text
large_string
। पनवेल । वार्ताहर । पनवेल तालुक्यातील करंजाडे ग्रामपंचायतीचे महाविकास आघाडीचे सरपंच पदाचे उमेदवार रामेश्वर आंग्रे यांच्यासह सदस्यपदासाठी ११ उमेदवारांनी गुरुवारी ता. १ रोजी पनवेल पंचायत समिती कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे अर्ज भरला. यावेळी महाविकास आघाडीचे जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले. यावेळी माजी विरोधीपक्षनेते प्रीतम म्हात्रे, माजी नगरसेवक गणेश कडू, रामदास पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्तित होते. निवडणूक लढविण्यासाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शेतकरी कामगार पक्ष असे चार पक्ष एकत्र आले आहेत. या चारही पक्षांनी एकत्र येत पनवेल तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूका एकत्रित लढविण्याचा निर्णय घेतला आहे. या चारही पक्षाने महाविकास आघाडी स्थापन करून त्या द्वारे निवडणूक लढविली जात आहे. प्रत्येक गावागावात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, काँग्रेस (आय), शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) या पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात असून या पदाधिकारी कार्यकर्त्याच्या बळावर व त्यांच्या जनसंपर्कच्या बळावर निवडणूकामध्ये महाविकास आघाडीला बहुमत मिळेल असा विश्वास महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांना आहे. त्यानुसार करंजाडे ग्रामपंचायतीत महाविकास आघाडीचे सरपंच पदाचे उमेदवार रामेश्वर आंग्रे यांच्यासह सदस्यपदासाठी 11 उमेदवारांनी गुरुवारी शक्ती प्रदर्शन करीत पनवेल पंचायत समिती कार्यालयात अर्ज भरण्यात आले. पनवेल तालुक्याच्या 10 ग्रामपंचायतीच्या निवडणूक येत्या 18 डिसेंबर रोजी पार पडत असून त्या निवडणुकीसाठी शिवसेना (शिवसेना उ ठाकरे) यांच्या उमेदवारांनी निवडणूक अर्ज पंचायत समिती कार्यालय, पनवेल येथे दाखल केले. तालुक्यातील नितलस मध्ये 4, करंजाडे 2, दिघाटी 1, शिरढोण 5, चिंध्रण 2, कानपोली 2, या ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांनी रायगड जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख बबनदादा पाटील व जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांच्या मार्गदर्शन वं सहकार्याने उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी विश्वास पेटकर, शांताराम कुंभारकर, विरोधीपक्ष नेते प्रीतम म्हात्रे, मा नगरसेवक गणेश कडू, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुदाम पाटील, काँग्रेस पक्षाचे ए. एस. पाटील, हेमराज म्हात्रे आदींसह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते प्रचंड उत्साहात व शक्ती प्रदर्शन करीत शिवसेना उमेदवारांनी आज आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
11 फेब्रुवारी 1936 - JaiBhim Blogger\nHome DR AMBEDKAR 11 फेब्रुवारी 1936\n11 फेब्रुवारी 1936\nसर्वांनी दृढनिश्चयाने आणि संघटितपणे कूच करावयाचे आहे.\nमंगळवार तारीख 11 फेब्रुवारी 1936 रोजी अहमदनगर मुक्कामी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले. सभा डॉ. बाबासाहेबांच्या स्वागतार्थ बोलाविली होती. सभेस 5000 वर जनसमूह जमला होता. शहरातील काही प्रमुख मंडळीही हजर होती. आरंभी स्थानिक अस्पृश्य पुढाऱ्यांची भाषणे झाली. त्यात सर्वांनी डॉ. बाबासाहेबांच्या पुढारीपणावरील आपला पूर्ण विश्वास प्रगट करून त्यांची धर्मातराची घोषणा आपल्याला सर्वतोपरी मान्य असल्याचे जाहीर केले.\nबाबासाहेब आपल्या भाषणात म्हणाले,\nधर्मांतराच्या प्रश्नाबद्दल बोलण्यास आज मी आलो नव्हतो. कारण जाहीर केल्याप्रमाणे अस्पृश्यांच्या एका युवक संघाचे उद्घाटन करावयाचे एवढेच माझे काम होते. परंतु आज आपण इतके लोक येथे मोठ्या उत्कंठेने जमला आहात. तुम्हा सर्वांची निराशा करणे शक्य नाही. प्रथमतः मी निक्षून सांगतो की, धर्म बदलणे ही बाब थट्टेची नाही किंवा तो तमाशा नाही. ढोलके बडवून नुसता गाजावाजा करण्यासारखी ती गोष्ट नाही. धर्मांतर हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा विषय आहे. तुम्हाला कदाचित कल्पना नसेल, पण चार महिन्यापूर्वी धर्मांतराची भाषा मी जाहीररीतीने बोलल्यापासून मला त्या गोष्टीचा एकसारखा सांगोपांग विचार करावा लागत आहे व तिचे मनन करावे लागत आहे. मला सांगायला अभिमान वाटतो की, मी जो निश्चय जाहीर केला आहे त्याबद्दल पश्चात्ताप करण्याचे मला बिलकूल कारण वाटत नाही. तुम्ही देखील या प्रश्नाचा अत्यंत खोल विचार करावयास पाहिजे. रोज पाच मिनिटे तरी तुम्ही त्याचे मनन करा. आता साहजिक असा प्रश्न उभा राहतो की, हा निश्चय कृतीत आणण्यास विलंब का ? तुम्हाला मी एक लहानसा दृष्टान्त देतो. त्यावरून आपल्याला कळेल की, हा प्रश्न किती धिमेपणाने सोडविणे प्राप्त आहे. सेनापतीला ज्यावेळेस सैन्याचा तळ हलवून कूच करण्याचा हुकूम द्यावयाचा असतो त्यावेळेस धडधाकट व जवान शिपायांचाच विचार करून भागत नाही तर अपंग, जखमी किंवा आजारी शिपायांची देखील त्यास काळजी वाहून सर्वांना बरोबर नेणे त्यास जरूर असते. कृतनिश्चयाने पुढे पाऊल टाकण्याची वेळ येईल त्या वेळेस आपल्यातील अज्ञ, अशिक्षित किंवा भेकड माणसे पाठीमागे रेंगाळता कामा नयेत. म्हणून सर्वांनी दृढ निश्चयाने एकाच वेळी कूच करावयास लागावयाचे आहे.\nआता आजच्या मुख्य कार्यासंबंधी बोलावयाचे म्हणजे तुम्ही तरुणांनी सेवा धर्माचे ध्येय पुढे ठेऊन ही जी संस्था काढली आहे त्या तुमच्या अनुकरणीय कार्याबद्दल मी तुमचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. तुमच्यामध्ये असे पुष्कळ लोक आहेत की, दुसऱ्यांनी हातभार लावल्याशिवाय त्यांची प्रगती होणार नाही. या कार्यात तुम्ही एक गोष्ट कधीही विसरता कामा नये आणि ती ही, शील आणि शिक्षण ही जवळ असल्याशिवाय मनुष्याला या जगात काहीच साध्य करून घेता येणार नाही. दुसरी गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे ती ही की, आज तुम्ही स्वातंत्र्य व स्वावलंबन मिळविण्याकरिता लढा चालविला आहे. त्यात तुम्हास यशस्वी व्हावयाचे असेल तर तुम्ही बाहेरच्या माणसाच्या मदतीची अपेक्षा न करता परावलंबी जिण्यापासून अगदी अलिप्त राहिले पाहिजे. हे तुम्ही जर करणार नाही तर, ध्यानात ठेवा, तुम्ही परत गुलामगिरीच्या गर्तेत पडाल. ज्या स्पृश्य हिंदुंनी आजपर्यंत तुम्हाला दास्यत्वात खितपत ठेवले ते तुम्हाला आमिष दाखवून मदत करण्याकरिता एका पायावर तयार देखील होतील. पण जर तुम्ही या मोहाला बळी पडलात तर त्याच्या पायातील तुम्ही घुंगरू बनाल व तुमच्या नशिबाची गुलामगिरी टळणार नाही.\nमहाभारतातील गोष्टी तुम्ही ऐकल्या असतीलच. त्यातील एक कथा या प्रसंगी अत्यंत बोधप्रद होईल. मी ती शेकडो वेळा वाचली आहे. तुम्ही देखील ती वाचली असेल. कदाचित यापुढे तुम्हाला ती वाचावयास मिळणार नाही. कौरव-पांडवांच्या युद्धात तुम्हाला माहीत आहे की, भीष्म व द्रोण हे कौरवांच्या बाजूने लढले. न्याय व सत्य ही पांडवांच्या बाजूला आहेत याची त्यांना पूर्ण जाणीव असताही त्यांना कौरवांचा पक्ष सोडता येईना. ते का तर त्यांनी कौरवांचे नमक खाल्ले होते. म्हणून तुम्ही कोणाचेही ओशाळे होऊ नका.\nशेवटी तुम्हाला एकच गोष्ट सांगावयाची आहे. निरनिराळ्या अनेक संस्था काढू नका. माझा असा अनुभव आहे की, निरनिराळ्या संस्था केवळ आपसात दुही माजविण्यास कारणीभूत होतात आणि शेवटी सर्वच विलयाला जातात. सबंध जिल्ह्याची मिळून एकच संघटित संस्था असू द्या. तिच्यामार्फत आपला योग्य मार्ग चोखाळून आपली सुधारणा घडवून आणा.
विविध प्रकारच्या गणेशमूर्तींना रंगकाम करण्यासाठी कुंभार व्यावसायिक मग्न झाले आहेत. यंदाही गणेशोत्सव सोहळ्यावर कोरोना महामारीचे सावट आहे. शासकीय निर्बंधांमुळे सार्वजनिक गणेशोत्सव सोहळ्यात चार फूट गणेशमूर्तींना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळांनी चार फुटी गणेश मूर्ती बसविण्यात येण्याचे नियोजन केले आहे. कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर मात्र गणेशोत्सवावर मर्यादा आल्या आहेत. गणेश मंडळांनी सांस्कृतिक कार्यक्रमांना फाटा देत मोजक्याच भक्तांच्या उपस्थितीत धार्मिक विधी पार पाडायचे आहेत. ग्रामीण भागात गणेशमूर्तींना रंगकाम करण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले असले, तरी शासकीय नियमांचे ग्रामीण भागात कडक पालन करण्यात येणार आहे. कोरोना, अतिवृष्टी आणि महापूर यामुळे ग्रामीण जनतेत उत्साह दिसून येत नाही.
भीषण आपत्काळामध्ये आरोग्यरक्षणासाठी औषधी वनस्पतींची लागवड करा ! मी अॅलोपॅथी आणि डॉक्टर यांच्या विरोधात नाही. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या विरोधात जाण्याचा प्रश्नच येत नाही; मात्र आमचा या क्षेत्रातील माफियांना विरोध आहे. ते २ रुपयांचे औषध २ सहस्र रुपयांना विकत आहेत. भारतात निरनिराळ्या देवतांची तत्त्वे आकृष्ट करणार्या वनस्पती (झाडे) आहेत. अशा वनस्पती / अशी फुलझाडे जागा असल्यास घराजवळ लावावीत. यामुळे त्या वनस्पतींमध्ये किंवा फुलांमध्ये संबंधित देवतेचे तत्त्व आकृष्ट होऊन त्यातून ते वायूमंडलात प्रक्षेपित होईल. अॅलोपॅथी उपचारपद्धत अवलंबणार्या डॉक्टरांपैकी काही जण भ्रष्ट असून त्यांचा मी विरोध करतो, अशी विधाने बैरिया मतदारसंघातील भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी केली आहेत. 'आयुष-६४' हे औषध आरोग्य केंद्रांमध्येही उपलब्ध केले जाणार आहे, अशी माहिती स्वतः आयुर्वेदाचे वैद्य असलेले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. सर्व वैद्यकशाखांनी एकत्र येऊन भारतियांचे आरोग्य चांगले होण्यासाठी तोडगा काढला पाहिजे. अशा वेळी ही द्वेषाची भाषा देशविरोधी आहे. त्यामुळेच जॉनरोज यांनीच प्रथम देशाची क्षमा मागितली पाहिजे ! योग्य वेळी योग्य ती औषधी वनस्पती उपलब्ध होण्यासाठी ती आपल्या सभोवताली असायला हवी. यासाठी अशा औषधी वनस्पतींची लागवड आताच करून ठेवणे.... 'ज्या लोकांच्या शरिरातील ऑक्सिजन पातळी ७० टक्क्यांवर गेली होती, ते लोकही योग आणि घरगुती उपचार यांनी बरे झाले आहेत. ९० टक्के लोकांना रुग्णालयात जाण्याची आवश्यकता भासली नाही', असे एम्स रुग्णालयाचे संचालक डॉ. गुलेरिया म्हणाले.
देवरूख (प्रतिनिधी) : चंदिगड येथे ६ जुलै रोजी पार पडलेल्या एनसीसी आंतरराज्यीय नेमबाजी क्रीडा स्पर्धेत संगमेश्वर तालुक्यातील आरवलीची सुकन्या असलेल्या रुई विनायक विचारे हिने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना चमकदार कामगिरी केली आहे. या कामगिरीबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंगळवारी (१९ जुलै ) रुईसह महाराष्ट्राला विजेतेपद मिळवून देणाऱ्या कॅडेट्सचा गौरव केला. चंदिगड येथे ६ जुलै रोजी पार पडलेल्या आंतरराज्यीय एनसीसी नेमबाजी क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रातून विविध गटांमधून १७ कॅडेट्स सहभागी झाले होते. रूई विचारे हिचाही समावेश होता. मूळची संगमेश्वर तालुक्यातील आरवलीची सुकन्या असलेली रुई विचारे ही सध्या पुण्यातील गरवारे महाविद्यालयामध्ये पदवी अभ्यासक्रमातील द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे. महाराष्ट्रामधून चंदिगडमधील स्पर्धेत सहभागी झालेल्या रुई विचारे हिने ५० मीटर रायफल शूटिंग प्रकारात चमकदार कामगिरी केली. तिने तिच्या गटातून खेळताना संपूर्ण भारतात दुसरा क्रमांक पटकावला आहे. पन्नास मीटर रायफल शूटिंगमध्ये तामिळनाडूतील मुलीने प्रथम, तर रुई विचारे हिने दुसरे स्थान पटकावले. कॅडेट्सनी महाराष्ट्र राज्याला सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपद पटकावून दिले. याची दखल घेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या कॅडेट्सना मंगळवारी १९ जुलैला राजभवनात बोलावून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.
शहरात जिल्हात नसेल असे अमरधाम (स्मशानभूमी) आहे. परंतू गेल्या अनेक दिवसांपासून येथील प्रेतांना जाळण्यासाठीच्या पाच शवदाहिनीची अत्यंत दुरावस्था झाली आहे. त्यामुळे येथे अंत्यसंस्कारासाठी येणार्या प्रेताला मरणयात्रणा भोगाव्या लागत आहे. अनेक संघटनासाठी नवीन शवदाहिनी बसविण्याची मागणी केल्याने, न. पा. च्या स्थायी समिती नवीन शवदाहिनी बाबतची ठराव करण्यात आला, मात्र अद्यापर्यंत नवीन शवदाहिनी बसविण्यात न आल्यामुळे मरणानतंरही प्रेतांची हेडसाळ न. पा. च्या भोंगळ कारभारामुळे होत आहे. शहरात विकास कामे होत नसल्याचे भाजपा व शहवि आघाडीचे नगरसेवक एमेकांवर चिखफेख करण्याचे ' पुण्यकर्म ' नगर परिषदेच्या निवडणुका डोळ्यासामोर ठेवून सद्या करीत आहेत. परंतू शहरासाठी व प्रत्येकांसाठी अत्यंत महत्वचे असलेल्या विषयाकडे त्यांनी आतापर्यंत कडक आवाज उठवलेला दिसत नाही. किवा लोकसहभागातून देखील या शवदाहिनी त्वरीत बसविण्यासाठी समाजीक संघटना किवा इतरांनी प्रयत्न केलेले दिसत नाही. करोना काळात अनेक प्रेतांना दुरावस्था झालेल्या शवदाहिनीवरच जाळण्यात आले. त्यामुळे आता या गंभीर प्रकरणाची आमदार मंगेश चव्हाण यांनी त्वरित दखल घेवून हा प्रश्न मार्गी लावावा. किवा जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरवा करावा, अशी अपेक्षा शहवासियांकडून व्यक्त केली जात आहे. नगर परिषदेकडून ठराव होवून हे प्रकरण प्रशासकिय मान्यतेसाठी गेल्याची माहिती प्राप्त झाली आहे. परंतू प्रशासकिय मान्यता व निविदा प्रक्रिया होण्यासाठी अजुन किती कालवंधी लागेल हे सांगता येत नाही. तोपर्यंत शवदाहिनी दुरावस्था कायम राहणार आहे. आणि प्रेताची हेडसाळ देखील होणार आहे. याला जबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जुलै २०२१ । भाजप खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रात मंत्रिपद न मिळाल्याने मुंडे भगिनी नाराज असल्याच्या चर्चा असून पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत प्रवेश करावा, अशी मागणी त्यांच्या समर्थकांकडून होत असतानाचा आता त्यात शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. पंकजा मुंडे यांना शिवसेनेत येण्याची ऑफर देणारा पहिला मीच होतो, असं विधान गुलाबराव पाटील यांनी करून चर्चेचं माहोळ उठवून दिलं आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे शिवसेनेत आल्या तर त्यांचे स्वागत आहे, पंकजा मुंडे यांना शिवसेनेत स्थान व सन्मान मिळेल, अशी हमी देखील गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. जळगाव जिल्ह्यातील कीनोद गावात मंत्री गुलाबराव पाटील हे आज शुक्रवारी सकाळी एका कार्यक्रमासाठी आले होते. या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलतांना त्यांनी पंकजा मुंडे यांच्यसंदर्भात त्यांनी आपले मत व्यक्त केले. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत प्रवेश करावा यासाठी त्यांच्या मागणी करत सोशल मीडियावर मोहीम सुरू केली आहे. यासंदर्भात पत्रकारांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी आपले मत मांडले. पंकजा मुंडे यांचा भाजपमध्ये छळ होत असल्याने त्यांनी शिवसेनेत यावं म्हणून सर्वात पहिली मी त्यांना ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट करतानाच पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर त्यांचे स्वागतच राहील. प्रवेश केल्यानंतर त्यांना पद काय द्यायचे हे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठरवतील, असंही त्यांनी स्पष्ट केले. यावर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, विधानसभा निवडणूकीनंतर पंकजा मुंडे यांना हवे तसे प्रतिनिधीत्व मिळाले नाही. मुळात गोपीनाथ मुंडे यांनी भाजपसाठी पडत्या काळात खूप मोठे काम केले आहे. आता मात्र त्यांच्या कन्या पंकजा मुंडे यांना संघर्ष करावा लागत आहे. भाजपने एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे व पंकजा मुंडे यांना तिकिटेही दिली नाहीत. याचाच अर्थ ओबीसी समाजाचे कुठेतरी खच्चीकरण केले जात आहे.
विद्यार्थी न्यायाधिकरणाचा प्रस्ताव गुलदस्त्यात! विजय सरवदे, औरंगाबाद डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेत मंजूर झालेल्या विद्यार्थी न्यायाधिकरणाच्या प्रस्तावाला सहा महिन्यांपासून मुहूर्त लागलेला नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेत मंजूर झालेल्या विद्यार्थी न्यायाधिकरणाच्या प्रस्तावाला सहा महिन्यांपासून मुहूर्त लागलेला नाही. काही शिक्षण सम्राटांच्या दबावाखाली येऊन विद्यापीठ प्रशासनाने या प्रस्तावाला खीळ घातली असावी, अशी चर्चा सध्या विद्यापीठ वर्तुळात ऐकायला येत आहे. मुंबई विद्यापीठ अधिनियमात तरतूद असलेले हे न्यायाधिकरण महाराष्ट्रात अथवा देशातील एकाही विद्यापीठात आजपर्यंत स्थापन झालेले नाही. प्रामुख्याने मराठवाड्यासारख्या मागास परिसरातील विद्यार्थ्यांची स्थिती गरीब व मध्यमवर्गीय आहे. या विद्यार्थ्यांना न्याय मागण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेणे परवडणारे नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी संस्थाचालक, विद्यापीठ किंवा शासनाच्या जाचक अटींचे बळी ठरत आहेत. या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेत पारित झालेला 'विद्यार्थी न्यायाधिकरण' स्थापन करण्याचा ठराव हा ऐतिहासिक मानला जातो. विद्यापीठाच्या उस्मानाबाद उपकेंद्रामध्ये १६ आॅगस्ट रोजी व्यवस्थापन परिषदेची बैठक झाली. त्या बैठकीत व्यवस्थापन परिषदेचे राज्यपालनियुक्त प्रतिनिधी उल्हास उढाण यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या व गाऱ्हाणी मांडण्यासाठी विद्यापीठात एक 'विद्यार्थी न्यायाधिकरण' स्थापन करावे, असा ऐतिहासिक ठराव मांडला. तो एकमताने मंजूर झाला. त्यानंतर पारित झालेल्या या ठरावावर विद्यापीठ प्रशासनाने आजपर्यंत कसलीही कार्यवाही केलेली नाही. 'विद्यार्थी न्यायाधिकरण' स्थापन करण्याच्या कार्यवाहीस विलंब होत असल्याबद्दल उढाण यांनी प्रशासनाकडे एका पत्राद्वारे नाराजीही व्यक्त केली. शासनाची मंजुरी मिळेपर्यंत विद्यापीठाने स्वतःच्या फंडातून नियुक्त केल्या जाणाऱ्या न्यायाधिकरण सदस्याला वेतन अदा करण्याची सूचना उढाण यांनी प्रशासनाला केली आहे. दुसरीकडे या प्रस्तावाबाबत कुलगुरू अनुकूल असले तरी विद्यापीठ प्रशासनावर काही शिक्षण सम्राटांचा दबाव येत असल्यामुळे हा प्रस्ताव गुलदस्त्यात ठेवण्यात आल्याची चर्चा विद्यापीठ वर्तुळात ऐकायला मिळत आहे.
देशातील सुजन नागरिक घडविण्याचे काम शिक्षक करत असतात. मात्र, शासनाने शिक्षण क्षेत्रात खाजगीकरण करण्याचा मोठा उद्योग सुरु केला आहे. शिक्षकांना देशव्यापी संपात उतरण्याची वेळ येणे ही दुर्दैवी बाब आहे. शिक्षक हा प्रोडक्टीव्ह घटक आहे. शिक्षकांच्या अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, अंशतःअनुदानित, अर्थहीन, पार्टटाईम अशा वेगवेगळ्या प्रतवारी थांबवून झाडाखाली विद्यार्थ्यांना शिकवणार्या शिक्षकांनाही पूर्ण पगार द्यावा अशी मागणी मुख्याध्यापक संघासह विविध शिक्षक संघटनांनी तहसिलदारांना निवेदन देत केली आहे. अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना सर्वांना लागु करा, राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, विना अनुदानित व अंशतः अनुदानित विद्यालयांना, वर्ग व तुकड्यांना शंभर टक्के अनुदान तातडीने अदा करावे, वर्षाची तीन लाभाची सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना राज्य सरकारी कर्मचार्याप्रमाणे राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांना लागु करावी, वेतनश्रेणी त्रुटी दूर करण्याविषयी बक्षी समितीच्या अहवालाचा दुसरा खंड त्वरित जाहीर करावा यासह विविध मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले. यावेळी आर. बी. एरंडे, बी. व्ही. पांडे, रामनाथ लोंढे, आर. बी. कहांडळ, एस. बी. येवले, राजेंद्र महात्मे, जमीर शेख, एस. टी. पांगारकर, आर. टी. गिरी, कल्पेश चव्हाण, एम. डी. काळे यांच्यासह मुख्याध्यापक संघ, माध्यमिक शिक्षक संघ, टी. डी. एफ. संघटना, शिक्षकेत्तर संघटना व विज्ञान अध्यापक संघटनेचे पदाधिकारी, शिक्षक उपस्थित होते.
सांगली : पेट्रोल, डिझेल आणि रेल्वे दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसतर्फे आज आंदोलन करण्यात आले. कॉँग्रेस कमिटीपासून म. गांधी पुतळ्यापर्यंत कार्यकर्त्यांनी दुचाकी ढकलून नेऊन सरकारचा निषेध नोंदविला. जिल्ह्यातही विविध ठिकाणी काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले. इस्लामपूर, कडेगाव, कवठेमहांकाळ, आटपाडी येथेही केंद्र शासनाचा निषेध करण्यात आला. केंद्र सरकारतर्फे पेट्रोल, डिझेल तसेस रेल्वेच्या तिकिटांमध्ये वाढ करण्यात आली आहे. याचा भार सामान्य जनतेवर पडला आहे. त्यामुळे महागाईत भर पडली आहे. त्याच्या निषेधार्थ काँग्रेसतर्फे आज आंदोलन करण्यात आले. काँग्रेस कमिटीसमोरुन काँग्रेस कार्यकर्त्यांनी दुचाकी ढकलून म. गांधी चौकापर्यंत नेल्या. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाही देण्यात आल्या. आंदोलनाचे नेतृत्व शहर जिल्हाध्यक्ष मुन्ना कुरणे, मिरज शहर अध्यक्ष रफिक मुजावर यांनी केले. यावेळी सेवादल जिल्हाध्यक्ष अजित ढोले, राजन पिराळे, करीम मेस्त्री, शैलेंद्र सॅमसंग, सचिन चव्हाण, पैगंबर शेख, चंद्रकांत पवार आदींसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलनात युवक काँग्रेस, एन. एस. यु. आय. अल्पसंख्याक सेल, मागासवर्गीय सेलचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. इस्लामपूर : महागाईचा निषेध म्हणून युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शहरातील मुख्य रस्त्यावरून दुचाकी वाहने चालवत नेण्याऐवजी पेट्रोलचा वापर न करता ढकलत नेऊन निषेध नोंदवला. मोदी सरकारच्या करणी व कथनीमधील फरक जनतेच्या निदर्शनास आणून देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्हा उपाध्यक्ष जयकर कदम, हातकणंगले युवकचे अध्यक्ष जयराज पाटील, अॅड. आर. आर. पाटील, धनंजय कुलकर्णी, राजू सावकर, महेश चौधरी, क्रांती जाधव, पोपट घोगावकर, विशाल पाटील, स्वप्निल इटकरकर, शीतल बोटकर सहभागी झाले होते. कडेगाव : कडेगाव येथे दुचाकी ढकलून मोदी सरकारचा निषेध करण्यात आला. आज रविवारी सकाळी ११ वाजता कडेगाव तालुका काँग्रेस कमिटी कार्यालयापासून ही रॅली सुरू झाली. केंद्र सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत ही रॅली बसस्थानक चौकात आली व रॅलीची सांगता झाली. कडेगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा मालन मोहिते, युवा नेते जितेश कदम, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इंद्रजित साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 'कहाँ गये अच्छे दिन, बुरे दिन आ गये' अशा घोषणा दिल्या. यावेळी कडेगावचे सरपंच विजय शिंदे, विनायक पवार, मंगल सूर्यवंशी, अजय पाटील, विठ्ठल मुळीक, सखाराम सूर्यवंशी, सुनील पाटील, चिंचणीचे सरपंच अशोक महाडिक आदी उपस्थित होते. आटपाडी : केंद्र सरकारने डिझेल आणि पेट्रोलच्या दरात वाढ केल्याच्या निषेधार्थ आटपाडीत आज, रविवारी काँग्रेसच्यावतीने दोरीने वाहने ओढून निषेध करण्यात आला. बसस्थानकापासून इंधन दरवाढीच्या निषेधार्थ घोषणा देत दोरीने वाहने ओढत आणि पेट्रोलविना दुचाकी ढकलत काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अनोखे आंदोलन केले. आटपाडी ग्रामपंचायत कार्यालयासमोरील चौकात आंदोलकांनी केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात भाषणातून संताप व्यक्त केला. आंदोलनात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वसंतराव गायकवाड, युवा काँग्रेसचे राहुल गायकवाड, अॅड. विलासराव देशमुख, प्रभाकर पाटील, सुहास पाटील, डी. एम. पाटील, जयदीप भोसले, नंदकुमार दबडे, गणपतराव काटकर, मोहन देशमुख, गणेश गायकवाड, यशवंत गायकवाड, केशव गायकवाड, पी. एन. कदम, मोहन खरात,अण्णासाहेब मोरे, सचिन गुरव, ऋषिकेश गुरव यांनी सहभाग घेतला. कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ येथे आज (रविवार) काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दुचाकी ढकलत नेऊन दरवाढीविरोधात तहसीलदारांना निवेदन दिले. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चक्क दुचाकी गाड्या ढकलत नेल्या आणि यापुढे या सरकारमुळे गाड्या ढकलण्याचीच वेळ येते की काय, असे दाखवून दिले. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब शिंदे, बाळासाहेब गुरव यांची भाषणे झाली. तहसीलदारांना पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढ मागे घ्यावी, अशा आशयाचे निवेदन दिले. यावेळी कार्याध्यक्ष अरविंद शिंदे, माणिकराव भोसले, भीमसेन भोसले, मोहन लोंढे, वैभव गुरव, पोपट पाटील, अनिल पाटील, चैतन्य पाटील, नानासाहेब पाटील, तुषार वनखडे, धनाजी गरड, भारत डुबुले, प्रशांत कांबळे उपस्थित होते. (वार्ताहर)
अलिबाग : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्याकडील निर्देशाप्रमाणे संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये शनिवार, दि. 10 एप्रिल 2021 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्याचे निश्चित झाले होते. मात्र करोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाने दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने नियोजित राष्ट्रीय लोक अदालत ही पुढील आदेशापर्यंत तहकूब करण्यात आली आहे, असे महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्याकडून कळविण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड-अलिबाग चे सचिव तथा न्यायाधीश श्री. संदीप स्वामी यांनी दिली आहे. तरी सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, पोलिस विभाग, वकील वर्ग, पक्षकार यांनी या बदलाबाबतची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश व अध्यक्ष, जिल्हा विधी प्राधिकरण, रायगड-अलिबाग श्रीमती विभा इंगळे यांनी केले आहे.
शिवसेना कार्यकर्ता संतोष परब मारहाण प्रकरणातील संशयित आम. नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी सुरु झालेली सुनावणी बुधवारी (29 डिसेंबर) पुन्हा केली जाणार आहे. दिवसभरात सुनावणी दरम्यान,सरकारी वकील,राणे यांचे वकील यांच्यात जोरदार युक्तीवाद झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. 30 डिसेंबर रोजी मतदान आणि 31डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. महाविकास आघाडीच्या पॅनेलचे नेतृत्व करणारे जिल्हा बँकेचे विद्यमान चेअरमन सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर 18 डिसेंबर रोजी प्राणघातक हल्ला झाला होता. सतीश सावंत यांनी हा हल्ला नितेश राणे यांनीच घडवून आणला, असा आरोप केला होता. संतोष परब यांनीदेखील आपल्या फिर्यादीत नितेश राणेंचे नाव नमूद केले होते. दरम्यान, नितेश राणे ङ्गनॉट रिचेबलफ असून, त्यांनी आपल्याला अटक होऊ नये यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. नितेश राणे यांचे पिता केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी संतोष परब हल्ल्याप्रकरणी नितेश राणे यांचा काहीही संबंध नाही, त्यामुळे ते अज्ञातवासात जाण्याचे कोणतेही कारण नाही, असे प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे. याप्रकरणी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यांचे वकील अॅड. संग्राम देसाई यांनी हा अर्ज दाखल केला असून मंगळवारी त्यावर सुनावणी सुनावणी सुरु झालेली आहे.
