल्याची खबर महसुल विभागाला मिळाली होती. त्यानुसार भङगाव व पाचोरा महसुल पथकाने दि. २८ रोजी पहाटे २. २० वाजेच्या सुमारास भङगाव शिवारातील गिरणा नदी पाञातुन अवैधरित्या वाळु वाहतुक करणारे ३ ङंपर वाहने पकङुन कार्यवाही केली. यात ङंपर मालक शरद सोनवणे रां चाळीसगाव यांचा ङंपर वाहन नं. एम एच १९ झेङ ४२५९ तसेच ङंपर मालक दिपक चौधरी रां चाळीसगाव यांचे दोन ङंपर असुन ङंपर नं. एम एच १८ बी जी २०५२ व दुसरा ङंपर नं. एम एच १२ ई क्यु १७४३ असा दोन ङंपरांचा समावेश आहे. या तीनही ङंपर वाळुसह महसुल विभागाने येथील शासकीय विश्रामगृहात जमा केलेले आहेत. ही कार्यवाही पाचोरा उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. यात तहसीलदार सी एम वाघ, पाचोरा नायब तहसिलदार अमित भोईटे, तलाठी आर ङी पाटील, अव्वल कारकुन विनोद कुमावत? आदिंचा कार्यवाहीत समावेश होता. अशी माहीती निवाशी नायब तहसिलदार मुकेश हिवाळे यांनी दिली. तसेच पारोळा चौफुलीलगतच्या राजाराम बापु मेगँसिटी लगतच्या किशोर पाटील याचा बिनशेती गट नं. ६०४ मध्ये ५० ब्रास वाळुचा अवैधरित्या साठा, ५० ब्रास वाळु बांधकाम दिलेले दिसन आले. तर ३५ ब्रास मुरुम साठा आढळुन आला. पाचोरा उपविभागीय अधिाकारी राजेंद्र कचरे यांचे आदेशानुसार या वाळु व मुरुम साठयाचा महसुल प्रशासनाने पंचनामा केल्याची माहीती निवाशी नायब तहसिलदार मुकेश हिवाळे यांनी दिली. ३ वाळु ङंपर व वाळु साठयाबाबत शासनाच्या नियमानुसार दंङात्मक कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहीती पाचोरा उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे , नायब तहसिलदार मुकेश हिवाळे यांनी दिली. भङगाव शहरासह तालुक्यात काही गावांना गिरणा नदी पाञातुन सर्रास अवैधरित्या वाहतुक सुरु आहे. महसुल विभागाने लक्ष ठेवावे. संबंधितांवर कार्यवाही करावी. वाळु चोरी रोखावी. अशी मागणी होत आहे. महसुल विभागाने वाळु चोरी रोखणारे एकुण ७ पथकांची नेमणुक केली आहे. १ एप्रील पासुन आतापर्यंत एकुण १५ वाहनांवर महसुल विभागाने कार्यवाही केली आहे. एकुण १० लाख रुपये दंङात्मक वसुलीची कार्यवाही करण्यात आल्याची माहीती तहसिलदार सी एम वाघ यांनी दिली. |
मी जेव्हा लहानपणीच्या आठवणीत मागे मागे जाते तेव्हा मला कायम आजोबा, मामा, आई, गडीमाणसे यांच्यासोबत आजोळच्या किंवा माहेरच्या आवारात लूडबूड करणारी मी दिसते. कोकणात रहाताना बागकाम हा जगण्याचाच एक भाग होता मात्र त्याचे खर्या अर्थाने छंदात रुपांतर झाले ते अमेरीकेत आल्यावर. भारतात असताना मला कुणी विचारले असते की तुझे छंद काय तर मी वाचन, विणकाम, हस्तकला वगैरे यादी दिली असती. पण म्हणताना आपण एखाद्या गोष्टीपासून दुरावल्याशिवाय तिचे महत्व जाणवत नाही तसे काहीसे माझे झाले. इथे अमेरीकेत लग्न होवून आले, दोन महिन्यात नव्याची नवलाई संपली, पानगळ सुरु झाली आणि काहीतरी टोचू लागले. खरे तर हाताशी भरपूर वेळ होता, वाचनाचा छंद पुरवायला सुरेख लायब्ररी होती, विणकाम-हस्तकलेसाठी भली मोठी दुकाने होती पण कसलीतरी कमी जाणवत राहीली. मिडवेस्टमधला पहीला विंटर बर्याच जणांना कठीण जातो तसेच काहीसे असावे असे म्हणत मी स्वतःला अभ्यासात बुडवून घेत माझ्या परीने जीव रमवत होते. बघता बघता वसंतऋतूची चाहूल लागली आणि गावच्या सुपरमार्केटच्या एका भागाची एकदम कायाच पलटली. माती, खताची पोती, छोटी छोटी बियाणांची पाकिटे, पिटुकली रोपं, पाणी घालायच्या झार्या, हातमोजे, खुरपी ..., बघूनच जीव हरकून गेला. पिटुकली क्रोटोन आणि स्नेक प्लांटची रोपटी, त्यांना हात लावत मी थेट आजोळीच पोहोचले आणि एकदम लक्षात आले अरे हेच ते हरवलेले! त्या कुंड्यांमधे माहितीचे लेबल खुपसलेले होते. हाऊसप्लांट म्हणून कशी काळजी घ्यायची तेही लिहिलेले होते. आजोळी मागल्या अंगणात तसरीत वाढणारी झाडे हाऊसप्लांट? गंमतच वाटली. तेव्हा आम्ही भाड्याच्या सदनिकेत रहात होतो. तीन रोपांची खरेदी झाली. आजोळच्या अंगणाचा कोपरा माझ्या विंडोसीलवर सामावला. भारतात असताना कधी हाऊसप्लांट हा प्रकार नव्हता. लायब्ररीत जाऊन भले मोठे हाउसप्लांटचे पुस्तक घेवून आले. एक वेगळेच हिरवे जग उलगडले. नवे बाळ, नवी नोकरी, सदनिकेतले रहाणे यासोबत एकीकडे उन्हाचे कोपरे शोधत हाउसप्लांटची बाग वाढू लागली. हळू हळू त्यात उन्हाळ्यात डेकवर ठेवायला फुलझाडांच्या कुंड्या आल्या. छोट्याशा झारीने त्यांना पाणी घालणार्या लेकाचे कौतुक आईला, मामीला सांगताना मी जुन्या आठवणीत रमले. लेक चार वर्षांचा झाला आणि आम्ही नव्या गावात रहायला आलो. इथेही भाड्याची सदनिकाच होती मात्र छान ऊन येणारा मोठा खाजगी पॅटीओ होता. प्लेडेटसाठी आलेली लेकाच्या मित्राची आई म्हणाली ' सो यू लव हाऊसप्लांट्स!' मी जेव्हा तिला सांगितले की इथे सदनिकेत तेवढेच शक्य आहे तेव्हा ती म्हणाली , 'अगं किती मोठा छान पॅटिओ आहे, कंटेनर वेजीटेबल गार्डन का करत नाहीस?' कुंडीतली भाजी? त्याआधी शहरातल्या नातेवाईकांकडे कुंडीत फक्त मोगरा, गुलाब, तुळस आणि कढीपत्ता वाढताना बघितला होता. पुन्हा लायब्ररीला शरण गेले. महिन्याभरात पानगळ सुरु होणार होती. पुढल्या वर्षी नक्की असे म्हणत माझे प्लॅनिंग सुरु झाले. उन्हाळ्यात कुंडीतले सॅलड ग्रीन्स, मटार, टोमॅटो, झुकिनी , हलपिनो पेपर्स अशी भाजीची बाग डौलात वाढली. दरवर्षी यात नव्याने भर पडत होती. यथावकाश याच गावात स्थानिक व्हायचे ठरवून घर बांधले आणि मला मातीत मनसोक्त खेळायला चिमुकला हक्काचा अर्बन लॉट मिळाला. मात्र त्यासोबत आला 'लॉन' नावाचा नवा धडा! बिल्डरने पुढल्या आवारात इंस्टंट लॉन लावले, बाजूचे, मागले आवार ही आमची जबाबदारी होती. बागकामाच्या या परीक्षेत मात्र मी सपशेल नापास झाले. फॉल-स्प्रिंग परीक्षेच्या वार्या सुरु होत्या, काठावर पास-नापास सुरु होते. समरमधे छोटा भाजीचा वाफा, फुलबाग डौलाने वाढत होती, भरपूर ऊन येणार्या खिडक्यांत घरातली झाडे ही जोमाने वाढत होती पण लॉन? निगराणीसाठी कंत्राट करुनही केविलवाणेच होते. अशातच गावात पर्ड्यू एक्सटेंशनतर्फे मास्टर गार्डनरचा कोर्स चालवला जातो असे कळले. मी जाऊन नोंदणी केली. ऑगस्टमधे कोर्स सुरु झाला, पहिल्या दिवशी ओळख कार्यक्रमात कळले की तीसातले वीसजण माझ्यासारखे 'लॉन चॅलेंज' वाले होते. हिरव्यागार , चित्रासारख्या लॉनचा मोहातून सुरु झाला आमचा निसर्गाच्या सोबतीने जगण्याचा एक प्रवास. या प्रवासाने नौसैनिकापासून ते नर्सपर्यंत विविध कार्यक्षेत्रं असलेले जीवाभावाचे मैत्र दिले, कम्युनिटी गार्डनमधे काम करताना श्रीमंत अमेरीकेतल्या अन्न असुरक्षितेबाबत शिकवले, रासायनिक खते-किटकनाशके यांकडे डोळे उघडून बघायला भाग पाडले, सुंदर फुलपाखरे, पक्षी यांच्या पलीकडे जावून इतर किटकांशी दोस्ती करवली. स्नोमधे बी रुजवायला शिकवले आणि नांगरणी न करता भाजीपाला पिकवायलाही शिकवले. बागकाम करता करता मी माझ्या गावासाठी ग्रांट्स शोधायला, हिरव्या जागा वाढवायला शिकले. माझ्यात गावच्या चौकात उभे राहून प्रात्यक्षिक देता येइल इतपत धिटाई आली. निसर्गसाखळीतल्या सगळ्याच कड्या महत्वाच्या हे उलगडत गेले तसे चित्रासारख्या हिरव्यागार लॉनचा मोहही गळून पडला. आता स्वप्न आहे ते पर्माकल्चरच्या तत्वांच्या सोबतीने शाश्वत बागकामाचे, उपकारकारक किटकांसाठी सुरक्षित अधिवासाचे. |
नवी दिल्ली । रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध किंग्ज इलेवन पंजाबचा आयपीएल सामना पार पडला. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हरली. आरसीबीचा कर्णधार विराट कोहली यांच्या काही चुकांमुळे त्यांनी हा सामना गमावला. आरसीबीने हा सामना गमावलाच पण कर्णधार विराट कोहलीवर दंडही बसला आहे. किंग्ज इलेवन पंजाब सामान्याविरुद्ध आरसीबीने कमी वेगाने ओव्हर टाकल्याने १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएलच्या दुसऱ्या मोसमात आरसीबी ९७ धावांनी हा सामना हरले. कर्णधार विराट कोहली किंग्ज इलेवन पंजाब सामान्याविरुद्ध कोणत्याच विभागात योगदान देऊ शकला नाही. आयपीएलच्या नियमानुसार, एखाद्या सामन्यात खूपच हळू ओव्हर टाकली, तर ती आचारसंहिता मानली जाते. आयपीएलच्या या पहिल्याच मोसमात आरसीबीने उल्लंघन केले, त्यामुळे कोहलीला १२ लाखांचा दंड भरावा लागेल. हा आयपीएलचा सामना दुबईतील इंटरनॅशनल स्टेडियममध्ये खेळला गेला. विराट कोहली हा सामना विसरून जाण्याचा प्रयत्न करत असेल. कारण त्यांनी केएल राहुलचे दोन कॅच सोडले, जे त्यांना खूपच महागात पडले. त्याचबरोबर विराट कोहली फलंदाजीसाठी ओळखला जातो, त्यातही त्याने केवळ एक धाव काढून खाते उघडले. त्यातच किंग्ज इलेवन पंजाबचा कर्णधार केएल राहुलने ६९ चेंडूत नाबाद १३२ धावा केल्या. आयपीएल मोसमात भारतीय फलंदाजाने एका सामन्यात केलेल्या या सर्वात जास्त धावा आहे. विराट कोहलीने १७ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर डीप मिडविकेटवर त्याचा कॅच सोडून दिला होता. के. एल. राहुलचा त्याने हा सोडलेला एकच कॅच नव्हता. १८ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरही विराट कोहलीने आणखी एकदा के. एल. राहुलचा कॅच सोडून त्याला जीवदान दिलं. विराट कोहलीने राहुलचे दोन कॅच सोडले त्यावेळी तो अनुक्रमे ८३ आणि ८९ धावांवर होता. त्यानंतर राहुलने धमाकेदार शतक ठोकले आणि बंगळुरुला याची मोठी किंमत मोजावी लागली. सुशांतसिंग प्रकरण : कोण आहे सिमोन खंबाटा? , का आली एनसीबीच्या रडारवर? पैशाच्या हव्यासापोटी मित्राला बायकोसोबत जे करायला लावलं त्यानं प्रत्येकाचा थरकाप उडेल! सुपरस्टार रजनीकांत यांनी केलं असं काही; आजारी चाहत्याला बसला सुखद धक्का! |
करांचे समकालीन होते, असे म्हटले आहे. कोणी कोणी हे " १६६० पासून १६७५ चे दरम्यान समाधिस्थ झाले असावे. असे म्हणतात. यांची समाधी औरंगाबादेकडे सायखेडे या गांवीं आहे. या कोकिळांचीं पदें चांगली आहेत. पैकीं कांहीं व्यवहारोपदेशक आहेत. यांचे एक पद असें - ठेविल भगवान तंसेंचि राहणें ।' तूप साखर पोळी, खीर, भात खाणें ; । केव्हां भाकर भाजी, स्वीकार करणें । केव्हां नूतन बारिक वस्त्र परिधान करणें । केव्हां जाडें मलिन बहु जोर्ण लेणें ॥ केव्हां रथ हय हस्ति शिबिकेंत बसणें ; । केव्हां कार्यासाठी पायींच फिरणें ॥ प्रारब्धं जें जें पडेल तें साहणें । हळहळही नयेची सोडुनि देणें ॥ कोकिळ ! प्रभुवरी बोल कुशासी धरणें ।। निशिदिनीं प्रभुच्या स्मरणें सुख साहणें ॥ १ ॥ कोणत्याहि भाषेचा प्रसार होणें हें, त्या भाषेच्या बरेवाईटपणापेक्षां किंवा तिच्या सोपेपणापेक्षा ती भाषा वापरणाऱ्या लोकांच्या संस्कृतीवर, त्यांच्या अंगच्या बुद्धिमत्तेवर व विशेषतः त्यांच्या अमलाच्या प्रसारावर व महत्त्वावर विशेष अवलंबून असतें. मराठ्यांची सत्ता फक्त महाराष्ट्रांतच होती तोपर्यंत त्यांच्या भाषेचें क्षेत्र फारसें पसरलें नाहीं. पण त्यांचा व्याप जेव्हां महाराष्ट्राबाहेर वाढत गेला तेव्हां त्यांची भाषाहि महाराष्ट्राबाहेर फैलावूं लागली. मराठे तंजावराकडे गेले व त्यांच्या राजध्वजाचा दांडा तेथें रोवला गेला, तेव्हां त्यांच्याबरोबर त्यांची आषाहि तिकडे गेली व तिच्या वेलीच्या मुळ्याहि तेथें रुजल्या; आणि यापुढे पेशव्यांच्या अमदानींत मराठ्यांच्या सत्तेने आणि व्यापानें बहुतेक सर्व हिंदुस्थान ग्रासिलें तेव्हां हिमालयापासून रामेश्वरापर्यंत ती भाषा पसरली. माळव्यांत आणि बडोद्यांतहि मराठी कवि होऊं लागले. दूरदूरच्या राजांस मराठी लिहिणारांचें अगत्य कळून येऊन पुण्यातले. हुकूम व पुण्यास 'धाडावयाचे अर्ज मराठींतच लिहविणे त्यांस भाग पडलें. महाराष्ट्रांतून मराठे सरदार बाहेर जात तेव्हां त्यांचे बरोबर सावकार, साधु, संत, कारकून, आश्रित, उपाध्ये जोशी, शाहीर वगैरे मंडळींचा ताफाहि तिकडे जाई व अनेक वेळां ही बरोबर गेलेली मंडळी त्या दूरदूरच्या प्रांतांत वस्ती करून राही; आणि त्या त्या प्रांतांत आपली भाषा, आपल्या ललितकला, आपले सारस्वत, आपले उद्योग वगैरेंचा पसारा पसरून टाकी. शहाजी राजे भोसले हे प्रथम चंदिचंदावराकडे गेले तेव्हा त्यांच्याबरोबर महाराष्ट्रांतलीं अनेक कुटुंबें तिकडे गेलीं; आणि जीं कुटुंबे एकदां तिकडे गेलीं त्यांपैकीं बरींच तिकडेच वस्ती करून राहिली. यांपैकी कांहींचे वंशवृक्ष अजूनहि त्या प्रांतांत चांगले बळावलेले आहेत. महाराष्ट्र - सारस्वत