International Pineapple Day: अननसाविषयी ७ इंटरेस्टिंग गोष्टी, खट्टामिठा अननस खाण्याचे जबरदस्त फायदेPublished:June 27, 2022 07:41 PM2022-06-27T19:41:52+5:302022-06-27T19:48:24+5:30 १. व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असणारं अननस हे फळ अनेकांच्या आवडीचं. . जगभरातही हे फळ एवढं प्रसिद्ध आणि इतक्या लोकांच्या आवडीचं आहे की २७ जुन हा दिवस खास International Pineapple Day म्हणून जगभर साजरा केला जातो. २. मुळचं अमेरिकेचं असणारं हे फळं जगभरातच मोठ्या आवडीने खाल्लं जातं. उन्हाळ्यात अननसाचा थंड गार ज्यूस प्यायला मिळाला तर आहाहा. . . ३. अमेरिकेत International Pineapple Day मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यादिवशी ते लोक एकमेकांकडे जाऊन अननस खातात. अननसाचा ज्यूस, अननस केक यासारखे अननसाचे वेगवेगळे पदार्थ त्यादिवशी हमखास बनवले जातात. ४. अननसाचं रोपटं अतिशय छोटंसं असतं. जमिनीपासून अवघं दोन- अडीच फूट झाड वाढतं आणि त्याला अननस येतात. ५. वजन कमी करण्यासाठी अननस खाणं अतिशय उपयुक्त ठरतं. कारण अननस खाल्ल्याने शरीरातील लेप्टीन हार्मोन्सचं सिक्रीशन संतुलित होऊन वजन वाढीवर आपोआप नियंत्रण येतं. ६. दमा, कफ असा त्रास असेल तर नियमितपणे अननस खायला हवं. ७. अननसामध्ये कॅल्शियम, मँगनिज मोठ्या प्रमाणात असल्याने हाडांच्या मजबुतीसाठी अननस खाणं अतिशय फायद्याचं असतं. ८. अनननसामध्ये फायबर मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी अननस नियमित खावं. ९. व्हीटॅमिन सी आणि बिटा केरॅटीन अननसामध्ये भरपूर प्रमाणात असल्याने त्वचा आणि केसांसाठी अननस खाणं चांगलं. १०. शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवून अशक्तपणा कमी करण्यासाठी अननस महत्त्वाचे आहे. टॅग्स :वेट लॉस टिप्सफळेआरोग्यहेल्थ टिप्सWeight Loss TipsfruitsHealthHealth Tipsशेअर :
खासदार म्हणून कोल्हापूरच्या जनतेने मला निवडले. सलग तिसºयांदा 'संसदरत्न' पुरस्कार मिळाल्याने जनतेची ही निवड योग्य असल्याची पोचपावती मिळाली आहे, अशी प्रतिक्रिया खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केली. कोल्हापूर : खासदार म्हणून कोल्हापूरच्या जनतेने मला निवडले. सलग तिसºयांदा 'संसदरत्न' पुरस्कार मिळाल्याने जनतेची ही निवड योग्य असल्याची पोचपावती मिळाली आहे, अशी प्रतिक्रिया खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केली. चेन्नई येथे 'संसदरत्न' पुरस्कार स्वीकारून कोल्हापुरात आल्यानंतर महाडिक यांनी आपल्या या भावना 'लोकमत'जवळ व्यक्त केल्या. साडेचार वर्षांच्या कामगिरीचा यावेळी त्यांनी आढावा घेतला. दिल्लीतील सुरुवातीचे दिवस सांगताना महाडिक म्हणाले, माझ्यासारख्या युवकावर कोल्हापूरच्या जनतेने विश्वास टाकला; त्यामुळे तो सार्थ करण्याचा निर्धार मी केला होता. देशभरातून येणाºया उच्चशिक्षित आणि अनेक वर्षे संसदेत काम केलेल्या मान्यवरांमध्ये स्वतःला सिद्ध करणे, हे आव्हानात्मक होते; परंतु ज्या जनतेने मला दिल्लीत पाठविले, त्यांची निवड योग्य होती हे दाखविण्याच्या भूमिकेतून तिसºया दिवशी मी संसदेच्या ग्रंथालयात गेलो. याचे ग्रंथपालांना आश्चर्यही वाटले. यानंतर मी आदर्श संसदपटू राहिलेले मधु दंडवते, अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यपद्धती विषयीची पुस्तके वाचली. प्रश्न विचारण्याच्या पद्धती, प्रश्नांची मांडणी, त्याच्या उत्तरावर पुन्हा चर्चा, शून्य प्रहरातील प्रश्न, तारांकित, अतारांकित प्रश्न या सगळ्यांची माहिती घेतली. मग राष्ट्रीय प्रश्न, महाराष्ट्राचे प्रश्न आणि कोल्हापूरचे प्रश्न अशी विभागणी करून त्यानुसार नियोजन केले. यासाठी तीनजणांची एक चांगली टीम तयार केली. जे प्रश्न आम्ही पाठवितो, त्यातून लॉटरी पद्धतीतून प्रश्न निवडले जातात. अधिवेशनाच्या आधी १५ दिवस प्रश्न विचारावे लागतात. २५0 प्रश्न एका अधिवेशनासाठी पाठविले, की त्यातून ३0/४0 प्रश्न अधिवेशनामध्ये लागायचे; पण मला सर्वच प्रश्नांची तयारी करावी लागत असे. या पद्धतीने पहिल्या वर्षी ७५0, दुसºया वर्षी ९00 आणि तिसºया वर्षी ११३६ प्रश्न उपस्थित केले. प्रत्येक बिलावर पक्षाची भूमिका मांडण्याची, देशाच्या अर्थसंकल्पावर, रेल्वे संकल्पावर बोलण्याची संधी नेते शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी दिली. वैभववाडी रेल्वेमार्ग, महिलांच्या रेल्वे डब्यात सीसीटीव्ही लावणे, पुणे कोल्हापूर रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, कोल्हापूर स्टेशनवरील सुधारणा, विमानसेवा, पासपोर्टची सुविधा आणि बी. एस. एन. एल. चे सर्वाधिक उभारण्यात आलेले १३१ थ्रीजी टॉवर अशी अनेक कामे मार्गी लावली. संसदेत विचारले गेलेले प्रश्न, संसदेतील उपस्थिती, चर्चेत घेतलेला सहभाग या सर्वांचा एक आढावा घेऊन 'संसदरत्न' पुरस्कार दिला जातो. सलग तिसºया वर्षी हा पुरस्कार मला मिळाल्याने मी घेतलेल्या कष्टाचे चीज झाल्याची भावना आहेच. खासदाराचे काम केवळ रस्ते आणि गटर्ससाठी निधी देणे इतकेच नसून, देशाच्या कारभाराची धोरणे ठरवण्याची जबाबदारी त्याच्यावर येते. सर्वसामान्य नागरिकांशी संबंधित आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक सुविधा या सर्व बाबतीत खासदाराने कार्यरत राहून त्यांचे जीवनमान कसे उंचावले जाईल, याची काळजी त्याने घ्यावयाची असते. याच भूमिकेतून मी संसदेत कार्यरत आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने (Maharashtra Education Board) राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांच्या हिता निर्णय घेतला आहे. तो म्हणजे राज्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कांत 15 टक्के सवलत (School fee Reduction) देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यात कोरोना काळात म्हणजेच वर्ष 2021 मध्ये शिक्षण विभागाने जाहीर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कात 15 टक्के सवलती देण्याचा निर्णय घेतला होता. आता त्या निर्णयाच्या अंमलबजावणीचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. शिक्षण विभागाने निर्णय दिल्यानंतर देखील राज्यातील अनेक शाळांना त्याची अंमलबजावणी केलेली नव्हती. त्यामुळे पालकांकडून संताप व्यक्त केला जात होता. त्यामुळे आता शिक्षण विभागाने पुन्हा परिपत्रक काढले आहे. शिक्षण विभागाने आपल्या परिपत्रकात म्हटले आहे, की विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कात 15 टक्के कपात करण्यात आली होती. परंतु काही शाळांनी अद्याप निर्णयाची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे पालकांकडून नाराजी व्यक्त केली जात होती. या संदर्भात बहुतांश पालकांच्या तक्रारी देखील प्राप्त झाल्या होत्या. विद्यार्थ्यांच्या पालकांकडून आकारण्यात आलेली 15 टक्के फी परत करा, नाही तर ती पुढील वर्षाच्या फीमध्ये समाविष्ट करा, असे आदेश राज्य शिक्षण विभागाने म्हटले आहे. मुंबई शहर, नवी मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्हातील तसेच मुंबईच्या कार्यक्षेत्रातील सर्व शिक्षण अधिकाऱ्यांना हा शिक्षण विभागाकडून आदेश जारी करण्यात आले आहेत. दुसरीकडे, शिक्षणाचे माहेर घर असलेल्या पुण्यात फी वाढीवरून विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत. पुण्याती सावित्रीबाई फुले विद्यापीठाने तिप्पट फी वाढवल्यामुळे विद्यार्थी मोठ्या संख्येने आंदोलन केले आहे. ऑनलाईन परीक्षा, तिप्पट फी वाढीला विरोध असल्याचे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस संघटनेने म्हटले आहे. ऑनलाईन परीक्षा आणि विद्यापीठातील तिप्पट फी वाढ, या विरोधात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्यामुळे आता फी वाढीवरून पुण्यात रणकंद पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.
(Beating) केल्या प्रकरणी पोलीस उपायुक्तांनी (Deputy Commissioner of Police Pune) एका पोलीस अंमलदाराला निलंबित (Pune Police) उपायुक्त नम्रता पाटील (DCP Namrata Patil) यांनी हा आदेश काढला आहे. (Policeman Suspended) Police) मारहाण करुन आरोपीला लॉकअपमध्ये ठेवल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर २३ वाजून ४६ मिनिटांनी पट्ट्यासारखी वस्तू परत ठेवण्यासाठी बाहेर गेल्याचे दिसत आहे. त्यामुळे कोळी यांनी आरोपी जाहेद शेख याला अनाधिकाराने बाहेर काढून त्यास हाताने थोबाडीत मारली. पायाने आरोपीच्या पार्श्वभागावर लाथ मारली व तोंडावर बुक्कीमारल्याचेही सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले आहे. या संपूर्ण घटनेचे लॉकअपमध्ये लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये चित्रिकरण झालेले आहे. यावरुन कोळी यांनी आपल्या अधिकारात आरोपीस लॉकअप बाहेर काढून मारहाण केली असल्याचे दिसून आल्याने पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी निलंबित (Pune Policeman Suspended) केले आहे.
Badaun horror:2UP cops abduct, rape 14-year-old girl inside police station । उत्तर प्रदेशातील पोलिसांचा ठाण्यातच मुलीवर अत्याचार - Divya Marathi\nBadaun Horror:2UP Cops Abduct, Rape 14 year old Girl Inside Police Station\nउत्तर प्रदेशातील पोलिसांचा ठाण्यातच मुलीवर अत्याचार\nबदायूं - उत्तर प्रदेशातील महिलांवरील अत्याचाराचे सत्र थांबायचे नाव घेत नाही. कुंपणानेच शेत खाल्ल्याचा प्रकार बदायूं जिल्ह्यातील मुसजहग पोलिस ठाण्यात ही घटना घडली. दोन पोलिसांनी १४ वर्षांच्या मुलींवर सामूहिक अत्याचार केला. या प्रकरणी दोन जणांना निलंबित करण्यात आले आहे.\n३१ डिसेंबर रोजी पोलिसांनी रात्री आठच्या सुमारास पीडिता वॉशरूममध्ये होती. त्याचवेळी कारमध्ये दोन पोलिस आले. ते सदर मुलीस बळजबरीने सोबत घेऊन ठाण्यात गेले. तेथील एका खोलीत तिच्यावर अत्याचार करण्यात आला. त्यानंतर दोघांनी तिला गावात सोडल्याचे पीडितेने तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणात शहर पोलिस अधीक्षक लल्लन सिंह म्हणाले, मुलीने तसेच तिच्या आईने दोन्ही कॉन्स्टेबलच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. दोघांनाही निलंबित करण्यात आले आहे. दोघेही फरार आहेत. त्यांना अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.\nहे केवळ दुर्दैव : मनेका गांधी\nउत्तर प्रदेशात ज्यांच्यावर संरक्षणाची जबाबदारी आहे. तेच अत्याचार करू लागले आहेत. हे दुर्दैव आहे. राज्याचे पोलिसच कायदा मोडू लागले आहेत, असे केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री मनेका गांधी यांनी म्हटले आहे.\nअगोदरही वादात होते गाव\nबदायूं अगोदरही अत्याचारावरून देशभरात चर्चेत राहिले होते. गेल्या वर्षी मे महिन्यात दोन मुलींवर झालेल्या अत्याचाराचे प्रकरण उजेडात आले होते. परंतु नंतर या प्रकरणात नातेवाइकांचाच हात असल्याचा आरोप झाला.\nकडक शिक्षा करू\nबदायूं पोलिस ठाण्यातील घटनेत दोषी असलेल्यांना कडक शिक्षा दिली जाईल. - अखिलेश यादव, मुख्यमंत्री.
पुणे : इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनीअर्सचे पुणे केंद्र आणि मराठी विज्ञान परिषदेचा पुणे विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने परमाणु रसायनशास्त्रातील संशोधक डॉ. नीलिमा राजूरकर यांचे 'अणुऊर्जा- मिथक आणि सत्य' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम आज (१६ एप्रिल) संध्याकाळी ६.१५ वाजता शिवाजीनगर येथील इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनीअर्सच्या केंद्रात होणार आहे. आज भारताकडे सात हजार ७८० मेगावॅट क्षमतेचे सात अणुऊर्जा प्रकल्प आहेत. त्यातून ३५ टीडब्ल्यूएच ऊर्जेचे उत्पादन होते व तो एकूण विद्युत पुरवठ्याचा ३.२२ टक्के भाग आहे. औष्णिक वीज प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात कार्बन डायॉक्सिडचे उत्सर्जन होते; तसेच राख निर्माण होते. सौर व पवनऊर्जेला काही नैसर्गिक मर्यादा आहेत. अणुऊर्जेचे पर्यावणावर होणारे परिणाम अत्यंत कमी आहेत. दक्षिण कोरियात प्रामुख्याने अणुऊर्जेपासून वीजनिर्मिती होते. जगात सध्या अणूऊर्जा हीच योग्य आहे अशी समजूत रूढ होते आहे. परंतु भारतात अणुऊर्जेला भीतीपोटी विरोध केला जात आहे. यातील मिथक काय व सत्य काय यावर परमाणु रसायनशास्त्रातील संशोधक डॉ. राजूरकर मार्गदर्शन करणार आहेत. डॉ. राजूरकर या सावित्रीबाइ फुले पुणे विद्यापीठ मधील परमाणु रसायनशास्त्र विभागात प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. या व्याख्यानाला विज्ञानप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. स्थळ : इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनीअर्स, स. गो. बर्वे चौक, शिवाजीनगर पुणे ५.
शफालीसोबतच राधालाही लागली लॉटरी! भारताची स्फोटक बॅटर शफाली वर्मा (Shefali Varma) आणि डावखुरी फिरकीपटू राधा यादव (Radha Yadav) ऑस्ट्रेलियातील महिला बिग बॅश लीग (WBBL) च्या मैदानात उतरणार आहेत. दोन वेळा चॅम्पियन राहिलेल्या सिडनी सिक्सर्सकडून या दोघी खेळणार आहेत. 13 मे रोजीच या दोघींसोबत सिडनी सिक्सर्स संघाने करार केल्याचे वृत्त समोर आले होते. पुढच्या महिन्यात सुरु होणाऱ्या सातव्या हंगामापूर्वी बिग बॅग लीगने अधिकृतरित्या यासंदर्भातील घोषणा केली आहे. सिडनी सिक्सर्स 14 आक्टोबर रोजी मेलबर्न स्टार्स विरुद्ध होबार्टच्या डस्टोन एरिना स्टेडियमवरुन स्पर्धेला सुरुवात करेल. बिग बॅश लीगच्या अधिकृत ट्विट अकाउंटवरुन भारतीय खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव करण्यात आलाय. सिडनीसाठी यंदाची स्पर्धा खास असेल. या संघात भारतीय महिला संघातील दोन प्रतिभावंत खेळाडूंचा समावेश आहे. शफली वर्मा आणि राधा यादव यांच्यामुळे टीम अधिक मजबूत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. 17 वर्षीय शफाली वर्माने 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण केले होते. भारताकडून सर्वात कमी वयात आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याचा विक्रम तिने आपल्या नावे केला आहे. सध्याच्या घडीला आयसीसी महिला टी 20 क्रमवारीत शफाली अव्वलस्थानी आहे. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे सामन्यात शफालीने आपल्या खेळीतील धमाका दाखवून दिला होता. क्रिकेट डॉट कॉम डॉट एयू'च्या वृत्तानुसार, शफाली बिग बॅश लीगमध्ये खेळण्यास उत्साहित आहे. ही एक माझ्यासाठी मोठी संधी असून त्याचा पूरपूर फायदा उचलण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल, असे शपालीने म्हटले आहे. शफाली वर्मा सिक्सर्सकडून खेळताना एलिसा हीली, एलिसे पेरी आणि एश्ले गार्डनर या बॅटर्ससोबत खेळताना दिसेल. शफालीसोबत राधा यादव देखील ऑस्ट्रेलियन लीगमध्ये खेळताना दिसेल. 2018 टी20 वर्ल्ड कप स्पर्धेत राधा यादवने सर्वाधिक विकट घेतल्या होत्या. संयुक्तरित्या ती अव्वस्थानी राहिली होती. 21 वर्षीय फिरकीपटू आयसीसीच्या टी-20 रँकिंगमध्ये 11 व्या स्थानावर आहे. बिग बॅश लीगमध्ये भारताचा ठसा उमटवण्यास आतूर असल्याची भावना तिने व्यक्त केली आहे.
Shivsean MLA Anil Kadam Surender To Police, Get Bail । शिवसेना आमदार अनिल कदमांची पोलिसांकडे शरणगती, जामीनही मंजूर - Divya Marathi\nShivsean MLA Anil Kadam Surender To Police, Get Bail\nशिवसेना आमदार अनिल कदमांची पोलिसांकडे शरणगती, जामीनही मंजूर\nनाशिक - टोल नाक्यावर महिलांना उद्देशून केलेली वक्तव्ये आणि शिवीगाळप्रकरणी विनयभंगाच्या दाखल गुन्ह्यात पोलिसांकडून अटक होण्याची शक्यता लक्षात घेत शिवसेनेचे आमदार अनिल कदम यांनी स्वतःहून न्यायालयात शरणागती पत्करली. न्यायालयाने कदम यांना न्यायालयीन कोठडी सुनावत त्यांना जामीन मंजूर केला.\nपिंपळगाव टोल नाक्यावरून आमदार कदम हे गुरुवारी (दि. 22) सकाळी मित्राच्या कारमधून जात असताना त्यांच्याकडे टोलनाक्यावरील महिला कर्मचार्याने ओळखपत्र मागितले होते. यावरून कदम यांना राग येऊन त्यांनी थेट टोलनाक्यावरील नियंत्रण कक्षात शिरून तोडफोड करीत महिलांना विवस्त्र करण्याची धमकी दिली होती. त्याचबरोबर अश्लील भाषेत शिवीगाळ करीत टोलनाका पेटवून देण्याचा दम भरला होता. या प्रकरणी चार दिवसांपासून शहर व जिल्ह्यात कदम यांच्या निषेधार्थ आंदोलने, मोर्चे काढण्यात आले. कदम यांनीही पक्षर्शेष्ठींकडे आमदारकीचा राजीनामा सादर केला.\nदरम्यान, या घडामोडी घडत असतानाच कदम यांच्याविरुद्ध विनयभंग, दमदाटी, तोडफोड, धमकी देण्याचे गुन्हे दाखल करण्यात आले. या गुन्ह्यांमध्ये कदम यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तविली जात होती. निफाड येथे सोमवारी सकाळी 11 वाजता कदम यांच्या विरोधातील कारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेकडून निषेध मोर्चा निघणार होता. या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच तपासी अधिकारी, वरिष्ठ निरीक्षक देवीदास शेळके व त्यांचे पथक कदमांना शोधत होते. मात्र, पोलिसांना गुंगारा देत त्यांनी पिंपळगाव न्यायालयात जाऊन शरणागती पत्करली.\nकदम यांनी महिलांना अश्लील भाषेत शिवीगाळ करीत दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला असल्याने पोलिस कोठडीची मागणी सरकारी वकिलांनी केली, तर अँड. भाटे, पाटोदकर यांनी आक्षेप घेत जामीनपात्र गुन्हा असल्याने कोठडीची आवश्यकता नाही, असा युिक्तवाद केला. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेत न्यायालयीन कोठडी सुनावली. तोच कदम यांच्याकडून जामीन अर्ज सादर करण्यात आला. यावर न्यायालयाने 15 हजारांच्या व्यक्तिगत जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर केला.\nकदमांच्या वाहनाने शिस्तीत भरला टोल : पिंपळगावच्या ज्या टोल नाक्यावर चार दिवसांपूर्वी शुल्क भरण्यावरून वाद झाला, त्याच टोल नाक्यावरून सोमवारी न्यायालयात शरणागती पत्करण्यासाठी जाताना आमदार कदमांनी मात्र शिस्तीत 40 रुपये शुल्क भरले. या वेळी ते त्यांच्या मित्राच्या फिगोही कारमध्ये होते\nराजकीय हेतूने अडकवल्याचा आरोप\nआमदार अनिल कदम यांच्यावर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत, त्याबरोबरच लोकप्रतिनिधींनाही अपमानास्पद वागणूक देणारा पिंपळगाव बसवंतचा टोलनाका कायमस्वरूपी बंद करण्यात यावा, या मागणीसाठी सोमवारी शिवसेना, भाजप व मनसे कार्यकर्त्यांसह सर्मथकांनी निफाड येथे तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. मार्केट यार्डापासून निघालेल्या या मोर्चाचा समारोप तहसील कार्यालयाजवळील शिवाजी चौकात झाला. आमदार धनराज महाले, शिवसेना नेते बंडूकाका बच्छाव यांच्यासह उपस्थित नेत्यांनी भाषणामध्ये मतांच्या राजकारणासाठीच आमदार कदमांना या प्रकरणात अडकवण्यात आल्याचा आरोप केला.
मुंबई - मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुन्हा एकदा एन्काउंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे यांच्यावर आरोप केले. यावेळी त्यांनी मनसुख हिरेन यांच्या पत्नीन दिलेली दिलेली तक्रारच वाचून दाखवली. हिरेन यांच्या पत्नीची तक्रार वाचून दाखवताना देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, वाझे माझ्या पतीचे ओळखीचे होते. नोव्हेंबर २०२० मध्ये त्यांनी सदर कार वापरली होती. ४ महिने कार वाझे यांच्याकडे होती. २६-२-२०२१ वाझे यांच्यासोबत माझे पती मुंबई गुन्हे शाखेत गेले होते. हिरेन यांची चौकशी फक्त वाझे यांनी केली आणि त्यांच्याच सांगण्यावरून तक्रार दाखल केली होती. चौकशी झाल्यानंतरही तक्रार अर्ज देण्यात आला तोही वाझे यांच्या सांगण्यावरून दिला होता. वाझे यांनी माझ्या पतीला अटक करुन घ्यायला सांगितले होते, मग दोन तीन दिवसात बाहेर काढू असेही सांगितले होते. याप्रकरणी मनसुख यांनी वकीलांशी बोलून घ्यायला सांगितले होते. हा खून वाझे यांनी केला असावा, असा माझा संशय आहे. २०१७ मध्ये ४० लाखांच्या खंडणी प्रकऱणात धनंजय गावडे, सचिन वाझे यांची नावे समोर आली. दोघांनीही अटकपूर्व जामीन घेतला होता. मनसुख यांचे शेवटचे लोकेशन गावडेंकडे होते आणि त्यानंतर ४० किमी दूर मृतदेह सापडतो. मृतदेह मुंब्य्राच्या खाडीत फेकण्यात आला. पण ओहोटी असल्याने मनसुख यांचा मृतदेह बाहेर आला. सचिन वाझे यांच्याविरोधात इतके पुरावे असताना त्यांना अटक करण्यात यावी. सचिन वाझे यांनीच मनसुख यांची हत्या केल्याचा आरोप फडवीसांनी यांनी केला. या आरोपांमुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. दरम्यान, ठाणे शहर पोलीस यांच्याकडून मनसुख हिरेन यांच्या अकस्मात मृत्यू प्रकरणाचा तपास दहशतवाद विरोधी पथक यांच्याकडे गृह विभागाने दिलेल्या आदेशानंतर वर्ग करण्यात आला आहे. त्याप्रमाणे दहशतवाद विरोधी पथकाने तपासाची सर्व कागदपत्रे मुंब्रा पोलीस स्टेशनकडून हस्तगत करून पुढील तपास सुरू केला आहे. तसेच, मृत मनसुख हिरन यांच्या पत्नी विमला मनसुख हिरेन यांच्या फिर्यादीवरून द वि प पोलीस स्टेशन मुंबई येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाणी फाउंडेशनकडून गावांचा सर्वांगीण विकास साधण्याच्या उद्देशाने वॉटर कप स्पर्धेच्या धर्तीवर यंदापासून समृद्ध गाव स्पर्धा राबविली जात आहे. या स्पर्धेत वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांनाच सहभागी करून घेण्यात आले आहे. त्यात वाशिम जिल्ह्यातील कारंजा आणि मंगरूळपीर तालुक्यातील मिळून ६१ गावांचा समावेश आहे. या गावांत स्पर्धेंतर्गत विविध कामेही केली जात आहेत. त्यात नाडेप, कंपोस्ट खत, वृक्ष लागवडीसह जलसंधारणाच्या विविध कामांचा समावेश आहे. पाणी फाउंडेशनची टीम आणि प्रशासनाच्या सहकार्याने गावकरी ही कामे करीत आहेत. त्यात प्रशासनाच्या सहकार्याने गावकरी लोकसहभागातून शेततळ्यांची कामे करीत आहेत. कारंजा तालुक्यातील विळेगाव, जानोरी, बांबर्डा, मंगरूळपीर तालुक्यातील तपोवन, बोरव्हा पारव्हासह इतर काही गावांत ही जलसंधारणाची कामे वेगात होत आहेत. समृद्ध गाव स्पर्धेत सहभागी असलेल्या कारंजा तालुक्यातील जानोरी गावात प्रशासनाच्या सहकार्याने गावकऱ्यांनी भव्य शेततळ्याची निर्मिती केली आहे. अतिशय तंत्रशुद्ध पद्धतीने या शेततळ्याची निर्मिती करण्यात आली असून, शेततळ्यात पाणी जमा होण्यासाठी सोडलेल्या भागांत खडी आणि दगड टाकण्यात आले आहेत. ज्यामुळे वाहून येणाऱ्या पाण्यातील कचरा आणि गाळ बाहेरच अडणार आहे, हे शेततळे अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आयपीएल 2020 च्या संदर्भात, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी काही दिवसांपूर्वी विधान केले होते की ते हे लीग घडवून आणण्यासाठी कटीबद्ध आहेत आणि प्रत्येक पर्याय विचारात घेता ते प्रेक्षकांशिवाय यास करण्यास तयार आहेत. त्यांच्या या वक्तव्याबद्दल टीम इंडियाचे माजी अष्टपैलू इरफान पठाण यांनी म्हटले आहे की, आयपीएल स्पर्धेबाबत गांगुलीचे वक्तव्य क्रिकेटपटूंसाठी मोठे आश्वासन आहे. यावर्षी ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 विश्वचषक होणे फार कठीण असल्याचे इरफानला वाटते. इरफान पठाणने स्टार स्पोर्ट्सचा शो क्रिकेट कनेक्टेड मध्ये सांगितले की, राज्य संघटनांना लिहिलेल्या पत्रात गांगुलीने लीग आयोजित करण्याची तयारी दर्शविली होती, त्यामुळे या आयोजनाची शक्यता वाढली आहे. दुसरीकडे क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या वतीने असे म्हटले जात आहे की कोविड-19 साथीच्या वाढत्या प्रभावामुळे यावर्षी टी-20 विश्वचषक आयोजित करण्याची शक्यता कमी आहे. ते म्हणाले की आयपीएल आयोजित करण्यासाठी मंडळाचे सर्वतोपरी प्रयत्न केलेले विधान आम्ही वाचले. इरफान पठाण म्हणाले की, बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली यांचे आयपीएल आयोजित केले जाईल या संदर्भातील वक्तव्य केवळ भारतीय खेळाडूंसाठीच नाही तर जगभरातील खेळाडूंसाठी चांगली बातमी आहे. याबद्दल मी खूप उत्साही आहे आणि यामुळे सर्व क्रिकेटर्सच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्याचबरोबर आयसीसी पुढील महिन्यात टी-20 वर्ल्डकपवर निर्णय घेईल की याचे आयोजन करण्यात येईल की नाही. 35 वर्षीय इरफान म्हणाले की बरेच जण ऑस्ट्रेलियात वर्ल्ड कप संपन्न होण्याबद्दल बोलत आहेत पण मला तसे वाटत नाही कारण ऑस्ट्रेलियामध्ये नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाते. जरी हा एक छोटासा नियम असला तरी ते त्यानुसार पालन करतात. ते म्हणाले की ऑस्ट्रेलियामध्ये प्रत्येक परिस्थितीची दखल घेतली जाते. आयसोलेशनसह सामने खेळवणे फार कठीण दिसते. तर दुसरीकडे वृत्तांनुसार बीसीसीआय आयपीएलच्या 13 व्या सीझनचे आयोजन 26 सप्टेंबरपासून करू शकते आणि हे 8 नोव्हेंबरपर्यंत चालतील.
अवयवदान सप्ताह सुरू असतानाच सलग दुसऱ्या दिवशी अवयवदान होऊन सहा जणांना नवे जीवन मिळाले आहे. सोमवारच्या पहिल्या प्रकरणातील दात्याचे नाव दयानंद सहारे, तर मंगळवारी अवयवदान झालेल्यांचे नाव विजय रंगारी आहे. ब्रह्मपुरी येथील रहिवासी असलेले दयानंद सहारे (वय ५८) हे देसाईगंज तालुक्यातील कोरेगाव येथील किसन विद्यालयातून शिक्षक म्हणून अलीकडेच सेवानिवृत्त झाले. १२ ऑगस्ट रोजी आरमोरी येथे ते व त्यांचा मुलगा पीयूष दोघेही अपघातात जखमी झाले. मुलगा पीयूषला आरमोरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर दयानंद यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नागपूरला व्हीआयएमएसमध्ये हलविण्यात आले. येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. दुर्दैवाने १५ ऑगस्ट रोजी त्यांचा मेंदू मृत झाल्याचे डॉक्टरांना घोषित करावे लागले. त्यामुळे तेथील डॉ. हरी गुप्ता व प्रार्थना द्वेदी यांनी दयानंद यांच्या पत्नी वनीता व मुलगा भूपेश यांचे अवयवदानाविषयी समुपदेशन केले. यकृताचे प्रत्यारोपण मेडिट्रेनामध्ये एका ६८ वर्षाच्या पुरुषावर करण्यात आले. एक किडनी वोक्हार्टमध्ये ६३ वर्षांच्या महिलेला, तर दुसरी न्यू इरा रुग्णालयात १७ वर्षाच्या मुलीला बसविण्यात आली. डोळे मेडिकलच्या नेत्रपेढीला देण्यात आले. डॉ. विनय काळबांडे, डॉ. विवेक अग्रवाल, डॉ. गिरीश ठाकरे, डॉ. हरी गुप्ता, डॉ. हांडा, डॉ. खंडेलवाल यांनी ही प्रक्रिया पार पाडली. हृदय चेन्नई येथील एका ६७ वर्षीय व्यक्तीसाठी नेण्याचे ठरले. त्यानुसार तेथील डॉक्टरांची चमू नागपुरात दाखल झाली. मात्र येथे आल्यानंतर वैद्यकीय कारणांनी हृदयाचे प्रत्यारोपण शक्य नसल्याचे लक्षात आले. डॉ. रवी मोहनका, डॉ. प्रशांत राव, डॉ. विनायक निकम, डॉ. अमेय पंचवाघ, डॉ. सौरभ कामत, डॉ. राजन गर्ग यांनी यकृत प्रत्यारोपण केले. एका किडनीचे प्रत्यारोपण डॉ़. प्रकाश खेतान, डॉ. शाबीर राजा, डॉ. रवी देशमुख यांनी, तर दुसऱ्या किडनीचे प्रत्यारोपण डॉ. संजय कोलते, डॉ. सूर्यश्री पांडे यांनी केले. प्रत्यारोपण समन्वयक म्हणून पायल कटरे यांनी काम पाहिले. प्रत्यारोपणाच्या दुसऱ्या प्रक्रियेत, खापरखेड्याजवळील चांडकापूर येथील विजय सुखदेव रंगारी यांना ११ ऑगस्ट रोजी न्यू इरा रुग्णालयात दाखल केले होते. तेथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. मंगळवारी त्यांना मेंदू मृत घोषित करताच डॉ. अश्विनी चौधरी यांनी त्यांच्या पत्नी रोशनी व व मुलांचे समुपदेशन केले. त्यांनीही अवयवदानाला होकार दिला. त्यामुळे विजय यांचे डोळे, यकृत, किडनी या अवयवांचे दान करण्यात आले. यकृत व किडनी न्यू इरामधील रुग्णांवर प्रत्यारोपण करण्यात आले, तर दुसऱ्या किडनीचे प्रत्यारोपण वोक्हार्टमधील रुग्णावर करण्यात आले. विभागीय अवयवदान सेंटरच्या अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी यांनी व्हीआयएमएस तसेच न्यू इरामधील डॉक्टरांच्या प्रयत्नांचे स्वागत केले आहे.