शहाजीनंतर शिवाजी राजे जेव्हां त्या प्रांतांत तंजावरास गेले तेव्हां त्यांच्या बरोबर रामदासस्वामींनीं आपल्या शिष्यवर्गापैकीं भीमस्त्रामी, अनंत मौनी, राघवस्त्रामी वगैर शिष्य तिकडे धाडिले होते. या शिष्यमंडळींनीं तिकडे रामदासी संप्रदाय व मराठी भाषा यांची उत्कृष्ट तऱ्हेनें जोपासना केलेली दिसते. यांपैकी भीमस्वामींची हकीकत थोडी मनोरंजक आहे. कऱ्हाडाजवळ शहापूर येथें कमळाजीपंत या नांवाचे एक गृहस्थ राहत असत. यांच्या बायकोचें नांव गंगाबाई. यांस एक पुत्र होता. या पुत्रास तीन पुत्र होते. या तिघांपैकी सर्वांत वडील मुलाचें नांव 'नाना' किंवा भीम. हाच ' भीमस्त्रामी' होय. या भीमस्वामीची आजी म्हणजे गंगाबाई ऊर्फ सतीबाई हिनें श्रीसमर्थ रामदासस्वामींचा उपदेश घेतला होता. हिच्या येथें एकदा रामदासस्वामी गेले असतां तेथें त्यांस नाना ऊर्फ भीम यानें पाहिलें. या वेळीं भीम हा अगदर्दी लहान म्हणजे केवळ सात-आठ वर्षांचा होता. या लहान मुलाची चलाखी व बुद्धि पाहून श्रीरामदासस्वामींनाहि संतोष वाटला; व त्यांनीं यास विचारिलें, 'तूं आमचा शिष्य होतोस का?' यावर भीमानें 'होय' म्हणून उत्तर दिल्यावर रामदासांनी त्यास सांगितलें कीं, ' आम्ही सांगू तें काम तुजला करावे लागेल.' यावरदेखील भीम यानें 'होय करीन' असेंच उत्तर दिल्यावर रामदासांनीं जवळ एक विहीर होती तिजकडे बोट करून रामदासांनी त्यास सांगितलें, 'आंत टाक उडी ' ही रामदासांची आज्ञा ऐकतांच भीमानें त्या विहिरींत एकदम उडी टाकिली ! हें पाहून रामदासांनी त्यास आपल्या शिष्यवर्गात सामील केलें. या भीमस्वामीचा सर्व विद्याभ्यास रामदासांच्या नजरेखालींच झाला; व पुढे योग्य काळी यास शहापूर येथील मठाचें महंतपण मिळाले. कांही दिवसांनीं (शके १५९७-चे सुमारास ) हे भीमस्त्रामी शिवाजीमहाराजांबरोबर तंजावर प्रांतीं गेलं. तेथें शिवाजीचे सावत्र बंधु व्यंकोजी महाराज यांनी त्यांस एक मठ बांधून दिला. हल्लींहि यांची परंपरा व मठ तेथे आहे. या भीमस्वामींची कांहीं पदें वगैरे असून शिवाय यांनी लिहिलेले एक श्री समर्थ रामदासस्वामींचें लहानसें चरित्र आहे. ' या भीमस्वामींच्या बरोबरच तंजावर प्रांतांत गेलेले दुसरे शिष्य अनंतस्वामी व राघवस्वामी या दोघांचाहे मठ व परंपरा तंजावर प्रांतांत आहेत. यांपैकी अनंतस्वामींचा शिष्य मेरुस्वामी या नांवाचा होता. यानें ' भीमोपदेश', 'स्वानंदलहरी', 'अनुभवसार' वगैरे ग्रंथ रचिले आहेत. रात्रत्रस्वामींचा मायव या नांवाचा एक शिष्य होता. तंजावर प्रांतांत होऊन गेलेल्या सर्व मराठी कवींत याच्याइतके ग्रंथ कोणीहि लिहिलेले दिसत नाहींत. याचे एक श्लोकबद्ध रामायण असून शिवाय दुसरे एक ओवीबद्धहि रामायण आहे. तसेंच, 'योगवाशिष्ठ ' आणि 'गणेशपुराण', 'विष्णुपुराण', 'अश्रमेव वगैरे अनेक ग्रंथ यानें रचिलेले आहेत. याच्या योगवाशिष्ठचे १२६ सर्ग असून ओवीसंख्या बारा हजारांवर आहे. सर्वांत अठरा पर्ने महाभारत हा याचा मोठा ग्रंथ आहे. माधवस्वामी हा ग्रंथ चार वर्षे रचीत होते. शके ( १६२५ ) सोळासें पंचवीस । सुभानु संवत्सर अश्वीन मास । शनवार कृष्ण तृतीयेस । ग्रंथ सौरस योजिला ॥ असे यांनी प्रारंभी आदिपर्वात लिहिले आहे; व शेवटच्या म्हणजे स्वर्गारोहणपर्वात लिहिले आहे कीं, शके सोळा सतें येकोणतिसी । कार्तिक वद्य प्रतिपदेसी । आरंभ केला स्वर्गारोहणासी । त्र हें पर्व दुसरे दिवशीं समाप्त झालें, या ग्रंथाची एकंदर अध्यायगणती कवीनें पुढीलप्रमाणे सांगितली आहे. अठरा पवें भारत संपूर्ण । नव शत चोवीस अध्याय प्रमाण । एकादश मागें गुणितां आपण । ताळ आणा चौन्यांशो ।। १. या भीमस्वामींचा जन्म शके १५६४-त झाला व मृत्यु १६६३-न झाला. म्हणजे यांची हयात एक कमी शंभर वर्षांची होती. २. या माधवाचा मुलगाहि रचना करी. याचे अनेक ग्रंथ तंजावर प्रांतांत आढळतात. हा ग्रंथांत आपणास माधवनंदन, माधवतनय असें म्हणवितो. महाराष्ट्र- सारस्वत म्हणजे : अध्यायसंख्या ९२४ नजरों- चोवीस. हिला अकरांनी भागिलें असता मागाकार चवऱ्याशी येतो. हा एवढा मोठा प्रचंड ग्रथ कवीनें श्रीकावेरी नदीच्या कांटी गौरी-मयूर ( ? ) या गांवीं श्रीरघुनाथासमोर बसून लिहिला. याच्या अनेक प्रती मद्रास प्रांतांत आढळतात. याच्याइतका दुसरा प्रचंड महाभारत - टीकाग्रंथ मराठीत उपलब्ध नाहीं. मात्र रचनेच्या मानानें या ग्रंथाची गोडी जितक्यास तितकीच आहे. ग्रंथाची भाषा आणि एकंदर शैली साधारण प्रतीची आहे. तंजावर प्रांतांत माधवाप्रमाणेच रंगनाथ या नांवाचा एक विस्तृत रचना करणारा कवि होऊन गेला. हा बहुतकरून श्रीरंगपट्टणाच्या आसपासचा राहणारा असावा. याची पौराणिक रचना पुष्कळच आहे. या ' कावेरीतटनिवासी' रंगनाथानें 'कावेरीमाहात्म्य' या नांवाचा मोठा ग्रंथ लिहिला आहे. इतर 'माहात्म्या 'प्रमाणेच याहि ग्रंथांत ऐतिहासिक माहिती किंवा 'स्थलवर्णन' देण्याचा कवीचा इरादा नसून केवळ भोळ्या भाविकांमध्ये त्या स्थलाची महती वाढावी, व भक्तिभावानें त्यांनी तेथे जाऊन दानधर्म करावा इतकाच या मोठ्या थोरल्या ग्रंथरचनेचा हेतु दिसतो. अर्थात् अशा प्रकारच्या रचनेंत 'काव्या'पेक्षां ' अर्थावर 'च नजर विशेष असते. या रंगनाथाचा छंदःशास्त्रावरहि एक लहानसा प्रबंध आहे. पण यांतहि विशेष असे सांगण्यासारखें कांहीं नाहीं. कावेरी नदीचे कांठी आणि श्रीरंगपट्टणाचे आसपास रंगनाथाप्रमाणेच अनेक मराठी कवि होऊन गेले; व या सर्वांनी मिळून बरेच मोठे काव्यग्रंथ निर्माण केले. दासानुदास', 'भगवंत', 'वैद्यनाथ' वगैरे कवि कावेरीकांठचेच राहणारे होत. 'दासानुदासा 'चें नांव 'रामे' व हा अनंताचा मुलगा. याच्या गुरूचें नांव 'केशिराज' असे याच्या ग्रंथांतील उल्लेखांवरून दिसतें. शंकराचार्यांच्या ज्ञानसंन्यास' ग्रंथावर १. कदाचित् शिवरामहि असेल,' शिवरामनामें मुखग्रंथतंत्रे' असा उल्लेख 'ज्ञानसार' प्रकरणांत आहे. 'दक्षिण हिंदुस्थानांतले कवि याची एक टीका आहे. तींत हा म्हणतोअनंतपुत्रं निजनाम राम । या गोतमगोत्रकुलोद्भवा में । या केशिराजें निजदास रंका । मुखप्रवाहीं वदवो तदा कां ।। हा ग्रंथ यानें शके १६२६ मध्यें श्रीरंगपट्टणाजवळील होसपूर या आपल्या गांवीं रचिला. याशिवाय 'सिद्धानुभव', "कायाजीवलग्न', 'ज्ञानामृत', 'ज्ञानसागर' वगैरे याचे बरेच ग्रंथ आहेत. भगवंत हा पट्टणाजवळील 'मुक्तातीती' गांवचा राहणारा. याच्या गुरूचें नांव ' सच्चिदानंद '. यानें ' सच्चिदानंदविलास', ' निजसुख ' वगैरे ग्रंथ लिहिले आहेत. 'वैद्यनाथ' हा शके १६०० च्या पूर्वीच होऊन गेला. याची अष्टवक्रा - 'वर' 'चिदंबरी"नांवाची टीका आहे. तंजावर प्रांतांतल्या ग्रंथकारांसंबंधाने एकदोन गोष्टी लक्षांत ठेवण्यासारख्या आहेत. या मंडळींनी अनेक वृत्तांतलें सारस्वत निर्माण केलें आहे. परंतु पवाडा आणि लावण्या या दोन्ही तऱ्हेचीं कवनें यांच्यांत लिहिली गेलीं नाहींत. तिकडे असणाऱ्या मराठे सरदारांच्या हालचाली असाव्या तितक्या जोराच्या नव्हत्या म्हणून, किंवा लढवय्ये शिपाई त्या प्रातांतले कायमचे राहणारे नव्हते म्हणून, या तऱ्हेच्या काव्यांना पोषक अशी हवा तिकडे मिळाली नाही, आणि हीं असलीं काव्यें रचण्याची स्फूर्ति तिकडील कवींना झालेलीहि दिसत नाहीं. परंतु आणखी एका तऱ्हेचें सारस्वत तिकडे निर्माण झालेले दिसतें. तंजावर येथील सरस्वतीमहालांत पौराणिक संविधानकांवर रचिलेलीं कांही नाटके आहेत. हीं नाटकें तेथील राजे 'शाहुमहाराजे' यांच्या नांवावर रचिलेली आहेत. तीं खरोखरच शाहुमहाराजांनी रचिलेलीं असोत किंवा त्यांचे आश्रितांपैकीं कोणीं त्यांचे नांवावर रचिलेलीं असोत, तीं लिहिण्याचे सर्व श्रेय तंजावराकडील ग्रंथकारांसच आहे, हे उघड आहे. ही नाटके कांहीं विशेष चांगली आहेत, असें नाहीं. किंबहुना, हीं अगदींच साधारण १. व्यंकोजीचा मुलगा. आहेत. पण दोन-अडीचशे वर्षांपूर्वी इकडे नाटकें कशीं असत व नाटकाचे प्रयोग कशा तऱ्हेचे होत असत, याची कल्पना होण्यास हीं चांगलीं उपयोगी आहेत. वास्तविक पाहतां, नाटकांचा प्रचार इकडे पुष्कळच होता. कालिदास भवभूतीसारख्या उत्कृष्ट नाट्याचार्यांची नाटकेंहि सर्वभर पसरलेली होतीं, आणि त्यांची माहिती व ज्ञानहि महाराष्ट्रांतील विद्वानांम चांगले होतें. असे असतां त्यांचे नमुन्यावर इकडे नाटकें कां रचिलीं गेली नाहीत, किंवा त्यांची नुसती भाषांतरें कां झाली नाहीत, हे एक मोठें गूढ आहे; गद्य ग्रंथ लिहिण्याचा प्रघात फार पूर्वीपासून इकडे होता. पंधराव्या शतकापासूनचे गद्य ग्रंथहि सांपडतात. भास्कराचार्यांच्या लीलावतीची अनेक भाषांतरे झालेली आढळतात. वेदान्तविषयक गद्य ग्रंथहि गेल्या चारशे वर्षांत लिहिलेले अजून उपलब्ध होतात. असे असतां बाणभट्ट, कालिदास वगैरे कवींचे ग्रंथ मराठीत का भाषांतरित केले जाऊं नयेत, याचा उलगडा नीटसा होत नाहीं. रामदासस्वामींनी तंजावर प्रांतांत जे शिष्य पाठविले त्यांत अनंत ' हे होते. हे आपण पाहिलें. हे अनंत कांहीं कवित्व करीत असत. परंतु 'अनंत' किंवा 'अनंत कवि' या नांवानें ज्या कवीचा आपल्याला आज चांगला परिचय आहे तो कवि या समर्थशिष्य भिन्न पुरुष समजावा. हा · अनंत ' उर्फ 'अनंत कवि' मूळचा मातारा जिल्ह्यांतील मेथवड' या गांवचा राहणारा. पण पुढे याम रामदास स्वामींनी निलंगाबादेस मठ स्थापून दिला होता व हा तेथेच अमे. हा रामदाससांप्रदायी असून चिठ्ठलभक्तहि होता आणि नेहमी पंढरीची वारी करी. याची हजार-पंधराशें कविता ही प्रसिद्ध आहे; व आणग्बी थोडीशी नवीन उपलब्ध झाली आहे. यानें आपल्या 'सुलोचनागरि' व 'सुलोचना-आख्यान', या काव्यांचे शेवटीं अनुक्रमे १६४३ १६४५ असे |
रत्न १२५ वें मी हा जो अग्नि, तो जन्मतःच सर्वज्ञ आहे. घृत हा माझा डोळा असून, माझ्या मुखांत अमृत आहे. प्राण, अपान व व्यान एतत्त्रयात्मक जो प्राण, तो प्राण मी आहे. त्याचप्रमाणे अंतरिक्षांत अधिष्ठित असलेला बायुहि पण मीच आणि निरंतर प्रकाशणारा द्युलोकस्थ सूर्यदेव, तोहि मीच ! किंबहुना आज्य पुरोडाशादि जे हविरन्न तें देखील मीच आहे ! (३-२६-७ ). रत्न १२६ वें अहो ऋत्विजहो ! हे अनीसाठीं यूपशकल इथे आहे. तसेच अरणीवर ठेवण्याचा मंथा व घुसळण्यासाठी रज्जु इत्यादि साहित्य येथेंच आहे. आणि अग्निसाधनभूत दर्भहि येथेंच आहेत. आतां ती अरणी घेऊन या. म्हणजे पूर्वीप्रमाणे मंथन करून आपण तद्वारा अग्नि निर्माण करूं या ( ३-२९-१ ). रत्न १२७ वें गर्भिणी स्त्रीच्या पोटांत जसा गर्भ सुव्यवस्थित ठेविलेला असतो तद्वत् सर्व विषयजात जाणणारा हा अग्नि अरणीमध्ये गर्भरूपानें देवांनी स्थापन करून ठेविला आहे. हविष्मान् व जागरूक अशा आम्ही मनुष्यांच्या स्तुतिस्तोत्रास तो नित्य पात्र आहे ( ३ - २९ - २). हे ज्ञानवान अध्वर्यो ! या उताण्या अघरारणीवर ती उत्तराणि म्हणजे वरची अरणि अधोमुख करून घर, म्हणजे ती अघरारणि लवकरच गर्भवती होऊन अभीष्टदायक अग्निदेवास जन्म देणारी होईल. त्या अग्नीचा प्रकाश तमोनाशक असून, इळेचा तो शुभ्र तेजस्वी मुलगा त्या अरणीपासून उत्पन्न होतो ( ३-२९ - ३ ). रत्न १२७ (अ) वें हे जातप्रज्ञ अग्निदेवा ! आम्ही अध्वर्युप्रभृति ऋत्विग्जन भूमीवर मध्यभार्गी उत्तरवेदीच्या स्थानांत तुझी देवांना हवि वाहून नेण्यासाठी म्हणून स्थापना करीत आहों ( ३-२९-४ ). रत्न १२८ वें विश्वामित्र ऋषि, अग्नि-देवता, त्रिष्टुप् छंद मन्थि॑ता नरः क॒विमद्व॑यन्तं॒ प्रचे॑तसम॒मृत॑ सु॒प्रतीकम् । य॒ज्ञस्य॑ के॒तुं प्रथ॒मं पु॒रस्ता॑द॒ग्निं न॑रो जनयता सु॒शेव॑म् ।। श्री. वि. अभिमंथन विश्वामित्र-ऋषि, अग्नि देवता, त्रिष्टुप् छंद जा॒तो अ॒ग्नी रो॑चते॒ चेक॑तानो वा॒जी विन॑ः कविश॒स्तः सु॒दाः । यं दे॒वास॒ ईड्यं॑ विश्व॒विदं॑ ह॒व्य॒वाह॒मद॑धुरध्व॒रेषु॑ ।। सीद॑ होत॒तः॒ स्व उ॑ लो॒के चि॑क॒त्वान्त्स॒दया॑ य॒ज्ञं सु॑कृ॒तस्य॒ योनौ॑नौ॑ । दे॒वावीर्दे॒वान्ह॒विषा॑ यज॒स्यग्ने॑ बृहद्यज॑माने॒ वयो॑ धाः ।। श्री. वि. ( उत्तरवेदींत ) अग्निस्थापन. विश्वामित्र-ऋषि, अग्नि-देवता, अनुष्टुप् छंद. अयं ते॒ योनि॑र्ऋत्वियो यतो॑ जातो अरोचथाः । तं जानन॑ग्न आ सीदाथा॑ नो॒ वर्धया गिरः ।। श्री. वि. (अरणींत ) अग्निसमारोपण. अहो अध्वर्युप्रभृति ऋत्विजहो ! दूरदर्शी, निष्कपटी, पूर्णप्रज्ञ, अमर, सुंदर अशा अग्निदेवास मंथन करून उत्पन्न करा. अहो ऋत्विज हो ! यज्ञाचा प्रज्ञापक, सर्वात प्रमुख व उत्तम सुखदाता अशा अग्नीस यज्ञानुष्ठानाच्या प्रारंभींच अरणीतून घुसळून प्रकट करा ! ( ३ - २९ - ५ ). अग्निदेव हा मंथनद्वारा अरणींतून उत्पन्न होतांच प्रकाशमान होतो. तो सर्व जाणणारा, सततगमनशील, कर्मकुशल, होतृजनस्तुत व दान देण्यांत मोठा उदार असा आहे. तो हे सर्व वस्तुजात जागणारा असल्यामुळे देवांनी त्याला यज्ञांतील आपला हविर्वाहक प्रतिनिधि म्हणून नेमला आहे. इन्द्रादि सर्व देव त्याची कीर्ति गात असतात ( ३ - २९ - ७ ). हे होमनिष्पादक अग्निदेवा ! तूं आपल्या स्थानावर म्हणजे उत्तरवेदीच्या मध्यभागी बैस आणि ज्ञानी असा तूं या यज्ञकर्त्या यजमानालाहि यज्ञगृहांत उत्तम स्थान बसव. त्यानंतर देवांचा रक्षक असा तूं त्या त्या देवांना हविर्भाग पोचवून त्यांना संतुष्ट कर आणि यज्ञ करणाऱ्या या यजमानाला विपुल अन्न प्रदान करून त्यासहि सुसंपन्न कर ! ( ३-२९-८ ). हे अग्निदेवा ! प्रत्येक यागकाली उत्पन्न होण्याचें हूँ तुझें जन्मस्थान आहे. तेथून तूं उत्पन्न होतांच प्रकाशत आला आहेस. तूं ते जाणून तेथें आतो विराजमान हो आणि आमच्या स्तुतिस्तोत्रानें सुपुष्ट हो ! ( ३-२९-१० ). |