देवेंद्र फडणीसांचा टोला 'उद्धव ठाकरे यांनी थिल्लरबाजी करू नये' महाराष्ट्रात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राजकारण पेटताना दिसत आहे, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडायला सुरुवात झाली आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोलापूर दौऱ्यावर असताना त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. त्यांनी म्हटलं, "बिहारमध्ये प्रचार करण्यापेक्षा राज्यात जर एवढं मोठं संकट आलं आहे, तर सर्वांनी एकजुटीनं केंद्राकडे मदत मागायला हवी. " उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्याविषयी विचारल्यावर फडणवीसांनी म्हटलं, "अतिशय असंवेदनशील अशाप्रकारचं हे वक्तव्य आहे. आता लोकांना मदत अपेक्षित आहे, पण अशा प्रकारची थिल्लरबाजी ही मुख्यमंत्र्यांनी करणं शोभत नाही. मुख्यमंत्र्यांना माहिती असेल की मोदीजी डायरेक्ट लडाखला जातात, तिथं कुणीही जाऊ शकत नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यानी उगीच स्वतःची तुलना पंतप्रधानांशी करू नये. "मोदींनी स्वतः फोन करून मदत करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांना दिलं आहे. पण, अशा प्रकारच्या गंभीर दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी असं थिल्लर वक्तव्य करणं योग्य नाही. केंद्र सरकार पाहिजे तेव्हा मदत करत नाही, या उद्धव ठाकरेंच्या आरोपावर फडणवीस यांनी म्हटलं, "केंद्रानं कोणतेही पैसे अडकवलेले नाहीत. जीएसटी सरकार भरून देत आहे. काहीही आलं की फक्त टोलवाटोलवी करायची. तुमच्यात दम नाही का, मदत करायची? हिमतीनं काम करावं लागतं. यांना मदत करायची नाही, म्हणून केंद्राकडे बोट दाखवलं जातंय. "आतापर्यंत राज्यातनं 50 हजार कोटींचं कर्ज काढलंय, अजून 70 हजार कोटींचं कर्ज काढण्याची महाराष्ट्राची क्षमता आहे, त्यावर बोलायला हवं आणि मदत करायला हवी. " हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा. )
मुंबई - शिवसेना ( Shivsena ) हा नेहमी संघर्षशील पक्ष राहिलेला आहे. शिवसेना हा रस्त्यावर संघर्ष करणारा पक्ष म्हणून सुरुवातीपासूनच ओळखला जातो. मुंबईमध्ये बंद करायचा असेल तर तो शिवसेनेच पुकारावा आणि यशस्वी करून दाखवावा, अशी आजपर्यंतची या पक्षाची ख्याती आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते आणि शिवसैनिक रस्त्यावर उतरून संघर्ष करायला कधीही मागेपुढे पाहत नाही. मुंबईत झालेली अनेक आंदोलने असतील राज्यातील आंदोलने असतील किंवा हनुमान चालीसा प्रकरणामध्ये नुकतेच शिवसेनेने रवी राणा यांच्या विरोधात पुकारलेले आंदोलन असेल, शिवसेनेने सातत्याने आपला रस्त्यावरील पवित्रा किती आक्रमक आहे दाखवला आहे. मात्र, नव्या राजकीय परिस्थितीमध्ये शिवसेना अजूनही आक्रमकरित्या रस्त्यावर का उतरली नाही याची उत्तरे त्यांच्या विधिमंडळाच्या आणि न्यायालयाच्या संघर्षातही दडली आहेत. विविध लढाया एकाच वेळेस - शेंडी-जानव्याचे हिंदुत्व हे खरं हिंदुत्व नाही ही भूमिका घेणाऱ्या शिवसेनेला आता आपलं हिंदुत्व हे कसं निखळ हिंदुत्व आहे हे नव्याने सिद्ध करावे लागणार आहे. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांच्या मी पुन्हा येईल या महत्त्वाकांक्षेला सुद्धा त्यांना टक्कर द्यावी लागणार आहे. ही टक्कर वैचारिक आणि भावनिक या दोन्ही पातळ्यांवर द्यावी लागणार आहे. त्याचप्रमाणे बाळासाहेबांची शिवसेना आता फुटू पाहते आहे, ती फुटणार नाही, यासाठी त्यांना वैचारिक आणि भावनिक पातळीवर संघर्ष करावा लागणार आहे, अशी प्रतिक्रिया जेष्ठ राजकीय विश्लेषक रवींद्र आंबेकर यांनी व्यक्त केली आहे. हे सर्व संघर्ष करताना त्यांना सरकार टिकवण्यासाठी संसदीय आणि न्यायालयीन लढाई सुद्धा तितक्याच ताकदीने लढावी लागते आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत आणि त्यांचे सहकारी आता जागोजागी मेळावे घेऊन सुरू करत आहेत, हे यावरून स्पष्ट दिसते आहे. असेही आंबेकर म्हणाले. विधीमंडळ आणि न्यायालयीन लढाई - शिवसेनेने आता विधिमंडळाच्या माध्यमातून बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याचा पवित्रा घेतला आहे. त्याचबरोबर न्यायालयीन लढाई सुद्धा शिवसेना लढते आहे बंडखोर आमदारांना अपात्र करावे यासाठी शिवसेनेने न्यायालयातही आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. एकूणच शिवसेनेचा हा संघर्ष सर्व स्तरावर सुरू असल्याचे दिसते. अशी प्रतिक्रिया राजकीय विश्लेषण विवेक भावसार यांनी व्यक्त केली.
गडहिंग्लज : राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अस्मिता पोवार यांची निवड झाली. जिल्हाध्यक्षा शीतल फराकटे यांनी त्यांना नियुक्तिपत्र दिले. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सूचनेनुसार त्यांची निवड झाली. गडहिंग्लज : शहरातील सामाजिक कार्यकर्ते रमजान अत्तार यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश पाटील, किरण कदम, बाळासाहेब घुगरी, हारुण सय्यद, गुंड्या पाटील, रफिक पटेल, राजू जमादार, मंजूषा कदम, सुनीता नाईक, आदी उपस्थित होते. गडहिंग्लज : भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षपदी महावितरणचे सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता एस. आर. कांबळे यांची निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष परशुराम कांबळे यांनी त्यांना नियुक्तिपत्र दिले. गडहिंग्लज : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक महिला आघाडीच्या शहराध्यक्षपदी शबाना निहाल मकानदार यांची निवड करण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्षा मंजूषा कदम, नगरसेविका रेश्मा कांबळे, सुनीता नाईक, सुनीता वर्मा, राधिका भगत, आदी उपस्थित होते.
अनुष्का शर्मा आणि वरुण धवन यांचा बहुचर्चित सिनेमा #SuiDhaagaMadeInIndiaTrailer चा ट्रेलर नुकताच उलगडला आहे. मौजी या व्यक्तिरेखील वरूण आणि ममताच्या व्यक्तिरेखेत अनुष्का फार शोभून दिसतायत. एका सामान्य तरूणाची ही यशोगाथा आहे, ज्याला मनस्वी वागण्यामुळे कुटुंबिय, बाहेरील व्यक्ती सर्वचजण तिरस्कार करतात. पण मौजी, म्हणजेच वरूण मात्र मनमौजीच वागतोय. पण एक मात्र विशेष, या सर्वप्रसंगात त्याची पत्नी ममता त्याला प्रत्येक प्रसंगात साथ देतेय. नालायक असं, विशेषण पडलेल्या मौजीला स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी पत्नी ममता प्रोत्साहित करते आणि इथूनच सुरू होते मौजीची बेरोजगार ते रोजगार होण्याच्या प्रवासाची कहाणी. एक खुपच खुमासदार संवाद मौजी या ट्रेलरमध्ये म्हणतो, "शिव्याच खायच्या आहेत, तर त्या टाळ्यांच्या आवाजात मिळू देत. फुकटचे चप्पल काय कामाचे. " ही कथा आहे, एका सामान्य व्यक्तीच्या असमान्य संघर्षाची आणि अथक प्रयत्नांची. मौजी आणि ममता आपल्या उद्योगातून एक भारतीय ब्रॅंड उदयास कसे आणतात, हे सिनेमात पाहता येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे या सिनेमाद्वारे मेक इन इंडियाला प्रोत्साहित करण्यात आले आहे. यशराज बॅनरअंतर्गत तयार करण्यात आलेल्या 'सुई धागा मेड इन इंडिया'सिनेमात वरुण धवन आणि अनुष्का शर्मा यांचा पारंपारिक देसी अवतार पाहायला मिळतोय. दोघंही प्रथमच या सिनेमाच्या निमित्ताने एकत्र झळकत आहेत. दिल्ली, मध्यप्रदेश अशा विविध ठिकाणी हा सिनेमा चित्रित झाला आहे. सर्वांनाच या सिनेमाच्या प्रदर्शनाची प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे. शरत कटारिया दिग्दर्शित 'सुई धागा मेड इन इंडिया' 28 सप्टेंबर 2018 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
Home मॅक्स रिपोर्ट पुरग्रस्थांची व्यथा : २००५ ला मदत मिळाली नाही, आता मिळेल का ? सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील नद्यांची पाणी पातळी कमी झाली असली, तरी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील तीन गावं मात्र, अद्यापही पुराच्या पाण्याने वेढलेली आहेत. त्यातील ८ हजार १९६ ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. 2005 सालीही शिरोळ गावात पूर आला होता. याआधी पुराचे पाणी जास्त नव्हतं. मात्र, यावेळी पुराचे पाणी चार पटीने वाढले आहे. संपूर्ण गावाला पुराच्या पाण्याचा वेढा पडला होता. नागरिकांना 14 किमी लांब कर्नाटक राज्यातील सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. तब्बल 11 दिवस हे गाव पाण्यात होते. विशेष म्हणजे गावाला हेलिकॉप्टरने येणारी मदत नाकारावी लागली. कारण पॅकेज खाली सोडताना घरांच्या छताचे नुकसान होत होते. एका गल्लीत हजारहून अधिक जनावरे, काही मोजक्या उंच घरात 300 हुन अधिक माणसं गावांत अडकली होती. पाणी ओसरल्यानंतर मोठ्या प्रमाणात मदत गावाच्या पूरबाधितांपर्यंत पोहचली. मात्र, सरकारी मदत अजूनही 5000 हजारांवरच थांबली आहे. गावात अजूनही पंचनामे होण्याची गावकरी वाट बघत आहेत. मागच्या पुरानंतर नागरिकांना तुटपुंजी भरपाई देण्यात आली. पुनर्वसनाची आश्वासने दिली. पूर परिस्थितीत बचाव कार्यासाठी गावच्या तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले. पाऊस काळात सुरक्षिततेसाठी बोटी देण्यात आल्या आणि काही काळानंतर या सर्व उपाययोजना गळून पडल्या. अजूनही पूरबाधित सरकारी पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आपलं घर उभं करत होते. तोच पुन्हा आस्मानी संकटाने त्यांना शून्यावर उभे केले आहे. जिथे मागच्या पुराच्या योजनाच पोहोचल्या नाहीत. तिथे पुन्हा तेच घडणार. पण दुसरा मार्ग नसल्याने तोंडाशी आलेलं पिक मागच्या पुरातून उभं केलेलं घर, आणि मुलांप्रमाणे जपलेली जनावरं गमावल्यानंतर आता पुन्हा पूरबाधित शासनाकडून मदतीची आस लावून बसले आहेत. एक घर उभा करायला आयुष्य जातं. कष्टानं घरं उभा करायचं आणि पुराच्या तडाख्यात त्याचं होत्याचं नव्हतं होऊन जातं. परत तेच घर उभा करायचं आणि पुन्हा एकदा पुरानं ते घरं उध्वस्त करायचं. अशी परिस्थिती गावातील लोकांची झाली आहे. त्यातच आलेल्या आस्मानी संकटांवर मात करण्यासाठी सरकारनं जर मदतीचा हात दिला नाही तर, या पुराग्रस्तांनी कसं उभा राहायचं असा सवाल या गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे. सध्या गावातील अनेक घराचं नुकसान झालं आहे. त्यातच जी घर आहे त्यात इतक्या दिवस पाणी राहिल्याने ते मनुष्य वस्तीस योग्य राहणार नाही. ती कधीही या पूर ग्रस्तांच्या अंगावर कोसळू शकतात. त्यामुळं ज्यांची घर आहेत त्यांच्यावर कुठं जावं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
कोयम्बटूरच्या बाहेरील परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीला त्याच्या बाथरूममध्ये शुक्रवारी एका मोठा साप दिसला होता. इतका मोठा साप बघून त्याला धक्का बसला. सर्वात विषारी मानल्या जाणाऱ्या रसेल्स वायपर सापाने कोयम्बटूरमधील प्राणी संग्रहालयात ३३ पिल्लांना जन्म दिलाय. रसेल्स वायपर हा साप इतर सापांपेक्षा वेगळा असतो. याची खासियत ही असते की, ते एकदा ४० ते ६० पिल्लांना जन्म देऊ शकतात. प्राणी संग्रहालयाचे निर्देशक सेंथिल नाथनने न्यूज एजन्सी एएनआयला सांगितले की, 'आमच्या प्राणी संग्रहालयात नुकताच एका रसेल्स वायपर सापाने ३३ पिल्लांना जन्म दिला'. सेंथिल नाथन म्हणाला की, काही वर्षांआधी आणखी एका सापाने साठ पिल्लांना जन्म दिला होता. याआधी जूनमध्ये रसेल्स वायपर एका सर्पमित्राने कोयम्बटूरच्या बाहेरील परिसरातील एका घरातून रेस्क्यू केला होता. रसेल्स वायपर भारतात आढळणारे सर्वात विषारी सापांच्या प्रजातीपैकी एक आहे. प्राणी संग्रहालयाचे निर्देशक सेंथिल नाथन म्हणाले की, या सापांना सांभाळणं फार कठिण आहे. त्यामुळे हे सगळे साप वन अधिकाऱ्यांना सोपवले जातील. शिकाऱ्यांमुळे हे सगळेच साप जिवंत राहू शकणार नाहीत. काही वर्षांआधी एका सापाने तब्बल ६० पिल्लांना जन्म दिला होता. कोयम्बटूरच्या बाहेरील परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीला त्याच्या बाथरूममध्ये शुक्रवारी एका मोठा साप दिसला होता. इतका मोठा साप बघून त्याला धक्का बसला. त्याने नंतर काही सर्पमित्रांची मदत मागितली होती. त्यांनी हा साप रसेल्स वायपर असल्याचे ओळखले. हा साप सर्वात विषारी सापांपैकी एक आहे. वन विभागाच्या टीमने सांगितले की, रसेल्स वायपर सापाच्या पिल्लांची योग्य ती काळजी घेतली जात आहे. प्राणी संग्रहालयाचे निर्देशक सेंथिल नाथन म्हणाले की, सर्व पिल्ले चांगले आहेत. रसेल्स वायपर सापाने एका वेळी इतक्या पिल्लांनी जन्म देणं शुभ संकेत मानला जातो.
ठाणे, १३ सप्टेंबर (वार्ता. ) - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शरीर आणि गणपतीचे शिर असे चित्र फेसबूकवर 'पोस्ट' करून ते प्रसारित करणार्यावर वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (गणेशोत्सवाच्या कालावधीत हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा केलेला हा जाणीवपूर्वक प्रयत्न आहे, हे लक्षात घ्या ! - संपादक) या 'पोस्ट'मुळे गणेशभक्त, तसेच डॉ. आंबेडकर यांचे अनुयायी यांकडून संताप व्यक्त होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चित्राला गणपतीचा मुखवटा लावलेले चित्र जनार्दन केशव-आवाम नावाच्या व्यक्तीने फेसबूकवर 'पोस्ट' (प्रसारित) केले होते. त्याखाली 'सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा, मूर्तीकाराच्या कल्पकतेचे आणि कार्यकर्त्यांच्या संकल्पनेचे कौतुक, फारच आनंदी चित्र', असा संदेश लिहिण्यात आला होता. या 'पोस्ट'मुळे सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याने अनेकांनी जनार्दन केशव-आवाम यांना ही 'पोस्ट' डिलीट करण्याची (काढून टाकण्याची) विनंती केली होती; मात्र आवाम यांनी ही 'पोस्ट' काढली नाही. त्यामुळे शास्त्रीनगर येथील उमेश इंदिसे यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार नोंदवली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत. या प्रकरणी राजाभाऊ चव्हाण नावाच्या व्यक्तीनेही नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. ठाणे शहरात हिंदूंच्या देवतांच्या विडंबनाच्या घटना वाढत असल्याने हिंदूंमध्ये संतापाची लाट ! काही दिवसांपूर्वी ठाणे पोलिसांनी कोरोनाविषयी जनजागृती करण्यासाठी श्री गणेशाची पोलिसाच्या वेशातील प्रतिकृती ठाणे येथील जांभळीनाका भागात असलेल्या बाजारपेठेतील रस्त्यावर ठेवल्याचा संतापजनक प्रकार केला होता. श्री गणेशाच्या प्रतिकृतीच्या हातात फलक ठेवण्यात आला होता. धर्माभिमानी हिंदूंनी पोलिसांना हे विडंबन असल्याचे सांगूनही त्यांनी त्यांची चूक न स्वीकारता ट्विटरद्वारे उद्दाम उत्तरे दिली होती. ठाणे शहरात वारंवार घडत असलेल्या विडंबनाच्या अशा प्रकारांमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. हिंदूंमध्ये संतापाची लाट आहे. 'संबंधितांवर कारवाई कधी होणार ? ' असा संतप्त प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.
सलमान खानपासून (Salman Khan)दीपिका पदुकोणपर्यंत (Deepika Padukone) बॉलिवूडच्या जवळपास सर्वच प्रसिद्ध कलाकरांचे स्वतःचे बॉडीगार्ड (Bodyguard) आहेत. हे कलाकार आपल्या चाहत्यांना तेव्हाच भेटतात, जेव्हा त्यांच्यासोबत त्यांचे बॉडीगार्ड असतात. ज्यापद्धतीनं हे बॉडीगार्ड कलाकारांची पूर्ण काळजी घेतात, त्याचप्रमाणे कलाकारही बॉडीगार्डच्या मानधानाची पूर्ण काळजी घेतात. कारण, कलाकारांचा बॉडीगार्ड होणं, ही सोपी गोष्ट नाही. त्यांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. अशात सलमान खान, दीपिका, अक्षय कुमार (Akshay Kumar), आणि शाहरूख खानसारखे (Shahrukh Khan) कलाकार आपल्या बॉडीगार्डला किती मानधन देतात जाणून घेऊया. सलमान खान - सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा जवळपास सर्वांनाच माहिती आहे. अनेक वर्षांपासून शेरा सलमान खानसोबत आहे. अशात आता तो सलमानसाठी कुटुंबीयातील एखाद्या सदस्यापेक्षा कमी नाही. सलमान शेराला दरवर्षी 2 कोटी इतकं मानधन देत असतो. याशिवाय शेरा एक सिक्यूरिटी फर्मही चालवतो. दीपिका पदुकोण - दीपिकाचा बॉडीगार्ड आहे जलाल. जलाल दीपिकाचा किती खास आहे, याचा अंदाज यावरुनच लावला जाऊ शकतो, की दीपिका रणवीरच्या लग्नात अभिनेत्रीचे नातेवाईक पोहोचले नसले, तरी प्रत्येक कार्यक्रमाला जलाल तिथं उपस्थित होते. प्रत्येक वर्षी रक्षाबंधनला दीपिका जलालला राखी बांधते. मीडिया रिपोर्टसनुसार, दीपिका आपल्या बॉडीगार्डला दरवर्षी 1 कोटी इतकी फी देते. अनुष्का शर्मा - अनुष्का शर्माचे बॉडीगार्ड आहेत, प्रकाश सिंह. प्रकाश सिंह अनुष्कासोबत प्रत्येक ठिकाणी हजर असतात. सार्वजनिक ठिकाण असो किंवा चित्रपटाचा सेट प्रकाश नेहमी अनुष्काच्या आसपास असतात. अनुष्का दरवर्षी प्रकाशला 1. 2 कोटी रुपये देते. शाहरूख खान - शाहरूख खानचा बॉडीगार्ड रवि सिंह आहे. रवि सिंह मागील 9 वर्षांपासून शाहरूखचं रक्षण करत आहे. रवि सिंहला शाहरूख आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणं मानतो. बॉलिवूडच्या बॉडीगार्डमध्ये रवि सिंह सर्वाधिक पैसे कमावणाऱ्या बॉडीगार्डपैकी एक आहे. म्हटलं जातं, की रवि सिंहला शाहरूख दरवर्षी 2. 6 कोटी सॅलरी देतो. कॅटरिना कैफ - कॅटरिना आपल्या रक्षणासाठी सर्वाधिक विश्वास बॉडीगार्ड दीपक सिंहवर ठेवते. दीपक आधी शाहरूख खानचा बॉडीगार्ड होता. कॅटरिना दीपकला दरवर्षी 1 कोटी रूपये देते. अक्षय कुमार - अक्षय कुमारच्या रक्षणाची जबाबदारी त्याचा बॉडीगार्ड श्रेयश ठेले याच्यावर आहे. अक्षय कुमार आपल्या रक्षणासाठी श्रेयशला दरवर्षी 1. 6 कोटी देतो. आमिर खान - जेवढी काळजी आमिरचा बॉडीगार्ड युवराज घोरपडे आमिर खानची घेतो. तितकीच काळजी आमिर घोरपडेंच्या सॅलरीची घेतो. आमिर खान आपल्या बॉडीगार्डला दरवर्षी 2 कोटी रूपये देतो.
Maharashtra Lockdown 5. 0 Update: जाणून घ्या... कोठे काय सुरू राहणार, कोठे काय बंद राहणार? Maharashtra Lockdown 5. 0 Update: Knowing what will continue where, what will stop where? एमपीसी न्यूज - लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यासाठी महाराष्ट्र शासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. महाराष्ट्रात कोणत्या विभागात काय सेवा-सुविधा चालू राहणार, कोणत्या भागात काय बंद राहणार याबाबतची एक यादी मुख्यमंत्री कार्यालयाच्या वतीने संध्याकाळी प्रसिद्ध करण्यात आली आहे. कन्टेनमेंट झोन, कन्टेनमेंट झोनच्या बाहेर व मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद आदी महापालिका क्षेत्र असे तीन विभाग करण्यात आले आहेत. विभागानुसार कोणत्या सेवा-सुविधा सुरू राहणार आणि कोणत्या बंद राहणार हे जाणून घ्या....
नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल रिझर्व्ह बँकेने LIC हाउसिंग फायनान्स लिमिटेडला 5 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. एलआयसी हाउसिंग फायनान्स गृहकर्ज घेणाऱ्या ग्राहकांसाठीच्या नियमांचे पालन करण्यास सक्षम नसल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. एलआईमध्ये गुंतवणूक करणारे ग्राह आणि एसेट्समध्ये करण्यात आलेल्या गुंतवणूकीवर फ्लोटीग चार्ज लावण्यात अयशस्वी ठरल्यामुळे नॅशनल हाऊसिंग बँकेच्या सेक्शन 29 बी चं पालन करण्यास अयशस्वी ठरल्याने हा दंड ठोठावल्याचे आरबीआयनं सांगितलं. यासोबतच एलआयसी हाऊसिंग फायनॅन्सप्रमाणे चार्जला रजिस्ट्रार ऑफ कंपनीकडे नोंदणीही केली नव्हती. यापूर्वी रिझर्व्ह बँकेने एलआयसी हाऊसिंग फायनॅन्सला एक नोटिसही पाठवली होती आणि का दंड ठोठावण्यात येऊ नये अशी विचारणा केली होती. यानंतर रिझर्व्ह बँकेनं एलआयसी हाऊसिंगवर पाच लाखांचा दंड ठोठावला. यासोबतच नियमांचं पालन करण्यात अयशस्वी ठरल्यानं आरबीआयनं म्हैसूर मर्चंट्स बँक लिमिटेडलाही पाच लाखांचा दंड ठोठावला. याशिवाय नियमांचं पालन न केल्याचा ठपका ठेवत वक्रांगी लिमिटेडलाही 1. 76 कोटींचा दंड ठोठावला आहे.
36 ST employees suspended उस्मानाबाद : गेल्या काही दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. विविध मागण्यासाठी एसटीचे कर्मचारी आंदोलन करत असल्यामुळे एसटी बंद आहे. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होताना दिसत आहे. मात्र, आता आंदोलन करणाऱ्या एसटीच्या कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या २ दिवसांपूर्वी सुमारे साडेतीनशे पेक्षा जास्त एसटीच्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. दरम्यान, आता उस्मानाबाद जिल्ह्यातील ६ आगारातील ३६ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. (36 ST employees suspended in Osmanabad district) दरम्यान, एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या ५४२ जणांचे निलंबन करण्यात आले त्यात उस्मानाबाद जिल्ह्यातील 6 आगारातील 36 कर्मचारी यांचा समावेश आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात या आंदोलनात सहभागी कर्मचारी यांच्यावर प्रथमच निलंबनाची कारवाई करण्यात आली त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. मंगळवारी ३७६ कर्मचारी याचे तर बुधवारी २० जिल्ह्यातील ५४२ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यात औरंगाबाद १०, बीड २२, परभणी २५, नाशिक ४०, अहमदनगर २०, जळगाव २८, पुणे २६, सांगली ५८, सातारा २ , उस्मानाबाद जिल्ह्यातील ३६, नागपूर ४६, वर्धा १०, भंडारा ३०, चंद्रपूर १५, अकोला २०, बुलढाणा ३४, यवतमाळ २०, अमरावती २०, सोलापूर ३५ तर रायगड जिल्ह्यातील १९ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले. एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी सुरू असलेल्या कर्मचारी यांचे निलंबन करण्यास सरकारने सुरुवात केली आहे. एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. वेळेवर पगार मिळत नसल्याने व तुटपुंजी पगार असल्याने कर्मचारी आक्रमक झाले असुन राज्य सरकार आणखी किती कर्मचारी यांचा बळी घेणार असा सवाल केला आहे. दरम्यान, उस्मानाबाद जिल्ह्यात एसटी कर्मचारी, वाहक व चालक यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. कर्नाटक , गुजरात यासह अन्य राज्यात एसटी कर्मचारी यांना अधिक वेतन दिले जाते. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात एसटी कर्मचारी यांना कमी वेतन दिले जात आहे त्यामुळे कर्मचारी यांच्यावर अन्याय होत आहे असा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. दरम्यान, मागण्या मान्य होईपर्यंत एकही बस आगाराच्या बाहेर जाणार नाही असा इशारा देत मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा पावित्रा आंदोलकानी घेतला आहे. त्यामुळे आगामी काळात आंदोलन पेटणार असल्याचे दिसते. समस्या व भावना मांडताना कर्मचारी यांना अश्रू अनावर होत रडू कोसळत आहे मात्र सरकारला जात येत नसुन निलंबन करून त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केल्याचा व आंदोलन दडपून टाकण्यासाठी निलंबनाचे दबावतंत्र वापरल्याचा आरोप होत आहे.
येथील रा. ना. गोडबोले सार्वजनिक ट्रस्ट व सातारकर नागरिकातफें प्रतिवर्षी दिला जाणारा मानाचा सातारा भूषण पुरस्कार 2018 सालासाठी गेली 25 वर्षे नाटक, चित्रपट व दूरदर्शन या तिन्ही माध्यमातून कसदार , प्रभावी लेखनाने आपली नाममुद्रा प्रस्थापित करणारे सुप्रसिध्द साहित्यिक प्रताप गंगावणे यांना जाहीर करण्यात आला आहे. दुरवाहिन्यांवरील मालिका लेखक म्हणून सर्वज्ञात आहेत. कालाय तस्मै नमः, राजा शिवछत्रपती, बाजीराव मस्तानी, पेशवा बाजीराव व सध्या प्रचंड लोकप्रिय झालेली, स्वराज्य रंक्षक संभाजी.. या मेगा सिरीयल खूप नावाजल्या जाऊन घराघरात पोहोचल्या. वीर शिवाजी ही 260 भागांची हिंदी सिरीयलही त्यांच्याच लेखणीतून साकारली होती. त्यांना उत्कृष्ट चित्रपट लेखन व नाट्य लेखनाचे राज्य व केंद्र सरकारचे अनेक पुरस्कारांबरोबर म.टा. सन्मान, चित्रकर्मी, कलारंग, भाउ फक्कड, अहिल्याबाई गौरव अश्या असंख्य पुरस्कारांनी आजपर्यत गौरवले गेलेआहे. प्रतिभा , प्रज्ञा, जिद्द व प्रयत्न यांच्या बळावर त्यांनी केलेली वाटचाल अनेक युवक,साहित्यिक व रंगकर्मीर्ना प्रेरणादायी ठरणारी आहे. गोडबोले ट्रस्टतर्फे 1991 पासून विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणार्या सातारा जिल्ह्यातील सुपत्रास सातारा भुषण पुरस्काराने गौरविले जाते. पुरस्काराचे यंदा 28 वे वर्षं असून यापुर्वी तर्कंतीर्थं लक्ष्मण शास्त्री जोशी, छोटा गंधर्व, प्रा. शिवाजीराव भोसले, ह. भ. प. बाबामहाराज सातारकर,डॉ. नीळकंठराव कल्याणी, शाहीर साबळे, शेतकरी संघटनेचे शरद जोशी, सविता प्रभुणे, डॉ.नरेंद्र दाभोलकर आदी मान्यवरांना गौरविण्यात आले आहे. यावर्षी ज्येष्ठ संशोधक डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर, रंगकर्मी बाळकृष्ण शिंदे आणि ट्रस्टचे विश्वस्त अशोक ,डॉ. अच्युत व उदयन गोडबाले यांच्या निवड समितीने ही निवड केली आहे. रुपये 25 हजार व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप असून तो लवकरच समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहेअशी माहिती गोडबोले ट्रस्टचे अध्यक्ष अरुण गोडबोले यांनी दिलीआहे.
युवकाचे पुन्हा शोले स्टाईल आंदोलन । पुढारी\tTop\nहोमपेज › Sangli › युवकाचे पुन्हा शोले स्टाईल आंदोलन\nयुवकाचे पुन्हा शोले स्टाईल आंदोलन\nPublished On: Sep 12 2018 1:49AM । Last Updated: Sep 11 2018 11:43PM\nलष्करात नोकरीचे आश्वासन देऊनही ते पूर्ण न केल्याने मंगळवारी एका युवकाने बीएसएनएलच्या टॉवरवर दुसर्यांदा चढून शोले स्टाईल आंदोलन केले. अनिल हणमंत कुंभार (वय 26, रा. इटकरे, ता. वाळवा) असे त्या युवकाचे नाव आहे. त्याच्याविरोधात आत्महत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा पोलिस ठाण्यात दाखल केला आहे.\nअनिलने आयटीआयचा वेल्डरचा कोर्स केला आहे. त्याने यापूर्वी भरतीसाठी प्रयत्न केला होता. मात्र त्याला त्यामध्ये यश आले नाही. निराशेतून दि. 27 ऑगस्ट रोजी तो स्टेशन चौकातील बीएसएनएलच्या टॉवरवर चढला होता. त्यावेळी त्याची समजूत घातल्यानंतर तो खाली उतरला होता.\nदि. 27 रोजी त्याला नोकरी देण्याचे आश्वासन अग्नीशमन तसेच पोलिस अधिकार्यांनी दिले होते. ते पूर्ण न केल्याने तो मंगळवारी पुन्हा टॉवरवर चढला होता. त्यानंतर त्याने पोलिस उपनिरीक्षक रोहित चौधरी यांना मिस कॉल दिला. चौधरी यांनी त्याला फोन केल्यानंतर त्याने टॉवरवर चढल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांसह अग्नीशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. उपनिरीक्षक चौधरी आणि अग्नीशमन दलाचे एक अधिकाऱी स्वतः टॉवरवर चढले. त्याला एक तासाच्या प्रयत्नानंतर सुरक्षित खाली आणले. पोलिसांनी त्याच्यावर आत्महत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला.
मुंबई : निवडणूक आयोगामध्ये एकनाथ शिंदे यांचा विजय झाला आहे. धनुष्यबाण निशाणी व शिवसेना हे नाव बाळासाहेबांच्या शिवसेनेला म्हणजेच शिंदे गटाला मिळाले आहे. यावर उध्दव ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आजचा निकाल लोकशाहीला अत्यंत घातक असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. उध्दव ठाकरे म्हणाले की, आजचा निकाल लोकशाहीला अत्यंत घातक आहे. आपल्या देशाचा अमृत महोत्सवी साजारा करताना पंतप्रधांनांनी लाल किल्ल्यावर घोषणा करावी की 75 वर्षाचे स्वातंत्र्य संपलेले आहे. आणि आता लोकशाही संपवून बेबंदशाही सुरु होत आहे. आजपर्यंत अनेक उदाहरणे पाहिली आहेत की सरकारची दादागिरी चालली आहे. न्याययंत्रणा सुध्दा आपल्या दबावाखाली कशी येईल. यांच्याबद्दल गेले काही दिवस केंद्रीय कायदामंत्री बोलत आहेत. आणि राज्यसभेचे अधक्ष बोलत आहेत. त्यांना न्यायमुर्ती नेमण्याचेही अधिकार हवे आहेत. हे असेच सुरु राहीले तर देशातील लोकशाही संपलेली आहे. लोकशाहीला भावपूर्ण आदरांजली वाहून आम्ही बेबंदशाहीला सुरुवात करत आहोत. हे धाडस तरी सर्व यंत्रणा घेऊन एकट्या लढणाऱ्या पंतप्रधानांनी दाखवावे, असे आव्हान त्याेनी दिले आहे. निकाल अत्यंत अनपेक्षित आहे. कारण जवळपास सहा महिने सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. 21 तारखेपासून सलग सुनावणी सुरु होईल. तो निकाल जोपर्यंत लागत नाही. तोपर्यंत निवडणूक आयोगाने कोणताही निकाल देऊ नये, अशी विनंती केली होती. पक्ष कोणाबरोबर आहे हे जर का केवळ लोकप्रतिनिधींच्या आकडेवारीनुसार ठरवायला लागलो. तर मग कोणीही धनाढ्य माणूस निवडून आलेले आमदार, खासदार विकत घेऊन पक्षाचा सर्वेसर्वा होऊ शकतो. देशाचा पंतप्रधान किंवा राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो. जशी न्यायाधीश नेमण्याची प्रतिक्रिया असते तशीच निवडणूक आयुक्त नेमण्यासुध्दा विरोधी पक्षांना सोबत घेण्याची गरज लागली आहे, असे मला आता वाटायला लागले आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.