नवी दिल्लीः ईद-उल-फितर मुस्लिम समाजाच्या मोठ्या सणांपैकी एक आहे. या दिवशी मुस्लिम घरांमध्ये कुर्बानी देण्याची प्रथा आहे. यावर्षी जगभरात ३१ जुलैला ईद साजरी केली गेली. पण दिल्लीतील जामा मस्जिदच्या शाही इमामांनी भारतात १ ऑगस्टला बकरी ईद साजरी केली जाईल, हे जाहीर केलंय. बकरी ईदच्या निमित्तानं यावर्षी अनेक वर्षांच्या तुलनेत बाजारांमधील रौनक गायब झालेली आहे. कुर्बानीवाल्या बकऱ्यांची विक्रीत सुद्धा कमतरता आलीय. यासर्वांमध्ये छत्तीसगढ इथला एक बकरा सध्या चर्चेत आहे. ८ फूट हून अधिक उंची असलेल्या या बकऱ्याचं वजन १४८ किलो आहे. एका टीव्ही चॅनेलच्या बातमीनुसार, हा बकरा बघून प्रत्येक जण आश्चर्यचकित होत आहे. पंजाबमधून खास भिलाईला मागवलेल्या या बकऱ्याला बघण्यासाठी लोकांची गर्दी उसळत आहे. या जातीचा बकरा खूप कमी बघायला मिळतो, अशातच त्याला बघण्यासाठी गर्दी होणं साहजिकच आहे. कोरोनाच्या संकटादरम्यान धान्य, भाज्या, फळंच नाही तर बकरे सुद्धा ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या ८ फूटाच्या बकऱ्याची किंमत ऐकून आपणही आश्चर्यचकित व्हाल. अनेक गुणांनी युक्त असलेल्या या बकऱ्याला भिलाईच्या फरीद नगर इथले राहणारे आई अहमद उर्फ लाल बहादुर मलिक यांनी खरेदी केलं आहे. ज्याची किंमत १ लाख त्रेपन्न हजार रुपये आहे. (१.५३ लाख रुपये). एव्हढंच नव्हे तर १४८ किलोच्या या बकऱ्याला एका राज्यातून दुसऱ्या राज्यात म्हणजे पंजाबमधून भिलाईला आणण्यासाठी २३ हजार रुपयांचा खर्च आला आहे. बकऱ्याचं वैशिष्ट्ये असं आहे की, बकरा गवतासोबतच भाज्या आणि फळ-फूलं पण चवीनं खातो. आपल्याला माहितीय की, देशातील काही भागांमध्ये लोकांना आरोग्यासंबंधी सूचना देऊन मस्जिदमध्ये ईदच्या दिवशी नमाज पठण करण्याची परवानगी दिली आहे. पण लोकांना मास्क घालणं आवश्यक असेल. आपल्याला माहितीच आहे देशात कोरोना संकटामुळे यावर्षी सर्वच सण आपआपल्या घरी साजरे करण्याचे आदेश सरकारनं दिले आहेत. शिवाय गणेशोत्सव पण अगदी साध्या प्रमाणात साजरा करण्यास सरकारनं सांगितलंय. तसंच आता बकरी ईद सुद्धा संपूर्ण काळजी घेऊन साजरा करण्यास सरकारनं सांगितलं आहे. |
मुंबई : तौक्ते चक्रीवादळामुळे (Tauktae Cyclone) कोकणात प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे कोकण दौऱ्यावर गेले होते .यावरून भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर ताशेरे ओढले आहे . तौक्ते चक्रीवादळानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी चांगले काम केले, असे वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केले. उद्धव ठाकरे हे कोकणात जाण्यासाठी घराबाहेर पडले. मात्र, कपड्याची इस्त्रीही मोडू न देता ते मुंबईत परतले. याउलट एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कोकणवासीयांना मदत तरी पाठवली. त्यासाठी मी एकनाथ शिंदे यांचे आभार मानतो. बाळासाहेबांचा खरा शिवसैनिक कसा असतो, हे त्यांनी दाखवून दिले. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याकडून काही तरी शिकावे, हा माझा मैत्रीपूर्ण सल्ला असल्याचे नितेश राणे यांनी म्हटले. उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यावर बोलताना राणे यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली .मुख्यमंत्री वायरीत गेले नाहीत, निवतीत गेले नाहीत. ज्या भागात सर्वांत जास्त नुकसान झाले त्या वैभववाडी, देवगडकडे ढुंकूनही पाहिले नाही. त्यामुळे मुळात याला दौरा म्हणू शकता का ? देवेंद्रजी कोकणात फिरताहेत, मी घरी बसून राहिलो तर उद्या मला उत्तरं द्यावी लागतील म्हणून उद्धव ठाकरेंनी हा दौरा केला का? असा प्रश्नही नितेश यांनी उपस्थित केला. उद्धव ठाकरे केवळ चिवला बीचवर जाऊन माघारी फिरले. चिवला बीचवर ते राणे साहेबांचं घर पाहायला आले होते का? कदाचित त्यांचं आमच्यावरील प्रेम आजही कमी झालेले नाही. कारण या ठिकाणी ते खूप दिवस राहिले आहेत, आमच्याबरोबर जेवले आहेत. त्यामुळे त्यांना बघायचे असेल की, राणेंच्या घराला तर काही नुकसान झाले नाही ना, असा टोला नितेश यांनी लगावला. |
दिल्लीमध्ये महागाई आणि बेरोजगारीवरून केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करताना काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वड्रा (Priyanka Gandhi) यांना दिल्लीतील AICC मुख्यालयाबाहेरून ताब्यात घेतले होते. (Rahul and Priyanka Gandhi released after 6 hours of detention) जेथे त्या बेरोजगारी आणि महागाईच्या निषेधार्थ पक्षाच्या इतर नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये सामील झाल्या होत्या. तसेच पक्षाने आज कॉंग्रेसने देशव्यापी आंदोलन पुकारले आहे. माध्यमांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले होते की, जनतेचे प्रश्न मांडणे हे आमचे काम आहे. महागाईचा मुद्दा मांडण्यासाठी काँग्रेसचे सर्व खासदार राष्ट्रपती भवनाकडे कूच करत होते. तसेच काँग्रेसच्या काही खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी महागाई आणि बेरोजगारीविरोधात दिल्लीच्या विजय चौकात आंदोलन करत होते. तसेच राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची 6 तासांच्या अटकेनंतर सुटका करण्यात आली आहे. Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS. दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा. |
Nashik News : नाशिकमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील ठाणगाव येथे ५० ते ६० जणांना महाप्रसादातून विषबाधा झाली आहे. ठाणगाव येथे हनुमान जयंती निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन समस्त गावकरी यांच्या तर्फे करण्यात आले होते. (Hanuman Jyanti) सकाळी नऊ ते अकरा वाजेच्या दरम्यान काल्याचे किर्तन होते. या महाप्रसादातून विषबाधा झाल्याचे गावकऱ्यांकडून समजले आहे. या सर्वच रुग्णांना नाशिकच्या बाऱ्हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वैद्यकीय अधिकारी सदर परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. पोलीस निरीक्षक वाघ यांना ही माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच महाप्रसादाचा नमुना घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. मात्र आज गुड फ्रायडे दिनानिमित्त सुट्टी असल्याने सर्वच आरोग्य कर्मचारी रुग्णालयात उपस्थित नव्हते. रुग्णांवर उपचार सुरू असून विषबाधेच्या रुग्णांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काल गावात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच महाप्रसाद देखील ठेवण्यात आला होता. या महाप्रसादाचा लाभ सर्व गावकऱ्यांनी घेतला. सर्वांनाच हा प्रसाद मिळाला आहे. त्यातील ५० ते ६० व्यक्तींना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. गावात सर्वांनी या प्रसादाचा लाभ घेतल्याने रुग्णांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS. साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा. |
गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी अनेकांचे खिसे रिकामे केले, तर महागडे मोबाइलही लांबविले. या प्रकरणात गुन्हे मात्र दाखल झाले नव्हते. नांदेड : सैराटफेम सिने अभिनेत्री रिंकू राजगुरू ही शनिवारी नांदेडात एका खासगी कार्यक्रमासाठी आली होती. कार्यक्रमात आर्चीला पाहण्यासाठी तरुणाईने गर्दी केली होती. याच गर्दीचा फायदा उचलत चोरट्यांनी मात्र आपली दिवाळी साजरी करत अनेकांचे खिसे रिकामे केले. कोरोनामुळे सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी आपल्या हातसफाईची कला दाखविण्याची संधी गेल्या दोन वर्षांत चोरट्यांनाच मिळालीच नाही. त्यात शनिवारी शहरात आर्ची येणार अन् तिची एक झलक पाहण्यासाठी तरुणाई गर्दी करणार याचा पुरेपूर अंदाज चोरट्यांना होता. त्या दृष्टीने सकाळपासूनच पाकीटमार तयारीत होते. गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी अनेकांचे खिसे रिकामे केले, तर महागडे मोबाइलही लांबविले. या प्रकरणात गुन्हे मात्र दाखल झाले नव्हते. |
कोविड -19 मुळे अस्थमा चा आजार असलेल्या लोकांचा मृत्यु होण्याचे प्रमाण कमी असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. अस्थमा असून कोरोना झालेल्या रुग्णांना आता हॉस्पिस्टल मध्ये दाखल होणे किंवा तंत्रज्ञानाच्या मदतीने श्वासोच्छवास घेण्याीच काहीच गरज भासणार नाही. मात्र ज्यांना अस्थमा नाही पण कोरोनाची लागण झाली आहे अशा लोकांना त्याची गरज भासत आहे. त्यामुळे अस्थमा असलेल्या रुग्णांना कोरोना व्हायरस जरी झाला तरी त्यांचा मृत्यू होण्याची शक्यता कमी असल्याचे एका नव्या अभ्यासातून समोर आले आहे. बोस्टन हेल्थकेअर सिस्टमच्या संशोधकांनी 562 अस्थमा रुग्ण आणि 2,686 अस्थमा नसलेले कोविड-19 रुग्ण यांचा अभ्यास केला. दोन्ही गटांना समान दराने (18% ते 21%) रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे यांत्रिक वेंटिलेशन ची सामान आवश्यकता होती. संशोधकांनी असे सांगितले की अस्थमाच्या रुग्णांचा व्हायरसमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण 70% कमी होते . गंभीरअस्थामाचा आजार असलेल्या 44 रुग्णांपैकी कोणाचाही मृत्यु झाला नाही. एका नवीन अभ्यासानुसार, लक्षण सुरू होण्याच्या एका आठवड्यात प्राप्त झालेल्या संसर्गजन्य आणि नॉन-संसर्गजन्य विषाणूंमधील फरक ओळखण्यासाठी कोरोना व्हायरसची वेगाने ओळख पटविण्यासाठी बेक्टन डिकेनसन आणि सीओडीची बीडी व्हेरिटर सिस्टम. मानक आरटी-पीसीआर प्रयोगशाळेच्या चाचण्यांपेक्षा चांगले आहे. पीसीआरची एक कमी आहे की रुग्ण यापुढे संसर्गजन्य नसल्यामुळे सकारात्मक चाचणी घेऊ शकतात. कारण चाचण्यांमध्ये व्हायरल आरएनए कमी प्रमाणात आढळतो जी बहुधा मृत्यू झालेल्या संक्रमित पेशींचे प्रतिनिधित्व करते. नवीन "अँटीजन-आधारित" चाचण्यांमध्ये आरएनएऐवजी व्हायरल प्रोटीन दिसतात. बीडी लाइफ सायन्सेसच्या कोथोर सेलिन रॉजर-डॅल्बर्ट यांनी सांगितले की वर्तमान आरएनए-बेस्ड (आरटी-पीसीआर) चाचणीपेक्षा संसर्गजन्य व्यक्ती ओळखण्यासाठी आणि वेगळ्या करण्यासाठी अँटीजन-आधारित पध्दती संभाव्यतः वापरली जाऊ शकतात. रुग्णाच्या वायुमार्गामध्ये ट्यूब ठेवणे किंवा काढून टाकणे वैद्यकीय कर्मचा-यांसाठी सर्वात जास्त धोकादायक प्रक्रिया मानली जाते. परंतु ऑपरेटिंग रूममध्ये कमीतकमी या प्रक्रियेमुळे व्हायरसच्या संक्रमणाचा धोका कमी होतो. जर्नल एनेस्थीसिया मंगळवारी संशोधकांनी दिलेल्या वृत्तानुसार, खोकल्यामुळे एकूण १ tube ट्यूब अंतर्भूततेमुळे एरोसोलचा एक हजारावा भाग तयार होतो. चौदा ट्यूब निष्कासनने जास्त एरोसोल तयार केले, परंतु तरीही त्यापैकी 25% पेक्षा कमी स्वेच्छेने खोकल्यामुळे झाले. आपत्कालीन कक्ष सेटिंगमध्ये देखील हे योग्य असू शकत नाही. शस्त्रक्रिया संघ सध्या एरोसोल टाळण्यासाठी श्वसन यंत्र आणि उच्च-स्तरीय वैयक्तिक संरक्षक उपकरणे परिधान करतात. प्रत्येक प्रकरणानंतर, विशेष साफसफाई केली जाते,जे ऑपरेटिंग रूमची उलाढाल कमी करते आणि ऑपरेशन्सची प्रतीक्षा वेळ वाढवते, असे लेखक म्हणतात. कोविड -19 रुग्णांचे फ्रंटलाइन हेल्थकेयर श्रमिकांनी श्वसन यंत्र असलेले मास्क वापरले पाहिजेत. जे चेहऱ्यावर एक पाताळ सील बनवतो. परंतू वाढलेल्या दाढ़ीमुळे ते शक्य होत नाही. हॉस्पिटलच्या संसर्गाच्या जर्नलमध्ये शनिवारी प्रकाशित झालेल्या एका अहवालात , ब्रिटनमधल्या एका डॉक्टर ने यावर उपाय आणला आहे ज्यामधे हनुवटी आणि गाल झाकले जाऊ शकतात. ज्यामध्ये अंडर-मास्क लोचदार रबर शीट जी योगा मध्ये वापरली जाते ती आहे आणि ते डोक्याच्या वर एका गाठीत बांधले जाऊ शकते. |
प्रत्येक वर्षी, औद्योगिक विकास, वेगवान वाढत आहेत. या नवीन तंत्रज्ञान आणि काही उत्पादने उत्पादन पद्धती परिचय ठरतो. या नावीन्यपूर्ण फक्त प्रभावीपणे अप्रचलित तंत्र पण आर्थिक व्यवहार्यता आणि सुरक्षा कनिष्ठ नाही नसावे. काय एक प्लाजमा जोडणी बद्दल चर्चा करू. हे तुलनेने अलीकडे दिसू लागले, पण आधीच फार सक्रियपणे अनेक वापरले उद्योग. अशा एक कनेक्शन पद्धत धातू पाईप्स, स्टेनलेस स्टील आणि इतर साहित्य वापरले जाते. पद्धत इच्छित भाग दिशेने प्लाजमा प्रवाह दरम्यान स्थानिक हळुवार मध्ये समावेश. प्लाजमा एक गॅस प्रवाह आरोप कण सक्रियपणे विद्युत चालू आयोजित एक अनेकत्व असलेल्या ionized आहे. गरम थेट प्लाजमा मशाल जातो की उच्च गती कंस वापरून गाठले आहे वायू, या इलेक्ट्रोलाइटमधून विजेचा प्रवाह गेल्याने परमाणुंचे विभाजन विद्युतभारवाही कण किंवा आयॉन्स मध्ये होणे येते. स्वाभाविकच, इलेक्ट्रोलाइटमधून विजेचा प्रवाह गेल्याने परमाणुंचे विभाजन विद्युतभारवाही कण किंवा आयॉन्स मध्ये होणे पदवी गॅस तापमान वाढते. तापमान amlituda कंस - नाही कमी 5 आणि नाही 30 पेक्षा जास्त 000 अंश सेल्सिअस. अर्थात, आज, प्लाझ्मा जोडणी सर्वत्र वापरले जाते, परंतु उपकरणे, विशिष्ट प्लाजमा मशाल मध्ये, फार महाग आहे. अशा प्रकारे आपण कडा कापून, अतिशय सोयीस्कर आहे न भाग कनेक्ट करू शकता. प्लाजमा जोडणी फक्त एक परंपरागत कंस एक प्लाजमा प्राप्त करण्यास सक्षम बाबतीत शक्य आहे. या संक्षेप आणि विशेष गॅस प्रणाली कंस सक्ती पुरवठा अर्थ सहसा गाठले आहे. प्लाजमा गॅस म्हणून हेलियम किंवा हायड्रोजन एक लहान रक्कम आर्गॉन आहे. हे विद्युत् संरक्षण म्यान निर्माण करणे गरजेचे आहे, या हेतूने सर्वोत्तम प्रकारे सुयोग्य असतात त्याच आर्गॉन आहे. प्रसंगोपात, electrodes टंगस्टन, थोरियम, किंवा संक्षेप y सक्रिय केले जातात. हे प्लाजमा मशाल भिंती उच्च दाब फार गरम झाले की नोंद करावी, म्हणून ते सतत थंड आवश्यक आहे. मागील तो प्लाजमा लहान व्यास कंस सह संयोजनात उल्लेखनीय उच्च तापमान वेल्डिंग की निष्कर्ष काढला जाऊ शकतो. शेवटचा पर्याय मेटल अनेक वेळा दबाव वाढवू देते. शिवाय, प्रक्रिया 0. 2-3. 0 amperes एक लहान चालू ठेवली आहे. प्रथमच या जोडणी प्रकार आवश्यक पात्रता म्हणून, घरगुती कारागीर वापरले जात नाही. आज परिस्थिती मूलतः बदल झाला नाही. असे असले तरी, घरगुती वातावरणात वापर योग्य आहेत जे जोडणी मशीन, आहेत. या प्रकरणात तंत्रज्ञान खूप सोपे आहे. आपण विशेष वेल्डिंग मशीन, electrodes आणि काढण्यासाठी वायर प्राप्त करणे आवश्यक आहे. सुरू करण्यापूर्वी, विद्युत् एक कोन 30 अंश फार नाही एक शंकूच्या आकाराचे आकार प्राप्त करण्यासाठी मैदान आहे. ते कदाचित योग्य विद्युत् स्थापित करण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. मुख्य गोष्ट - शिट्टी nozzles विद्युत् अक्ष अक्ष सह योगायोग अनुसरण. जोडणी शिवण आर्गॉन जोडणी मध्ये म्हणून तशाच प्रकारे मानले जाते. कडा काढून घेतला आणि degreased आहेत, फक्त नंतर आपण कार्य सुरू करू शकता. तसे, 1. 5 मि. मी. मंजुरी अभाव लक्षात ठेवा. क्षेत्र अतिरिक्त साफ आणि आसंजक बिंदू आणि वेल्डिंग शिवण गुणवत्ता समान याची खात्री करा टॅक करणे आवश्यक आहे. प्लाजमा जोडणी त्याच्या स्वतः च्या हातांनी केले जाते सतत चालू, मूल्य, जे शिफारस श्रेणी बाहेर येऊ नये. शिवाय, संरक्षक गॅस elapses 5-20 सेकंद दिले जाते, नंतर कंस व्यत्यय नंतर सुमारे 10-15 सेकंद बंद आहे. प्लाजमा मशाल ऑपरेशन दरम्यान उत्पादन 1 पेक्षा अधिक सेंमी नाही अंतर पाहिजे, आणि कंस शक्यतो बंद शिवण आधी बंद खंडित नाही. वेल्डिंग तेव्हा धातू overheating टाळण्यासाठी अशक्य आहे. जटिल स्तरावर प्लाजमा जोडणी स्टॉप पोहोचत यावर. मेटल संकुचित हवा थंड, आणि ते ऑपरेशन पुन्हा फक्त नंतर. लक्षात ठेवा बर्नर स्वयंचलित उपकरणे म्हणून, सहजतेने आणि समान रीतीने हलवा करणे आवश्यक आहे. या प्रकरणात, आपण खरोखर उच्च दर्जाचे व विश्वसनीय सील अपेक्षा करू शकता. Multifunctional वेल्डिंग मशीन "ड्रॅगन 'या सुप्रसिद्ध घरगुती वाहने सर्वाधिक आहे. आम्ही हे खरोखर एक दर्जेदार उत्पादन तुम्ही स्वतंत्रपणे जोडणी काम अमलात आणणे करू शकता जे आहे की म्हणू शकता. ती लक्षात "ड्रॅगन" श्रेणी शक्ती भिन्न आहे ते वाचतो. 8, 10 आणि 12 amps तेथे मॉडेल आहे. पहिला पर्याय घरगुती वापरासाठी योग्य आहे, सरासरी एक उत्कृष्ट किंमत / कामगिरी प्रमाण आणि सर्वात शक्तिशाली "ड्रॅगन" फक्त व्यावसायिक वापरली जाते आहे. त्यामुळे, मॉडेल आहे 8 amps 29 हजार खर्च होईल, 10 - 30 हजार, आणि 12 - 33 000 रूबल्स. तत्त्व, प्लाजमा "ड्रॅगन" जोडणी, जे किंमत परदेशी analogues त्या पेक्षा कमी आहे, रशिया, युक्रेन, बेलारूस, अतिशय लोकप्रिय आहे आणि इतर. स्टेट्स. पूर्वी, तर योग्य मॉडेल फार कठीण आहे शोधण्यासाठी, पण आता तो नाही समस्या आहे. थोडक्यात, प्लाजमा वेल्डिंग मशीन कोणताही विशेष शॉप मध्ये आढळू शकते. आपण निखळ देऊ युनिट रुंद निवड आश्चर्य जाईल. पण ते इलेक्ट्रिक वेल्डिंग आणि inverters पेक्षा जास्त महाग आहेत. इतर पर्याय तुलनेत प्लाजमा साधन अतिशय अनुकूल पाहिले. पहिल्याने, काम गती अनेक वेळा उच्च सादर, आणि दुसरे म्हणजे, प्रत्यक्ष व्यवहारात नाही कचरा नाही. plazmosvarkoy आवश्यक वीज आणि काम करण्यासाठी संकुचित हवा, आणि एक विशेष दाबणारा सह - फक्त नेटवर्कशी कनेक्ट करा. नियतकालिक बदलण्याची शक्यता बर्नर तोंड आणि विद्युत् अधीन आहे. याव्यतिरिक्त, प्लाजमा मशाल नियमितपणे भरवू पाहिजे. या विशेष कंटेनर वापरली जातात. विशेष म्हणजे, प्लाझ्मा पठाणला आणि वेल्डिंग सुरक्षीत मानले जातात. असे असले तरी, तो घराबाहेर किंवा हवेशीर क्षेत्रात काम करणे इष्ट आहे. आम्ही आधीच काय प्लाजमा वेल्डिंग विषयी थोडी माहिती. उपकरणे किंमत, म्हणून आपण पाहू शकता, त्याच्या क्षमता अवलंबून असते. पण आपण जोडणी अनेक प्रकार आहेत हे खरं लक्ष देणे आवश्यक आहे. त्यापैकी एक - सरासरी चालू (50-150 amps) मध्ये काम. अशा जोडणी आर्गॉन तुलना होऊ शकत, पण ते अधिक प्रभावी असल्याचे मानले जाते कंस शक्ती जास्त आहे आणि गरम क्षेत्र मर्यादित आहे. परंपरागत कंस तुलनेत हे मूर्त स्वरूप, उपचार धातू proplavki खोली वाढ आणि उष्णता खोल स्तर हस्तांतरण सुधारीत करण्यास परवानगी देते. मुळात, या नाही फक्त योग्य ऊर्जा वैशिष्ट्यपूर्ण आहे, पण जोडणी पूल वर एक उच्च दाब. वेल्डिंग काढण्यासाठी वायर माध्यमातून सरासरी चालू येथे सुरू आहे. आज अतिशय लोकप्रिय आणि प्रभावी उपाय आहे. आपण घरी काम करू इच्छित असल्यास, आपण प्लाजमा जोडणी या प्रकारची स्वीकारणार नाही. उपकरणे किंमत, विविध होणार नाही समायोजित करू शकता कारण आहे. या प्रकरणात, ऑपरेशन 150 amperes पेक्षा चालू मोठे प्रवाह. या धातू अधिक असुरक्षितता प्राप्त करणे आवश्यक आहे. खरं तर, 150 एक समान तापमान उपभोग्य विद्युत् असाच जोडणी वेल्डिंग. हे समाधान एक विशिष्ट वैशिष्ट्य कामे अंमलबजावणी दरम्यान पूर्ण आत प्रवेश करणे workpiece खात्री बाथरूम मध्ये एक माध्यमातून-भोक स्थापना आहे. पण इथे निष्काळजी वृत्ती तसेच तंत्रज्ञान देखणे सहज बर्न गुण मिळवू शकता अत्यंत महत्वाचे आहे. याव्यतिरिक्त, आदर करणे आवश्यक आहे, आणि इतर महत्त्वाची घटकः प्लाजमा मशाल थंड आणि त्याचा संग्रह अटी, बर्नर nozzles नियतकालिक बदलण्याची शक्यता, refueling आणि अधिक. तत्त्व, एक कारण लिहिले सूचना, आणि आवश्यकता साजरा करणे आवश्यक आहे. साधारणपणे, प्लाझ्मा पठाणला आणि वेल्डिंग उपकरणे चालू कार्य, तो धातूंचे मिश्रण आणि कमी कार्बन पोलाद कंपनीचे कर्जरोखे, तांबे, टायटॅनियम आणि इतर कनेक्ट करणे आवश्यक आहे. सामुग्री. त्यामुळे आम्ही हा विषय आपण पाहिले. तुम्ही बघू शकता, प्लाझ्मा जोडणी - तो जोरदार मनोरंजक आणि प्रभावी आहे. या असंख्य प्रतिसाद बनलेले होते. व्यावसायिक welders सांगतो की, जेथे वापरले आर्गॉन जोडणी अशक्य, फक्त योग्य प्लाजमा आहे. सुरुवातीला हे देखील लक्षात ठेवा उत्पादन welded सांधे हा प्रकार नाही फक्त त्याच्या गती पण जोडणी उच्च दर्जाचे चांगले आहे. याव्यतिरिक्त, ऑपरेशन नियमांचे पालन सर्व काम पूर्णपणे सुरक्षित आहे. आपण घरी वेल्डिंग गुंतण्यासाठी जात असल्यास, डिव्हाइस "ड्रॅगन" येईल आहे. घरगुती उत्पादक पासून हे तंत्र अत्यंत उच्च दर्जाचे मानले जाते आणि त्याच वेळी अतिशय स्वस्त किंमत आहे. अर्थात, किंमत तुलनेत आहे जोडणी इन्व्हर्टर अतिशय वाटू शकते, पण गुणवत्ता आपण भरावे लागते. तसे, प्लाजमा सर्व प्रतिष्ठापन काम पुरेसे सोपे आहे अमलात आणणे "ड्रॅगन" जोडणी परवानगी देते. पण प्रथम, आपण काळजीपूर्वक सूचना वाचा आणि पहिल्या वापरासाठी तयार करणे आवश्यक आहे. आपले पहिले अनुभव अतिशय असामान्य वाटते जातील, परंतु शेवटी आपण एक व्यावसायिक पातळीवर जोडणी गुणवत्ता आहे की दिसेल. |
इंफाळः इंफाळ पश्चिम उपायुक्त कार्यालयाच्या कॉम्प्लेक्समधुन गुरुवारी मतपत्रिका (ballot paper) चोरल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केल्याची माहिती अधिकृत निवेदनातुन देण्यात आली आहे. इम्फाळ पश्चिम जिल्ह्यातील किशमथोंग (Keishamthong) सीटवर ईव्हीएम्स (EVMs) आणि व्हीव्हीपीएटीएसचा (VVPATS) वापर चालू असताना नरेश म्हणून ओळखल्या जाणार्या व्यक्तीने क्रमांक 0001 असलेली मतपत्रिका खिशात टाकली. हा पेपर मतदारसंघाच्या बॅलेट युनिट (BU) साठी वापरायचा होता, जिल्हा निवडणूक अधिकारी (DEO) ने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अटक केलेला व्यक्ती RPI (A) उमेदवाराचा प्रतिनिधी आहे. सध्या तो पोलीस कोठडीत आहे. |
मुंबई । केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेवरून देशभर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. उत्तर भारतात या योजनेविरोधात संताप व्यक्त केला जात असताना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. युवकांचा वाढता विरोध बघता केंद्र सरकारने अग्निपथ योजनेच्या वयोमर्यादेत वाढ करण्याचा निर्णय घेतला. अग्निपथ योजनेला होणारा विरोध शांत करण्यासाठी केंद्र सरकार रोज नव्या घोषणा आणि योजनेत बदल करत असल्याची टीका रोहित पवारांनी केली. अग्निवीरांसाठी CAPF आणि आसाम रायफल्समध्ये 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय केंद्राने घेतला. यावरून देखील रोहित पवारांनी टीका केली आहे. योजनेत गुंतागुंत आणि अस्पष्टता असल्याचं देखील रोहित पवार म्हणाले. केंद्र सरकारकडून योजनेत रोज केले जाणारे नवीन बदल म्हणजे आभाळाला ठिगळ लावण्यासारखं आहे, अशी खोचक टीका देखील रोहित पवार यांनी केली आहे. केंद्र सरकारने आपला ego बाजूला ठेवून तज्ज्ञांशी चर्चा करून योग्य मार्ग काढायला हवा. अजूनही वेळ गेलेली नाही, असा सल्ला देखील रोहित पवार यांनी दिला आहे. एकाच दिवसात योजनेत बदल करावा लागतो. याचाच अर्थ योजना तयार करताना विस्तृत विचार झालेला नाही, असा टोलाही रोहित पवारांनी लगावला आहे. दरम्यान, केंद्राच्या अग्निपथ योजनेवर विरोधकांकडून सडकून टीका केली जात आहे. |
जेरुसलेम अल अक्सा मशिदीत पॅलेस्टाइन आणि इस्रायलच्या सुरक्षा दलामधील चकमकीने आता रौद्र रुप धारण केलं आहे. दोन्ही बाजूंनी रॉकेट हल्ला केला जात आहे. यामध्ये आतापर्यंत ३२ जणांचा मृत्यू झाला असून यात एका भारतीय महिलेचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. सौम्या संतोष असं या महिलेचं नाव असून ती गेल्या सहा वर्षापासून इस्रायलमध्ये राहत होती. इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले की, हमासनं रहिवाशी भागात जवळपास १३० रॉकेटचा हल्ला केला. तर जेरुसलेममध्येही मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला. या हल्ल्यात भारतीय महिलेचा मृत्यू झाला. भारतात इस्रायलचे राजदूत डॉक्टर रॉन मलका यांनी ट्विट करून या घटनेची माहिती दिली आहे. तसेच सौम्या संतोष यांच्या कुटुंबियाच्या दुःखात आपण सहभागी असल्याचं म्हणत इस्रायलचे राजदूत डॉक्टर रॉन मलक यांनी शोक व्यक्त केला आहे. |