या कथेतील मुख्य पात्रांपैकी एक 13 वर्षांचा मुलगा अँटनी आहे जो उदासीनताग्रस्त आहे. जेव्हा एक मानसिक विकार घेतो, तेव्हा माझ्यावर विश्वास ठेवा, एक गरीब माणूस दुःखी राहतो . . . त्याला हसणे आणि हसणे कठीण आहे. आता दुसरे मुख्य पात्र, किंवा नायिकाबद्दल बोलण्याची वेळ आहे. तिचे नाव बेले आहे, खरेतर अॅनाबेले, पण जेव्हा तिला तिच्या प्रिय राजकुमारीचे नाव म्हणतात तेव्हा ती मुलगी आवडते. ती 5 वर्षांची आहे आणि ती अँटनीची स्वतःची बहीण आहे. ती एक वास्तविक सूर्य आहे, ती नेहमी कुठेतरी धावू इच्छित असते, ती एकाच ठिकाणी जोरदारपणे बसते हे एक मुलगी-स्मित आहे, सुर्यप्रकाश एक किरण. ती आपल्या लोकांना इतकी खूश करते की ती जिथे जिथे येते तिथे ती सर्वत्र मित्रांना शोधते. तरीसुद्धा, ऍन्थोनी तिच्यासाठी सर्वात चांगला मित्र आहे. त्यांच्यामध्ये असा घनिष्ठ नातेसंबंध आहे की, तो कितीही असला तरी तो कितीही असला तरी त्याच्या सनी सृष्टीने ती अंधार दूर करण्यास नेहमीच मदत करते, जे कधीकधी त्याला आतून लपवून ठेवते. अँथनी आणि बेलेमध्ये आणखी पाच भाऊ व बहिणी आहेत. पण या दोन आणि दिवस एकमेकांच्याशिवाय जगू शकत नाहीत. तो तिच्याबरोबर चित्रपट पाहतो. तो स्केटबोर्डवर तिच्यासोबत स्केटबोर्ड करतो, आणि रात्री तो त्याला बेडवर घालवतो. या दोघांना स्वतः चा थोडा विधी आहे, ज्याने वाईट स्वप्नांचा धिक्कार केला. तर, दर संध्याकाळी अँटनीला, एक जादूचे परागकरासह बेल्लेचे डोके छिद्राप्रमाणे. दोघांनाही असे वाटते की ते दुःस्वप्नाने संरक्षण करते. आपल्या 7 व्या बाळाच्या जन्मानंतर आई ऍन्थोनी आणि बेलेसाठी असामान्य फोटो शूट तयार करण्याची कल्पना आली. स्त्री स्वतः टिप करते, ती डिस्ने कार्टून आवडते, आणि म्हणून ती स्वतः ला एक सुंदर ड्रेससाठी स्वतः ला ठेवण्याची इच्छा होती, जो स्वतःला वजन कमी करण्यास प्रवृत्त करते. नंतर, साइटवर, ऍन्थोनीने प्रिन्सची परिधान पाहिली. त्या दिवसापासून, तो विचारानुसार जगला, जणू तो प्रत्यक्षात तो जाणण्याचा विचार झाला होता. "मी त्याला एक राजकुमार च्या खटला खरेदी शकते का विचारले? त्याने मला सांगितले की त्याला बेल्लेसाठी एक उत्कृष्ट फोटो शूट करण्याची इच्छा आहे, "अँटनीची आई हसते. तिने हे छायाचित्र सत्र अविश्वसनीय भावना एक समुद्र दिली की जोडले, संस्मरणीय क्षण आणि उज्वल आठवणी ऍन्थोनी, स्थळांच्या बदलांमुळे, बाळाला तिच्या बाह्यामध्ये नेले, जेणेकरून ती स्वतःच्याच दुकानावर ठोठावत नाही. ती मुलगी प्रत्यक्ष राजकुमारीसारखी होती आणि या दोघांना किती आनंदी वाटले याची कल्पना करणे कठीण आहे.
अमेरिका, ता. 04 जून : अमेरिकेच्या डेनवरमध्ये एका धम्माल कार्यक्रमात असा काही प्रकार घडला की तिथलं वातावरण एखाद्या दंगलीप्रमाणे झालं. जेव्हा डान्स फ्लोअरवर डान्स करताना एका व्यक्तिची बंदूक खाली पडली. ती बंदुक उचलताना गोळी झाडली गेली आणि तिथे उभं असणाऱ्या एका बार टेंडरला जाऊन लागली. हा प्रकार इतक्या झटपट घडला की, तिथे सगळ्यांची धावपळ सुरू झाली. डेनवरच्या माइल हाई बारमध्ये पार्टी सुरू असताना, डान्स फ्लोअरवर हटके डान्स करून एका व्यक्तीने सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे ओढून घेतलं. अनेक जण त्याच्या डान्सचा व्हिडिओही काढत होते. असाच डान्स करताना त्या व्यक्तीने बॅक फ्लिप मारली आणि त्याच्या खिशातून त्याची बंदूक खाली पडली. घाईघाईत तो ती उचलायला गेला पण त्यातून चुकून गोळी झाडली गेली. त्या व्यक्तिच्या बंदूकीतून निघालेली ती गोळी थेट समोर उभं असलेल्या बार कर्मताऱ्याला जाऊन लागली. गोळी लागल्यामुळे हा कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. डेनवर पोलिसांच्या मते गोळी झाडलेला व्यक्ती एफबीआयचा एजंट आहे. पण तो ड्यूटीवर नसल्याने त्याची अद्याप ओळख पटलेली नाही.
नवी दिल्ली - आपल्या कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा बोनस भारतीय रेल्वेने जाहीर केला असून या प्रस्तावाला बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आदींसह अर्थमंत्री अरूण जेटली, रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांच्यासह मंत्रिमंडळातील प्रमुख मंत्री या बैठकीला उपस्थित होते. रेल्वेच्या १२. ३० लाख कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. उत्पादकतेवर देण्यात येणाऱ्या बोनससाठी वेतनाची मर्यादा ही ७ हजार रूपयाइतकी निश्चित करण्यात आली आहे. पात्र रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांच्या बोनसपोटी १७९५१ रूपये मिळणार आहेत. दसऱ्याच्या आत कर्मचाऱ्यांना बोनसची ही रक्कम दिली जाण्याची शक्यता असल्यामुळे २,२४,५४५ कोटी रूपयांचा बोजा रेल्वेवर पडणार आहे.
मेलबर्न - भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सांगता विजयाने केली. कसोटीपाठोपाठ भारतीय संघाने यजमानांना पराभवाची चव चाखवली आणि इतिहास घडविला. मेलबर्नवर भारताने तिसरा वन डे सामना सात विकेट राखून जिंकला आणि वन डे मालिका २-१ अशी जिंकली. ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकणारा भारत हा पहिला आशियाई संघ ठरला. त्यात भर म्हणून भारतीय संघाने वन डे मालिकाही जिंकली. मालिका विजयानंतर खेळाडूंना देण्यात आलेल्या रकमेवरून महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी आयोजकांना धारेवर धरले. महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा मॅच फिनिशरची भूमिका बजावली. युजवेंद्र चहलने रचलेल्या मजबूत पायावर धोनीने विजयी कळस चढवला. चहलने सहा विकेट घेतल्या. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात प्रथमच द्विदेशीय वन डे मालिका जिंकण्याचा पराक्रम करून दाखवला. फलंदाजांची कसोटी पाहणाऱ्या खेळपट्टीवर धोनीने एका बाजूने संयमी खेळ करताना भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाचे 231 धावांचे माफक लक्ष्य भारताने 7 विकेट राखून सहज पार केले. धोनीने नाबाद 87 धावा केल्या. कर्णधार विराट कोहली ( 46) आणि केदार जाधव ( नाबाद 61 ) यांनीही विजयात हातभार लावला. भारताने 49. 2 षटकांत 3 बाद 234 धावा केल्या. मॅन ऑफ दी मॅच पुरस्कार मिळालेला युजवेंद्र चहल आणि . मॅन ऑफ दी सीरिज जिंकलेला महेंद्रसिंग धोनी यांना आयोजकांनी ५०० डॉलरचा चेक देउन थट्टा केली का , असा सवाल गावस्करांनी केला. ते म्हणाले," फक्त ५०० डॉलर ( ३५००० रुपये) ? आयोजकांनी या मालिकेतून इतका पैसा कमावला आणि खेळाडूंना किती दिले? त्यांनी खेळाडूंना योग्य बक्षीस रक्कम का दिली नाही? खेळाडूंमुळेच ही मालिका झाली. " Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.
कामानिमित्त सतत स्थलांतर करणाऱ्या मजुरांच्या मुलांसाठी शिक्षणाची गंगा ठरलेल्या येथील दिशा हॅप्पी स्कूलमध्ये शिकणाऱ्या चिमुकल्यांची यंदाची दिवाळी देवळाली इनरव्हील क्लबमुळे गोड झाली. कामानिमित्त सतत स्थलांतर करणाऱ्या मजुरांच्या मुलांसाठी शिक्षणाची गंगा ठरलेल्या येथील दिशा हॅप्पी स्कूलमध्ये शिकणाऱ्या चिमुकल्यांची यंदाची दिवाळी देवळाली इनरव्हील क्लबमुळे गोड झाली. या मुलांसोबत प्रकाशाचा उत्सव साजरा करताना क्लबतर्फे चॉकलेट, केक, मिठाई अन् फरसाणचे वाटप करण्यात आल्याने चिमुकले हरखून गेले होते. येथे शिकणाऱ्या मुलांचे आई-वडील वीतभर पोटाची खळगी भरण्यासाठी डोक्यावर पाट्या-विटा वाहत असताना अंधःकाराने भरलेल्या या निरागसांच्या जीवनात आशेचा किरण आणण्याचे कार्य दिशा हॅप्पी स्कूल करीत आहे. देवळालीतील इनरव्हील क्लब, कॅन्टोन्मेंट बोर्ड व मधुर बिल्डर्सच्या सहकार्याने आनंदरोडवर सुरू असणाऱ्या बांधकाम क्षेत्रावरीलदिशा हॅप्पी स्कूलमध्ये क्लबच्या अध्यक्षा श्रुती मदान, माजी अध्यक्षा शैलजा गर्ग, शशी मदान, भैरवी बक्षी, मोहिनी मनचंदा, अनिता नागपाल आदींनी येथील मुलांसोबत दिवाळी साजरी केली. चिमुकल्यांना चॉकलेट, केक, फरसाण, मिठाई आदींचे वाटप, तसेच शिक्षिका मुनेश्वरी चिंधालोरे यांना साडीची भेट देण्यात आली. यावेळी मुलांनी दिवाळीवर आधारित विविध गाणी सादर करतानाच स्वतः आकाशकंदील व दिवेदेखील बनवून दाखविले. आपण सण-उत्सव साजरे करताना समाजातील वंचित घटकांनादेखील आनंद दिला पाहिजे, या जाणिवेतून हा उपक्रम राबविण्यात आला. गोरगरिबांनादेखील हा आनंद देणे आपले सामाजिक कर्तव्य आहे.
मुंबई - गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षक ज्या चित्रपटाची आतुरतेनं वाट पाहत होते. तो आता थो़ड्याच दिवसांत प्रेक्षकांना पाहता येणार आहे. 83 या चित्रपटातून पुन्हा एकदा त्या विश्वचषकाच्या आठवणी ताज्या होणार आहेत. कबीर खान दिग्दर्शित, '83' हा निश्चितपणे 2021 च्या बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे, जो भारताच्या 1983 च्या ऐतिहासिक विश्वचषक विजयाची गाथा आपल्याला सांगतो. 'लेहरा दो' लाँच केल्यानंतर, निर्मात्यांनी अलीकडेच रणवीर सिंग आणि इतर प्रतिभावान कलाकारांच्या 'बिगडने दे' चित्रपटातील दुसरे गाणे आता प्रदर्शित झाले आहे. बेनी दयाल यांनी गायलेले आणि प्रीतम यांनी संगीतबद्ध केलेले हे गाणे भारतीय क्रिकेट संघाचे भावविश्व प्रेक्षकांसमोर उभे करते. आणि त्यांना त्या प्रसंगांची आठवण करुन देते ज्यातून भारतीय संघानं प्रभावी वाटचाल केली होती. या चित्रपटामध्ये रणवीर सिंग आणि त्याच्या टीमने उत्तम प्रकारे अभिनय केला आहे. 'बिगडने दे' आपल्याला टीम इंडियाची तयारी आणि इतिहास रचण्याआधी पडद्यामागील गंमती जमती समोर आणतो. रणवीर सिंह चित्रपटात कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. यासोबतच ताहिर राज भसीन, जीवा, साकिब सलीम, जतिन सरना, चिराग पाटिल, दिनकर शर्मा, निशांत दहिया, हार्डी संधू, साहिल खट्टर, अम्मी विर्क, आदिनाथ कोठारे, धैर्य करवा, आर बद्री आणि पंकज त्रिपाठी देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. दीपिका पादुकोण या चित्रपटात कपिल देव यांची पत्नी रोमीची व्यक्तिरेखा साकारणार आहे. फैंटम फिल्म्स यांच्याद्वारे कबीर खान फिल्म्स प्रोडक्शनच्या 83 ला सादर करण्यात येणार आहे. रिलायंस एंटरटेनमेंट आणि पीवीआर पिक्चर्स चा हा चित्रपट 24 डिसेंबर 2021 ला हिंदी, तमिळ, तेलुगु, कन्नड़ आणि मलयाळम मध्ये 3डी रिलीज होणार आहे. कमल हसन यांची राजकमल फिल्म्स इंटरनेशनल, अक्किनेनी नागार्जुन यांची अन्नपूर्णा स्टूडियो, पृथ्वीराज प्रोडक्शंस यांनी चित्रपटाचे अनुक्रमे तामिळ, तेलुगु आणि मलयाळम व्हर्जनकरिता रिलायंस एंटरटेनमेंट सोबत एकत्र आले आहेत. पृथ्वीराज प्रोडक्शन आणि किच्छा सुदीपा यांची शालिनी आर्ट्स फिल्म मलयाळम आणि कन्नड व्हर्जन प्रस्तुत करण्यासाठी तयार आहेत.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव प्रतापराव गोडसे यांचे आज ( सोमवार) सायंकाळी ६. ४५ वा. निधन झाले. ते ६५ वर्षाचे होते. त्यांच्या मागे पत्नी, १ मुलगा, १ मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. यकृताच्या कर्करोगासंदर्भात त्यांच्यावर मागील दोन आठवड्यापासून ससून रुग्णालयात उपचार सूरु होते. ट्रस्टच्या माध्यमातून ते ५० वर्षाहून जास्त कार्यरत होते. २०१० पासून ते अध्यक्ष होते. या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम सातत्याने राबविले.
मराठी वाङ्मयकोश : खंड ३ (ग्रंथपरिचय ) रूद्रवीणा : कांत, वा. रा. संपादक : प्रतिभा प्रकाशन, औरंगाबाद, १९४७. या संग्रहात १९३० ते १९४७ पर्यंतच्या वा. रा. कांत यांच्या प्रसिद्ध व अप्रसिद्ध स्फूट कविता संग्रहित केल्या आहेत. यांत स्वातंत्र्यसन्मुख भारताच्या जनजागरणाचे प्रतिबिंब, त्याग, तेज आणि प्रसन्नता ही वैशिष्ट्ये, काही प्रेमगीत आहेत. त्यांत कधी, निराशमनाचे मूकभाव, कधी निर्व्याज प्रसन्नता, कधी प्रणयिनी स्त्रीचे वर्णन इत्यादि विषयांचे मुलायम चित्रण. अर्थवाही, अनुप्रासगर्भ नादमय शब्दरचना कवितांच्या शीर्षकांखालोखालच 'रुद्राक्षकन्या ',' वासणी', 'भृंगावर्तनीस्वैर', 'नववधू 'अशा जाति प्रत्येक कवितेवर दिल्या आहेत. सौ. वसुंधरा बनहट्टी रूपगर्विता आणि सहा गोष्टी : केळकर, दिवाकर कृष्ण (दिवाकर कृष्ण) वाग्विलास मंडळ, हैदराबाद, १९४१. दिवाकर कृष्ण यांचे पूर्ण नाव दिवाकर कृष्ण केळकर त्यांचे शिक्षण एम.ए., एलएल.बी.पर्यंत झाले होते. ते हैदराबाद येथे वकील होते. ते कथाकर म्हणून प्रसिद्ध आहेत. 'कथा' हा वाङ्मय प्रकार बंदिस्तपणामुळे ओळखला जातो. यामध्ये कादंबरीचा पाल्हाळ नाही. यामध्ये अनुभव, पात्र रचना, वातावरण, निवेदन, भाषा यांचा समग्र विचार करून कथालेखन केले जाते. दिवाकर कृष्णांना मराठी लघुकथेचे शिल्पकार मानले जाते. तरीही त्यांचे कथालेखन अत्यंत अल्प आहे. साधारण २५ ते ३० कथा भावनाविष्कार, भाषेचा प्रयोजक वापर, अनुभवाभिमुख कथा, वातावरण निर्मिती इत्यादी विशेषणे त्यांच्या कथेच्या संदर्भात व्यक्त झाली आहेत. त्यांच्या कथेत स्त्री जीवनाचा अविष्कार झाला आहे, स्त्री मनाचे विविध पैलू व्यक्त झाले आहेत. प्रीतीची विविध रूपे त्यांनी कल्पकतेने चित्रित केली आहेत. त्यांचे तीन कथासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. पहिला समाधि आणि सहा गोष्टी (१९२७), दुसरा प्रस्तुतचा १९४१ साली प्रसिद्ध झालेला संग्रह, तिसरा १९५५ साली प्रसिद्ध झालेला संग्रह, 'महाराणी आणि इतर कथा '. प्रस्तुत संग्रहात सात कथा समाविष्ट आहेत. पहिली कथा 'रूपगर्विता'. नायिका पूर्वाश्रमीची आनंदी. पद्माकराशी लग्न झाल्यानंतर पद्मावती नायिकेचे वर्णन अप्रतिम. परंतु नायिका आपला सौंदर्याचा वृथा अभिमान बाळगून आपला नाश करून घेते. 'दंडकारण्यातील प्रणयिनी' या कथेत नाजूक प्रणयभावनांचा संघर्ष चित्रित केला आहे. 'नीलम ' 'ऋता' आणि ' देवव्रत' या तीघांची ही प्रणयकथा आहे. आर्यकुळ, दस्यूकुळ यांचे वर्णन तसेच वातावरण निर्मितीसाठी निसर्ग वर्णन हे तपशीलाने या कथेत येते. आर्य-दस्यु संघर्षाचे भावुक कथानक चित्रित केले आहे. ऋता देवव्रत-आणि-नीलम यांच्यासाठी स्वतःला दरीत झोकून देऊन आत्महत्या करते. ' आशाबंध' या कथेत आशावतीच्या मनात लहानपणापासून शेजारी रहात रुद्रवीणा-रूपेरी वाळू असलेल्या तरुणाबद्दल प्रीती निर्माण होते. पण ती व्यक्त न करता आल्याने तिचे आयुष्य दुःखमय होते. 'लोकनिंदेचा व्रतभंग' या कथेची नायिका सुधा सबनीस विवाहानंतरची 'दमयंती देवी' या नायिकेच्या मोकळ्या वागण्याने समाजात तिच्याबद्दल गैरसमज निर्माण होतात. या संदर्भात नायिकेच्या मनात निर्माण झालेली आंदोलने चित्रित केली आहेत दीपगृहावरील मध्यरात्र' या कथेत कोळी जमातीत जन्मलेल्या परंपराप्रिय, धाडसी तरुणीचे चित्रण येते. संवादासाठी कोकणी भाषेचा अवलंब या कथेत आहे. सुरुवातीला ती नायकाबरोबर संघर्ष करते पण त्याचे तिच्यावरील प्रेम पाहून अंती ती त्याचा स्वीकार करते. नायिकेच्या आई-वडिलांचे तसेच निसर्गाचे यथातथ्य वर्णन प्रसंगानुरूप या कथेत येते. अनुराधेचे स्वप्न' ही कथा अनुराधेची साहजिकच स्त्री जीवनाचे यात चित्रण आहे. अनुराधेचे एका तरुणावर प्रेम असते पण तिचे लग्न मात्र अन्य तरुणा बरोबर होते. प्रियकर सासरी तिला भेटायला येतो यामुळे तिच्या सासरच्या लोकांच्या मनात गैरसमज निर्माण होतो ती गृहत्याग करते व परित्यक्तेचे जीवन जगते. 'मलयागिरीवरील वसंतकाल' या कथेत आत्तापादी खेड्यातील एका विवाहित स्त्रीचे कथन आहे. प्रसंगानुरुप कथेत व्यक्तिचित्रण, निर्सग वर्णन या गावातील समाजाच्या चालीरीतीचे चित्रण यात येते. श्री वि. स. खांडेकर याना दिवाकर कृष्णाच्या मितभाषा व सूचक प्रेमकथांचा मोठा अभिमान वाटत असे. ही कथा त्यांच्या कथाहून सर्वस्वा भिन्न कथा होती आणि नवकथेला आवाहन करणारी होती. रूपेरी काणेकर, अनंत. प्रकाशक : देशमुख आणि वाळू : कंपनी, पुणे, १९४७. रुपेरी वाळू" या पुस्तकाची पहिली आवृत्ती खलिल जिब्रानच्या कणिकांचा अनुवाद म्हणून प्रकाशित झाली. मार्मिकपणा, उपरोध, भेदकदृष्टी, जीवनमूल्यांचे समन्वयी आकलन हे जिब्रानच्य छोट्या कथा परिच्छेदातून नजरेत भरणारे विशेष कालेकरांच्याही या कणिकात आढळून येतात. प्रश्नोत्तरे, मधील विस्मयकारकता, वैशिष्ट्य, माकड, शत्रू, शिंपी, शक्ती, यातील मार्मिक व्याजोक्ती, सौजन्य, भिकारी, मधील उपरोधिकता, शहाणा, स्वातंत्र्य, सौंदर्य, वगैरेतून दिसणारे जीवनदर्शन हे विशेष. त्यावर जिब्रानचा ठसा उमटला आहे. एकच विचार घेऊन तो अत्यंत थोडक्या शब्दात सौंदर्यपूर्णरितीने प्रकट करणे व एखादे तत्त्वदर्शन घडविणे हे जे कणिकांचे वैशिष्ट्य ते येथे दिसते. पुस्तकामध्ये एकूण १८ कणिका आलेल्या असून कल्पना वैचित्र्य आणि अर्थप्रतीति याबाबत त्या सरस आहेत. मानवी जीवनाचे वस्तुनिष्ठ दर्शन, रुपकांचा अवलंब यांचा येथे प्रत्यय येतो. वास्तविक पाहता काणेकरांच्या या कणिका जिब्रानच्या कोणत्याही कणिकांचे अनुवाद नसून त्या स्वतंत्रपणे लिहिल्या आहेत. सुधा कापरे रेंदाळकरांची कविता - रेशमांच्या गांठी रेंदाळकरांची कविता : खंड प्रथम व द्वितीय (१) प्रथम खंड : प्रकाशक : विठ्ठल हरी बर्वे, आर्यभूषण प्रेस, पुणे. पहिली आवृत्ती १९२४, दुसरी आवृत्ती १९४०. (२) द्वितीय खंड : प्रकाशक : वामन जनार्दन कुंटे, सांगली, १९२८. एकनाथ पांडुरंग रेंदाळकर यांची समग्र कविता संपादित करण्याचा प्रयत्न वामन जनार्दन कुंटे, सांगली यांनी केला 'प्रयत्न केला' असे म्हणण्याचे कारण रेंदाळकरांची एकूण कविता तीन खंडांत प्रसिद्ध करावयाचे कुंटे यांनी ठरविले होते. परंतु त्यातील दोनच खंड प्रसिद्ध झालेले दिसतात. प्रथम, खंडामध्ये रेंदाळकरांच्या कवितांचे (१) मन्दारमञ्जरी, (२) काव्यकुसुममाला, (३) कर्णमंगल, (४) काव्यगुंफा व (५) स्फुट कविता असे पाच विभाग केले आहेत. द्वितीय खंडात (१) यमुनागीत, (२) कादंबरीरुपांतर, (३) शांतीसोपान, (४) रतिविलाप, (५) विज्ञानसार, (६) श्री अवधूतगीता, (७ नितिमंडन, (८) गंगालहरी, (९) शिरक्यांची तारा, (१०) जाधवांची मंजुळा (अपूर्ण), (११) बाष्पबिंदू, (१२) पद्मपुष्पांजली या खंडकाव्य दीर्घकाव्यसदृश्य काव्याचा समावेश केला आहे. रेंदाळकर हे मराठीतील पहिले निर्यमक कवितेचे पुरस्कर्ते म्हणून ओळखले जातात. १८८७-१९२० असा ३३ वर्षांचा अल्पायुष्यकाल लाभलेल्या रेंदाळकरांनी विपुल कविता लिहिली आहे. विसाव्या शतकाच्या सरुवातीच्या काळात विलक्षण वाटणाऱ्या स्त्री-पुरुषप्रेमाचे वर्णन रेंदाळकरांनी निर्भयतेने केलेले दिसते. त्यांची सरुवातीची प्रेमकविता संस्कृत वळणाची दिसून केशवसुतांच्या प्रभावाने रेंदाळकर प्रेरित झालेले दिसतात. केशवसुतास', ' केशवसुत व म्हातारी' या त्यांच्या कवितातून याची साक्ष मिळते. 'शिंग' या काव्यात 'तुतारी' चा पडसाद दिसतो. उघडी नयन रम्य उषा हंसत हंसत आली" या सुंदर ओवीने सुरू होणारी 'प्रबोधन' ही कविता पहाटेच्या वातावरणाची सुंदर रम्य चित्र रेखाटते. ती आजही रसिकांना मोहिनी घालते. या कवितेतील रम्य निसर्गवर्णन मनाला उल्हसित करते. अशा उल्हास देणाऱ्या कवितांपेक्षा रेंदाळकरांनी उदासीन वृत्तीचे दर्शन देणाऱ्या कविताच अधिक प्रमाणात लिहिल्या. रेंदाळकरांनी निर्यमक कविता लिहिण्याचा प्रघात पाडला त्याविषयी ग. त्र्यं. माडखोलकर यांनी प्रस्तुत ग्रंथाच्या प्रथम खंडाच्या प्रस्तावनेत पुढील उद्गार काढले आहेत, " रेंदाळकरांविषयी आदरापेक्षा अवज्ञेचे शब्द माझ्या कानावर अधिक पडले होते; आणि त्यांच्या संबंधाने उपेक्षेचीच वृत्ती सामान्यतः दृष्टीस पडे. वस्तुतः नवीन पिढीतील कवींना त्यांच्याविषयी अभिमान वाटला पाहिजे. परंतु, मराठीत निर्यमक कविता लिहिण्याचा प्रघात पाडून, त्यांनी आपला मार्ग किती सुगम केला आहे, याची जाणीव अलीकडील कवत दिसत नाही." मराठी वाङ्मयकोश : खंड ३ (ग्रंथपरिचय) दारिद्र्य, निष्प्रेम जीवन, गैरसमज, उपेक्षा यांनी ग्रासलेल्या रेंदाळकरांनी एक उत्कृष्ट विलापिका. 'अजुनी चालतोचि वाट नावाची मराठीस दिली आहे. तीत ते कष्टी होऊन म्हणतात,अजुनी चालतोचि वाट माळ हा सरेना विश्रांतिस्थल केव्हा यायचे कळेना ! त्राण न देहांत लेश, पाय टाकवेना, गरगर फिरत अजी होय पुरी दैना ! दिन गेले, मास तसे, संवत्सरेही गेली निकट वाटते जीवनसंध्या ही आली ! कुठुनि निघालो, कोठे जायचे न ठावे, मार्गातचि काय सकळ आयु सरुनि जावे ! पुरे ! पुरे ही असली मुशाफिरी आतां, या धूळित दगडावर टेकलाच माथा ? वि. दा. वासमकर रेशमांच्या गांठी : कवठेकर, द. र. प्रकाशक : देशमुख आणि कं., पुणे, १९४२. 'रेशमाच्या गांठी' ही द. र. कवठेकरांची तिसरी कादंबरी. या कादंबरीचे कथानक नाना पाटील व बापू देशमुख या दोन मित्रांच्या परस्पर संबंधांशी त्यांच्यातील संघर्षाशी निगडित आहे. ग्रामीण वातावरणाची पार्श्वभूमी असलेल्या प्रस्तुत कादंबरीत नानांची मोलकरीण पारी, नानांची सोशिक पत्नी, पारीचा मुलगा हिऱ्या, नानांची मुलगी मालन, डॉ. मनोहर अशी भिन्नधर्मी पात्रे आहेत. पारीचा भूतकाळ, तिच्या अपत्य संभवाचे रहस्य, नानांविषयी असणारे संशयाचे किल्मिष, नानांच्या पत्नीची मूक सहनशीलता, देशमुखांचा पीळ या घटना-प्रसंगांमुळे व पात्रविशेषांमुळे 'रेशमांच्या गांठी' वाचनीय झाली आहे. त्यातही पारीची स्वामिनिष्ठा, तिने आपल्या आयुष्यातील रहस्याची केलेली जपणूक, तिचा स्वाभिमान, साहसी नि बंडखोर वृत्ती, मुलाविषयी तिला वाटणारा तिरस्कार या स्वभाववैशिष्ट्यांच्या चित्रदर्शी व नाट्यपूर्ण चित्रणामुळे कादंबरी मनाची पकड घेते. आकर्षक भाषा, उत्तम निवेदन शैली, कथानकातील नाट्यपूर्णता उत्तरोत्तर वाढवत नेण्याची लेखकाची हातोटी, या गुणवैशिष्ट्यांमुळे कादंबरी प्रत्ययकारी ठरते. एकामागोमाग एक घडणाऱ्या घटनांची मालिका कवठेकरांनी चित्रमय शैलीत साकार केली आहे. मात्र घटना द्रुतगतीने दाखवण्यात आणि गुंतागुत रहस्यमयतेचे जाळे विणण्याच्या लेखकाच्या हव्यासामुळे कादंबरीतील आशयाला पूर्णपणे न्याय मिळू शकला नाही. काही घटनांत अवास्तवता, भडकपणा व कृत्रिमता आली आहे. कादंबरीचा शेवट सहज स्वाभाविक वाटत नाही. तो ओढूनताणून आणल्यासारखा सांकेतिक वाटतो. कादंबरीच्या प्रारंभीपासून विकसित होत गेलेले कारुण्य विषयाला शेवटी आकस्मिक मिळालेल्या कलाटणीमुळे फिके होते. 'रेशमांच्या गाठी' ही एक वाचनीय आणि रंजक कादंबरी एवढेच वाङ्मयीन मूल्य त्यामुळे शिल्लक राहते. वि. शं. चौघुले
पोलीसनामा ऑनलाइन टीम - परळी बीड व मुंबई असा सातत्याने प्रवास तसेच अनेक लोकांशी जनसंपर्क यामुळे राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली होती. यावेळी लॉकडाऊनच्या काळात कामकाज केलं होतं. त्याचा अहवाल त्यांनी कोरोना वाॅर्डमधून सादर केला होता. ते कोरोनावर यशस्वीरित्या मात करून आले. दुसऱ्या दिवशी धनंजय मुंडे यांनी कामाला सुरवात केली. आता पुन्हा एकदा मुंडे उपचारासाठी लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याची माहिती त्यांनी ट्विट करून दिली. तीव्र पोटदुखीमुळे मागील काही दिवसांपासून मी त्रस्त आहे. त्यामुळे उपचारासाठी आज मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झालो आहे. प्रकृती स्थिर असून उपचार घेऊन मी लवकरच पुन्हा आपल्या सेवेत दाखल होईल. कोरोनाची लागण झाल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये धनंजय मुंडे यांच्यावर उपचार सुरू होते. कोरोनावर मात केल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. हॉस्पिटलमधून बाहेर पडताना धनंजय मुंडे यांनी हात उंचावून आणि हात जोडून डॉक्टर नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांचे आभार मानले होते. संजय मुंडे यांच्यासोबत कोरोनाची लागण झालेले त्यांचे खासगी सचिव १ सहाय्यक, दोन वाहनचालक, एक अंगरक्षक यांनाही रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. त्या सर्वांची दुपारी चाचणी निगेटिव्ह आली होती, त्यानंतर आता धनंजय मुंडे यांना लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
पंचखाद्य लाडू. गणपतीसाठी नैवेद्याला दर वर्षी काहीतरी नवीन पदार्थ बनवायचा असतोच. म्हणूनच नेहमी वापरात असलेले साहित्य वापरून, तसेच कमी वेळात होणारी पाककृती देत आहे. करून पाहा, आवडेलच. गणपतीला आणि तुम्हालासुद्धा. १. एक कप बिनबियांचा खजूर. (नेहमीचाही बिया काढून वापरू शकता.) २. एक टेबलस्पून तूप, अर्थातच साजूक. ३. दोन टेबलस्पून डेसिकेटेड कोकोनट. ४. एक टेबलस्पून खसखस. ५. दोन टेबलस्पून गुळाची पावडर. ६. पाव चहाचा चमचा जायफळ पावडर. ७. बदामाचे काप किंवा एक चहाचा चमचा भरड पूड. १. गॅसवर कढई तापवून त्यात तूप घालून खजूर मऊ होईपर्यंत परतावा. परतताना मध्ये मध्ये चमच्याने कुस्करावा. हात भराभर चालवावा, नाहीतर खजूर करपण्याची शक्यता असते. २. खजूर छान एकजीव होतो चारपाच मिनिटात. त्यानंतर गार करण्यासठी एका ताटात पसरून द्यावा. ३. गरम कढईत खसखस आणि खोबरे मंद आचेवर भाजून घेऊन गॅस बंद करून गूळ पावडर मिसळावी. ४. आता हे मिश्रण खजुरावर घालून त्यात जायफळ पावडर आणि बदाम काप घालावे. ५. साधारण कोमट झाल्यवर मळून घ्यावे. हव्या त्या आकाराचे लाडू वळावेत किंवा मोदकाच्या साच्यात घालून मोदक करावेत. हवे असल्यास डेसिकेटेड कोकोनटमध्ये घोळवावेत. त्यासाठी अर्धा टेबलस्पून डेसिकेटेड कोकोनट लागेल. या मिश्रणाचे पेढ्याच्या आकाराचे २१ लाडू किंवा मोदक पंधरा मिनिटात तयार होतात. गणपती बाप्पा मोरया.
आरोग्यनामा ऑनलाइन टीम - चांगल्या आरोग्यासाठी दररोजच्या आहारात पालेभाज्या आणि फळभाज्या खाव्यात, असे आहारतज्ज्ञ सांगतात. ही गोष्ट खरी असली तरी या भाज्यांमधील पोषक तत्त्व शरीराला योग्यप्रकारे आणि जलद मिळण्यासाठी भाज्या बनविण्याची पद्धतही महत्वाची ठरते. स्टीमच्या जागी हिरव्या पालेभाज्या ऑलिव्ह ऑइलमध्ये फ्राय केल्यास प्रतिजैविके मोठ्या प्रमाणात बीटा कॅरोटीन शोषून घेतात. याबाबत काही महत्त्वाची बाबी आपण जाणून घेणार आहोत. * फळ किंवा भाजीपाल्यांत ऑलिव्ह ऑइल, नट्स तसेच फॅटचे अन्य सकस स्रोत सामील केल्याने जीवनसत्त्व अ, आणि क चे प्रमाण वाढवता येऊ शकते. या सर्व पोषक तत्त्वांनी दृष्टी, रोगप्रतिकारकशक्ती प्रखर बनते. शिवाय, हृदयास आघात आणि शरीराला ऑस्टियोपोरोसिसपासून सुरक्षित ठेवता येऊ शकते. * आम्लधारी फळ किंवा भाजीपाला कास्ट-आयर्न पॅनमध्ये शिजवल्याने ऊर्जादायी लोह सत्त्वाचे प्रमाण दोन हजार टक्क्यांनी वाढते. कास्ट-आयर्न पॅनमध्ये स्वयंपाक बनवणे नुकसानकारक नाही. पॅनमधून काही प्रमाणात लोह सत्त्व भाजीत मिसळते. यामुळे चवीत काही फरक पडत नाही. * सलादमध्ये वनस्पतींची पाने टाकल्याने कर्करोगाशी लढणारी सत्त्व वाढतात. तसेच प्रतिजैविकांची संख्याही दुपटीने वाढते. अद्रकाच्या सेवनानेही प्रतिजैविके वाढतात. * सफरचंद, गाजरासारखी बहुतांश फळे आणि भाज्या साली काढून खाऊ नयेत. कारण या टरफलातच अधिक पोषक तत्त्वे तसेच फायबर असते. टरफलांसह खाता येतील असे जैविक फळ विकत घ्यायला हरकत नाही. कीटकनाशके आणि घाण स्वच्छ करण्यासाठी फळ किंवा भाज्या स्वच्छ पाण्यानी धुऊन घ्या. * टोमॅटो तव्यावर गरम करून खाल्ल्यास त्यातील पोषकतत्त्वे हृदयासाठी चांगली ठरतात. यासाठीच अन्य सॉसच्या तुलनेत टोमॅटो सॉस चांगले असते. टोमॅटो कापून त्यास बेकिंग शीटवर ठेवा. नंतर त्यावर थोडेसे ऑलिव्ह ऑइल, मीठ काळे मिरे टाका. यास १५-२० मिनिटांपर्यंत बॉइल होऊ द्या. याचे सेवन आरोग्यासाठी लाभदायी ठरेल. * फळभाज्या कापताना मोठे तुकडे करावेत. बारीक तुकडे केल्याने यातील न्यूट्रियंटरिच ऑक्सिजन निघून जातो. मोठ्या तुकड्यात जीवनसत्त्व दीर्घकाळ टिकून राहते. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. फळ किंवा भाज्या कापल्यानंतर लगेच उपयोगात आणाव्यात. अन्यथा त्यातील पोषक तत्त्वे नष्ट होऊ लागतात. * लसूण आहारात घेतल्याने शरीराला कर्करोगापासून दूर ठेवता येऊ शकते. लसणाची साल काढल्यानंतर त्यास बारीक करून १०-१५ मिनिटे तसेच ठेवा नंतर वापरा. यामुळे लसणातील पोषक तत्त्वे नष्ट होणार नाहीत. अथवा कच्चा लसूण थेट भाजीवरच टाका.
ऑनलाईन फुड डिलीवरी कंपन्यांमधील चार पैकी एक डिलीवरी बॉय जेवण पोहचवण्याआधी स्वतः चाखतो अथवा खातो. अमेरिकेतील चार कंपन्यांच्या 500 डिलीवरी बॉयवर करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये ही बाब समोर आली आहे. हे सर्वेक्षण अमेरिकेच्या खाद्य विभागाने केले आहे. विभागातर्फे सांगण्यात आले की, मागील अनेक दिवसांपासून डिलीवरी बॉयच्या विरोधात तक्रारी येत होत्या. अनेक ग्राहकांनी तक्रार केली होती की, त्यांना अन्न हे थंड आणि कमी मिळते. तक्रारीनंतर विभागाने उबर ईटस, ग्रबहब, डोरडॅश आणि पोस्ट मॅट्स या अपच्या डिलीवरी बॉयवर सर्वेक्षण केले. यामध्ये समोर आले की, केवळ 20 मिनिटांवरील ऑर्डर पोहचवण्यासाठी डिलीवरी बॉय सरासरी 40 मिनिटे लावतात. तर काहीजण जेवण पोहचवण्यासाठी 70 मिनिटे देखील लावतात. त्यामुळे ग्राहकांना थंड अन्न मिळते. काही ग्राहकांना अन्नावरील पॅकिंग निघालेली दिसते तर काहींना अन्नच कमी मिळते. या सर्वेक्षणामध्ये अमेरिकाच्या खाद्य विभागाने1518 लोकांचे सर्वेक्षण केले. तसेच ज्यांनी फूड डिलीवरी अॅपसाठी एकदा तरी काम केले आहे अशा 500 लोकांचे देखील सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षणामध्ये दिसून आले की, अमेरिकन माणसाच्या फोनमध्ये दोन फूड डिलीवरी अॅप असतात. ज्याद्वारे ते महिन्यातून तीन वेळा ऑर्डर करत असतात. सर्वात लोकप्रिय अपमध्ये उबर इटस, ग्रबहब, डोरडॅश आणि पोस्ट मॅट्स यांचा समावेश आहे. या अॅप्सनी लोकांच्या घराच्या आजूबाजूच्या हॉटेल आणि दुकानदारांशी भागीदारी केली आहे. या सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेल्या 25 टक्के डिलीवरी बॉयने स्विकार केले की, अन्न चाखून बघितलेले आहे. तर सर्वेक्षणामध्ये दिसून आले की, 46 टक्के लोक ऑफर बघून ऑर्डर करतात. 54 टक्के लोक आपल्या आवडीच्याच हॉटेलमधून अन्न मागवतात. तर 46 टक्के लोक जेवणाचे फोटो बघून ऑर्डर करतात.
प्रत्येकाला हे ठाऊक आहे की सुखी बालवयात मुलाला पॅरेंटल प्रेमाची आणि काळजीची आवश्यकता आहे. पण याशिवाय, एक कपडे कपडे, शूज, खेळणी, औषधे, पुस्तके आणि इतर काही महत्त्वाच्या गोष्टींशिवाय करू शकत नाही. बाळाच्या सर्व गोष्टी आवश्यक असण्यासाठी, कुटुंब विभाजन झाले आहे आणि पालकांनी घटस्फोट दिला गेला आहे तर, मृत पालक पालक पोटगी भरण्यासाठी obliged आहे. आपण जाणता त्याप्रमाणे, पालकांपैकी एकाच्या मजुरीवर पोटगी देण्यात आली आहे. पण प्रत्यक्षात नोंदणीशिवाय बरेच काम, अधिकृतपणे कोणतेही उत्पन्न मिळत नाही या प्रकरणी मुलांवर देखरेख ठेवण्याचे सुनिश्चित कसे करावे? रशिया आणि युक्रेन या दोन्ही कायदे कायदेशीर कारणास्तव गुंतागुंतीची वसुलीच्या बाबतीत या प्रकरणात ठोस पैशाची तरतूद आहे. रशियाचे कुटुंब संहिता (अनुच्छेद 83) आणि युक्रेन (अनुच्छेद 184) असे म्हटलेले आहे की पोटगी खालील प्रकरणांमध्ये एक निश्चित रकमेत पोटगी असू शकतेः - देणारा कायमस्वरूपी उत्पन्न नसतो; - गुन्हेगाराचा दाता प्रकारची कमाईचा भाग आहे; - दात्याची मिळकत बदलते किंवा सीझनवर अवलंबून असते. निश्चित पोटगीसाठी मी अर्ज कसा करावा? कडक रोखीने पोटगीची मागणी करण्याकरिता, आपण खालील कागदपत्रांना दाव्याच्या निवेदनाशी संलग्न न करता न्यायालयात अर्ज करावाः - मुलाचे जन्म प्रमाणपत्र आणि घटस्फोट (जर आईवडील अधिकृतपणे घटस्फोटित झाल्यास) एक प्रत; - पोटगी पुनर्प्राप्तीवर अर्ज (पक्षांच्या संख्येवर) प्रती; - दावेदार आणि प्रतिवादी च्या उत्पन्नाच्या रकमेवर दस्तऐवज; - वादी सह मुलाच्या संयुक्त निवासस्थानी दस्तऐवज; एका निश्चित रकमेमध्ये पोटगी भरणा सुरू करण्यासाठी पोटगीचे लाभार्थी आणि त्यांचे दाता न्यायालयाने 18 वर्षाखालील मुलांसाठी पोटगी भरणा करण्याचे आदेश दिले, त्याचवेळी एका निश्चित रकम आणि मजुरीपासून काही प्रमाणात. हे आठवणीत ठेवायला हवे की ते फक्त पतीपत्नीच्या उत्पन्नाबद्दल जाणून घेण्याकरता त्यांच्याकडून आवश्यक पोटगी मिळवणे पुरेसे नाही, न्यायालयाला पुरावे आवश्यक आहेत - अधिकृत प्रमाणित दस्तऐवज माजी पती / पत्नीला एक व्यवसाय आहे ज्यामध्ये नियमानुसार अनियमित रक्कम - अॅथलीट, कलाकार, अभिनेता इत्यादीचा अर्थ होतो तेव्हाच निश्चित पोटगीची नियुक्ती आवश्यक आहे. पोटगीची निश्चित रक्कम मुलांच्या जीवनासमान पातळीच्या संदर्भात निर्धारित केली जाते आणि ती इंडेक्सेशनच्या अधीन असते - खात्यातील चलनवाढ लक्षात घेता पुनर्गणना. पोटगीची रक्कम ठरवताना न्यायालय वैवाहिक स्थिती आणि पोटगीचे दावेदार आणि लाभार्थी या दोन्ही पक्षांची भौतिक शक्यता आणि खात्यातील मुलांची मागील पातळीवरील सुरक्षा राखण्याचे प्रमाण वाढवण्यावर विचार करते. जर मुले प्रत्येक पतीबरोबर पालकांच्या घटस्फोटाचा परिणाम म्हणून राहतील तर न्यायालय पालकांच्या नावे एक निश्चित रकमेच्या कमी उत्पन्नासह पोटगी वसूल करेल. युक्रेन मध्ये, पोटगी रक्कम संबंधित वय (युक्रेन च्या कौटुंबिक कोड अनुच्छेद 182) एक मुलासाठी स्थापन निर्वाह किमान रक्कम 30% पेक्षा कमी असू शकत नाही. 2013 मध्ये 6 वर्षांच्या वयोगटातील मुलांसाठी 2 9 51 UAH आणि 6 ते 18 वर्षांच्या मुलांसाठी 363 UAH. रशियात, पोटगीची निश्चित रक्कम रशियन संघाच्या प्रत्येक घटक घटनेत किंवा संपूर्ण संपूर्ण रशियन संघाद्वारे प्रत्येक मुलाच्या जीवनावर अवलंबून असते. जेव्हा पोटगी देणारा काम करत नाही आणि तदनुसार मुलांवर देखरेख ठेवू शकत नाही, तेव्हा तो देखभाल करण्यापासून त्याला मुक्त करीत नाही. यावेळी पोटगी साठवून ठेवली जाते आणि ते कर्जाची निर्मिती करतात, जेणेकरुन त्यांना मिळणारे उत्पन्न चुकते करण्यास भाग पाडले जाईल. जर त्याने हे करू नये असे वाटत असेल, तर पोटगी प्राप्तकर्त्याला त्याच्या मालमत्तेवर कब्जा करण्यासाठी अर्ज दाखल करण्याचा अधिकार आहे.
लॉयला हायस्कूल, द बिशप्स स्कूल, सेंट व्हिन्सेंट स्कूल या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून सुब्रतो मुखर्जी कप शालेय फुटबॉल स्पर्धेतील १७ वर्षांखालील मुलांच्या गटातून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश निश्चित केला. शिक्षण विभाग (मनपा) आणि जिल्हा क्रीडा परिषद यांच्या वतीने आयोजित ही स्पर्धा डोबरवाडी येथे सुरू आहे. रविवारी झालेल्या उप-उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत पाषाणच्या लॉयला हायस्कूलने नगरवाला बोर्डिंग स्कूलवर ३-०ने मात केली. यात प्रभांश मथारूने (६ व २६ मि. ) दोन गोल केले, तर इम्यॅन्युएल इजिकेल (१४ मि. ) याने एक गोल केला. यानंतर अंश तलवारच्या (१९ मि. ) एकमेव गोलच्या जोरावर द ऑर्बिस स्कूलने रेसकोर्सच्या आर्मी पब्लिक स्कूलवर १-०ने मात करून आपली आगेकूच कायम राखली. यानंतर एसएसपीएमएस बोर्डिंग स्कूलने घोरपडीच्या सेंट जोसेफ हायस्कूलचे आव्हान २-०ने परतवून लावले. 'एसएसपीएमएस'कडून दहाव्या मिनिटाला तन्मय शिंदेने गोल केला, तर २९व्या मिनिटाला अभिषेक खानेकरने गोल करून 'एसएसपीएमएस'ची आघाडी वाढवली. सेंट जोसेफ हायस्कूलला शेवटपर्यंत 'एसएसपीएमएस'ची बचाव फळी भेदता आली नाही. 'एसएसपीएमएस'ने २-० अशी आघाडी कायम राखून बाजी मारली. महंमदवाडीच्या दिल्ली पब्लिक स्कूलने एरंडवणाच्या डॉ. श्यामराव कलमाडी हायस्कूलवर २-०ने विजय मिळवला. दोन्ही संघांनी सुरुवातीला एकमेकांचा अंदाज घेत खेळ केला. यानंतर लढतीच्या अकराव्या मिनिटाला अॅलन बिनॉयने कलमाडी हायस्कूल संघाची बचाव फळी भेदून सुरेख गोल केला आणि दिल्ली स्कूलला आघाडी मिळवून दिली. यानंतर कलमाडी हायस्कूलने बरोबरी साधण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. पण, त्यात त्यांना यश आले नाही. यानंतर २३व्या मिनिटाला बिनॉयने दुसरा गोल करून दिल्ली स्कूलची आघाडी वाढवली. ही २-० आघाडी कायम राखून दिल्ली स्कूलने विजय मिळवला आणि उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश निश्चित केला. यानंतर कॅम्पच्या द बिशप्स स्कूलने गुरुकुल हायस्कूलवर ४-० अशी मात केली. ही लढत एकतर्फीच झाली. बिशप्स संघाकडून पवन ढोकरेने (२३ व २७ मि. ) दोन गोल केले, तर ईशान चितळे (१३ मि. ) आणि शेनॉन परेरा (१९ मि. ) यांनी प्रत्येकी एक गोल करून त्याला चांगली साथ दिली. आर. रणदिवेच्या (५ व २७ मि. ) दोन गोलच्या जोरावर सेंट व्हिन्सेंट हायस्कूलने विखे पाटील मेमोरियल स्कूलवर २-०ने विजय मिळवून आपली आगेकूच कायम राखली. यानंतर हचिंग्ज स्कूलने खडकीच्या सेंट जोसेफ हायस्कूलवर १-०ने मात केली. यात हचिंग्जकडून सायन वर्गीसने (१४ मि. ) गोल केला. तत्पूर्वी, तिसऱ्या फेरीच्या लढतीत आर्मी पब्लिक स्कूलने डॉन बॉस्को हायस्कूलवर टायब्रेकमध्ये ५-४ असा विजय मिळवला. निर्धारित वेळेत लढत १-१ अशी बरोबरीत सुटली होती. यात आर्मी स्कूलकडून दिपांशू धनकरने (२७ मि. ), तर डॉन बॉस्को हायस्कूलकडून साहिल कदमने (१४ मि. ) गोल केला. टायब्रेकमध्ये दिपांशू धनकर, अब्दुल्ला खान, अक्षीत पोखरीयाल, अभिनव सोलंकी यांनी गोल केले, तर डॉन बॉस्को संघाकडून साहिल कदम, सुसाई मोझेस, रोदिन पुआ यांनाच गोल करता आले. नगरवाला डे स्कूल आणि बाणेरच्या ऑर्किड स्कूल यांच्यातील लढत शेवटपर्यंत चुरशीची झाली. निर्धारित वेळेत दोन्ही संघांनी आक्रमक चाली रचून गोल करण्याच्या संधी निर्माण केल्या. मात्र, निर्धारित वेळेत गोलशून्यची कोंडी काही फुटली नाही. त्यामु्ळे टायब्रेकचा अवलंब करण्यात आला. यात नगरवाला स्कूलकडून साहिल उत्तेकर, ओम साळुंखे, शबदसिंग पाल, महंमद अली शेख, मंदार खोड यांनी गोल केले, तर ऑर्किड स्कूलकडून अर्चित सिंग, ऋषिकेश काटे, निनाद वालंदे, प्रचित कुलकर्णी यांनी गोल केले. झेन शर्माने संधी दवडली.
May 16, 2022 May 16, 2022 Kanthak SuryatalComment(0) नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या सासऱ्याने आपल्यावर शारिरीक अत्याचार केल्याची तक्रार एका सुनबाईने दिल्यानंतर त्या 57 वर्षीय सासऱ्याला अटक केली. आज 16 मे रोजी दुसऱ्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी रुहिना अंजुम यांनी सुनबाईवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या सासऱ्याला 18 मे पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. 9 मे रोजी विमानतळ पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्हा क्रमांक 172/2022 मध्ये पोलीस उपनिरिक्षक एन.व्ही. जाधव यांनी परभणी येथील सोमनाथ माणिकराव शेट्टे (57) यास अटक केली. सोमनाथ शेट्टे यांच्या सुनबाईने दिलेल्या तक्रारीनुसार दाखल झालेल्या या गुन्ह्यात भारतीय दंड संहितेची कलमे 376(2)(एन), 498(अ), 323, 504, 506 आणि 34 ही कलमे जोडण्यात आली आहेत. सुनबाईच्या म्हणण्यानुसार तिचे लग्न सुजित सोमनाथ शेट्टेसोबत झाले. 15 लाख रुपये खर्च आणि सोन्याचे दागिणे अशी रक्कम लग्नात देण्यात आली होती. माझे पती सुजीत सोमनाथ शेट्टे बाहेरगावी गेल्यानंतर साधारणताः ऑक्टोबर 2021 मध्ये सासु-सासरे आणि मी असे तिघेच घरी असतांना सासऱ्याने माझ्यावर अत्याचार करतांना माझ्या मुलाकडून कांही होणार नाही, तुला माझ्यासोबत संबंध ठेवूनच तुला मुल करून घ्यावे लागेल असे सांगत बळजबरी संभोग केला. ही घटना सुनबाईने सासूला सांगितली. तेंव्हा तीनेही आपले पती, सूनबाईचे सासरे यांचीच बाजू घेत तसे करणे योग्य असल्याचे सांगितले. या प्रकरणाला सामोपचाराने मिटविण्यासाठी भरपूर बैठका झाल्या. आपल्यावर झालेला अत्याचार सूनबाईने आपल्या वडीलांना सांगितला त्यानंतर अनेक लोकांनी यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला पण यश आले नाही. त्यानंतर सुनबाईने विमानतळ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल झाला. आजपर्यंत या युवतीच्या विवाहाला एक वर्ष सुध्दा पुर्ण झालेल ेनाही. या प्रकरणाचा तपास पोलीस निरिक्षक अनिरुध्द काकडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक एन.व्ही. जाधव यांच्याकडे देण्यात आला. एन.व्ही. जाधव यांनी आज आपले पोलीस अंमलदार, रामदास सुर्यवंशी यांच्यासोबत पकडलेला सासरा सोमनाथ माणिकराव शेट्टे यास न्यायालयात हजर केले. इतर दोन आरोपींना पकडणे आहे आणि गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस कोठडी आवश्यक आहे असा मुद्दा सरकारी वकील व्ही.बी. तोटेवाड यांनी मांडला. न्या.रुहिना अंजुम यांनी आपल्या सूनबाईवर अत्याचार करणाऱ्या सासऱ्याला दोन दिवस अर्थात 18 मे 2022 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. गणेशनगरच्या जुगार अड्ड्यावर कार्यवाही होणार काय ?
प्रौढांच्या वाचन गती कशी वाढवावी? कोणत्याही वयोगटातील वाचन करण्याची गती वाढवता येते, मुख्य गोष्ट म्हणजे सतत गुंतलेली असते आणि ही गोष्ट टाकत नाही. परंतु सर्वप्रथम हे सांगणे आवश्यक आहे की हे किंवा ते व्यायाम करण्यापूर्वी आपल्याला शरीराचा योग्य स्थान घेण्याची आवश्यकता आहेः मुदत स्थिती असणे आवश्यक आहे आणि डाव्या हाताला पुस्तकात थोडासा आराम करावा. पुस्तके वाचण्याची गती कशी वाढवायचीः - वाचलेले शब्द मोठ्याने उच्चारण्यात बाह्य स्वरुपातील अभिव्यक्तीचे वर्गीकरण करणे आवश्यक आहे. हे करण्यासाठी, वाचताना आपण आपले हात आपल्या हाताच्या बोटाने बंद करणे आवश्यक आहे. - संपूर्ण आंतरिक उच्चारण वगळा ही एक प्रक्रिया आहे, आपण वाचलेले शब्द उच्चारून. हे गती कमी करते त्यातून बाहेर पडण्यासाठी वाचन करताना तुम्हाला स्वतःला 1 ते 10 वाचावे लागेल. - आधीच्या वाक्ये किंवा परिच्छेदांना पुनरावृत्त डोळा हालचाली वगळण्याचा किंवा कमी करण्याचा प्रयत्न करा. यामुळे केवळ वाचनच होत नाही तर माहितीचा स्वाभाविकपणा कमी होण्यास मदत होते. - केवळ महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त माहितीवरुन मजकूर हायलाइट करण्याची सवय विकसित करा आणि इतर सर्व गोष्टी मानसिकदृष्ट्या कापून टाका. - आपल्या दृष्टिकोनाचे क्षेत्र विस्तारीत करा. जितके शक्य असेल तितके शब्द, परिच्छेद कव्हर करण्याचा प्रयत्न करा. - अधिकाधिकपणे कसे वाचावे ते जाणून घ्या - केवळ मजकूचे महत्त्वपूर्ण भाग पाहण्यासाठी. आपल्या स्वतः च्या वेगाने वाचण्याची तंत्रशिक्षण करण्याची इच्छा किंवा शक्यता नसल्यास, प्रशिक्षण सत्रांमध्ये आणि अभ्यासक्रमात शिकविणार्या तज्ञांच्या मदतीने हे शक्य आहे.
पाऊस चांगला झाला. . . पीकही चांगले आले. . . शेतकऱ्याला चांगले उत्पन्न मिळाले. . . आणि यंदा तरी पाणीटंचाईपासून मुक्ती मिळणार या आशेने नागरिकही समाधानी झाले. मात्र पाणीटंचाईमुक्त रायगडचे स्वप्न जिल्ह्यातील ३७ ते ४२ अं. से. च्या तापमानात यंदा पूर्णपणे विरून गेले आहे. वाढत्या तापमानाबरोबर पाणीटंचाईची झळ यंदा जिल्ह्यातील ३६७ गावे आणि १ हजार १०९ वाड्यांमधील ग्रामस्थांना बसणार आहे. जिल्ह्यातील या सर्व टंचाईग्रस्त गाव-वाड्यांतील ग्रामस्थांची तहान भागविण्याकरिता तब्बल ६ कोटी २५ लाख १० हजार रुपये जिल्हा प्रशासनाला खर्च करावे लागणार आहे. यंदाचा टंचाई निवारण आराखडा तयार करण्यात आला असून तो राज्य सरकारला पाठविण्यात आला आहे. जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त ३६७ गावांपैकी सर्वाधिक टंचाईग्रस्त ४८ गावे तर टंचाईग्रस्त एकूण १ हजार १०९ वाड्यांपैकी सर्वाधिक २७२ वाड्या या एकट्या पोलादपूर तालुक्यामध्ये आहेत. पोलादपूरशेजारील महाड तालुक्यात ३६ गावे तर २२० वाड्या टंचाईग्रस्त आहेत. महाड-पोलादपूर बरोबरच कर्जत तालुक्यात देखील मोठे जलदुर्भिक्ष जाणवत असून या तालुक्यात ४४ गावे तर ३७ वाड्या टंचाईग्रस्त आहेत. एकेकाळी टंचाईमुक्त झालेल्या अलिबाग तालुक्यात देखील तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून १२ गावांबरोबरच ७१ वाड्यांमध्ये पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. पेण तालुक्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील जलदुर्भिक्ष यंदाही कायम असून, पेण तालुक्यातील १५४ वाड्यांबरोबरच ३९ गावांमध्ये पाणीटंचाई आहे. १५ एप्रिल २०१७ रोजीच यंदा जिल्ह्यातील तीव्र पाणीटंचाईग्रस्त १२ गावे आणि ७४ वाड्यांना १३ टँकर्सच्या माध्यमातून पाणीपुरवठा करावा लागत आहे. महाड तालुक्यातील २ गावे आणि ६ वाड्या, तर पोलादपूर तालुक्यातील ४ गावे आणि २६ वाड्यांना प्रत्येकी तीन टँकर्सच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पेण तालुक्यातील ४ गावे आणि २९ वाड्यांना दोन टँकर्सच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पनवेलमधील दोन वाड्या, खालापूरमधील एक गाव व एक वाडी, रोहा तालुक्यातील एक वाडी तर श्रीवर्धनमधील दोन वाड्या यांना प्रत्येकी एका टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जलशिवार योजनेंतर्गत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बंधाऱ्यांची कामे करण्यात आली. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जलसाठा देखील संकलित झाला, परंतु जिल्ह्यातील लक्षणीय तापमानामुळे तो जलसाठा पाणीटंचाई दूर करण्यात यशस्वी होऊ शकलेला नाही, हे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे. परिणामी जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणार्थ केवळ टँकर्स आणि विंधण विहिरींची पारंपरिक मात्रा देणे प्रशासनाच्या हाती राहिले आहे.
आपल्या नयनबाणांनी अनेकांना घायाळ करणारी प्रिया प्रकाश वॉरियर (Priya Prakash Varrier) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 'एक्सप्रेशन क्वीन' (Expression Queen) म्हणून नावारुपास आलेल्या प्रिया वारियर ने आपले इन्स्टाग्राम अकाऊंट डिअॅक्टीव्हेट (Deactivates Instagram Account) केलं आहे. इंडिया टुडे ने दिलेल्या वृत्तानुसार, प्रियाने ट्रोलिंगकडे आणि नकारात्मक चर्चा करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर काही दिवसातचं तिने आपले इन्स्टाग्राम अकाऊंट डिअॅक्टीव्हेट केलं आहे. प्रिया आपल्या कुटुंबियांना वेळ देता यावा यासाठी सोशल मीडियापासून लांब राहण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या लॉकडाऊन असल्याने हा सर्व वेळ तिला आपल्या कुटुंबियांसोबत घालवायचा आहे. कुटुंबियांना वेळ देता यावा म्हणून तिने इन्स्टाग्राम अकाऊंट डिअॅक्टीव्हेट करण्याचा निर्णय घेतला आहे. (हेही वाचा - मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता शिंदे च्या बोल्ड फोटोजची सोशल मीडियावर चर्चा; पहा हॉट फोटोज) दरम्यान, प्रियाचे इन्स्टाग्रामवर जवळपास 7 मिलिअनपेक्षा जास्त फॉलोअर्स होते. प्रिया नॅशनल क्रश आहे. त्यामुळे प्रियाचे सोशल मीडियावर तुफान चाहते आहेत. प्रियाने इन्स्टाग्राम अकाऊंट डिअॅक्टीव्हेट करण्यापूर्वी मल्याळम भाषेत एक व्हिडीओ शेअर केला होता. प्रिया वारियर मल्याळम चित्रपट 'ओरु अदार लव्ह'मधील एका व्हिडीओमुळे रातोरात प्रसिद्ध झाली होती. 26 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये प्रिया प्रकाशचे एक्सप्रेशन्सने सर्वांवर जादू केली होती. प्रिया ही एक उत्तम मल्याळम अॅक्ट्रेस आणि मॉडल आहे.
औरंगाबाद : मागीलवर्षी अतिवृष्टीचा फटका कृषी उत्पादनाला बसल्याने वर्षभर डाळींच्या भावात चढ-उतार होत राहिला. मात्र, आता ऐन नवीन आवक होण्याच्या तोंडावर मूग डाळ, उडद डाळीच्या किमतीने शंभरी पार केली. यामुळे भल्या-भल्यांचे अंदाज चुकले आहेत. किराणा दुकानातील फलकावर नजर टाकली, तर लक्षात येईल की, डाळी किती महागल्या आहेत. उडीद डाळ व मूग डाळ १०२ ते १०४ रुपये प्रतिकिलो विकत आहेत. त्यापाठोपाठ आता तूर डाळ शंभरीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. ही डाळ ९४-९६ रुपये किलोने खरेदी करावी लागत आहे. त्यातुलनेत हरभरा डाळीच्या भावात जास्त वाढ झालेली नाही. ती ६२ ते ६४ रुपये किलोने विकत आहे, यामुळे ग्राहकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. एप्रिल महिन्यात नवीन मूग व उडीद बाजारात येणार आहे. मात्र, उत्पादन कमी असल्याच्या बातमीमुळे मागील आठवड्यात किलोमागे १० रुपयांनी वाढ झाली. लॉकडाऊन काळात डाळी सर्वाधिक महाग दरात विकण्यात आल्या होत्या. एप्रिल २०२० मध्ये हरभरा डाळ चक्क १२० रुपये किलोने विकली गेली होती. तूरडाळ १३५ रुपये, मूगडाळ १३८ रुपये, तर उडीद डाळ १४० रुपयांनी विकण्यात आली होती. अनलॉकनंतर डाळीचे भाव उतरले होते. पण आता पुन्हा एकदा डाळींनी शंभरी गाठून महागाई आणखी वाढविली. हरभरा डाळ ५६-५८ रु. ६२-६४ रु. तूर डाळ ८०-८४ रु. ९४-९६ रु. मूग डाळ ९४-९६ रु. १०२-१०४ रु. उडीद डाळ ९०-९२ रु. १०२-१०४ रु. नवीन मूग व उडदाची आवक एप्रिल महिन्यात सुरू होत आहे. आवक वाढली तरच डाळीचे भाव कमी होतील. नाही तर भाव स्थिर राहतील.