नागपूर - शहरातील पाचपावली भागात रहाणारे कुटुंबप्रमुख आलोक माथुरकर याने प्रथम पत्नी, मुलगा, मुलगी यांची हत्या केली. नंतर तिथेच थोड्या अंतरावर रहाणारे सासू आणि मेहुणी यांचीही हत्या केली. हत्या केल्यानंतर त्याने पुन्हा आपल्या घरी येऊन आत्महत्या केली. ही घटना २० जून या दिवशी घडली. पोलिसांनी पंचनामा करून सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत. कौटुंबिक कलहातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलीस या प्रकरणी अधिक अन्वेषण करत आहेत. |
लोकप्रिय सामग्री अनेक प्रकारच्या असू शकतेः - सिरेमिक ग्रॅनाइटची भिंत टाईल अत्यंत टिकाऊ आणि यांत्रिक आणि रासायनिक प्रभावांना अत्यंत प्रतिरोधक असतात. हे असामान्य रचना असू शकते - ग्रेनाइट, संगमरवरी किंवा इतर कोणत्याही नैसर्गिक सामग्रीचे अनुकरण करा. - मिरर टाइल लहान आकाराच्या बाथरुम्ससाठी एक चांगला उपाय आहे, कारण ती दृश्यमानपणे जागा वाढवते. पण हे पाणी सतत ढवळावे लागतेवेळी भिंतीवर पसरवण्याची शिफारस केलेली नाही, कारण सामग्री ढगाळ बनू शकते. बाथरूमसाठी वॉल टाइल सामान्यतः हलक्या रंगात निवडली जातात, कारण पाणी हलका रंगांशी संबंधित आहे. स्काय निळा, पांढरा, मऊ गुलाबी आणि अगदी हलका राखाडी- या सर्व रंग या खोलीसाठी परिपूर्ण आहेत. परंतु आपण मानकेतून बाहेर पडू शकता आणि भिंतीवर आच्छादनांच्या साहाय्याने आपल्या स्नानगृहाच्या उज्ज्वल आणि अनन्य अंतराची तयार करु शकता . सजवण्याच्या बाथरुम्स आणि सरी यासारख्या भिंतीची टाईल सामग्री आकर्षक का आहे? अनेक पैलू आहेत प्रथम, खोलीत आर्द्रता आणि तपमानाचे फरक सह सतत संवाद साधण्यासाठी स्थिर आहे. दुसरे म्हणजे, ही सामग्री फार टिकाऊ आणि टिकाऊ आहे. आणि भिंतीच्या टायल्सकडे एक महत्त्वाचे फायदे आहेत की, त्याच्या उत्पादनासाठी वापरले जाणारे साहित्य जैविक दृष्ट्या अक्रिय आहे. म्हणजेच, या प्रकारचे कपडे वेगवेगळ्या बुरशी व साच्यासाठी प्रजनन स्थळ होऊ शकत नाही. रंग उपाय साठी, सर्व प्रथम स्वयंपाकघर साठी भिंत टाइल पूर्णपणे खोली आतील मध्ये फिट पाहिजे. म्हणून, हे पूर्णपणे भिन्न छटा दाखवा असू शकते - क्लासिक क्रिस्टल पांढऱ्या ते ट्रेडी निऑन रंगांपासून. वॉल टाइल - हे एक गोष्ट आहे ज्यात धोकादायक प्रयोगांवर जाणे चांगले नाही त्याच्या बिछाना प्रक्रिया लांब आणि laborious आहे. म्हणून, आपल्याकडे बिल्डरचे व्यावसायिक कौशल्य नसल्यास, तज्ञांकडून मदत मागणे सर्वोत्तम आहे. |
अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळं ओडिशा, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये शेतकऱ्यांच्या आंबा पिकांची नासाडी केली आहे. अवकाळी पाऊस आणि गारपीटीनं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं शेतकरी अस्वस्थ आहेत. मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये अवकाळी पावसामुळं फळबागांसह रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. पावसामुळं आंबा, द्राक्ष, केळी, संत्रा या फळबागांसह गहू, हरभरा, मका, मोहरी, ज्वारी या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. उत्तर प्रदेशातील चित्रकूटमधील आंबा बागांवर पाऊस आणि गारपिटीचा मोठा परिणाम झाला आहे. अवकाळी पावसामुळं निर्माण झालेला ओलावा, त्यामुळं आंबा पिकावर रोगराई निर्माण झाली आहे. ओडिशातही अवकाळी पावसाचा परिणाम आंब्याच्या बागांवर होताना दिसत आहे. ओडिशामध्ये अवकाळी पाऊस आणि आता तापमानात अचानक वाढ झाल्यामुळं आंब्याच्या उत्पादनावर वाईट परिणाम झाला आहे. महाराष्ट्रातही अवकाळी पावसाचा परिणाम आंब्याच्या बागांवर होताना दिसत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या बदलत्या बावावरणाचा फटका बसत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. पिकांचं नुकसान झाल्यानं मोठा तोटा सहन करावा लागत आहे. |
मुंबई :- कथित विनयभंग प्रकरणी ठाणे न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. गेल्या रविवारी भाजपच्या महिला मोर्च्याच्या उपाध्यक्ष रिदा रशीद यांनी आव्हाड यांच्याविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार केली होती. या पार्श्वभूमीवर आज आंतरराष्ट्रीय पुरुष दिवसानिमित्त आव्हाडांनी केलेले ट्विट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यांनी ट्विटच्या माध्यमातून शिंदे सरकारवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. जामीन मिळाल्यानंतर आव्हाडांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. मला अडकविण्यासाठी हा पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप त्यांनी केला होता. एखाद्या महिलेला पुढे करून राजकारण केले जात आहे. राज्यात यापूर्वी कधीच असे खालच्या पातळीवरील राजकारण पाहिले नव्हते, हे अत्यंत वाईट आहे, असेही आव्हाड म्हणाले होते. ही बातमी पण वाचा : जितेंद्र आव्हाडांवर कारवाई केल्याने सरकारची प्रतिष्ठा वाढली का? |
Vidya Iyer (es); বিদ্যা বক্স (bn); Vidya Iyer (nl); विद्या वोक्स (mr); విద్యా ఐయెర్ (te); ਵਿੱਦਿਅਾ ਵੌਕਸ (pa); Vidya Iyer (sq); Vidya Iyer (ast); विद्या अय्यर (hi); Vidya Iyer (en) American YouTuber and singer (en); ఇండో-అమెరికన్ యు ట్యూబర్ మరియు గాయకురాలు (te); zanger (nl); American YouTuber and singer (en); আমেরিকান ইউটিউবার এবং সঙ্গীতশিল্পী (bn); इंडो-अमेरिकन यूट्यूब और गायक (hi); baaŋa ŋun nyɛ paɣa (dag) Vidya Vox (en); विद्या वॉक्स (hi); విద్యా వాక్స్, విద్యా అయ్యార్ (te) विद्या अय्यरचा जन्म भारतातल्या चेन्नई येथे झाला होता. ती घरी तमिळ बोलते, वयाच्या ५ व्या वर्षापासूनच कर्नाटक संगीत शिकली आणि इंग्रजी संगीत ऐकण्यातही तिला मजा आली. तिने स्वतःची भारतीय म्हणून ओळख देणे हे संकटासारखे वाटत असल्याची कबुली दिली आहे, भारतीय असल्याने आपला छळ केला जात होता आणि म्हणून तिने मोठी होत असताना तिची संस्कृती लपवून ठेवली होती. पण तिने पुढे सांगितले आहे की तिला आता तिच्या संस्कृतीचा अभिमान वाटतो. [३] [१] भारतीय शास्त्रीय संगीतासाठी आजीने तिला प्रेरित केले. तिला महाविद्यालयातल्या भारतीय मुळांचा विश्वास वाटू लागला, भारतीय विद्यार्थी संघात सामील झाला आणि भारतीय लोकनृत्य संघात सामील झाला. तिने जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीमध्ये मानसशास्त्र आणि बायोमेडिकल सायन्सचे शिक्षण घेतले आणि बायोलॉजिकल सायन्समध्ये बॅचलर ऑफ सायन्स पदवी घेतली. संगीत शिकण्यासाठी ती दोन वर्षे भारतात गेली. तिने तिची बहीण वंदना अय्यर आणि तिचा प्रियकर शंकर टकर यांच्याबरोबर ज्यांना तिची महाविद्यालयात भेट झाली, त्यांनी संगीत तयार करण्यासाठी सहकार्य केले. [१] २०१७ मध्ये तिने तिच्या संगीताची जाहिरात केली, भांगडा आणि हिप-हॉप डान्सचे रिहर्सल केले . ↑ a b c Now, her music merges India and the United States: Vidya Vox's "Kuthu Fire" extended play features influences from both her Indian and American identities, NBC News, November 17, 2017. ^ "Be Free (Pallivaalu Bhadravattakam) ft. Vandana Iyer" (इंग्रजी भाषेत). July 30, 2019 रोजी पाहिले. ^ Vidya Vox proud to be Indian in America, IANS, November 22, 2017. ^ "The mashup star". The Hindu. August 21, 2015. August 21, 2015 रोजी पाहिले. ^ "Singer Vidya Vox on Blending two Musical Worlds: East and West". India.com. January 8, 2016. January 8, 2015 रोजी पाहिले. ^ "The Famous Kerala Boat Song 'Kuttanadan Punjayile' Just Got A New Twist And It Sounds Awesome". The Huffington Post. January 13, 2016. January 13, 2015 रोजी पाहिले. ^ "Vidya and Shankar Tucker gives Kerala's favourite boat song 'Kuttanadan Punjayile' a classic twist". India Today. January 14, 2016. January 14, 2015 रोजी पाहिले. ^ "Stylish makeover for Malayalam folk song". Deccan Chronicle. January 17, 2016. January 17, 2015 रोजी पाहिले. |
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मोदी सरकार पुन्हा सत्तारूढ झाल्यांनतर अनेक वेगवेगळे निर्णय घेत आहे. यातीलच एक महत्वपूर्ण निर्णय म्हणजे आज झालेला वाहन परवान्या संदर्भातचा निर्णय होय. ड्रायविंग लायसेन्स साठीचा ८ वी पास अनिवार्य असण्याचा नियम आता शिथिल केला आहे. यामुळे आता शिक्षणामुळे वाहतूक क्षेत्रातला रोजगार थांबणार नाही. केंद्रीय वाहतूक आणि बांधकाम मंत्री नितिन गडकरी यांनी यासंदर्भात निर्णय घेत २२ लाख लोकांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. कारण सध्या वाहतूक क्षेत्रात २२ लाख वाहनचालकांची कमतरता भासत आहे. गडकरींच्या म्हणण्यानुसार हि कमतरता दूर करण्यासाठी देशात एकूण २ लाख स्किल सेंटर उघडण्यात येतील. वाहन परवान्यासाठी आता शिक्षणापेक्षा प्रशिक्षण आणि कौशल्यावर आधारित परीक्षेवर अधिक भर दिला आहे जेणेकरून रस्तासुरक्षेसंदर्भात कोणत्याही प्रकारची तडजोड होऊ नये. आत्तापर्यंतच्या केंद्रीय मोटर वाहन नियमावली, १९८९ च्या नियम ८ नुसार वाहन चालक परवाना मिळविण्यासाठी ८ वी पास असणे आवश्यक आहे. आता हा नियम बदल्यासंदर्भात कार्यवाही सुरु करण्याचे आदेश मंत्रालयातून दिलेले आहेत आणि लवकरच या संदर्भात अधिसूचना काढली जाईल. देशात २०१८-१९ या वित्तीय वर्षात नवीन १०,०७,३१९ व्यावसायिक वाहनांची विक्री झाली याशिवाय ३३,७७,४३६ प्रवासी वाहने तर २१,१८१,३९० थ्री व्हीलर वाहनांची विक्री झालेली आहे. याचे कारण देताना मंत्रालयाने सांगितले कि मंत्रालयाने बस, ट्रक आणि मालवाहतुकीच्या वाहनांसाठी ८ वी पास असण्याचा नियम शिथिल केला आहे. याची गरज आहे कारण देशात मोठ्या प्रमाणात बेरोजगार युवक असे आहेत जे जरी शिक्षित नसले तरीही कुशल आणि साक्षर आहेत. |
Home कला अभंगात गझलेचा शोध - एक व्यर्थ खटाटोप! 'गझलधारा' ह्या प्रातिनिधिक गझलसंग्रहाच्या प्रस्तावनेत प्रा.डॉ.अविनाश सांगोलेकर ह्यांनी असाच एक 'शोध' लावला आहे. कवी अमृतराय (१६९८ - १७५३) व कवी मोरोपंत (१७२९ - १७९४) हे त्यांच्या मते, मराठीतले आद्य गझलकार होत! ह्या दोन कवींच्या काही ओळी किंवा प्रत्येकी एक रचना गझलसदृश आहे, म्हणून! गंमत म्हणजे त्यासाठी प्रा.डॉ. अविनाश दस्तुरखुद्द माधव ज्यूलियनांचा हवाला देतात. ते म्हणतात- " मुळात अमृतरायांनी व मोरोपंतांनी गझला लिहिलेल्या आहेत, हे सत्यच १९२० पर्यंत कुणाला माहीत नव्हते. मात्र माधव ज्यूलियनांमुळे ते लोकांपुढे येऊ शकले. त्यांनी त्या गझलांमधल्या उणिवाही दाखवून दिल्या आहेत." खरे तर, त्या रचना गझल तांत्रिक कसोटीवर म्हणून टिकत नाहीत. त्या कवींनी केवळ गझलसाठी मान्यताप्राप्त असलेले फारसी वृत्त वापरले होते, एवढेच माधव ज्यूलियनांना आढळले होते. अरुण भालेरावांचा गझल तंत्राचा अभ्यास आहे, हे जाणवते. मग त्यांना सुरेश भटांचे हे वाक्यही ज्ञात असेल, की - 'कुठल्याही अक्षरगण वृत्तात किंवा मात्रिक छंदात गझल लिहिता येते. मात्र अभंग किंवा ओवी यांसारख्या केवळ अक्षरसंख्येवर आधारित अक्षरछंदात गझल लिहिली जात नाही. ते मान्य नाही.' माझा खरा आक्षेप अजून वेगळा आहे. उर्दू भाषेत अक्षरछंद - अभंगासारखे प्रकार नाहीत. तसे आणणेही अवघड आहे. कारण उर्दू लिपीत 'अल्फाज का गिरना' असा प्रकार असतो. शिवाय, ती उच्चारानुसारी भाषा आहे. ते शब्दांचे 'वजन'(वज्न) बघतात. त्यांचा एकाक्षरी शब्द (उदाहरणार्थ, है, वो, जो...) कधी एका मात्रेचा तर कधी दोन मात्रांचा असू शकतो. त्यामुळे उर्दूत 'अभंग' लिहिता येत नाहीत अशी खंत उर्दू कवींना वाटायला हवी. इथे तर, भालेराव अभंगात गझल शोधताहेत! 'अभंगापेक्षा गझल श्रेष्ठ' असा न्यूनगंड तर ह्यात नाही ना? याचाही विचार व्हावा. गालिबने अभंग लिहिला नाही तरी तो श्रेष्ठच आहे आणि तुकारामांनी गझल लिहिली नाही तरी ते जगत्कवीच आहेत आणि राहतील. - अरुण अनंत भालेराव. अखिल भारतीय नाट्य परिषदेचा ' उत्कृष्ट गीतकार ' हा मानाचा पुरस्कार श्री सदानंद डबीर. यांना सलग चार वेळा मिळाला आहे. प. रेल्वे कला विभाग , नेहरू सेंटर अशा ठिकाणी त्यांनी लेखन केलेल्या संगीतीका व संगीत नाटके सादर झाली आहेत. त्यांच्या गजलांना संगीतकार यशवंत देव , अशोक पत्की, आनंद मोडक आदि मान्यवर संगीतकारांनी संगीत दिले आहे .त्यांचे गजलांचे सोलो अल्बम माधव भागवत , सुलोचना देवलकर, विजय गटलेवार यांच्या सुरेल स्वरात प्रसिद्ध झाले असून खूप गाजले आहेत. सामना, महाराष्ट्र टाइम्स , लोकसत्ता आदि दैनिकात त्यांचे गजलेवरचे उत्तम लेख प्रसिध्द झाले आहेत, सावलीतील उन्हे : दुष्यंतकुमार यांच्या ' साये मे धूप ' या गजल संग्रहाचा अनुवाद २००५ ग्रंथाली प्रकाशन. |