राज्य सरकारच्या निर्णयावर माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी निशाणा साधला आहे. मुंबई- लिव्ह इन रिलेशनशिपमधून झालेल्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरण लक्षात घेता राज्य सरकारकडून मोठं पाऊल उचलण्यात आले आहे. अनेकदा मुलांची लग्न ही पालकांच्या मनाविरूद्ध होतात. त्यानंतर संबधित मुलीबाबत चुकीच्या गोष्टी घडतात. त्या मुलींना एक आधार म्हणूनही समिती नेमलेली आहे. श्रद्धा वालकर प्रकरण हे एक उदाहरण आहे. जे श्रद्धासोबत झालं ते इतरांसोबत होऊ नये यासाठी राज्य सरकारनं समितीची स्थापना केल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे. पोलीस यंत्रणा यापूर्वी होती तरी श्रद्धा वालकर प्रकरण झालचं, त्यामुळे राज्यात १३ सदस्यीय आंतरधर्मीय विवाह कुटुंब समन्वय समिती स्थापन करण्यात आली असल्याचं, मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितलं. तसेच ही समिती ज्या मुलामुलींनी आंतरधार्मीय विवाह केला आहे. ज्या मुली ज्यांचा कुटुंबियांशी संबध तुटलेला आहे. त्याच्यासाठी ही समिती काम करेल. या मुलींसाठी टोल फ्री नंबर सुरू करण्याचा आमचा मानस आहे असं त्यांनी सांगितले. राज्य सरकारच्या या निर्णयावर माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी निशाणा साधला आहे. आंतरजातीय/धर्मीय लग्नांची मोजदाद करण्याचा सरकारला काय अधिकार आहे? पुरोगामी महाराष्ट्राला २०० वर्षे मागे न्यायायचं काय? , असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला. तसेच कुणाशी विवाह करायचा ही प्रत्येकाची खाजगी बाब आहे. सरकारने हे पाऊल तातडीने मागे घ्यावं. जाती व्यवस्था म्हणजेच चतुरवर्ण व्यवस्था मजबूत करण्यासाठी हे काम चालू असल्याची टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली. लव्ह जिहादविरोधात ही समिती नसून ज्या मुली कुटुंबापासून विभक्त झाल्या आहेत. त्यांच्या अडचणीत त्यांना मदत करण्यासाठी नेमली आहे. या समितीचं कार्यक्षेत्र मर्यादित आहे. महिला आयोग व महिला व बाल कल्याण विभाग यांच्यात चांगलं समन्वय आहे. वादविवाद होऊ नये आणि पुन्हा श्रद्धा वालकरसारखे प्रकरण घडू नये यासाठी ही समिती काम करणार असल्याचंही लोढा यांनी सांगितले. सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
रात्री उशिरापर्यंत झोप लागत नाही, खूप मोठे दडपण आले आहे, सतत विचारात असतो, कसे आणि काय होणार, ही परिस्थिती दुसऱ्या-तिसऱ्या कोणाची नसून, आपला लाडका हर्षवर्धन म्हणजेच प्रसाद ओक या अभिनेत्याची झाली आहे. याबाबत 'लोकमत सीएनएक्स'ने प्रसाद ओकशी संवाद साधला असता, प्रसाद म्हणाला, "कच्चा लिंबू या चित्रपटाचे दिग्दर्शन मी स्वतः करणार आहे. त्यामुळे जसजसे कच्चा लिंबू या चित्रपटाच्या शूटिंगचे शेड्युल जवळ येत आहे, तसतशी माझी झोप उडत चालली आहे. कारण या चित्रपटात सचिन खेडेकर, सोनाली कुलकर्णी यांसारखे मोठे कलाकार असल्यामुळे एक मोठे दडपण आले आहे. आणि या चित्रपटात अॅज अॅक्टर म्हणून रवी जाधव पहिल्यांदा काम करीत आहे. त्यामुळे एक दिग्गज दिग्दर्शक कलाकाराची भूमिका करणार आणि मी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असल्यामुळे हे मोठे आव्हान माझ्यासमोर उभे राहिले आहे. त्यामुळे सध्या माझी झोप तर उडाली आहे.
दिल्लीमधील आम आदमी पक्षाचे सरकार आणि तेथील नायब राज्यपाल यांच्यात गेली जवळजवळ तीन वर्षे सुरू असलेल्या शीतयुद्धाला विराम देऊ शकेल अशी अपेक्षा ज्याच्यामुळे बाळगता येईल असा निवाडा सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने काल दिला आहे. लोकनियुक्त सरकार आणि नायब राज्यपाल यांनी एकमेकांविरुद्ध संघर्षाच्या पवित्र्यात उभे न राहता भारतीय संविधानानुसार परस्पर समन्वयानेच काम केले पाहिजे असे या निवाड्याचे एकंदरीत सार आहे. नायब राज्यपालपद हे सरकारच्या कामकाजात अडथळे निर्माण करण्यासाठी नाही हेही घटनापीठाने बजावले आहे. केजरीवाल यांनी दिल्लीची सत्तासूत्रे हाती घेतल्यापासून तेथील नायब राज्यपालांशी संघर्ष आरंभिला होता. दिल्लीसाठी स्वतंत्र विधानसभा जरी असली, तरी ते राजधानीचे नगर असल्याने सार्वजनिक व्यवस्था, जमीन, पोलीस यंत्रणा व शिक्षण हे केंद्राच्या अखत्यारीत असते. संविधानाच्या कलम २३९ अअ ने दिल्लीला विशेष दर्जा बहाल केलेला आहे. त्यामुळे दिल्लीत जरी लोकनियुक्त सरकार विधानसभेवर निवडून येत असले, तरी त्याला काही घटनात्मक मर्यादा आहेत. विशिष्ट प्रकारचे कायदे करायचे झाले तर त्यांना ते विधेयक विधानसभेत मांडण्यासाठी केंद्र सरकारची पूर्वसंमती घ्यावी लागते आणि विधानसभेत संमत झालेल्या विधेयकांनाही राष्ट्रपतींची मंजुरी मिळवावी लागते. पूर्ण राज्याचा दर्जा असलेल्या राज्यांना जे अधिकार असतात, ते दिल्लीच्या वाट्याला नाहीत. अरविंद केजरीवाल यांची 'आप' दिल्लीत भरभक्कम आघाडीनिशी निवडून जरी आली, तरी ह्या मर्यादा त्यांच्या सरकारलाही लागू होत्या, परंतु केजरीवाल यांनी केंद्र सरकारशी उघडउघड संघर्ष सुरू केला. त्यामागे अर्थातच राजकीय कारणे होती, परंतु केंद्राचे प्रतिनिधित्व करणार्या नायब राज्यपालांशी केजरीवालांचा संघर्ष अक्षरशः पोरकट पातळीवर जाऊन पोहोचला. नायब राज्यपालांनी कार्यकारी मुख्य सचिवांची केलेली नियुक्ती, त्यानंतर घडलेले रामायण, कार्यालयांना कुलूप ठोकणे काय हे सगळे दिल्लीच्या जनतेने मुकाट पाहिले. नजीब जंग यांच्या जागी त्या पदावर अनिल बैजल आले, तरीही सरकार व नायब राज्यपालांमधील संघर्ष थांबला नाही. अलीकडेच नायब राज्यपालांच्या घरी जाऊन केजरीवाल, सिसोदिया प्रभृतींनी रात्रंदिवस धरणे धरलेही धरले होते. आपल्याला केंद्र सरकार काम करू देत नाही हेच तुणतुणे 'आप' वाजवीत राहिला आहे. नायब राज्यपालांना न विचारता वरिष्ठ अधिकारीपदांवर परस्पर नेमणुका करणे, नायब राज्यपालांशी सल्लामसलत न करता निर्णय घेणे असे प्रकार सरकारने अवलंबिले, तर मंत्रिमंडळाने घेतलेले निर्णय अडवण्याच्या क्लृप्त्या नायब राज्यपाल लढवीत राहिले. या संघर्षातच आयएएस अधिकार्यांशी केजरीवाल सरकारचा खटका उडाला आणि या सगळ्या गदारोळामध्ये परिणामी प्रशासन ठप्प झाले होते. मध्यंतरीच्या काळात दिल्ली उच्च न्यायालयाने नायब राज्यपाल हेच दिल्लीतील प्रशासनाचे प्रमुख आहेत असा निवाडा दिला, त्यामुळे 'आप' सरकार अडचणीत आले होते. त्याविरुद्ध त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आणि त्यावर उभय पक्षांना सामंजस्याचा आणि संविधानानुसार काम करण्याचा सल्ला देणारा निवाडा आता घटनापीठाने दिलेला आहे. कोणत्याही एका अधिकारिणीच्या अधिकारांना वाजवीहून अधिक महत्त्व न देता उभय पक्षांनी परस्पर सहमती व सामंजस्याने काम करण्याची रास्त अपेक्षाच घटनापीठाने व्यक्त केलेली आहे. विधानसभेच्या अखत्यारीतील विषयांवर केंद्राने ढवळाढवळ करू नये आणि नायब राज्यपालांनी मंत्रिमंडळाचा प्रत्येक निर्णय यांत्रिकपणे राष्ट्रपतींकडे वर्ग करू नये असे घटनापीठाने बजावले आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे. केंद्र आणि राज्य संबंधांमध्ये अकारण विरोधाची हटवादी भूमिका असू नये असेच घटनापीठाला अपेक्षित आहे. हे केवळ दिल्लीपुरते लागू ठरत नाही, तर आजची देशातील परिस्थिती लक्षात घेता सर्वत्र हे तत्त्व लागू होते. केंद्रात एकाची सत्ता आणि राज्यात दुसर्याची हे चित्र अनेक राज्यांतील प्रादेशिक पक्षांच्या बलाढ्यतेमुळे यापुढे सर्रास दिसेल. त्यामुळे त्यांच्यामध्ये संघर्ष निर्माण होण्याची वेळ पदोपदी येणारच. ती येऊ नये यासाठी उभय पक्षांनी जी पथ्ये पाळणे अपेक्षित आहे त्याचे सूतोवाच या निवाड्यातून झाले आहे. एकमेकांच्या पायांत कोलदांडा घालण्याने नुकसान होईल ते जनतेचे. तिच्या प्रश्नांना सामोरे जाण्यासाठी उभय पक्षांनी एकजुटीने आणि पक्षीय मतभेद दूर ठेवून काम करण्याचे ठरवले तर असे विषय पराकोटीच्या संघर्षाप्रत जाणार नाहीत, परंतु आज त्याचीच तर देशात वानवा आहे. जनतेच्या हितापेक्षा आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षांना प्रत्येक राजकीय पक्ष प्राधान्य देतो आणि त्याची परिणती मग अशा अंत नसलेल्या संघर्षात होते. या संघर्षातून समेटाने मार्ग काढणेच जनतेच्या दृष्टीने श्रेयस्कर ठरणार आहे. घटनापीठाच्या निवाड्याचे खरे सार हेच आहे. जनतेचे हित समोर ठेवून आणि आपापल्या राजकीय इराद्यांना मुरड घातली गेली तर अशा टोकाच्या संघर्षाची वेळच येणार नाही.
IPL 2022, CSK vs RCB: चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) स्टार कर्णधार एमएस धोनीने (MS Dhoni) आज रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) विरुद्ध मैदानात उतरताच मोठा विक्रम केला. CSK फ्रँचायझीसाठी 2022 सामने खेळणारा धोनी हा पहिला खेळाडू ठरला आहे. धोनीच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर त्याने एकूण 229 सामने खेळले आहेत. सीएसकेवर दोन वर्षांची बंदी असताना धोनीने पुणे सुपर जायंट्सकडून 30 सामने खेळले आहेत. तसेच धोनी आयपीएलमध्ये एका फ्रँचायझीकडून 200 सामने खेळणारा वीर तकोहलीनंतर दुसरा खेळाडू आहे. विराट आरसीबीसाठी सध्या 217 सामने खेळला आहे. ('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही. )
तुळशीची वाळलेली काडी, करा हा दिव्य उपाय सारी राहिलेली बिघडलेली कामे होतील. - Hashtag Marathi\nHome जरा हटके तुळशीची वाळलेली काडी, करा हा दिव्य उपाय सारी राहिलेली बिघडलेली कामे होतील.\nतुळशीची वाळलेली काडी, करा हा दिव्य उपाय सारी राहिलेली बिघडलेली कामे होतील.\nआपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला खूप महत्व आहे. तुळशीला आपण देवीचा दर्जा देतो. म्हणून प्रत्येक हिंदूंच्या दारापुढे तुळस नक्कीच असते. तुळस आपल्या जीवनासाठी फार उपयोगी आहे. तुळस ही धार्मिक तसेच आरोग्याच्या दृष्टीने ही खूप फायदे आहेत.\nआपल्या दरातील तुळस हिरवीगार व बहरलेली असावे यासाठी आपले नेहमीच प्रयत्न चाललेले असतात. आपण सकाळी संध्याकाळी तुळशीचे पूजन करतो आणि तुळशीपुढे दिवा लागतो. दररोज तुळशीला जल अर्पण करतो. अशाप्रकारे घेता येईल तेवढी काळजी आपण आपल्या तुळशीची घेत असतो.\nपरंतु तरीही कधीकधी आपल्या दारातील तुळस वाळून कोरडी होऊन जाते. अशावेळी त्या तुळशीची काय करावे हे आपल्याला समजत नाही. वाळलेली तुळस दारात कधीही ठेवू नये. म्हणून जर दारातील तुळस वाळलेली असेल तर ती लगेच तेथून काढून टाकावे.\nजर तुळस खाली हिरवी असेल आणि वरवर त्याच्या काड्या कोरड्या होत असतील तर तुळशीच्या कोरड्या कोरड्या काड्या अलगत काढून घ्याव्यात आणि त्या काड्या सांभाळून ठेवावे. जर संपूर्ण तुळस वाळलेली असेल तर ते तिथून काढून घ्यावी आणि त्या ठिकाणी लगेच दुसरे तुळशीचे रोप लावावे. वाळलेली तुळस कोठेही टाकू नये किंवा नदीमध्ये विसर्जित करू नये.\nतुळशीच्या वाळलेल्या काड्या वेगळ्या करून त्यांना पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे आणि वाळवून घ्यावे. त्यानंतर त्यांचे बारीक पावडर तयार करून घ्यावे आणि ती सुती कापडाने गाळून घ्यावे. यानंतर आपल्याला या पावडरचा वापर करायचे आहे. आपण दररोज भगवंतांचे पूजन करतो. त्यावेळी श्रीहरी विष्णु भगवंतांना आपण चंदनाचा टिळा लावतो.\nत्या चंदनामध्ये तयार केलेल्या तुळशीच्या वाळलेल्या काड्यांचे पावडर मिक्स करून तो टिळा भगवंतांना लावावा. श्रीहरी विष्णू यांना तुळस अतिप्रिय आहे. तुळशीचे पान न ठेवता अर्पण केलेला नैवेद्य भगवंत स्वीकारतही नाही. इतके श्रीहरी विष्णूंच्या पूजनात तुळशीचे महत्त्व आहे.\nआपण जर श्रीहरी विष्णू भगवंतांना तुळशीच्या काड्यांचे पावडर करून तो टिळा लावला तर भगवंत खूप प्रसन्न होतील आणि त्यांचा शुभ आ शी र्वा द प्राप्त होईल. भगवंत आपल्या पूजनाचा स्वीकार करतील. दररोज सकाळी भगवंताचे पूजन झाले की, घरातील सर्व सदस्यांनी या पावडरचा टिळा आपल्या कपाळावर लावावा.\nयामुळे आपले मन शांत राहते आणि आपल्यामध्ये स का रा त्म क ऊर्जेचा संचार होतो, आपला आत्मविश्वास वाढीस लागतो. आपल्या कार्यात मन लागते, आपले मन एकाग्र होते. जर तुमची तुळस खूप मोठी असेल आणि तिची पावडर खूप जास्त झाली असेल तर घरातील सदस्यांनी दररोज अर्धा चमचा पावडरमध्ये अर्धा चमचा मध मिक्स करून ते औषध म्हणून घ्यावे.\nयामुळे आपल्याला शारीरिक व मानसिक कोणत्याही समस्या असतील, काहीही अडचणी असतील, शरीराच्या अंतर भागामध्ये काही त्रास असेल तर ते सर्व या उपायांमुळे निघून जातील. तसेच आपल्यामध्ये काही वाईट व नकारात्मकता भरलेली असेल तर ती ही नष्ट होईल.\nतसेच आपली मानसिकता बदलेल आणि मनाला एक प्रकारे शांतता मिळेल. आत्मविश्वास वाढीस लागेल, स्वतःवरील विश्वास वाढेल, आपण हे करू शकतो असे ठाम मत बनेल. तर मित्रांनो आता आपल्या लक्षात आले असेल की, जर दारातील तुळस वाळलेली असेल तर त्या कड्यांचा काय आणि कशाप्रकारे उपयोग करावे ते.\nPrevious articleया5राशींना प्राप्त होणार आहे राजयोग\nNext articleमुलांच्या डोक्यात भवरा असणे काय आहे याचा अर्थ? कसे असते यांचे भविष्य?
निक्की हेलीनंतर आता भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी यांनीही अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत उडी घेतली आहे. उमेदवारी जाहीर होताच त्यांनी निधी उभारण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते लोकांकडे व्हिडिओ बनवून निवडणूक लढवण्यासाठी निधीची मागणी करत आहे. कोण आहे विवेक रामास्वामी? ते कधीपासून अमेरिकेत राहतात आणि आत्तापर्यंत अमेरिकेत काय केलं? (विवेक रामास्वामी अधिकृत वेबसाइट) विवेक रामास्वामी हे आरोग्य सेवा आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योजक आहेत. कमेंटर असण्यासोबतच ते लेखकही आहेत. फॉक्स न्यूजवर दिलेल्या मुलाखतीदरम्यान त्यांनी आपली उमेदवारी जाहीर केली. व्हिडिओमध्ये ते म्हणाले की, त्यांचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होण्याचे स्वप्न आहे. जर ते हे करू शकले, तर मार्टिन ल्यूथर किंगचे ते स्वप्नही पूर्ण होईल, जे त्यांनी एकदा पाहिले आणि म्हटले होते की एक दिवस असा येईल जेव्हा अमेरिका सर्वांची असेल आणि गोरे नसलेले देखील राष्ट्राध्यक्षपदावर बसतील. (विवेक रामास्वामी अधिकृत वेबसाइट) विवेक हे 37 वर्षांचे आहेत. त्यांनी अमेरिकन कॉर्पोरेट्समधील सामाजिक न्यायाच्या समस्यांवर एक पुस्तक लिहिले आहे. ते त्यांच्या उमेदवारीला केवळ राजकीय प्रचार म्हणत नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी एका स्वप्नाची तयारी करत आहेत. अमेरिकेने वंशाच्या रंगात अडकण्यापेक्षा गुणवत्तेवर भर दिला पाहिजे, असे त्यांचे मत आहे. (विवेक रामास्वामी अधिकृत वेबसाइट) विवेक यांचे आई-वडील केरळहून अमेरिकेला गेले होते. त्याचा जन्म 09 ऑगस्ट 1985 रोजी सिनसिनाटी येथे झाला. ते 90 च्या दशकात ओहायोमध्ये मोठे झाले. आपल्या प्रतिभेने पुढे जात त्यांनी अनेक मोठमोठ्या कंपन्यांमध्ये काम केलं आहे. स्थलांतरितांमध्ये आपली मजबूत पकड आहे, असा त्याचा दावा आहे. ते रिपब्लिकन पक्षाचे सदस्य आहेत. डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष असताना त्यांनी पक्षात प्रवेश केला. (फेसबुक खाते) 2022 मध्ये त्यांनी स्ट्राइव्ह अॅसेट मॅनेजमेंट नावाची नवीन कंपनी स्थापन केली. आता विवेक त्या कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. यापूर्वी त्यांनी बायोफार्मास्युटिकल कंपनी रिव्हॉल्ट सायन्सेसची स्थापना केली आहे. त्यांनी एक टेक कंपनीही स्थापन केली आहे. गुंतवणूक फर्ममध्येही ते भागीदार आहेत. अनेक विषयांवर सतत भाषणे देण्याचे कामही ते करत आहेत. फेसबुक खाते) केरळमध्ये, त्यांचे पालक वेदकेंचेरी, पलक्कड येथे राहत होते. त्यांच्या वडिलांनी केरळमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. अमेरिकेत त्यांनी ओहायो येथील जनरल इलेक्ट्रिक प्लांटमध्ये काम केले. तर त्यांची आई मानसोपचारतज्ज्ञ म्हणून काम करू लागली. विवेक यांनी 2003 मध्ये सिनसिनाटी येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आपले शिक्षण पूर्ण केलं. ते टेनिस खेळत होते. पियानो वाजवण्याने त्यांना प्रसिद्धी मिळाली. (फेसबुक खाते) 2007 मध्ये त्यांनी हार्वर्डमधून पदवी प्राप्त केली. ओहायो स्टेट युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरमधील सर्जन आणि सहाय्यक प्राध्यापक अपूर्व तिवारी यांच्याशी त्यांनी लग्न केले. त्यांना एक लहान मुलगा देखील आहे. (फेसबुक अकाउंट)
महाराष्ट्र राज्यातील पहिली महिला मुख्यमंत्री कोण होणार? यासंदर्भात माध्यमांमध्ये राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असताना आता शिवसेनेतील ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'मी शिवसेनेत नुकतंच दाखल झालीये. जर यूपीमध्ये महिलेला पाच वेळा मुख्यमंत्री होण्याची संधी मिळत असेल तर महाराष्ट्रात महिलेला अशी संधी मिळायला हरकत नाही. मी ज्या ठिकाणी आहे तीथे सुखात असल्याचं' वक्तव्य सुषमा अंधारे यांनी केलंय.
मिरजेत चोरट्यांने पोलिस उपनिरीक्षकाचा बंगला फोडला, हाती काहीच लागले नाही म्हणून. . मिरजः मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याशेजारी असलेला पोलिस उपनिरीक्षकाचा बंगला चोरट्याने फोडला. मात्र चोरट्यास बंगल्यात कोणत्याही मौल्यवान ऐवज हाती लागला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत माहिती अशी की, संबंधित पोलिस उपनिरीक्षकाचा महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याशेजारीच बंगला आहे. काही दिवसांपूर्वी ते उमरा यात्रेसाठी सौदी आरेबियाला गेले आहेत. त्यांचा मुलगा व सून तीन दिवसांपूर्वी जयसिंगपूर येथील मित्राकडे गेल्यानंतर घरावर पाळत ठेवलेल्या चोरट्याने शनिवारी मध्यरात्री बंगल्याचा मागील दरवाजा फोडून आत प्रवेश केला. चोरट्याने बंगल्यातील कपाटे फोडून त्यातील साहित्य विस्कटून दागिने व रोख रक्कमेची शोधाशोध केली. मात्र चोरट्याच्या हाती काहीच लागले नाही. किमती ऐवज सापडला नसल्याने चोरट्याने तेथे बसून मद्यपान केले. किचनमधील खाद्यपदार्थावर ताव मारला. त्यानंतर चोरट्याने तेथून पलायन केले. रविवारी शेजार्यांना बंगल्याच्या मागील दरवाजा उघडा असल्याचे दिसले. याबाबत उपनिरीक्षकाच्या मुलास माहिती दिल्यानंतर तो घरी परतला. यावेळी घर फोडून चोरट्यांनी साहित्य विस्कटल्याचे निदर्शनास आले. चोरट्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रण झाले आहे. मात्र, पोलिस ठाण्याशेजारी पोलिस उपनिरीक्षकाचाच बंगला फोडल्याच्या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली होती.
इंग्लंडकडून चार कसोटी आणि 15 एकदिवसीय सामने खेळणारे माजी क्रिकेटपटू रॉबिन जॅकमॅन यांचे निधन झाले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ही माहिती दिली. ते 75 वर्षांचे होते. जॅकमनने 1966 ते 1982 दरम्यान 399 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 1402 बळी घेतले. निवृत्तीनंतर ते दक्षिण आफ्रिकेत कमेंटेटर झाले होते. आयसीसीने शुक्रवारी जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "वयाच्या 75 व्या वर्षी निधन झालेले दिग्गज भाष्यकार आणि इंग्लंडचा माजी गोलंदाज रॉबिन जॅकमॅन यांच्या निधनाबद्दल ऐकून आम्हाला वाईट वाटले. या कठीण काळात क्रिकेटचे जग त्यांच्या कुटुंबा आणि मित्रांसमवेत आहे. " रॉबिन जॅकमनने त्याच्या संपूर्ण कारकीर्दीत 15 एकदिवसीय सामने खेळले होते, ज्यात त्याने 54 धावा केल्या. गोलंदाजीबद्दल बोलताना त्यांनी एकदिवसीय सामन्यात 19 बळी आणि कसोटी सामन्यांमध्ये 4 सामन्यात 14 गडी बाद केले. कसोटी क्रिकेटमधील त्यांची सर्वोत्कृष्ट कामगिरी 141-5 अशी होती. 1974 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणार्या जॅकमनने 1983 मध्ये शेवटचा सामना खेळला होता. तथापि, त्याच्या प्रथम श्रेणी कारकीर्दीची सुरुवात 1966 मध्ये झाली आणि त्यानंतर ते 1982 पर्यंत क्रिकेट खेळले.
भारत आणि पाकिस्तान या शेजारील देशांच्या नेतृत्वाने गेल्या काही दिवसांत मांडलेल्या भूमिका आणि घेतलेले निर्णय हा नवा अध्याय असू शकेल का? अशी चर्चा आशिया राष्ट्रांमधील संबंधावर विचारमंथन करणाऱ्या विचारवंतांच्यामध्ये चालू झाली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळत असताना झालेली फाळणी आणि काश्मीर प्रश्नांवरून शेजारील दाेन्ही देशांमध्ये झालेल्या तीन युद्धांची पार्श्वभूमी पाहता या घडामाेडीवर तातडीने विश्वास बसत नाही, असे अनेकांना वाटते आहे. पाकिस्तानने परवा (मंगळवार, २३ मार्च राेजी) राष्ट्रीय दिन साजरा केला. लाहाेर येथे २३ मार्च १९४० राेजी मुस्लीम लीगच्या पुढाकाराने घेतलेल्या अधिवेशनात सर्वप्रथम मुस्लिमांसाठी स्वतंत्र राज्याची मागणी करण्यात आली हाेती. त्यानंतरच स्वतंत्र पाकिस्तानची मागणी पुढे आली आणि स्वातंत्र्याच्या पहाटे देशाची फाळणी झाली. ताे दिवस पाकिस्तानात राष्ट्रीय दिन म्हणून पाळण्यात येताे. राष्ट्रपती रामनाथ काेविंद आणि पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी राष्ट्रीय दिनानिमित्त पाकिस्तानच्या जनतेला शुभेच्छा दिल्या हाेत्या. त्याचवेळी गेली दाेन वर्षे न झालेली भारत-पाकदरम्यान वाहणाऱ्या नद्यांच्या पाणी वाटपासाठी १९६० मध्ये स्थापन केलेल्या इंडस पाणी आयाेगाची बैठक सुरू झाली. दाेन्ही देशांदरम्यान वाहणाऱ्या नद्यांच्या पाणी वापरावर चर्चा करण्यास सुरू झाली आहे. तत्पूर्वीही भारत-पाकिस्तानने काश्मीरच्या सीमेवर हाेणाऱ्या चकमकींना विराम देण्याचा निर्णय घेतला हाेता. तेव्हाच आश्चर्य व्यक्त केले जात हाेते. तसेच पंतप्रधान इम्रान खान यांनी उभय देशांमधील संबंध सुधारण्यावरही वक्तव्य करून या चकमकीच्या विरामाचे स्वागत केले हाेते. पाकिस्तानात लाेकनियुक्त सरकार सत्तेवर असले तरी लष्कर आणि लष्करप्रमुखाची भूमिका काय राहते, याला महत्त्व असते. कारण आजवर लाेकनियुक्त सात पंतप्रधानांपैकी सर्वांनाच पदच्युत व्हावे लागले आहे किंवा त्यांची हत्या झाली आहे. हा पाकिस्तानमधील लाेकशाहीचा काळा इतिहास आहे. मात्र, पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी इस्लामाबादेत एका परिसंवादात बाेलताना भारत-पाकिस्तानने भूतकाळातील घटना विसरून पुढे गेले पाहिजे, काश्मीर प्रश्नासह सीमेवर शांतता नांदेल याचा विचार केला पाहिजे, अशी भूमिका मांडली, तेव्हाही सर्वांना थाेडे आश्चर्य वाटले हाेते. गेल्या दाेन महिन्यांतील या घटनांनी उभय राष्ट्रांमधील संबंध सुधारण्यासाठी पाेषक वातावरण निर्मिती झाली आहे, हे तरी मान्य केले पाहिजे. दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान काेविडबाधित झाल्याचे समजताच त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी अशी सदिच्छा व्यक्त करीत पंतप्रधान माेदी यांनी खास पत्र पाठवून राष्ट्रीय दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सीमेवरील चकमकीस विराम, उभय देशांच्या पंतप्रधानांची जाहीर भूमिका आणि लष्करप्रमुखांचे वक्तव्य पाहता पाकिस्तानची भारताबराेबरच्या संबंधात सुधारणा करण्याची तयारी दिसते. त्याची दाेन प्रमुख कारणे दिसतात. ती म्हणजे अमेरिकेतील सत्तांतर आणि काेराेना महामारीने अर्थव्यवस्थेला बसलेला फटकाही आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदी जाे बायडेन निवडून आल्यानंतरच्या या घडामाेडी आहेत, हे नाकारता येणार नाही. पंतप्रधान माेदी यांनी डाेनाल्ड ट्रम्प यांची बाजू उचलून धरली असली तरी बायडेन यांच्या सरकारची भूमिका भारताला मदत करणारीच राहणार आहे, हे आता पाकिस्तानने ओळखले आहे. यात अमेरिकेच्या हितसंबंधांचा भाग असला तरी पाकिस्तानचे चीनच्या बाजूने झुकलेले अमेरिकेच्या परराष्ट्र नीतीमध्ये बसत नाही, हे उघड सत्य आहे. चीनचे आर्थिक धाेरण पूर्णता व्यावसायिक आहे. याउलट अमेरिकेने पाकिस्तानची अफगाण युद्धात मदत घेताना भरभरून आर्थिक हातभार पाकिस्तानला लावला हाेता. चीनच्या उद्देशात हा विषयच येत नाही. दक्षिण आशियातील सत्तासमताेलात आणि आर्थिक हितसंबंधात अमेरिकेचा कल भारताच्या बाजूने दिसताच पाकिस्तानच्या भूमिकेत हा झालेला बदल दिसताे. इंडस पाणी आयाेगाची दाेन वर्षे न झालेली बैठकही त्याचाच भाग आहे. अन्यथा चेनाब नदीच्या खाेऱ्यातील मरूसुदर या उपनदीवरील एक हजार मेगावॉटचा प्रकल्प पाकिस्तानला न विचारता बांधण्याचा निर्णयही माेदी सरकारने घेतला आहे. ताे या बैठकीत मान्य करण्यात येईलच. विशेषतः काश्मीरसाठी खास असलेले ३७०वे कलम रद्द करून ताे भाग केंद्रशासित केल्यानंतरच्या या घडामाेडी महत्त्वाच्या आहेत. यानिमित्त मांडलेल्या भूमिका आणि विविध पातळीवर हाेणाऱ्या चर्चेतून उभय राष्ट्रांतील तणाव निवळत असेल तर त्याचे स्वागतच करायला हवे. नरेंद्र माेदी यांनीही दिलेला प्रतिसाद खूप सकारात्मक आहे.
मुंबई महानगरपालिकेची निवडणूक (BMC Election 2021) पुढील वर्षी होत आहे. मात्र, त्यासाठी भाजपने (BJP) आतापासूनच रणनीती आखण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे. राज्यात शिवसेनेने (Shiv Sena) साथ सोडल्यानंतर भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. यातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वर्तुळातील मानले जाणारे आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी कृष्णकुंजवर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर प्रसाद लाड यांनी मुंबई महापालिकेतील सत्ता उलथवून टाकण्यासाठी शक्य ते सर्व करु, असे शिवसेनेला इशारा देणारे विधान केले आहे. राज ठाकरे यांची भेट घेऊन कृष्णकुंजमधून बाहेर पडल्यानंतर प्रसाद लाड यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. दरम्यान ते म्हणाले की, माझे आणि राज ठाकरे यांचे वैयक्तिक संबंधत आहे. तसेच ही भेट वैयक्तिक आहे. मात्र, त्यांना मुंबई महापालिका निवडणुकीबाबतही प्रश्न विचारण्यात असता ते म्हणाले की, मुंबई महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकावण्याचा पक्षाचा निर्धार आहे. शिवसेनेची परंपरागत सत्ता खाली करण्यासाठी शक्य ते सर्व करु, असेही प्रसाद लाड म्हणाले आहेत.