पिंपरी - लॉकडाउनच्या काळात उद्योगनगरीतील हजारो कामगार बेरोजगार झाल्याचे चित्र असतानाच हिंजवडी येथील ओमानी ऍक्टिव्ह हेल्थ टेक्नॉलॉजिस प्रा. या कंपनीत 51 कामगारांना कायमस्वरुपी नोकरी देण्यात आली आहे. त्याचबरोबर कामगारांना किमान 10 हजार 234 तर कमाल 16 हजार154 रुपयांची घसघशीत वेतनवाढ देण्यात आली आहे. भारतीय कामगार संघटना आणि कंपनी व्यवस्थापनात नुकताच वेतनवाढ करार पार पडला. सुट्टयादेखील देण्यात आल्या आहेत. या करारप्रसंगी भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस आणि किमान वेतन सल्लागार मंडळाचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ कुचिक, शुभम दिघे, बाजीराव शिंदे, आबासाहेब यादव, मच्छिंद्र कळमकर, पवन कांबळे, योगेश पाडेकर, रोहिदास गराडे, एकनाथ दवन तर व्यवस्थापनाकडून अभय तुलापुरकर, अंबु गांधी, मकरंद भालेराव, अभिजीत थोरात उपस्थित होते. कामगारांचे हित डोळ्यासमोर ठेवून केलेला हा वेतनवाढ करार कंपनीतील कामगारांचे मनोबल वाढविण्याबरोबरच उद्योगनगरी व आयटी हबमधील कामगार क्षेत्राला उर्जा देणारा आहे, असे मत डॉ. रघुनाथ कुचिक यांनी व्यक्त केले. |
हवामानाच्या अंदाजानुसार उन्हाळी धानासाठी नर्सरीची तयारी शेतकरी करीत आहेत. यासाठी उष्ण हवामानाची गरज आहे. परंतु डिसेंबर जानेवारीत तामपान १० अंशाच्या आसपास असते. त्यामुळे नर्सरी धानाची अपेक्षित उगवण होत नाही. मुखरु बागडे। पालांदूर : हवामानाच्या अंदाजानुसार उन्हाळी धानासाठी नर्सरीची तयारी शेतकरी करीत आहेत. यासाठी उष्ण हवामानाची गरज आहे. परंतु डिसेंबर जानेवारीत तामपान १० अंशाच्या आसपास असते. त्यामुळे नर्सरी धानाची अपेक्षित उगवण होत नाही. हा प्रकार टाळण्यासाठी आता पालांदूर-मऱ्हेगाव परिसरात तंत्रशुद्ध पद्धतीने नर्सरीचा प्रयोग शेतकरी करीत आहेत. निसर्गाची अवकृपा आणि त्यातून येणारी सततची नापीकी यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. यावर मात करण्यासाठी आता अनेक शेतकरी पुढे सरसावले आहेत. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. कृषी विभागाच्या योजनांचा पुरेपुर फायदा घेण्यासाठी शेतकरी आता तत्पर झाला आहे. ज्यांच्याकडे अपेक्षित पाणी आहे असे शेतकरी पालांदूर परिसरात दोन एकरात तरी उन्हाळी धानाची लागवड करतात. उर्वरीत जागेत कडधान्य आणि भाजीपाला पीक घेतात. परंतु थंडीच्या हंगामात पºह्याची उगवण क्षमता अपेक्षित होत नाही. तसेच बुरशीजन्य रोगांचा प्रादूर्भाव वाढतो. हा सर्व प्रकार टाळण्यासाठी आता शेतकरी अत्याधुनिक पद्धतीने नर्सरी लागवड करीत आहेत. यात गादीवाफा तयार करून अपेक्षित उतार काढला जातो. सरळ रेषेत पट्टे तयार केले जातात. माती बारीक करून त्यात पाणी देऊन जमीन पूर्णतः पाण्याने भरून पाईपच्या आधाराने सपाटीकरण करून गादीवाफ्याचा उतार काढला जातो. त्यावर धान फेकून आवरणाकरिता राखड फेकली जाते. यामुळे धान उगवण होवून तीन ते चार दिवसातच अंकुर बाहेर येतात. यात धान सडण्याची अजीबात भीती नसते. पाणी चुकीने अधिक झाले तरी वाफ्याबाहेर पाटाने काढण्यासाठी अडचण येत नाही. यामुळेच शेतकरी आता या पद्धतीचा वापर करीत आहे. नवे काहीतरी करण्याची जिद्द माणसाला प्रगतीकडे नेते. पारंपारिकतेकडून काही घेत त्यात नवे घालून प्रयोग केला जातो. त्यातूनच नवे तंत्रज्ञान हस्तगत होते. उन्हाळी धानाच्या संदर्भातही पालांदूर परिसरात शेतकऱ्यांनी हेच केले. आता त्यांना अपेक्षित उत्पादन येण्याची शक्यता आहे. पालांदूर परिसरात नव्या तंत्रज्ञानाने नर्सरी सजली आहे. पूर्णतः उगवण घेण्याकरिता हिवाळ्यात पाण्याची व थंडीची समस्या असते. कधीकधी तर पऱ्हे उगवतच नाही. उगवले तर वाढ होत नाही. यासाठी पदवीधर कृषीमित्रांनी आम्हाला दिलेले ज्ञान प्रत्यक्षात उतरवून उन्हाळी धानाची नर्सरी लावली आहे. त्यात धोका अजीबात दिसत नाही. -रवींद्र मदनकर, मऱ्हेगाव (जुना) थंडीमुळे अपेक्षित पºहे उन्हाळ्यासाठी घेणे अडचणीचे जाते. ही समस्या गेल्या कित्येक वर्षापासून आहे. मात्र अलिकडे कृषी विभागाच्या मदतीने आम्ही आधुनिक तंत्रज्ञानाने नर्सरीची लागवड करीत आहोत. त्यामुळे यात धोका होण्याची कोणतीही शक्यता नसते. उलट रोगमुक्त पºहे लागवडीसाठी उपलब्ध होतात. -भाऊराव धकाते, पालांदूर (चौ. ) |
राधानगरी : तालुक्यातील पोटनिवडणूक होणाऱ्या चार ग्रामपंचायतींपैकी दोन ग्रामपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही; तर उर्वरित दोन ग्रामपंचायतींची प्रत्येकी एका जागेसाठी दुरंगी लढत होत आहे. ढेंगेवाडी ग्रामपंचायतीच्या दोन, तर शेळेवाडीच्या एका जागेसाठी अर्जच दाखल झाला नाही. त्यामुळे या तीन जागांसाठी पोटनिवडणूक प्रक्रियाच थांबली आहे. येळवडे आणि पुंगाव ग्रामपंचायतीच्या प्रत्येकी एका जागेसाठी दोन उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. पोटनिवडणुकीसाठी ५ जूनला मतदान, तर ६ जूनला मतमोजणी होईल. |
बिहारच्या भागलपूर परिसर गुरुवारी रात्री स्फोटांनी हादरला आहे. भागलपूरमध्ये सलग झालेल्या बॉम्ब स्फोटात परिसरात मोठे नुकसान झाले आहे. तर, या घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला असून १२ लोक गंभीर जखमी झाले आहेत. भागलपूरः बिहारच्या भागलपूर परिसर गुरुवारी रात्री स्फोटांनी हादरला आहे. भागलपूरमध्ये सलग झालेल्या बॉम्ब स्फोटात परिसरात मोठे नुकसान झाले आहे. तर, या घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला असून १२ लोक गंभीर जखमी झाले आहेत. कोतवाली ठाण्यापासून १०० मीटरच्या अंतरावर हे स्फोट झाले आहेत. एका तीन मजली इमारतीत हा स्फोट झाला असून या स्फोटात इमारत कोसळली आहे. तर, इमारतीच्या आजूबाजूच्या घरांचेही मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे एक पथक घटनास्थळी पोहोचले आहे. बारूद, फटाके आणि गावठी बॉम्ब यामुळं स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांच्या बचावासाठी जेबीसीच्या मदतीने मलबा साफ करण्यात येत आहे. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या लोकांना भागलपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर, या घटनेत मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, परिसरातील नागरिकांच्या म्हणण्यानुसार ज्या घरात स्फोट झाला तिथे बॉम्ब बनवण्याचा व्यवसाय सुरू होता. तसंच, बॉम्ब स्फोटांचे आवाज ऐकून काही क्षणांसाठी नागरिकांना भूकंप आल्याचा भास झाला. या बॉम्ब स्फोटामुळं आजूबाजूच्या घरांनाही हादरा बसला. नेमकं काय झालं हे पाहण्यासाठी लोक धावत घराच्या बाहेर पडले. गंभीर जखमी असलेल्या रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शिवाय, या फटाके तयार करणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मात्र, याविषयी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाहीये. |
ड्रॅगन फ्रूटला पिटाया फ्रूट, स्ट्रॉबेरी नाशपाती, कमळ इत्यादी नावानेही ओळखले जाते. त्याला सुपर फूडचा दर्जा देण्यात आला आहे. या गोड लाल रंगाच्या फळाला बिया नसतात. ड्रॅगन फ्रूट हे प्रथिने, फायबर, लोह, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई इत्यादींचा चांगला स्रोत आहे. याचे सेवन करण्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. ड्रॅगन फ्रूटचे आरोग्यदायी फायदे जाणून घेऊया. कोलेस्ट्रॉलः याचे सेवन कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करते. मधुमेहः ड्रॅगन फ्रूटमध्ये फ्लेव्होनॉइड्स, एस्कॉर्बिक अॅसिड, फेनोलिक अॅसिड, बेटासायनिन, फायबर इत्यादी अनेक अँटीऑक्सिडंट असतात. हे शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करते. त्वचा रोगः त्वचेशी संबंधित आजारांमध्ये अँटिऑक्सिडंट्स फायदेशीर आहेत. याच्या सेवनाने तुम्हाला सुरकुत्या, मुरुम इत्यादीपासून मुक्ती मिळते. यामध्ये असलेले व्हिटॅमिन बी-३ त्वचा चमकदार आणि तरुण ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. काकडीच्या रसात पिठय़ा फळ मिसळून लावल्याने उन्हात जळलेल्या त्वचेला आराम मिळतो. लठ्ठपणाः ड्रॅगन फ्रूटमध्ये कॅलरीज कमी असतात आणि ते फायबर आणि पाण्याचा चांगला स्रोत आहे. त्यामुळे त्याचे सेवन हा वजन कमी करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. कर्करोगः व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी2, फायबर, कॅल्शियम, फॉस्फरस इत्यादीमध्ये अनेक अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळतात, जे आपल्या शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात. दमाः काही अहवालांनुसार, पिट्या फळामध्ये असे घटक आढळतात जे दमा आणि श्वसनाच्या अनेक गंभीर आजारांवर फायदेशीर ठरतात. रोगप्रतिकारशक्ती : अनेक प्राणघातक आजारांपासून दूर राहण्यासाठी प्रतिकारशक्ती चांगली असणे आवश्यक आहे. तुमची प्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर या फळाचे सेवन करा. तणावः यामध्ये असलेले लोह, व्हिटॅमिन ई आणि अँथोसायनिन्स मेंदूच्या पेशी मजबूत करतात. तणाव, स्मृतिभ्रंश यांसारख्या गंभीर मानसिक आजारांपासून आराम मिळण्यास मदत होते. अशक्तपणाः लोहाचा चांगला स्रोत. हे आपल्या शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता दूर करते. याच्या सेवनाने रक्तप्रवाह वाढण्यासह अशक्तपणापासून आराम मिळतो. डोळ्यांतील कोरडेपणा दूर करताना पाहण्याची क्षमता सुधारते. केसांना फायदा होतो. डेंग्यूसारख्या जीवघेण्या आजारापासून मुक्ती मिळू शकते. दात मजबूत करतात. गरोदरपणात फायदेशीर. इतर फळांप्रमाणे याचे सेवन करता येते. फळांचा रस बाहेर काढून सेवन करता येतो. हे सॅलड म्हणून सेवन केले जाऊ शकते. त्याची पावडर दुधात मिसळून पिऊ शकता. हे फळ जॅम किंवा जेली बनवूनही सेवन करता येते. शेक बनवून प्या. ड्रॅगन फ्रूट लागवडीशी संबंधित माहिती येथून मिळवा . आम्हाला आशा आहे की ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची ठरेल. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर ही पोस्ट लाईक करा आणि इतर मित्रांसोबत शेअर करा. जेणेकरून ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. यासंबंधी तुमचे प्रश्न आम्हाला कमेंट्सद्वारे विचारा. |