एमपीसी न्यूज- मावळातील रस्त्यांची गेल्या 10 वर्षांत दुरवस्था झाली असून आमदार झाल्यानंतर आपण अग्रप्राधान्याने रस्ते विकासाचे काम हाती घेणार आहे. 'खड्डेमुक्त रस्ते' हा आपला मावळवासीयांना शब्द आहे, अशी ग्वाही मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस- एसआरपी व मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार सुनील शेळके यांनी सोमवारी रात्री महागाव येथे बोलताना दिला. सुनील शेळके यांनी सोमवारी रात्री शेवती वसाहत, महागाव, सावंतवाडी, दत्तवाडी, निकमवाडी, प्रभाची वाडी, काले आदी गावांमध्ये प्रचारदौरा करून मतदारांशी संवाद साधला. शेळके म्हणाले की, चांगल्या रस्त्यांमुळे परिसरातील विकासाचा मार्गही प्रशस्त होतो, मात्र दुर्दैवाने रस्ते विकास तसेच त्यांची देखभाल-दुरुस्ती याकडे पुरेसे लक्ष दिले गेले नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील रहिवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. हे चित्र बदलण्यासाठी मावळवासीयांनी आता परिवर्तनाच्या बाजूने कौल देण्याची गरज आहे. आपण आतापर्यंत दिलेला प्रत्येक शब्द पाळलेला आहे. त्यामुळे मावळवासीयांनी आपल्याला तालुक्याचा विकास करण्याची एकदा संधी द्यावी. ग्रामसभेप्रमाणे तालुक्याची आमसभाही असते हे आजपर्यंत मावळच्या जनतेला ठावूक नाही, अशी टीका शेळके यांनी केली. आपल्याला हॅटट्रिकची गरज नाही आणि हॅटट्रिक करायला हा काही क्रिकेटचा सामना नाही, अशी टिप्पणी त्यांनी केली. संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात जास्त बिगारी मावळात आहेत. आपल्या शेतकरी बांधवांना बिगारी बनवले गेले आहे, असा आरोप शेळके यांनी केला. ही लढाई जनशक्ती विरूध्द धनशक्ती अशी आहे, असे त्यांनी सांगितले. महागाव शाळेला विचार न करता सुनीलआण्णांनी त्वरित आर्थिक मदत केली आणि शाळेचे कामही झाले. गावातील पाणी शुद्धीकरणाच्या कामाला सुरुवात केली ज्यांनी शब्द दिला त्यांनी सुरुवात ही केली, असे महागावच्या ग्रामस्थांनी सांगितले. त्याबद्दल त्यांनी सुनीलआण्णांचे विशेष आभार मानले. गेली 10 वर्षे सत्ता असूनही विद्यमान आमदारांनी गावच्या कामांना एकदाही साधा हात लावला नाही, असे सांगून ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. महागावच्या सर्व वाड्या-वस्त्यावर सुनीलआण्णा यांना मोठे मताधिक्य देऊ, अशी ग्वाही ग्रामस्थांनी दिली. शेवती वसाहत येथे निखिल कालेकर, सुनील कालेकर, गणेश कालेकर, सुरेश कालेकर, राजेश राऊत, मोहम्मद शेख,अल्ताफ शेख यांनी तर महागाव सावंतवाडी, दत्तवाडी, निकमवाडी, प्रभाचीवाडी येथे संजय वि. तिकोणे, माऊली निकम, इंद्रजित पडवळ, बजरंग घारे, रामदास घारे, दत्तात्रय पडवळ, भिकू तिकोणे, नंदा तिकोणे (पाटील), विश्वनाथ डोंगरे, हनुमंत निकम, रोहिदास होजगे, विनायक सावंत, अंकुश भालेसईन, विश्वनाथ भालेसईन आदी उपस्थित होते.
मुंबई :- गेल्या काही दिवसात राज्यात करोना संसर्ग पुन्हा एकदा हळूहळू वाढताना दिसतो आहे. आज दिवसभरात राज्यात १ हजार ८१ नवे रुग्ण आढळले आहेत. काल, राज्यात आढळलेल्या रुग्णांच्या संख्या ७११ होती. आता राज्यातील करोना रुग्णांची एकूण संख्या ७८,८८, १६७ झाली आहे. राज्यात आज एकूण ४ हजार ३२ अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. यामध्ये २ हजार ९७० रुग्ण मुंबईतील आहेत. आज दिवसभरात राज्यात ५२४ रुग्ण बरे होऊन घरी देखील परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ७७,३६,२७५ करोना रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९८.०७ टक्के आहे. राज्यात आज एकही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८७ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या एकूण ८,०९,५१,३६० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,८८,१६७ (०९.७४ टक्के) पॉझिटिव्ह आले आहेत. Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.
अहमदाबाद - पृथ्वी शॉ, आकर्षित गोमेल व सचिन यादव यांनी निराशा केल्यानंतरही अजिंक्य रहाणे व सर्फराज खान यांनी फटकावलेल्या दमदार शतकी खेळींच्या जोरावर मुंबईने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत पहिल्याच दिवशी सौराष्ट्रविरुद्ध पहिल्या डावात 3 बाद 263 धावा उभारल्या. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा सर्फराज 121, तर रहाणे 108 धावांवर खेळत आहेत. मुंबईच्या डावाची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. त्यांचे पहिले तीन प्रमुख फलंदाज अपयशी ठरले. मात्र, कसोटी संघातून खेळताना आलेल्या अपयशावर होत असलेल्या टीकेला आपल्या बॅटने उत्तर देत रहाणेने जिद्दी शतकी खेळी केली. त्याने आपल्या नाबाद खेळीत तब्बल 250 चेंडूंचा सामना केला व 14 चौकार आणि 2 षटकार फटकावले. रहाणेला सुरेख साथ देत आक्रमक फलंदाजी करत सर्फराजनेही शतकी पल्ला पार केला. त्याने नाबाद खेळीत 219 चेंडूत 15 चौकार व 2 षटकार फटकावले. काही दिवसांपूर्वी रहाणेकडून भारताच्या कसोटी संघाचे उपकर्णधारपद काढून घेण्यात आले होते. त्याला कसोटी संघात पुनरागमन करण्यासाठी रणजी स्पर्धेत खेळण्याचा सल्ला बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिला होता. त्यानेही शतकी खेळी करत आपला दर्जा सिद्ध केला. हे त्याचे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील 36 वे शतक ठरले असून, रणजी स्पर्धेच्या इतिहासातील हे त्याचे 24 वे शतक आहे.
अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2022 Ahmednagar News :- कोपरगाव ते पुणतांबा या रस्त्यावर खड्यांची मोठी संख्या निर्माण झाली आहे. या खड्डेमय रस्त्याने शाळकरी मुलं दररोज प्रवास करताना दररोज छोटेमोठे अपघात होत असतात. अनेक दिवसांपासून वैतागलेल्या शाळकरी मुलींनी पुणतांबा कोपरगाव रस्त्यावर गांधीगिरी आंदोलन केले. या शाळकरी मुलींनी महिला दिनाचे औचित्य साधून रस्त्यातील खड्ड्यांना सडा रांगोळीने सजवून त्या खड्ड्यात वृक्षारोपण करुन स्थानिक प्रशासनाचा निषेध केला. यावेळी या शाळकरी मुलींना पाठींबा देण्यासाठी तेथील ग्रामस्थही रस्त्यावर उतरुन त्यांनीही या अंदोलनात सहभाग घेतला. एका बाजुला आठ मार्च हा दिवस जागतिक महीला दिन म्हणून साजरा केला जातो. महिलांच्या मान सन्मानाचे गुणगान गायले जात असताना कोपरगाव तालुक्यातील शाळकरी मुलींना आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ येते. हे चिञ अतिशय विरोधाभास दर्शवणारे आहे. या अनोख्या गांधीगिरी बद्दल शाळकरी मुलींनी आपल्या भावना व्यक्त करीत त्वरीत खड्डेमुक्त रस्ते करण्याची मागणी केली. दरम्यान, रस्त्याच्या कडेला निषेधाचे फलक धरुन रस्त्याने ये-जा करणाऱ्यांचे लक्ष शाळकरी मुलींनी वेधले. संबधीत विभागाचे अधिकारी, स्थानिक प्रशासनाचे सर्व अधिकारी, लोकप्रतिनिधी यांना पुणतांबा कोपरगाव रस्त्याची चाळण झाल्याच्या तक्रारी वारंवार करुनही या जिवघेण्या रस्त्याचे काम करण्यास टाळा टाळ होत असल्याची खंत येथील ग्रामस्थांनी केली.
अशा तऱ्हेने दरबानाने अबू सीरला काय हवे नको ते विचारून सर्व खर्च स्वतःच केला. अबू सोर चांगला बरा झाल्यावर म्हणाला- "अल्लाची मेहरबानी असेल तर मी तुझ्या उपकाराची फेड अवश्य करीन. परंतु तुझ्या उपकाराची पूर्ण फेड तो अल्ला करीमच करू शकेल." अबू सीर दरबानाला नम्रपणे म्हणाला. "तू या मोठ्या आजारातून वांचलास अल्लाची हीच केवढी मोठी मेहरबानी आहे !" दरबान म्हणाला. त्यानंतर अबू सीर आपली घोपटी घेऊन गावात निघाला. हिडतहिंडत तो अबू कीरच्या रंगाच्या दुकानासमोर आला. Fullscreen बाहर निरानराळया + th टाकलेले होते आणि दुकानासमोर मोठी गर्दी होती. इतके लोक कशासाठी जमा झाले आहेत हो ? काही विशेष आहे का ?" अबू सीरने गर्दीतल्या एका माणसाला विचारले. "हे दुकान दरबारी रंगारी अबू कोर यांचे आहे. येथे ते गमतीदार रंग कपड्यांना देतात." एक जण म्हणाला. ते पाहून व आपल्या मित्राचे दिवस पालटलेले ओळखून अबू सीरला फार आनंद झाला. त्याने विचार केला. अल्लाच्या कृपेने आज त्याला पुन्हा चांगले दिवस पहायला मिळाले. मी उगीच गैरसमज करून घेतला. बिचारा कामाच्या गर्दीत मला सोडून आला आणि विसरून गेला असावा. माझे पैसेच त्याला हे रंग विकत घ्यायला व कामाची सुरवात करायला उपयोगी पडले असतील. मी भेटल्यावर त्याला किती आनंद होईल व माझे घेतलेले पैसे तो दहापट करून देईल. असा विचार करून अबू सीर गर्दीतून वाट काढीत पुढे गेला. दार उघडून त्याने आंत डोकावून पाहिले. अबू कीर एका लोडाला टेकून बसलेला होता. त्याचा सर्व पोशाख राजसी थाटाचा होता. त्याच्या पाठीमागे चार काळे व चार गोरे गुलाम वायला तयार उभे होते. दोघे जण रंग तयार करीत होते. अबू कीर त्यांना पाणी किती रंग किती व इतर वस्तू किती गादीवर बसल्या वसन्याच सार होता. अबू सौर आत गेला आणि आपल्या मित्रासमोर जाऊन उभा राहला. त्यावेळी अत्र कीरचे लक्ष दुसरीकडे होते. त्याने आपल्याकडे पाहिले व प्रेमाने विचारपूस केली म्हणजे बरे, या विचाराने अबू सीर काही बोलला नाही. आपल्याला पाहल्याबरोबर आपला मित्र धावत पुढे येऊन घट्ट मिठी मारील असे अबू सीरला वाटत होते. परंतु अबू कीर अबू सोरला पाहून एकदम दचकला आणि शिवीगाळ करू लागला. म्हणाला-"काय रे भिकारडया ! तुला कितीदा सांगितले माझ्या दुकानासमोर येऊ नकोस. धरा रे याला खूप बडवून काढा दुकानाबाहेर ! बदमाश ! तो तेवढे म्हणण्याची खोटी, त्याचे काळे व गोरे गुलाम धावून आले. त्यांनी अबू मोरला धरून खूप बडविले. अबू सीर तोल जाऊन खाली पडला तेव्हां अबृ कीर पुढे आला. त्याने अबू सीरच्या पोटावर उभे राहून त्याला खूप लाथा मारल्या आणि शिव्या देत म्हणाला- "पहा, पुन्हां चांदोबा इकडे कधी फिरकलास तर तुला सुलतानाकडे घेऊन जाऊन त्यांच्या कडून तुझी चामडीच लोळवीन." अशा तऱ्हेने मार खाऊन अबू सीर रडत दुकानाबाहेर पडला. बाहेर उभे काही लोक होते त्यांनीदेखील 'कसला भिकारी मनुष्य आहे, कोठून आला कोण जाणे!" असे म्हणत त्याला जायला वाट दिली. अबू सीर आपल्या खोलीत परत आला. चटईवर पडून घडलेल्या गोष्टीबद्दल विचार करू लागला. त्याला खाणे पिणे काहीच सुचले नाही. रात्रभर झोप आली नाही. परंतु पडून राहल्यामुळे हलके वाटले. त्याने विचार केला, छान आंघोळ करावी म्हणजे
पडद्यावरच्या हसऱ्या चेहऱ्यांमागे काय काय लपलेलं आहे, याचा अंदाजही आपण बांधू शकत नाही. ग्लॅमरच्या झगमगत्या दुनियेत वावरणाऱ्या अनेकांच्या मनातील घुसमत, हृदयात ठसठसणारं दुःख अनेकदा समोर येत नाही. एकेकाळी मोठा पडदा गाजवणाऱ्या अभिनेत्री डेजी इराणी (Daisy Irani) यापैकीच एक. आता इतक्या वर्षानंतर डेजी यांनी त्यांच्या आयुष्याबद्दलचे असे काही खुलासे केलेत की, ते ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. दिग्गज दिग्दर्शक आणि कोरियोग्राफर फराह खानची मावशी डेजी इराणी यांनी 1950 मध्ये बाल कलाकार म्हणून करिअरला सुरुवात केली. आज त्या 70 वर्षांच्या आहेत. याच डेजी इराणी यांच्या वयाच्या 6 व्या वर्षी बलात्कार झाला होता. कोवळ्या वयात त्यांना बेल्टने बेदम मारलं गेलं होतं. 'मुंबई मिरर'ला दिलेल्या मुलाखतीत खुद्द डेजी यांनी हा धक्कादायक खुलासा केला. त्या म्हणाल्या, मी सहा वर्षाची होते. माझ्यासोबत राहणाऱ्या एका व्यक्तीने माझ्यावर बलात्कार केला. तो माझा गार्डियन होता. तो माझ्यासोबत चेन्नईत 'हम पंछी एक डाल के' या चित्रपटाच्या शूटिंगसाठी आला होता. एका रात्री त्याने हॉटेलच्या खोलीत माझ्यावर अत्याचार केला. त्याने मला बेल्टने बेदम मारलं आणि कोणाला काही सांगितलं तर जीवे मारण्याची धमकी दिली. ती व्यक्ती आज या जगात नाही. त्याचं नाव नजर असं होतं. त्याची चित्रपटसृष्टीतील व्यक्तींसोबत ओळख होती. कुठल्याही परिस्थितीत मी स्टार व्हावं, अशी माझ्या आईची इच्छा होती. मी मराठी चित्रपटातून केली डेब्यू केला होता. पण आजही ती घटना आठवते. त्या गोष्टीचं दुःख मला आजही होतं. त्या घटनेच्या दुसऱ्या दिवशी मी पुन्हा काम करायला लागले. जणू काही घडलंच नाही. आईला सांगू शकले असते, पण तेव्हा धीर झाला नाही. सुमारे 10 वर्षानंतर माझ्या आईला या घटनेबद्दल कळलं. हे खरं आहे का? एवढंच तिने मला विचारलं. मी हो म्हटलं, तेव्हा तिला स्वतःची लाज वाटली. ती माझी माफी मागू लागली. तो क्षण खूप हृदय पिळवटून टाकणारा होता, असं डेजी यांनी सांगितलं. डेजी इराणी यांनी अनेक चित्रपटांत बालकलाकार म्हणून भूमिका केल्या. बंदिश (1955), एक ही रास्ता (1956), नया दौर (1957) जेलर (1958), कैदी नं. 911 (1959) आणि दो उस्ताद (1959) या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं.
मुंबई । राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (१३ एप्रिल) रात्री राज्यातील जनतेशी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोरोनाची चेन ब्रेक करण्यासाठी १५ दिवसांच्या संचारबंदीची घोषणा केली आहे. तसेच या काळात सर्वसामान्यांसाठी मदतीचीही घोषणा केली. दरम्यान, ही मदत तुटपुंजी असल्याचे सांगत भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहेे. याबाबत केलेल्या ट्वीटमध्ये अतुल भातखळकर म्हणाले की, "मुख्यमंत्री महोदयांचे FB live म्हणजे नेहमी प्रमाणे 'कन्फ्यूजन ही कन्फ्यूजन है सोल्युशन का पता नही' या थाटाचे होते. मदतीच्या नावाखाली लोकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम त्यांनी केले आहे. परिस्थिती इतकी गंभीर असताना मुख्यमंत्री पंतप्रधानांकडे मदत मागण्यासाठी वाट कोणाची पाहत होते? ", असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांनी केलेली मदत अपुरी असल्याचे सांगत अतुल भातखळकर म्हणाले की, "मध्यमवर्ग, दुकानदार, केशकर्तनालय, बारा बलुतेदार असे कित्येक लोक मदतीपासून वंचित राहणार. यांचा विचार कोणी करायचा. मुळात ज्यांना मदत दिली तीही अपुरी, इतरांना तर साफ वाऱ्यावर सोडलंय. त्यांना मदत का मिळाली नाही ? की मनात येईल ते बोलायचं आणि मनाला वाटेल ते करायचं सगळाच सावळा गोंधळ सुरू आहे, असेही ते म्हणाले. As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
लाईव्ह न्यूज : नवीन Hyundai Santa Fe ची पहिली झलक समोर; Land Rover Defender ला देऊ शकते टक्कर! विरोधकांच्या आघाडीचं नाव ठरलं, २०२४ ला देशात INDIA विरुद्ध NDA सामना! छत्रपती संभाजीनगरः दोन जिवलग मित्रांची रेल्वेरुळावर आत्महत्या, मुकुंदवाडी रेल्वेस्थानकातील पहाटेची घटना. चीन-पाकिस्तानला भरणार धडकी! भारत खरेदी करणार ९७ ड्रोन, १० हजार कोटींची डील! तंत्रज्ञान : तंत्रज्ञान : तंत्रज्ञान : तंत्रज्ञान : 6000mAh च्या अवाढव्य बॅटरीसह Nokia C30 भारतात लाँच; शाओमी-रियलमीला देणार का टक्कर? तंत्रज्ञान : तंत्रज्ञान : तंत्रज्ञान : तंत्रज्ञान : तंत्रज्ञान : बुलिंग, स्टॉकिंग आणि तुम्ही! तंत्रज्ञान :
कुष्ठरोगाचा लवकर शोध घेणे आणि रोग्यांना उपचार पुरविणे या गोष्टींना प्राधान्य देऊन कुष्ठरोगाच्या समूळ निर्मूलनासाठी बहुआयामी आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांवर भर दयावा, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले. वर्धा : कुष्ठरोगाचा लवकर शोध घेणे आणि रोग्यांना उपचार पुरविणे या गोष्टींना प्राधान्य देऊन कुष्ठरोगाच्या समूळ निर्मूलनासाठी बहुआयामी आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांवर भर दयावा, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले. सेवाग्राम येथील महात्मा गांधी आयुर्विज्ञान महाविद्यालय येथे गांधी मेमोरिअल लेप्रसी फाऊंडेशन यांच्यावतीने आंतरराष्ट्रीय गांधी कुष्ठरोग सेवा पुरस्कार 2017 च्या वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार रामदास तडस, खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार डॉ. पंकज भोयर, विभागीय आयुक्त अनुप कुमार, संस्थेचे अध्यक्ष धिरुभाई मेहता, जे. के. बांठिया, डॉ. बी. एस. गर्ग, पी. एल. तापडिया आणि पुरस्कार प्राप्त डॉ. अतुल शहा व डॉ. एम. डी. गुप्ते आदी मान्यवर उपस्थित होते. महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी आणि सुशिला नायर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते सुतमाला अर्पण करण्यात आली. उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते डॉ. एम. डी. गुप्ते व डॉ. अतुल शहा यांना कुष्ठरोग निर्मूलन कार्यातील उल्लेखनीय सेवेबद्दल आंतरराष्ट्रीय गांधी कुष्ठरोग सेवा पुरस्कार 2017 प्रदान करण्यात आला. उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी भाषणाची सुरुवात मराठीतून करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी नायडू म्हणाले, मानवसेवा हीच माधव सेवा अर्थात ईश्वरसेवा असल्याची महात्मा गांधी यांची शिकवण होती. महात्मा गांधी यांचे विचार आजही सुसंगत ठरतात. खेड्यांकडे चला, असा नारा महात्मा गांधी यांनी दिला. ग्रामराज्याशिवाय रामराज्याची संकल्पना साकार होणार नाही. त्यासाठी आपल्या नियोजनाची दिशा ग्रामीण भागाकडे केंद्रित करणे गरजेचे आहे. खादी हे स्वावंलबन आणि साधेपणाचे प्रतिक आहे, अशी स्वदेशीबाबतची शिकवण देताना महात्मा गांधी यांनी सांगितले होते. या पार्श्वभूमीवर खादीचे उत्पादन मनरेगाशी जोडण्याची संकल्पना अत्यंत उपयुक्त ठरू शकते. आपल्या प्राचीन परंपराचे, संस्कृतीचे आपण जतन केले पाहिजे. पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षलागवड केली पाहिजे. उज्ज्वल भवितव्यासाठी निसर्ग आणि संस्कृतीचे संवर्धन करणे गरजेचे असल्याचेही नायडू यांनी सांगितले. कुष्ठरोगाबाबत महात्मा गांधी यांचे विचार मांडतांना नायडू म्हणाले, नोव्हेंबर १९४७ च्या हरिजन साप्ताहिकात गांधीजींनी लिहिले होते, कुष्ठरोग्यांची सेवा ही केवळ उपचारापुरती नाही तर त्यांचे पुनर्वसन करून, त्यांचे नैराश्य दूर करून जगण्याचा आनंद त्यांना घेता यावा यासाठीसुद्धा आहे. अशा रोग्याचे जीवन तुम्ही जर बदलून टाकले तर तुम्ही खेड्यातच नव्हे तर राष्ट्रात परिवर्तन घडवून आणू शकाल. १९४५ मध्ये प्रो. जगदीशन यांनी कस्तुरबा कुष्ठ निलयम या कुष्ठरोग्यांच्या निवासस्थानाचे उद्घाटन करण्यासाठी महात्माजींना निमंत्रित केले असता ते म्हणाले होते, उद्घाटनासाठी तुम्ही अन्य कुणाला तरी बोलवा पण ते बंद करण्यासाठी मात्र मला बोलवा, अशा त-हेने कुष्ठरोग्यांसाठी स्वतंत्र निवासाची व्यवस्था हा त्या समस्येवरचा तोडगा नाही, असेच त्यांनी सुचविले. १९५०मध्ये स्थापन झालेल्या गांधी मेमोरियल लेप्रसी फाऊंडेशनने या रोगाच्या निर्मूलनासाठी चांगली कामगिरी बजावून हा एक कलंक असल्याची समाजातील कल्पना दूर केली. या फाऊंडेशनने कुष्ठरोग्यांवर उपचार तर केलेच पण त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कामही केले, असे गौरवोद्गार नायडू यांनी काढले. २०१२-१३ या काळात कुष्ठरोग्यांची संख्या ८३ हजार होती व त्यांचे प्रमाण १० हजार लोकसंख्येत ०. ६८ टक्के इतके होते. २०१२ सालापर्यंत देशातील ६४० जिल्ह्यांपैकी ५४२ जिल्ह्यांतून या रोगाचा समूळ नायनाट करण्यात यश संपादन केले असले तरीही नवी प्रकरणे पुढे येत आहेत. याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. छत्तीसगड आणि दादरा-हवेली या केंद्रशासित प्रदेशात दर दहा हजारी दोन आणि चार रोगी हे प्रमाण आजही पाहावयास मिळते. ज्या बिहार, महाराष्ट्र आणि प. बंगाल या राज्यातून कुष्ठरोगाचे समूळ उच्चाटन झाले होते त्या राज्यात अलीकडच्या काळात या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले आहे. २०१२-१३ यावर्षी देशातील २०९ जिल्हे कुष्ठरोगाने बाधित होते, या जिल्ह्यात लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे. कुष्ठरोगाचा लवकर शोध घेणे आणि रोग्यांना उपचार पुरविणे या गोष्टीला आपण प्राथमिकता द्यायला हवी. रोगापेक्षा एक कलंक म्हणून रोग्याकडे बघितले जाते ही खरी चिंतेची बाब आहे. उपचारासंबधी अनभिज्ञता आणि रोगाविषयी असलेल्या भ्रामक कल्पना याचाच कुष्ठरोग्यांना अधिक त्रास होत असल्याचे त्यांनी प्रतिपादित केले. संपूर्ण जगात दरवर्षी अडीच लाख नवीन प्रकरणे प्रकाशात येतात. समाजात या रोगाविषयी जागरुकता निर्माण करावी लागेल. हा रोग कलंक आहे ही समजूत दूर करण्याचे प्रयत्न झाले तर रोगी स्वतःचा रोग लपवून ठेवणार नाहीत. २०२० पर्यंत या रोगामुळे व्यंग येणा-यांची संख्या दहा लाखात एक व्यक्ती इतकी कमी करण्याचा संकल्प जागतिक आरोग्य संघटनेने केला आहे. हा रोग समूळ नष्ट करण्यासाठी बहुआयामी आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज असल्याचे आवाहनही नायडू यांनी केले. पुरस्कार विजेते डॉ. एम. डी. गुप्ते मनोगतात म्हणाले, कुष्ठरोग निर्मूलनाच्या क्षेत्रात महात्मा गांधी आयुर्विज्ञान महाविद्यालयाचे योगदान मोठे आहे. कुष्ठरोग निर्मूलनाच्या क्षेत्रात आगामी काळात काम करतांना सुदुर सर्वेक्षण, उपलब्ध मनुष्यबळाचा वापर, स्थानिक संबधित संशोधनाचा वापर आणि किफायतशीर सेवा या मुद्द्यांवर अधिक भर द्यावा लागेल. असेही डॉ. गुप्ते यांनी सांगितले. डॉ. अतुल शहा म्हणाले, कुष्ठरोग व कुष्ठ रुग्णांप्रतीचा समाजाचा दृष्टिकोन बदलण्याची अद्यापही नितांत आवश्यकता आहे. कुष्ठरोगावरच्या उपचारात सर्वांगीण उपचार पद्धतीवर भर देण्याची गरज असून कुष्ठरुग्णांसमवेत कोणत्याही प्रकारचा भेदभाव करण्यात येऊ नये, असे आवाहनही डॉ. शहा यांनी केले. अध्यक्ष धीरूभाई मेहता प्रास्ताविकात म्हणाले, कुष्ठरोग निर्मूलनाच्या क्षेत्रात महात्मा गांधी आयुर्विज्ञान महाविद्यालय अनेक वर्षापासून कार्यरत असून कुष्ठरोग व कुष्ठरुग्णांबाबत समाजात असलेले अनेक गैरसमज दूर करण्याची गरज आहे. महात्मा गांधी यांच्या विचारापासून प्रेरणा घेऊन संस्था मार्गक्रमण करीत असल्याचेही मेहता यांनी सांगितले. जे. के. बांठिया आणि डॉ. बी. एस. गर्ग यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. पी. एल. तापडिया यांनी आभार मानले.
अहमदनगर - कोविड (COVID) प्रकोपामुळे सार्वजनिक वावरावर मोठ्या प्रमाणावर निर्बंध होते. राज्यातील मंदिरांची कवाडेही गेल्या दीड वर्षांपासून बंद होती. राज्य सरकारच्या सूचनेनुसार राज्यातील धार्मिक स्थळे भाविकांच्या दर्शनासाठी खुली करण्यात आली आहे. तब्बल दीड वर्षानंतर ओम साईरामच्या जयजयकाराने शिर्डी ( Shirdi ) येथील साईंचा दरबार (Sai Baba ) दुमदुमून गेला. मंदिर उघडल्यानंतर आज देशभरातील भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली. 'साई' दरबार सुनासुनाः भारतासोबतच विदेशी भाविकांची रीघ दर्शनासाठी लागलेली असते. वर्षभरात शिर्डी येथे मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागलेल्या असतात. मात्र, कोविड प्रकोपामुळे प्रत्यक्ष दर्शन रांग गेल्या दीड वर्षापासून बंद होती. 'या' भक्तांना नो-एन्ट्रीः साई संस्थान प्रशासनाने भक्तांच्या दर्शनासाठी स्वतंत्र नियमावली तयार केली आहे. तासाला एक हजार याप्रमाणे दिवसाला पंधरा हजार भक्तांना दर्शन घेता येणार आहे. संस्थानच्या मंदिर परिसरातील केंद्रावरुन तसेच संस्थानच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पास काढणे बंधनकारक करण्यात आले आहे. दहा वर्षांखालील बालके, गर्भवती महिला तसेच वृद्धांना मात्र दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार नाही. फुले, हार तसेच पूजेचे साहित्य घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. सबुरी अन् खबरदारीः सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले असणार आहे. कोविड संसर्गाचा धोका लक्षात घेऊन संस्थान प्रशासनाने दर्शनरांगेत सॅनिटायझेशन, थर्मल स्क्रीनिंगची स्वतंत्र व्यवस्था केली आहे. शिर्डीवरुन टेक-ऑफः तब्बल 18 महिन्यानंतर शिर्डी विमान तळावरुन विमानांचे उड्डाण होणार आहे. विमानतळ प्राधिकरणाने उड्डाणांची घोषणा केली आहे. येत्या 10 सप्टेंबरला शिर्डी-हैदराबाद व शिर्डी-चेन्नई अशी दोन उड्डाणे होणार आहेत. परिस्थितीचा अंदाज घेऊन विमानसेवा पूर्ववत केली जाणार असल्याची माहिती प्राधिकरणाने दिली आहे.