धर्म आणि धर्मांतर हा वर्तमानातला राजकारणप्रेरित मुद्दा. त्यात विचारांचे अधिष्ठान दिसत नाही की धर्म चिकित्सेचा आग्रह लावून धरला जात नाही. या अनुषंगाने बाबासाहेबांनी बौद्धधर्म स्वीकारला त्यावेळची पार्श्वभूमी आणि धर्मांतराची फलश्रुती यावर प्रकाशझोत टाकणाऱ्या 'परिवर्तनाचा वाटसरू' मासिकातील जयंत लेले लिखित आणि अभय कांता अनुवादित प्रदीर्घ लेखाचा हा संक्षिप्त अंश. राजकीय आणि सामाजिक सुधारणेच्या आघाडीवर मोठी कामगिरी केल्यानंतर १९३५ मध्ये डॉ. आंबेडकर एका महत्वाच्या तर्कशुध्द निष्कर्षावर पोहचले. ज्या शहरातील एका मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा म्हणून त्यांनी संघर्ष केला होता, त्यापासून केवळ शंभर किलोमीटर कमी अंतरावर असलेल्या गावातच त्यांनी 'मी हिंदू म्हणून जन्मलेलो असलो तरी, हिंदू म्हणून मरणार नाही', अशी घोषणा केली. त्यांचा हा धर्मांतराचा निर्णयही एक चिकित्सक व्यवहार्य कृती म्हणून आपण समजून घेतला पाहिजे. राजकीयदृष्ट्या आकर्षक असे अन्य संभाव्य पर्याय उपलब्ध असताना त्यांचा त्यानंतरचा बौध्द धर्म स्वीकारण्याचा निर्णय, हाही त्यांच्या विवेकी श्रद्धेशी मिळताजुळता होता. हिंदू धर्म आणि बौद्ध धर्म यांच्यामधले नाते एकेरी नसून गतिशील आहे आणि हिंदू धर्म ह्या नावाखाली झाकलेल्या पण मूलतः मानवी आणि म्हणूनच एकात्म असलेल्या भारतीय परंपरेच्या प्रभुत्ववादी अपहरणाची बौद्ध धर्म ही एक मूलगामी चिकित्सा असल्याची जाणीव त्यांच्या या भूमिकेत होती. १९२० मध्ये टिळकांच्या आणि १९२२ मध्ये शाहूंच्या मृत्युनंतर महाराष्ट्रातील हितसंबंधी राजकारणाचे एक महत्वपूर्ण युग हळूहळू लयाला गेले. काँग्रेस पक्षाचे नेतृत्व संथ गतीने का असेना,पण गांधींकडे सरकू लागले. टिळकांच्या उघड-उघड सनातनी आणि आक्रमक ब्राह्मणवादाकडून गांधींच्या सूक्ष्म आणि सुविकसित, पण वरदहस्तवादी ब्राह्मणवादाकडे वळणारे हे स्थित्यंतर हळूहळू स्थिर होत अत्यंत प्रभावी झाले. १९३६ मध्ये आंबेडकरांनी सुधारणेचा मार्ग सोडून धर्मांतराची नाट्यमय रीतीने घोषणा करणे, हे गांधींनी पुरस्कारलेल्या नव्या अर्थाच्या हिंदू धर्माच्या वाढत्या प्रभावामुळे आलेल्या नैराश्यातून झाले होते. हिंदू धर्मावरील त्यांची टीका ही अधिक परखड होत गेली, पण तरीही ती रानडे आणि फुुले यांनी बनवलेल्या मानवतावादी चौकटीत राहिली. खरं तर गांधींच्या नेतृत्वाखाली भारत पुन्हा एकदा अंधारयुगात जाऊन ठेपला होता. या ऱ्हासाला आंबेडकर गांधींना जबाबदार मानत होते. कारण, गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आपले सवर्ण जातींमध्ये आणि श्रीमंत व मध्यमस्तरीय शेतकऱ्यांमध्ये आपला आधारगट विस्तारण्यातून यशस्वी झाली होती. त्यामुळे अस्पृश्यांचे राजकारण ब्राह्मणेतर राजकारणाशी जोडण्याची आंबेडकरांची संकल्पना धुळीस मिळाली होती. भारतीय समाजाचे एकात्मिक सामाजिक-राजकीय आणि आध्यात्मिक परिवर्तन करण्याचा प्रत्येक प्रयत्न राजकीय स्वातंत्र्याच्या तातडीच्या, व्यूहरचनात्मक प्रकल्पासमोर बाजूला पडत गेला. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली भारतात खरी लोकशाही साकारण्याची शक्यता नाही, असे आंबेडकरांना वाटू लागले होते. औपचारिक लोकशाहीच्या अपयशाच्या मूलगामी कारणांचा त्यांनी शोध घेतला तो असा. १३ ऑक्टोबर १९३५ रोजी आंबेडकरांनी ती सुप्रसिद्ध घोषणा केली. हिंदू धर्माची अवनती पूर्णपणे ब्राह्मणवादामध्ये झाल्यामुळे त्यांनी त्यांच्या अस्पृश्य अनुयायांना, तो सोडण्याचा सल्ला दिला. शांतता आणि स्व-सन्मान देणारी धर्मश्रद्धा त्यांनी स्वीकारावी, असे त्यांनी सांगितले. दर्जा, संधी आणि व्यवहाराच्या समतेची खरी हमी जी श्रद्धा देईल, तीच तुम्ही स्वीकारा,असे आवाहन त्यांनी केले. मंदिरप्रवेशाच्या चळवळीला नुकतेच आलेले अपयश, उच्चजातीय सामाजिक सुधारकांची दांभिक आणि दुटप्पी नीती तसेच दडपणुकीला आळा घालण्यासाठी कायदेशीर प्रयत्न करण्यास सरकारची अनुत्सुकता, ही आंबेडकरांच्या निर्णयामागील महत्त्वाची कारणे होती. आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार नागपूर येथे दि. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी केला. त्यांच्या हजारो अनुयायांनी त्यांच्यासोबत धर्मांतर केले. या ऐतिहासिक क्षणी श्रद्धावान आंबेडकरांमधील भाबडे मूल आणि प्रौढ चिकित्सक यांनी आपल्यातील अंतर्गत तणावावर विजय मिळवून नास्तिकाला दूर ठेवण्यात यश प्राप्त झाले. धर्मांतराच्या कार्यक्रमानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये भविष्याबाबतचा त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. आगामी दहा ते पंधरा वर्षांत देशभरात बौद्ध धम्माची लाट येईल,अशी त्यांना आशा होती. बौद्ध धम्माचे जानी दुश्मन म्हणजे, ब्राह्मण वगळता अन्य सर्व समाज बौद्ध धम्माकडे वळतील,असा त्यांचा होरा होता. तळागाळातील वर्गांतील लोकांचा शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय व्यवहारात जसजसा सहभाग वाढेल, तसतशी त्यांच्यातील राजकीय जाणीव विकसित होईल आणि ब्राह्मणवादाच्या दडपणुकीच्या अंगाचे त्यांना सुस्पष्ट भान येईल, आंबेडकरांनी जेव्हा सुस्पष्टपणे मांडलेला बौद्ध धर्माचा पर्याय सर्वांसमोर ठेवला, तेव्हा त्यांना अशी खात्री वाटत होती की लोक मोठ्या संख्येने ब्राह्मणवादाला नकार देऊन बौद्ध धर्माचा स्वीकार करतील. या अपेक्षेमागे त्यांचा सर्वंकष मानवी विवेकशिलता आणि सदाचारासाठीचा दैवी मानवी आवेग यावर असणारा काहीसा भाबडा विश्वास होता. आपल्या उत्साहाला त्यांनी रोमन साम्राज्याच्या पाडावानंतर जनसामान्यांनी केलेल्या सामूहिक धर्मांतराच्या ऐतिहासिक दाखल्याची जोड देऊ पाहिली. त्यांना असा विश्वास होता की, बौद्ध धर्मातील सर्व अंतर्गत भेदांवर मात करण्यात त्यांच्या 'नव बौद्धवादा'ला यश मिळेल आणि तळागाळातील लोकांच्या जाणिवेत एक मार्गदर्शक दीपस्तंभ म्हणून तो रुजलेला राहील. आपण आपल्या पुस्तकांमधून आणि शिकवणुकीमधून असे लोकशिक्षण चालू ठेवू,असे त्यांना आश्वासन दिले. नव्या नैतिक समाजात राजकारण आणि धर्माचे पूर्णतः एकात्मिकरण होईल, या त्यांच्या धारणेला अनुसरून त्यांनी एका नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली. या पक्षाचे नाव, त्यांनी अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष असे ठेवले. १९५६ मध्ये आंबेडकरांना पुन्हा अशी आशा वाटत होती की, आताच्या बदललेल्या परिस्थितीत आधीपेक्षा वेगळे फलित आपल्या हाती लागेल. याची दोन कारणे होती. एका बाजूला वासाहतिक हितसंबंध आणि त्यांचे विभेदनाचे राजकारण देशाच्या मंचावरून नाहीसे झाले होते. तर दुसरीकडे महात्मा गांधींच्या मृत्यूला ८ वर्षे झाली होती. काँग्रेस पक्ष अजूनही प्रभुत्वशाली असला तरी प्रादेशिक, भाषिक आणि वर्गाधारित विरोधाचे आवाज जागोजागी बुलंद होत होते. काँग्रेसविरोधी पक्षांची एक व्यापक पायांवर उभी असणारी आघाडी आकार घेत होती. स्वातंत्र्योत्तर काळातही पूर्वीपासून विशेषाधिकार असणारे वर्गच सामाजिक, राजकीय आणि आर्थिक क्षेत्रात प्रभावशाली राहिले होते. या पार्श्वभूमीवर दडपल्या गेलेल्या सर्व वर्गांना सामावून घेणारी विश्वदृष्टी असणाऱ्या बौद्ध धर्माच्या पुनर्स्थापनेमुळे भारतीय परंपरेमध्ये घट्टपणे रुजलेली एक नवी वैचारिक रचना आकारात आल्याने तसेच धर्मांतरदेखील मोठ्या संख्येने झाल्यामुळे आंबेडकरांची दृष्टी अत्यंत सकारात्मक होती आणि तरीही हा प्रयत्न फसला. डॉ. आंबेडकरांना आपल्या चळवळीला आवश्यक अशी दिशा देण्यासाठी पुरेसा अवधी मिळाला नाही, असं म्हणता येईल, कारण धर्मांतरानंतर काही महिन्यातच त्यांचे निधन झाले, अन्य पक्षांनी केलेले असे प्रयत्नही अपुरे पडले. आंबेडकरांच्या अपेक्षेनुसार बुद्ध हा मार्क्सला पर्याय होऊ शकतो,हा विचार सफल झाला नाही. त्याचबरोबर भारतीय डाव्यांनाही जातभेदांच्या पलीकडे जाणारी जनचळवळ उभी करता आली नाही, ही तर अधिकच नाट्यमय बाब म्हणावी लागेल. आज श्रीमंतांसाठी चैनीच्या महागड्या वस्तू आणि आयातीवर आधारलेली आणि आर्थिक वाढीवर भर देणारी उदारमदवादी धोरणे प्रचंड वेगाने आणली जात असताना भारतीय डावे एक तर त्यामध्ये साथीदार म्हणून किंवा केवळ असहाय्य बघ्याच्या रुपात कार्यरत आहेत. याहूनही अधिक धोकादायक बाब म्हणजे, या भांडवली आक्रमणाच्या विरोधात हिंसा आणि सट्टेबाजीवर उभारल्या जाणाऱ्या भांडवलाचा अंश वेगाने वाढतोआहे आणि तो कष्टकरी जनतेमधील गुन्हेगारी घटकांना टोळीयुद्ध, मादक पदार्थ व्यवहार आणि अन्य गुन्ह्यांमध्ये अडकवण्यास कारणीभूत ठरतो आहे. याच काळात नवहिंदुत्ववादी गटांचे पुन्हा बळकट होणे आणि त्यातून मुस्लिम आणि अस्पृश्य (दलित) यांच्यावरील हिंसक हल्ले वाढत आहेत, ही अर्थातच काही योगायोगाची बाब नाही. स्वातंत्र्य चळवळीमध्ये काँग्रेसचे नेतृत्व गांधींकडे असताना हिंदु धर्माचा जुना, प्रभुत्वशाली चेहरा अस्तित्वात होता. हिंदू अभिजनांनी चिकित्सक विचार करावा, यासाठी आंबेडकरांचे बहुआयामी प्रयत्न त्यामुळेच अयशस्वी ठरत होते आणि परिणामी ते निराश झाले होते. जुना हिंदू धर्म हा ग्रामीण प्रभुत्वशाली जमीनदार जातींच्या मूक पाठिंब्यावर उभा होता. आजचा आक्रमक हिंदुत्ववाद हा प्रायः बेरोजगार तरुण आणि सवर्ण मागास जातीतील (इतर मागास जाती, ओबीसी) श्रमिकांच्या बळावर उभा आहे. आरक्षणाच्या धोरणामुळे अस्पृश्यांमध्ये निर्माण झालेल्या अल्पशा अभिजन वर्गाची प्रगती किंवा ग्रामीण भागातील दलित कष्टकरी वर्गाकडून येणारी योग्य वेतनाची अथवा कर्जमाफीची मागणी त्यांना सहन होतनाही आणि ते प्रभुत्वशाली जातींच्या अभिजनांबरोबर दलितविरोधी आघाडीमध्ये सामील होतात. आंबेडकरांची महती यासाठी होती की, त्यांनी एका प्रतिप्रभुत्वशाली प्रकल्प निर्माण केला ज्यातून भारतीय परंपरेतल्या ब्राह्मणवादाच्या वैचारिक आधारावर उभ्या असलेल्या दडपणुकीच्या विविध प्रकारांना आव्हान निर्माण झाले. त्याच भारतीय परंपरेतील एका गतिशील-चिकित्सक क्षणामध्ये उभ्या राहिलेल्या बौद्ध विचारप्रणालीची एक नवी चिकित्सा त्यांनी उभी केली. या चिकित्सेतील कळीचा घटक म्हणजे प्रत्यक्षात नाकारला गेलेला पण वैश्विक आणि पवित्र नैतिकतेच्या (धम्माच्या) आधारावर नव्याने उभा राहू शकणारा जनसमूह(संघ) हा होता. बौद्धधर्माने जरी ब्राह्मणवादाची आणि जातीची चिकित्सा केलेली असली तरी जातीय उतरंड शाबूत ठेवली होती. आंबेडकरांनी तिचे नवसंकल्पन करण्याचा असा प्रयत्न केला, की ज्यातून ती ब्राह्मणवाद आणि जातिव्यवस्था याच्याविरुद्ध एक सक्षम हत्यार बनेल आणि माणुसकीचे रक्षण होऊ शकेल. जर आंबेडकर अधिक जगले असते तर त्यांनी ते कदाचित अधिक ताकदीने करून त्यामार्गे भांडवलशाहीच्या समर्थक साधनवादाला आणि त्याने पोसलेल्या सामाजिक-आर्थिक संस्थांना ते भिडू शकले असते. भाडंवलशाहीच्या भयकारी सांस्कृतिक परिणामांची चिकित्सा न करण्यातून तसेच बौद्ध धर्माच्या पुनरुज्जीवनाच्या प्रकल्पामधून संतांची भूमिका पूर्णपणे वगळण्यामुळे आंबेडकरांच्या तत्त्वांची सुस्पष्टता आणि प्रस्तुतता मंदावली. दुसऱ्या बाजूला मार्क्सचे वाचन केवळ अर्थवादी दृष्टीतूनच करणे हाही एक मोठा अडसर ठरला. भांडवली आधुनिकतेला केवळ आपला राजकीय प्रभाव टिकवण्यासाठी विरोध करणाऱ्यांच्या तसेच निव्वळ शांततेच्या पुरस्कारासाठी संतांचा उदोउदो करणाऱ्यांच्या प्रभुत्वशाली हेतूंमुळेच आंबेडकर या दोन्हींपासून दूर राहिले. मूळ विचारांना लक्षपूर्वक ऐकून घेण्यापेक्षा त्यांच्याबद्दल साशंक राहणे त्यांनी पसंत केले. या बाबत त्यांच्यातला आधुनिक नास्तिकतावादी, निरागस बालकापेक्षा काकणभर अधिक वरचढ ठरल्याचे स्पष्टच दिसते. विशेषाधिकारी अभिजन आणि दारिद्र्यात अडकलेले बहुजन यांचे ध्रुविकरण जसजसे वाढत जाते आणि कनिष्ठ वर्गांचे सांस्कृतिक जीवन झपाट्याने उद्ध्वस्त केले जाते, तस तसे भविष्यासंबंधीची स्वच्छ दृष्टी पोसण्याचे काम कळीचे ठरत जाते.आंबेडकरांची दृष्टी ही अशीच कळीची होती. आज आक्रमक आणि चतुर नवब्राह्मणवाद आंबेडकरी जनतेच्या वैध आकांक्षांनाही अडसर निर्माण करण्याचे काम अधिकच जोमाने करताना दिसतो आहे. आज अस्पृश्यांचा बौद्धधर्म हा दडपणुकीच्या विरोधातील लढ्यामध्ये आणि चिकित्सेच्या गतिशील परंपरेमध्ये निर्माण झालेला आणखी एक क्षण होऊन राहिला आहे. तो एक असा क्षण आहे की, जो सत्ताधाऱ्यांकडून दुर्लक्षित झाला आहे, मात्र अत्यंत अल्पसंख्य असणाऱ्या अस्पृश्य अभिजनांकडून तो स्वहितासाठी वापरला जातो आहे. ब्राह्मणवादाला, त्याच्या सर्व रूपांना आव्हान देऊ शकतील आणि सर्वंकष भारतीय परंपरेतील खऱ्या स्मृतींना आणि स्वप्नांना आवाहन करून सोप्या आणि अनुकरणीय रुढींच्या अंधपालनात गुंतलेल्या जनांना दूर नेण्यात यशस्वी होतील, अशा नव्या प्रचारकांच्या आणि अर्थनिर्णयनकारांच्या प्रतीक्षेत हा क्षण उभा आहे. |
पायांवर नखे वेगवेगळ्या कारणांसाठी पिवळ्या रंगाची पिशवी प्राप्त करता येते कारण सजावटीसाठी वार्निशचा वापर, बाह्य घटकांचा नकारात्मक प्रभाव, काही आरोग्य समस्या. कोणत्याही परिस्थितीत, या समस्येवर लक्ष देणे आवश्यक आहे. या लेखात, आम्ही घराच्या पायांवर नख कसे आणि कसे पांढरे करणे प्रकारे कसे दिसेल. टूथपेस्टसह आपले नखे कसा पांढरा करायचा? एक प्रभावी मार्ग म्हणजे आपल्या नखे पांढर्या रंगाचे टूथपेस्टसह धुऊन घालणे. हे करण्यासाठी, जुन्या टूथब्रशवर पेस्टची लहान मात्रा वापरा आणि काही मिनिटे नख स्वच्छ करा. आपण काही वेळेसाठी नखांवर पेस्ट सोडू शकता आणि नंतर पाण्याने स्वच्छ धुवा. लिंबू सह नखे पांढरा कसा करावा? नखांसाठी एक चष्मा करणारा दाता हा एक लिंबू आहे. हे करण्यासाठी, लिंबू बारीक तुकडे करा आणि नखांच्या पृष्ठभागावर नख द्या, 5 ते 10 मिनिटे सोडा आणि पाण्याने स्वच्छ धुवा. किंवा ताजे लिंबाचा रस घालून आपल्या नखांना कपाशीच्या काचा लावा. शुभ्र प्रभावासोबतच, लिंबू नखांना बळकट करण्यासाठी मदत करेल. सोडा आणि हायड्रोजन पेरॉक्साईडसह नखे पांढरे करणे कसे? या प्रकरणात, हायड्रोजन द्राव एक चमचे (3%) सह बेकिंग सोडा दोन tablespoons मिक्स करावे. परिणामी पेस्ट नखांनी झाकून आणि 2 ते 3 मिनिटांसाठी कार्य सोडा आणि नंतर पाण्याने स्वच्छ धुवा. आपण आपल्या नख थोड्या मऊ ब्रशसह घासु शकता. या पद्धती पर्यायी आणि, याव्यतिरिक्त, एक पॉलिश नेल फाइल वापरू शकता. कोणत्याही पद्धतीचा वापर केल्यानंतर, नाखूनला कोणत्याही पौष्टिक क्रीम लावायला घेणे आवश्यक आहे, नाहीतर नेल प्लेट्स आणि त्यांच्या भोवतीची त्वचा त्वरीत ह्या प्रभावापासून बाहेर पडू शकते. एक आठवडा झाल्यावर आपल्याला सुधार दिसून आला नाही तर - आपण तज्ञांशी संपर्क साधावा कारण नाखून वापरल्याने शरीरातील फुफ्फुसाचा रोग किंवा अन्य वाईट गोष्टी सूचित होऊ शकतात. |
Maharashtra State Transport Workers Union । एसटी महामंडळाच्या 'महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटने'ला मोठा धक्का; संघटनेची मान्यताच केली रद्द? मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - Maharashtra State Transport Workers Union । मागील काही दिवसांपासून एसटी कामगारांचा संप (ST Workers Strike) सुरू आहे. एसटी महामंडळाचे (MSRTC) शासनात विलिनीकरण करण्याच्या मागणीवरुन एसटी कामगार ठाम आहेत. दरम्यान कामगारांनी संप बंद करून कामावर हजर राहण्याच्या सूचना राज्य सरकारने केल्या होत्या. मात्र तरीही कामगार संपावर ठाम असल्याने राज्य सरकारने (Maharashtra Government) कठोर पावले टाकण्याचा निर्णय घेतला आहे. काही कामगारांना निलंबित (Suspended) तर काही कामगारांवर बडतर्फीची (Dismiss) कारवाई देखील करण्यात आली आहे. यानंतर एसटी महामंडळ महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेला (Maharashtra State Transport Workers Union) मोठा दणका दिला आहे. औद्योगिक न्यायालयाकडून (Industrial Court) संघटनेची मान्यता रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे कामगार संघटनेला एक धक्का बसला आहे. (ST Kamgar Sanghatna) 2012 मध्ये महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) या संघटनेने महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेची मान्यता रद्द करावी यासाठी कोर्टाचा दरवाजा ठोठावला होता. 1996 पासून झालेल्या पगार करारात योग्य वेतनवाढ न दिल्याने शासकीय कर्मचा-यांपेक्षा अत्यंत कमी वेतनात एसटी कामगारांना काम करावे लागते. तसेच वर्ष 2000- 2008 साली बेसिक कोणतेही वाढ केली नसून फक्त 350 रुपये व्यक्तिगत भत्ता दिल्यानंतर कराराचा कालावधी संपल्यानंतर भत्ता काढून घेण्यात आला होता. म्हणून एसटीतील मान्यता प्राप्त महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेने कर्मचाऱ्यांचे हित जोपासले गेले नाही. त्यांचे आर्थिक संरक्षण देखील केले नसल्याचा आरोप करत इंटकने न्यायालयात धाव घेतली होती. (Maharashtra State Transport Workers Union) राज्यातील एसटी महामंडळातील एकमेव मान्यताप्राप्त संघटना असलेल्या महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेची मान्यता औद्यौगिक कोर्टाने (Industrial Court) आता रद्द केली आहे. तर, एम. आर. टी. यु. (M. R. T. U. ) आणि पी. यु. एल. पी. कायदा (P. U. L. P. Law) 1971 या कायद्यानुसार ही मान्यता रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे संघटनेला मोठा धक्का बसला आहे. यामुळे आता संघर्ष चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. Google Pay-Paytm-ATM । गुगल पे आणि पेटीएमचा वापर करून ATM मधून काढून शकता पैसे, Omicron Covid Variant । हलक्यात घेऊ नका 'ओमिक्रॉन'ला, वाढवू शकतो तुमच्या अडचणी; Calcium For Bones । 'या' 10 कॅल्शियमयुक्त खाद्यपदार्थांचे करा सेवन, हाडे होतील मजबूत; |
मुंबई , २७एप्रिल २०२३, प्रतिनिधी :मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी निवेदिता सराफ या एक आहेत. मालिका, सिनेमा आणि नाटक या तिन्ही क्षेत्रात त्यांनी आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. सध्या त्या कलर्स मराठी वाहिनीवरील 'भाग्य दिले तू मला' या मालिकेत रत्नमाला यभूमिकेत आहेत. त्यांच्या या भूमिकेचे चाहत्यांकडून कौतुक होत आहे. सध्या त्यांच्या 'मी स्वरा आणि ते दोघं' या नाटकाची देखील जोरदार चर्चा आहे. सध्या मी स्वरा आणि ते दोघे या नाटकात काम करत आहेत. यात नाटकाला चक्क जॉनी लिवर यांनी हजेरी लावली होती. त्यामुळे त्यांच्यासोबतचा एक फोटो पोस्ट करत निवेदिता यांनी फॅन मूव्हमेंट असल्याचं सांगितलं. सोबतच त्यांचा अनुभवही शेअर केला. निवेदिता सराफ यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी प्रसिद्ध अभिनेते जॉनी लिवर यांच्याबरोबरचा एक फोटो पोस्ट केला आहे. त्यांनी फोटो शेअर करत म्हटलं आहे की,'माझ्यासाठी हा खूप मोठा क्षण होता. माझा आवडता अभिनेता आणि एक उत्तम व्यक्ती असलेले जॉनी लिवर 'मी स्वरा आणि ते दोघं' हे नाटक पाहायला आले. ही माझ्यासाठी एक फॅन मूव्हमेंट होती. त्यांनी या नाटकाचे आणि माझ्या अभिनयाचे कौतुक केले. मी तुमची खूप आभारी आहे, जॉनी भाई,' . . असं लिहित त्यांनी त्यांच्या सोबतचा फोटो समाज माध्यमावर सामायिक केला आहे. सध्या निवेदिता सराफ यांची पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. दरम्यान,'मी स्वरा आणि ते दोघे' हे नाटक सध्या रंगभूमीवर चांगलेच गाजताना दिसत आहे. या नाटकात निवेदिता यांच्याबरोबर सुयश टिळक, रश्मी अनपट हे कलाकारही झळकत आहेत. |
एडीआर डेटामध्ये प्रमुख गुंतवणूक निर्देशांक जसे की नॅशनल हाऊसिंग बॅंक्स रेसिडेक्स फॉर प्रॉपर्टी, भांडवली बाजारासाठी सेन्सेक्स निर्देशांक, सोन्यासाठी एमसीएक्स- यातून असे दिसून आले की आमदारांच्या संपत्तीचे स्थावर मालमत्ता बाजारपेठेशी घनिष्ठ संबध आहे. त्यावरुन त्यांच्या मालमत्तेत स्थावर मालमत्ता क्षेत्राचा मोठा वाटा असेल यात आश्चर्य वाटायला नको. आमदारांच्या संपत्ती प्रचंड वाढ झाल्याचे दिसून आले जेव्हा स्थावर मालमत्ता क्षेत्रात तेजी होती आणि सेन्सेक्स आणि सोनं तुलनेनं समाधानकारक परतावा देत होते. महाराष्ट, तेलंगणा, मध्य प्रदेश, ओदिशा आणि झारखंड या राज्यांमधील मागील दोन निवडणुकांची आकेडेवारी पाहिली तर संथ भांडवली बाजाराच्या तुलनेत स्थावर मालमत्ता क्षेत्र जवळपास स्थिर होते. त्यामुळे साहजिकच या राज्यातील आमदारांना लाभ झाला. कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात, राजस्थान, आसाम आणि पश्चिम बंगाल या राज्यातील मागील दोन निवडणुका या शेअर बाजारातील तेजीच्या काळात पार पडल्या होत्या. त्यावेळी बाजार विजेता ठरला होता. इतर प्रमुख राज्यांमध्ये जिथे रेसिडेक्समधून स्थावर मालमत्तेची आकडेवारी मिळते, ज्यात नऊ आमदारांच्या संपत्तीत माफक वाढ झाली. विशेष म्हणजे यातील काही राज्यांमध्ये स्थावर मालमत्ता क्षेत्राची संथपणे वाढ झाली. त्यामुळे भांडवली बाजार आणि सोन्याची कामगिरी तुलनेने सरस ठरली. |
मुरुड-गारंबी मार्गे रोहा रस्त्याची दुर्दशा झाली आहे. रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्याच्या साईडपट्ट्या गेल्या पावसाळ्यात वाहून गेल्या असून, त्या अजूनही तशाच आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडेझुडपे वाढलेली असून, अद्याप तशीच आहेत. पावसाळा तोंडावर आला तरी बांधकाम खात्याला काही मुहूर्त सापडेना. मुरूड-गारंबीमार्गे रोहा हा अगदीच जवळचा मार्ग आहे. या मार्गावर गारंबी धरणावर पर्यटक आवर्जून भेट देत असतात. त्यामुळे रोहामार्गे मुरुडला येताना हा सर्वात जवळचा मार्ग असल्याने या मार्गावर रहदारी असते. या मार्गावरून येताना अनेक दुचाकीस्वारांचे अपघात झालेले आहेत. वर्षभरात बांधकाम खात्याने दुर्लक्ष केल्यामुळे रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्याच्या साईडपट्ट्या निसरड्या झाल्या आहेत, तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाढलेली झाडेझुडपे अजूनही तशीच आहेत. त्यामुळे या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. बांधकाम खात्याने याकडे लक्ष देऊन रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, रस्त्याच्या साईडपट्ट्या सुस्थितीत कराव्यात व रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली झाडेझुडपे तोडण्यात यावी, अशी मागणी प्रवासी वर्गातून, पर्यटक व स्थानिक ग्रामस्थांमधून होत आहे. मुरूडकडे कायम बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असते, हा बांधकाम विभाग सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्या अधिकारात असल्याने बांधकाममंत्री याकडे लक्ष देतील का? असा सवाल निर्माण होत आहे. |
अहमदनगर शहरातील सावेडी उपनगरामध्ये सासरच्या छळास कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रोहिणी प्रशांत बुऱ्हाडे (वय 27) असे मयत विवाहितेचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, रवींद्र भिमाशंकर डहाळे (रा. शेवगाव) यांची मुलगी रोहिणी हिचा विवाह प्रशांत संतोष बुऱ्हाडे (रा. गुलमोहर रस्ता, सावेडी) यांच्याशी झाला होता. विवाहानंतर काही महिन्यांनी रोहिणीचा सासरच्या मंडळींकडून छळ सुरू केला. या छळाला कंटाळून रोहिणी हिने शुक्रवारी गुलमोहर रस्त्यावरील राहत्या घरात आत्महत्या केली. रवींद्र डहाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात प्रशांत (पती), संतोष (सासरा) आणि सुनिता (सासू) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. |
पंचायत समितीचा येथे ढिसाळ कारभार सुरू आहे. चिमुकल्या जिवांशी त्यांचा खेळ सुरू आहे. जीर्ण झालेल्या इमारतीत केवळ एक नव्हे तर सहा अंगणवाडीतील चिमुकले बसविले जातात. नेर : पंचायत समितीचा येथे ढिसाळ कारभार सुरू आहे. चिमुकल्या जिवांशी त्यांचा खेळ सुरू आहे. जीर्ण झालेल्या इमारतीत केवळ एक नव्हे तर सहा अंगणवाडीतील चिमुकले बसविले जातात. थोडाही वारा आला तर कवेलू अंगावर पडतात. या भीषण परिस्थितीकडे पंचायत समितीचे सुरू असलेले दुर्लक्ष नागरिकांमध्ये संताप व्यक्त करणारे ठरत आहे. कधी काळी बांधल्या गेलेल्या इमारतीत अंगणवाडीतील चिमुकले बसतात. या इमारतीवरील कवेलूचे तुकडे पडले आहे. भिंतींना भेगा पडलेल्या आहेत. कशी तरी तग धरून असलेली ही इमारतही पंचायत समितीला कमी पडली आहे. साध्या वाऱ्यानेही त्यावरील कवेलूचे तुकडे विद्यार्थ्यांच्या अंगावर पडतात. ही बाब संबंधितांच्या वारंवार निदर्शनास आणून देण्यात आली. परंतु कुणीही गांभीर्याने घेतले नाही. अंगणवाडीच्या इमारतीसाठी मागील दहा वर्षांपूर्वी निधी प्राप्त झाला. परंतु पंचायत समितीने जागा उपलब्ध करून दिली नाही. अखेर निधी परत गेला. आता कोंडवाड्यापेक्षाही भीषण स्थितीत चिमुकले विद्यार्थी ज्ञानार्जन करतात. इमारतीचे सडके लाकूड केव्हाही पडून मोठी गंभीर घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर इमारत जीर्ण झाल्यामुळे पंचायत समितीच्या निवासस्थानांमध्ये अंगणवाडी भरविली जावी, अशी सूचनाही मांडण्यात आली होती. यावरही पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांकडून अंमल झालेला नाही. यावरून पंचायत समिती किती उदासीन आहे हे दिसून येते. (तालुका प्रतिनिधी) अंगणवाडीच्या इमारतीविषयी पंचायत समिती सभापती भरत मसराम यांनी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळू नका, अशी विनंतीही त्यांनी केली. यानंतरही अधिकाऱ्यांना घाम फुटला नाही. एवढेच नव्हे तर त्यांनी पदाधिकाऱ्यांसाठी असलेल्या निवासस्थानांमध्ये विद्यार्थ्यांना बसविले जावे, अशी सूचनाही केली होती. अंगणवाडीसाठी आलेला निधी परत जाण्यास जबाबदार असलेल्या अभियंत्यावर कारवाईची मागणी करून तसा ठराव जिल्हा परिषदेकडे पाठविला जाणार असल्याचे सभापती मसराम यांनी सांगितले. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.