नवी दिल्ली - अगोदर लखनौ संघाला पराभवाचा धक्का देणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सने प्रगती करत असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरलाही हादरा दिला. १८२ धावांचे भले मोठे लक्ष्य सात विकेट आणि २० चेंडू राखून पार करून दिल्ली संघाने आयपीएलमधील आपले आव्हान कायम ठेवले. विराट कोहली, फाफ डुप्लेसी आणि लोमरोर यांच्या आक्रमक फलंदाजीमुळे बंगळूर संघाने प्रथम फलंदाजी करताना १८१ धावा उभारल्या होत्या. एवढे मोठे आव्हान असूनही बेधडक फलंदाजी करणाऱ्या दिल्लीच्या फलंदाजांनी बंगळूरच्या गोलंदाजांना प्रतिकाराचीही संधी ठेवली नाही. फिल सॉल्टने बंगळूरच्या प्रतिकारावर मिठ चोळताना ८७ धावांचा तडाखा दिला यात त्याने ८ चौकार आणि ६ षटकारांची पेरणी केली. अशी खेळी केली आणि बंगळूरच्या सर्वच गोलंदाजांची बेदम पिटाई केली. डेव्हिड वॉर्नर आणि मिशेल मार्श यांनी त्याला चांगली साथ दिली त्यामुळे दिल्लीचा धावफलक १२ ते १३ धावांच्या सरासरीने धावत होता. तेथेच त्यांचा विजय निश्चित झाला होता. दिल्ली संघाने गुणतक्त्यात प्रथमच तळाच्या स्थानातून पुढे प्रगती केली आहे आता ते १० संघात नवव्या क्रमांकावर आहेत. या पराभवानंतर बंगळूरचे पाचवे स्थान मात्र कायम राहिले आहे. बंगळूर ः २० षटकांत ४ बाद १८१ (विराट कोहली ५५ - ४६ चेंडू, ५ चौकार, फाफ डुप्लेसी ४५ - ३२ चेंडू, ५ चौकार, १ षटकार, महिपाल लोमरोर नाबाद ५४ - २९ चेंडू, ६ चौकार, ३ षटकार, मुकेश कुमार ३-०-३०-१, मिशेल मार्श ३-०-२१-२) पराभूत वि. दिल्ली ः १६. ४ षटकांत ३ बाद १८७ (डेव्हिड वॉर्नर २२ -१४ चेंडू, ३ चौकार, १ षटकार, फिल सॉल्ट ८७ - ४५ चेंडू, ८ चौकार, ६ षटकार, मिशेल मार्श २६ -१७ चेंडू, ३ चौकार, १ षटकार, रॉसो नाबाद ३५ - २२ चेंडू, १ चौकार, ३ षटकार)
१. काशीनाथपंत गाडगीळ यांनी आपल्या मुलीचा विवाह १६ व्या वर्षांनंतर केला. म्हणून वरातीवर दगडफेक करून वधुवारांपैकी एकाला तरी हॉस्पिटलमध्ये पाठवायची इच्छा होती. सफल झाली नाही. पण फक्त काही बायकांस दगड लागले! २. 'सुधारक'पत्रावर 'डोळा' होता. पण कृती करण्यास असमर्थ ठरल्याने 'पापी' आगरकर हातून सुटला. (आगरकर ९५ साली गेले!). म्हणून नंतरचे संपादक कुलकर्णी आणि पटवर्धन यांना लोखंडी काम्बिने कानशिलात आणि डोक्यावर वार केले. ३. रानडयांच्या सामाजिक सभेचा मंडप जाळायचा विचार होता. त्याकरता एक नकली सुधारणांची संस्था बनवून तिकिटं मिळवण्याचा प्रयत्न केला, तो फसला! ४. शिवाजी काही परमेश्वर नसतानाही त्याचा जयंती उत्सव टिळकांनी सुरू केला, त्याची निंदा! ५. टिळकांवर टीका (हे त्यांचंच शीर्षक आहे!)... धर्मनिष्ठ म्हणवणाऱ्यांना लांच्छनास्पद अशा बऱ्याच गोष्टी त्यांच्यामध्ये वास करत होत्या! मात्र काही दिवसांनी हा पुष्कळ पटीने सुधारेल अशी आम्हाला आशा होती! ७. एखादा युरोपियन अपराधी पाहून त्याला दंडाची शिक्षा दिल्यावर देवधर या सुधारकवादी संपादकाचे मस्तक भयंकर रीतीने कापण्याची योजना! ९. रँड मानी होता, निर्व्यसनी होता. स्त्री-लंपट नव्हता. त्याच्यावर तीन-साडेतीन महिने पाळत ठेवली तेव्हा त्याचे बरेच गुण आमच्या लक्षात आले. पण आमचा धर्मशत्रू बनल्यामुळे सूड घेणे जरुरीचे झाले. प्लेगचा आजार आणि त्यामुळे गेलेले, जाऊ शकत असलेले बळी आणि त्यापासून वाचण्यासाठी करायची उपाययोजना याची माहिती वाचकांना असेल, अशी आशा. नसल्यास जरूर मिळवावी. उपरोक्त अनुभव/विचार वाचून चापेकर बंधूंना काय म्हणावं आणि त्यांच्याविषयी कसा आणि किती आदर बाळगावा, हे मी वाचकाच्या सद्सद्विवेक बुद्धीवर सोडतो...!
बातमी - सिलिकॉन उद्योगात बराच काळ राहिल्यानंतर बर्याच ग्राहकांना हा प्रश्न ऐकू येईलः समान आकारात किंवा समान संरचनेसह सिलिकॉन उत्पादनांची किंमत वेगवेगळी आहे.\nदीर्घकाळ सिलिकॉन उद्योगात राहिल्यानंतर, बर्याच ग्राहकांना हा प्रश्न ऐकू येईलः समान आकार किंवा अगदी समान संरचनेसह सिलिकॉन उत्पादनांची किंमत वेगवेगळी आहे.\nदीर्घकाळ सिलिकॉन उद्योगात राहिल्यानंतर, बर्याच ग्राहकांना हा प्रश्न ऐकू येईलः समान आकार किंवा अगदी समान संरचनेसह सिलिकॉन उत्पादनांची किंमत वेगवेगळी आहे. या विषयावर, तेथे वापरले जायचे\nमी थोडा वेळ त्रास झाला. या समस्येचे निराकरण करण्यासाठी, उद्योगातील पूर्ववर्तींकडून शिकण्याव्यतिरिक्त, मी तुलनासाठी भिन्न किंमती, उत्पादक आणि प्रदेशांचे सिलिकॉन उत्पादने देखील खरेदी केली.\nआज मी तुम्हाला आमच्या कंपनीचे एक साधे स्पष्टीकरण देईन'सिलिकॉन उत्पादने उद्योग समजून घेण्यासाठी आपल्याला मदत करण्याच्या आशेने उत्पादने.\n1. सामग्रीच्या बाबतीतः काही विशेष उद्योगांना सिलिकॉन उत्पादनांसाठी काही वैशिष्ट्यपूर्ण आवश्यकता असतात. उदाहरणार्थ, हवामान गोंद आणि सामान्य सिलिकॉन उत्पादनांनी बनविलेले सिलिकॉन उत्पादनांची किंमत निश्चितपणे भिन्न आहे.\n2. संरचनेचा आकारः काही सिलिका जेल बाहेरील बाजूने सारखीच दिसतात, परंतु त्याची अंतर्गत रचना आकार भिन्न असू शकते आणि रचना देखील अधिक क्लिष्ट आहे, ज्यामुळे उत्पादनाचे परिणाम प्रभावित होतील, म्हणून किंमत नाही त्याच.\n3. प्रक्रियाः सिलिकॉन उत्पादनांच्या उत्पादन प्रक्रियेची विविधता देखील उत्पादन खर्चावर परिणाम करेल. जसे की रेशीम प्रिंटिंग, रोल प्रिंटिंग, थर्मल ट्रान्सफर इत्यादी\nM. साचाः उत्पादन साच्यातील छिद्रांची संख्या उत्पादन क्षमतेवर परिणाम करेल. केवळ जेव्हा ग्राहकांची मागणी आणि मूसमधील छिद्रांची संख्या वाजवी प्रमाणात पोहोचते तेव्हाच मजुरीवरील खर्च कमी केला जाऊ शकतो आणि सानुकूलित सिलिकॉन उत्पादनांची किंमत-प्रभावीता सुधारली जाऊ शकते.\nDe. मागणीः समान उत्पादनासाठी, पसंतीची संख्या जितकी मोठी असेल तितकी किंमत अधिक अनुकूल असेल.\nवरील गोष्टींवरून असे दिसून येते की सिलिकॉन उत्पादनांची किंमत समान दिसत नाही. हे वापरलेल्या कच्च्या मालाशी संबंधित आहे, रचना आकार, उत्पादन तंत्रज्ञान, साचा पोकळी क्रमांक आणि ऑर्डर प्रमाण.\nम्हणूनच, ग्राहकांनी उत्पादनांचे सानुकूलित करण्यापूर्वी या सामग्रीचे निर्धारण करणे आणि नंतर निर्मात्यास सहकार्य करण्याची शिफारस केली जाते. आपणास आवश्यक असेल तोपर्यंत आम्ही नेहमीच तिथे आहोत. झोंगशेंग सिलिकॉनने सर्व ग्राहकांचे सानुकूलित स्वागत केले आहे.
"मंगल देशा ! पवित्र देशा ! महाराष्ट्र देशा ! प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा . . . " ही कविता लिहून तुम्ही काय मिळवलंत गडकरी ? तुमच्या नावात राम असला म्हणून काय झाले सद्यराज्यात रावण जास्त सक्रीय आहेत . . . तुम्ही माणसं ओळखून लिहायला पाहिजे होतं. तुम्ही चुकलात हो ! गोविंदाग्रज म्हणून आम्ही तुम्हाला मस्तकी मिरवत राहिलो आणि आज तुम्ही छिन्न विच्छिन्न झालात तरी आम्ही नेहमीप्रमाणे नुसते मख्ख बघत राहिलो ! मास्तर, आमच्यापेक्षा तुम्ही शब्दबद्ध केलेली ती जर्जर 'सिंधू' बरी की हो, जिने 'सुधाकरा'च्या 'एकच प्याल्या'ची नशा उतरवली. आम्ही तथाकथित सुसंस्कृत जातीयतेचे जहरी प्याले पित राहतो अन पाजतही राहतो ! पण आमचे कोणीच काहीच वाकडे करू शकत नाही ! ! आमच्यातला हा तळीराम जरा वेगळा आहे. तो कधी भगवा असतो तर कधी निळा तर कधी हिरवा ! मी काय म्हणतोय हे तुम्हाला कदाचित कळणार नाही, मास्तर तुम्ही रंगांधळे होतात का हो ? प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा ! . . . . " असं तुम्ही लिहिलंय ! इथे भगव्याच्या व्याख्या माहिती नसलेले लोक तुम्ही इहलोक सोडून दशकं लोटली तरी तुमच्या जीवावर उठलेत हो ! का तुम्ही प्रणाम केलात ह्या महाराष्ट्राला ? का तुम्ही जरिपटक्यावर जीव लावलात? "अंजनकांचन करवंदीच्या काटेरी देशा , बकुळफुलांच्या प्राजक्ताच्या दळदारी देशा' मास्तर या पंक्तीत तुम्ही दळदारी असं न लिहिता दरिद्री असं लिहायला हवं होतं. . . . नाहीतरी किती जणांना दळदारीचा अर्थ ठाऊक आहे ? मराठी भाषा आणि मराठी साहित्यावर इथे नावालाच प्रेम केलं जातं ! अन तुम्ही तर एक क्षुद्र कस्पटासमान लेखक की हो ! तरीही काही जणांना तुमचा चेहरा नकोसा वाटतो. ते तुम्हाला भीतात मास्तर ! आपले मूल मरणपंथाला लागल्यावर 'राजहंस माझा निजला' असे हळवे काव्य लिहिणारे तुम्ही जगाला कसे उमगणार हो मास्तर ? काय गरज होती तुम्हाला नाटके लिहिण्याची ? तुमच्या नाटकांना इंग्रज घाबरले असतील. ते गोरे देश सोडून गेले पण आता काळे इंग्रज त्यांचा वारसा चालवत आहेत. गोरयांनी तुमच्या अंगाला हात लावायचे धाडस केले नव्हते पण आताच्या त्यांच्या वंशजांनी चक्क तुमचा पुतळा फोडून त्याचे अवशेष गटारात टाकून आपली अतृप्त विकारवासना शमवून घेतलीय. केव्हढा हा डंख ! "काही गोड फुले सदा विहरती स्वगागनांच्या शिरी, काही ठेवितसे कुणी रसिकही स्वच्छंद हृन्मंदिरी . . . . " आहे जो सुखदुःखभोग नशिबीं, कोणास तो ना टळे ॥ " असंही तुम्ही लिहिलंय. आता मला सांगा की, पुतळा फोडण्याचा विधिलेख तुमच्या भाळी होता का ? की हा भोग टाळता आला असता ? कदाचित रक्षणकर्ते आणि भंजक दोघेही एक असावेत त्यामुळे हा योग कधी टळला नसता. तुम्ही हे तेंव्हा ओळखून लिहिलंत. तुम्ही अंतर्ज्ञानी होतात का ? "इश्काचा जहरी प्याला। टोकाविण चालु मरणे। ते त्याचे होते जगणे॥ सारखे॥ " मास्तर तुमच्या नशिबी इश्काचा प्याला येण्याऐवजी काही लोकांनी प्रेमाने जतन केलेला तिरस्काराचा प्याला येऊ पाहतोय. असूद्यात, हरकत नाही. कारण 'टोकाविण चालु मरणे' असं तुम्ही पूर्वीच सांगून ठेवलेय. मास्तर तुम्ही एकदा भावूक होऊन जात लिहिलं होतं की, "क्षण एक पुरे प्रेमाचा। वर्षाव पडो मरणांचा। मग पुढे॥ " असे पुतळे फुटणार हे कदाचित तुम्हाला आधी कळून चुकले असावे. वर्षाव पडो मरणांचा असं तुम्ही लिहिलंय त्यामुळे असे कितीएक पुतळे फुटले तरी तुम्हाला काही फरक पडणार नाही हे नक्की ! "स्मरणार्थ तयाच्या ही बोलांची रानपालवी। मराठी रसिकांसाठी 'गोविंदाग्रज' पाठवी॥ " तुमची ही पालवी काही लोकांच्या डोळ्यात सलते ना ! तेंव्हा कृपा करून अशी शब्दपालवी पुढील जन्मी मराठी साहित्यशारदेच्या दरबारी वाहू नका. १३६, कसबा पेठेतदेखील आता काही शिल्लक राहीले नाही. १९१९ मध्ये याच वास्तूत तुम्ही अखेरचा श्वास घेतला होतात. इथल्या सिन्नरकर वाड्यातील तिसऱ्या मजल्यावरील खोलीत तुम्ही वास्तव्यास होतात. मात्र, काळाच्या प्रवाहात ही गोष्ट इतिहासजमा झाली. आमच्या शासनाकडून व साहित्यप्रेमी मंडळीकडून यथावकाश तुमच्या खोलीकडे सोयीस्कर दुर्लक्ष झाले याचा राग मनात धरू नका. तुमची खोली जोपासून कुठल्या सरकारला काय फायदा होणार होता ? त्यापेक्षा जुने जाऊदया मरणालागुनी हे आम्हाला फार कळते हो ! तुम्ही आपले साहित्य संमेलनापुरते उरलात हे देखील तुम्ही ध्यानात ठेवा ! तुमच्या माथी 'राजसंन्यास' कायम राहणार आहे, चिंता नसावी. आता माझा साधा आणि अखेरचा प्रश्न. किमान याचे उत्तर तरी तुम्ही द्यावे. मास्तर, ज्यांनी आज पुण्यात तुमचा पुतळा फोडला तेच हे चिंतातुर जंतू होत का ? तुम्ही यांना 'जंतू' म्हणालात पण काहींना हे वाघ सिंह वाटतात. आता एखादे जंतूनाशक पण तुम्हीच सुचवा मास्तर कारण सरकारमध्येही काही जंतू आहेत, व्यवस्था तर जंतूमय झालीय आणि माझ्यासारखे बाजारबुणगे साहित्यप्रेमी जंतू मारण्या इतकं धाडस हरवून बसले आहेत. तेंव्हा मास्तर यावर उतारा तुम्हीच सुचवायचा आहे. तुमच्यावर माझी फार श्रद्धा आहे. आशा करतो की तुम्ही माझ्या पत्राचे उत्तर द्याल. 'बाकी सर्व ठीक आहे. . ' हे नेहमीचे पालुपद लिहून थांबतो. आणि हो, एक सांगायचे राहिले, कोणी काही म्हणो मायमराठीच्या माझ्यासारख्या फाटक्या रसिकांच्या हृदयाशी असणारे तुमचे 'भावबंधन' चिरंतन असेल याची ग्वाही मात्र छाती ठोकून देतो ! - तुमचाच, समीरबापू गायकवाड. वाऱ्यावरती थिरकत आले झाडावरूनी पिंपळपान. . . . ' )
भारतीय हवाई दलाच्या (Indian Air Force) ताफ्यात 'अपाची' (Apache) हे अत्याधुनिक पद्धतीचे लढाऊ हेलिकॉप्टर भारतीय हवाई दलात दाखल झाले आहे. यामुळे आता शत्रूवर मात करण्यासाठी हवाई दलाची ताकद अधिक मजूबत होणार आहे. भारताने अमेरिका सोबत 22 हेलिकॉप्टरचा करार केला आहे. तर अॅरिझोना येथील उत्पादन तळावर हवाई दलाच्या अधिकाऱ्यांकडे हे हेलिकॉप्टर सोपवण्यात आले आहे. अपाची हे जगातील सर्वोत्कृष्ट लढाऊ विमान असल्याचे म्हटले जाते. यामुळे आता हवाई दलाची ताकद अधिक मजबूत होणर आहे. त्यातसोहत पाठणकोट आणि आसाम येथील जोरहाटमध्ये हे हेलिकॉप्टर तैनात करण्यात येणार आहेत. येत्या 2020 पर्यंत भारतीय हवाई दलालात 22 अपाची हेलिकॉप्टर सुपूर्द करण्यात येणार आहेत. जूलै महिन्यात याची पहिली बॅच हवाई दलाला मिळणार आहे. (भारतीय हवाई दलाने रोखले पाकिस्तानचे Antonov AN-12 विमान, जयपूर विमानतळावर विमानचालकाची चौकशी सुरु) तर अपाचीच्या 22 पैकी 11 हेलिकॉप्टर हे एएनय/एपीजी-79 लाँगबो फायर कंट्रोल रडार सिस्टिमची असणार आहेत. तसेच ठराविक अंतरावरुन शत्रूवर अचूक हल्ला करणे आणि शत्रूच्या जमिनीवर सुद्धा हे हेलिकॉप्टर काम करु शकते ऐवढी यांची क्षमता आहे.
वेध नाताळाचे : ख्रिश्चन बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला नाताळ सण अवघ्या १० दिवसांवर येऊन ठेपला आहे. वेध नाताळाचे : ख्रिश्चन बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला नाताळ सण अवघ्या १० दिवसांवर येऊन ठेपला आहे. ख्रिसमसच्या उत्सवात घरांची, प्रार्थनास्थळांची आकर्षक सजावट केली जाते. त्यासाठी बाजारपेठेतही विविध शोभेच्या वस्तू आल्या आहेत. यवतमाळच्या बाजारओळीत नटलेले हे आकाशदिवे.
Home Ahmednagar City Civic News Special Story मैत्रेय ग्राहक व प्रतिनिधींचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने. मैत्रेय ग्राहक व प्रतिनिधींचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने. अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- बंद पडलेल्या मैत्रेय कंपनीत अडकलेला ग्राहकांचा पैसा (परतावा) मिळण्याच्या मागणीसाठी मैत्रेय उपभोक्ता एवम अभिकर्ता असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात जिल्हा संपर्क प्रमुख सतीश पाटील, कल्पना वखरे, रमेश तावरे, बाळासाहेब वाघ, मच्छिंद्र निकम, निला शिंदे, बाळासाहेब आडसळे, संदीप बनकर, युनुस शेख, वंदना खेतमाळीस, वर्षा डांगे, रेहाना खान, निलेश वाणी, गौतम महाजन, मीरा केदार आदिंसह जिल्ह्यातील प्रतिनिधी व ग्राहक सहभागी झाले होते. अहमदनगर जिल्ह्यात मैत्रेय कंपनीच्या संचालकांनी आर.डी. व एफ.डी. स्वरुपाच्या (4, 5, व 6 वर्षा) कालावधीच्या योजनामध्ये व्याजाचे अमीष दाखवुन जवळपास जिल्ह्यातील कोपरगाव, श्रीरामपूर, अहमदनगर, संगमनेर या चार कार्यालयाच्या माध्यमातून 150 कोटी पर्यंन्तच्या ठेवी जमा केल्या. तसेच मैत्रेय कंपनीने 18 वर्षात चार वेगवेगळ्या कंपनीच्या नावाने पैसा गोळा केले. दि.5 फेब्रुवारी 2016 पासून कंपनी बद असून, सध्या कंपनीचे महाराष्ट्रातील सर्व कार्यालय बंद अवस्थेत आहे. ग्राहकांनी गुंतवणुक केलेल्या ठेवीची मुदत संपुनही त्यांचे परतावे त्यांना परत मिळाले नाही. या प्रकरणी कंपनीवर नाशिक येथे गुन्हा दाखल होवून, जिल्हा न्यायालय व नाशिक पोलिसांनी योग्य कारवाई करुन तेथील ग्राहकांना परतावे मिळून देण्यासाठी महत्त्वाची भुमिका बजावली. नाशिकच्या धर्तीवर अहमदनगर जिल्ह्यातील ग्राहकांचे मैत्रेय कंपनीत अडकलेले हक्काचे व कष्टाचे पैसे (परतावे) मिळण्यासाठी जिल्हाधिकार्यांनी याप्रकरणी जातीने लक्ष घालून कारवाई करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संदिप निचित यांना देण्यात आले.
मुंबई :- राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज होत मतदानापूर्वी मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे. अशातच एमआयएमचे (MIM)खासदार इम्तियाज जलील(Imtiaz Jalil) यांनी एमआयएमचे दोन्ही आमदार काँग्रेसच्या (Congress) उमेदवाराला मतदान करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यासोबतच आमचा पाठिंबा केवळ महाविकास आघाडीला (MVA) आहे. शिवसेनेला (Shivsena) नाही. शिवसेनेसोबत आमचे वैचारिक आणि राजकीय मतभेद कायम असतील, असे म्हणत त्यांनी शिवसेनेवर निशाणाही साधला. आणि यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) शिवसेनेला लक्ष्य केले आहे. इम्तियाज जलील यांनी ट्वीट करत एमआयएमचे दोन आमदार काँग्रेस उमेदवाराला मतदान करणार असल्याचे म्हणाले आहे. 'भाजपाचा पराभव करण्यासाठी एमआयएमने महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सहभागी असणाऱ्या शिवसेनेसोबत आमचे राजकीय आणि वैचारिक मतभेद कायम असतील. आमच्या आमदारांच्या मतदारसंघात विकास व्हावा यासाठी आम्ही काही अटी ठेवल्या आहेत. तसेच एमपीएससीमध्ये अल्पसंख्यांक सदस्याची नियुक्ती व्हावी अशी मागणी सरकारकडे करण्यात आली आहे. महाराष्ट्र वक्फ बोर्डाचे उत्पन्न वाढवण्यासाठी पावले उचण्याची मागणीही करण्यात आली आहे. याशिवाय मुस्लिमांसाठी आरक्षणाची मागणी करण्यात आली आहे. तसेच पक्षाचे प्रमुख असुद्दीन ओवैसी यांनी महाराष्ट्रातील आमच्या दोन आमदारांना काँग्रेसचे उमेदवार इम्रान प्रतापगढी यांना मतदान करण्यास सांगितले आहे. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत, असे इम्तियाज जलील यांनी ट्वीटमध्ये स्पष्ट केले आहे. एमआयएमने महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी ट्विटरवरुन महाविकास आघाडी आणि शिवसेनेवर निशाणा साधला. 'राज्याची शोभा होईल अशी ही राज्यसभा निवडणूक सुरू आहे. जनता असंख्य अडचणींचा सामना करत असताना सत्ताधाऱ्यांचा पंचतारांकित निवडणुकीचा खेळ सुरू आहे,' असा टोला काळे यांनी लगावलाय. पुढे बोलताना त्यांनी, 'त्या निजामाची अवलाद एमआयएमची मदत घेऊन जनाची नाही पण मनाचीही महाविकास आघाडीने सोडली आहे तर शिवसेनेचं नकली, ढोंगी हिंदुत्व उघडं पडलं आहे,' असे ट्विट करत मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
(६८) लोक म्हणतात, अल्लाहने एखाद्याला पुत्र बनविले आहे.६६ पवित्र आहे अल्लाह!६७ तो तर निस्पृह आहे, आकाशांत व पृथ्वीत जे काही आहे सर्व त्याच्या मालकीचे आहे,६८ तुमच्यापाशी या कथनाचे काय बरे प्रमाण आहे? तुम्ही अल्लाहसंबंधी त्या गोष्टी सांगता काय ज्याचे ज्ञान तुम्हाला नाही?\n(६९) हे पैगंबर (स.)! सांगा, जे लोक अल्लाहवर खोटे कुभांड रचतात ते कदापि सफल होऊ शकत नाहीत.\n(७०) जगातील काही दिवसाच्या जीवनांत मौजमजा करून घ्या, मग आमच्याकडे त्यांना परतावयाचे आहे, मग त्या कुप्रâच्या (इन्कार) बदल्यात जे ते करीत आहेत आम्ही त्यांना कठोर यातनेचा आस्वाद चाखवू.\n(७१) या लोकांना नूह (अ.)६९ ची सत्य कथा ऐकवा, त्या वेळेची सत्य कथा जेव्हा त्याने आपल्या लोकांना सांगितले होते, "हे देशबंधुंनो, जर माझे तुमच्या दरम्यान राहणे व अल्लाहची वचने ऐकवून ऐकवून तुम्हाला गाफीलपणातून जागे करणे तुम्हाला असह्य झाले आहे तर माझा विश्वास अल्लाहवर आहे, तुम्ही आपल्या मानलेल्या भागीदारांना बरोबर घेऊन एकमुखी निर्णय घ्या आणि जी योजना तुमच्या दृष्टीसमोर असेल तिच्यावर खूप विचारविनिमय करा जेणेकरून तिचा कोणताही पैलू तुमच्या दृष्टीतून सुटू नये, मग ती माझ्याविरूद्ध अंमलात आणा आणि मला मुळीच सवड देऊ नका.७०\n(७२) तुम्ही माझ्या उपदेशापासून तोंड फिरविले (तर माझे कोणते नुकसान केले?) मी तुमच्यापासून कोणत्याही मोबदल्याचा इच्छुक नव्हतो, माझा मोबदला तर अल्लाहपाशी आहे आणि मला आज्ञा दिली गेली आहे की (मग कुणी मान्य करो वा न करो) मी स्वतः मुस्लिम (आज्ञाकारी) बनून राहावे."\n(७३) त्यांनी त्याला खोटे लेखले आणि परिणाम असा झाला की आम्ही त्याला व त्या लोकांना जे त्याच्याबरोबर नावेत होते वाचविले आणि त्यांनाच भूतलावर उत्तराधिकारी बनविले आणि त्या सर्व लोकांना बुडवून टाकले ज्यांनी आमच्या संकेताना खोटे लेखले होते. तर मग पाहा ज्यांना सावध केले गेले होते (आणि तरीदेखील त्यांनी मान्य केले नाही) त्यांचा कसा शेवट झाला.\n(७४) मग नूह (अ.) नंतर आम्ही वेगवेगळ्या पैगंबरांना त्यांच्या लोकसमूहाकडे पाठविले आणि ते त्यांच्याकडे उघड-उघड संकेत घेऊन आले, परंतु ज्या गोष्टीला त्यांनी अगोदर खोटे लेखले होते त्याला पुन्हा मानले नाही. अशाप्रकारे आम्ही मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांच्या हृदयावर मोहर लावतो.७१\n६६) वरील आयतीमध्ये लोकांना त्यांच्या अज्ञानतेवरून टोकले गेले की त्यांनी आपल्या धर्माचा पाया ज्ञानाऐवजी अनुमानावर आणि अंधविश्वासावर रचला आहे. तसेच वैज्ञानिक दृष्टीने त्यावर विचार करत नाही की आम्ही ज्या धर्माला आचरणात आणत आहोत त्याचे एखादे प्रमाण आहे किंवा नाही. याच अनुषंगाने िख्र्तासी आणि इतर धर्मियांच्या या गैरसमजुतीवर त्यांना टोकले गेले आहे की त्यांनी अनुमानावरच कुणाला ईश्वराचा पुत्र ठरवून टाकले आहे.\n६७) 'सुब्हानल्लाह' हा शब्द आश्चर्य किंवा विस्मय व्यक्त करण्यासाठी वापरला जातो. कधी याच्या वापराने त्याचा तात्पर्य अर्थानुसार आहे. म्हणजे 'अल्लाह सर्व त्रुटींपासून पवित्र आहे' येथे हे वाक्य दोन्ही अर्थ देत आहे. लोकांच्या या कथनावर विस्मय व्यक्त करणेसुद्धा योग्य आहे. तसेच उत्तरात त्यांना सांगणे की अल्लाह त्रुटीहीन आहे आणि त्याचा कोणी पुत्र आहे हा संबंध व्यक्त करणे कशा प्रकारे योग्य होऊ शकते?\n६८) येथे त्यांच्या कथनाचे खंडन करण्यासाठी तीन गोष्टी सांगितल्या आहेत. एक अल्लाह त्रुटीहीन आहे. दुसरी अल्लाह निस्पृह आहे. तिसरी आकाश आणि जमिनीतील सर्व वस्तू अल्लाहची संपत्ती आहे. हे संक्षिप्त् उत्तर थोड्याशा तपशीलाने समजून घेतले जाऊ शकते, स्पष्ट आहे की पुत्र सख्खा असू शकतो किंवा दत्तकपुत्र असू शकतो. जर हे लोक एखाद्याला अल्लाहचा सख्खा पुत्र ठरवितात तर अर्थ होतो की, अल्लाहला त्या प्राण्यासारखे समजतात जे व्यक्तिगत रूपात नश्वर असते. त्याच्या अस्तित्वाला शिल्लक ठेवण्यासाठी त्याची एखादी जात आणि त्या जातीतील एखादे जोडपे असणे आवश्यक आहे. या जोडप्यापासून त्यांची संतती व्हावी ज्याद्वारे त्याचे अस्तित्व आणि कार्य शिल्लक राहील. जर हे लोक या अर्थाने अल्लाहचा पुत्र ठरवतात की अल्लाहने कुणाला आपला पुत्र मानले आहे. तरी या स्थितीपासून ते अलग होऊ शकत नाही. त्यांनी अशा स्थितीत अल्लाहला त्या माणसासारखे समजून घेतले जो निपुत्रिक असल्याने आपल्या जातीतील एखाद्याला आपला पुत्र म्हणून दत्तक घेतो. त्यामुळे तो त्याचा वारस बनतो आणि निपुत्रिकतेचा कलंक थोड्या-फार प्रमाणात पुसला जातो. किंवा या लोकांचा विचार असेल की अल्लाहसुद्धा मनुष्याप्रमाणे भावनाशील आहे आणि आपल्या अगनीत दासांपैकी एकाशी त्याचे असे प्रेम जडते की त्याला आपला पुत्र बनवितो. या तिन्ही प्रकारांपैकी कोणत्याही प्रकारात अल्लाह वर अनेक दोषारोप, त्रुटी आणि अनेक गरजांची इच्छा असल्याचा आरोप लावला गेला आहे. म्हणून पहिल्याच वाक्यात स्पष्ट सांगितले गेले आहे की अल्लाह त्या सर्व त्रुटी, दोष आणि उणिवांपासून पवित्र आहे, ज्या तुम्ही त्याच्याशी जोडत आहात. दुसऱ्या वाक्यात सांगितले गेले की अल्लाह त्या गरजांपासूनही निरपेक्ष आहे, ज्यामुळे नश्वर माणसाला संततीची आवश्यकता भासते आणि तिसऱ्या वाक्यात स्पष्ट सांगण्यात आले आहे की जमिनीवर व आकाशांत अल्लाहचे दास आणि त्याची संपत्ती आहे. त्यांच्यापैकी कुणाशीही अल्लाहचे वैयक्तिक संबंध नाही की सर्वांना सोडून त्याला आपला पुत्र बनवितो, एकुलता एक पुत्र बनवितो किंवा उत्तराधिकारी घोषित करतो. गुणांच्या आधारावर निश्चितच काही लोकांना दुसऱ्यांच्यापेक्षा जास्त प्रिय ठेवतो. परंतु या प्रेमाचा हा अर्थ होत नाही की एखाद्या दासाला उपासनेच्या आणि दासत्वाच्या ठिकाणाहून उठवून ईशत्वात भागीदार बनविले जावे. या प्रेमाचा फार तर अधिकार आहे ज्याला वरील आयतीत वर्णन केले आहे. "ज्यानी ईमान धारण केले आणि ईशपरायणता स्वीकारली त्यांच्यासाठी कोणत्याही भय आणि दुःखाचे कारण नाही. जगात आणि परलोक दोघांत त्यांच्यासाठी शुभसूचना आहेत."\n६९) येथपर्यंत या लोकांना उचित प्रमाण आणि मनाला भिडणाऱ्या उपदेशाने समजाविण्यात आले. त्यांना दाखविले गेले की त्यांच्या विचारात, आचारात, विश्वासात आणि जीवनशैलीत कोणत्या चुका आणि उणिवा आहेत आणि त्या चुकीच्या का आहेत? याविरुद्ध सत्यमार्ग कोणता आहे आणि तो का खरा आहे, हे समजून सांगण्यात आले. आता त्यांच्या त्या कार्यशैलीकडे लक्ष वेधले गेले आहे जे ते स्पष्ट समजून सांगण्याच्या उत्तरात स्वीकारत होते. दहा-अकरा वर्षांपासून त्यांची कार्यशैली (मक्केतील अनेकेश्वरवादी) नकारात्मक होती. हे सत्य मार्गदर्शनाने आपल्यात सुधारणा करणे दूरच, परंतु ते पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या जीवावर उठले होते. पैगंबर मुहम्मद (स.) त्यांना सत्यमार्गदर्शन त्यांच्या भल्यासाठीच करत होते. त्यात त्यांचा कोणताही वैयक्तिक स्वार्थ नव्हता. ते लोक तर्कांचे उत्तर दगडांनी आणि उपदेशाचे उत्तर शीवराळ भाषेत देत होते. त्यांच्या समाजात पैगंबर मुहम्मद (स.) यांचे अस्तित्व त्यांना असह्य झाले. ते वाईटाला वाईट म्हणत होते आणि सत्य सांगण्याचा प्रयत्न करत होते. त्यांची मागणी होती की आम्हा आंधळयांमध्ये हे डोळस आहेत त्यांनी आमचे डोळे उघडण्याऐवजी स्वतःचेच डोळे बंद करावे. अन्यथा आम्ही जोर जबरदस्ती करून त्यांचे डोळे फोडून टाकू. ही कार्यशैली त्यांनी स्वीकारलेली होती. त्यावर काही सांगण्या ऐवजी अल्लाह आपल्या पैगंबरांना आदेश देतो की त्या लोकांना आदरणीय नूह (अ.) यांची ऐतिहासिक घटना सांगा. त्या घटनेतच त्यांच्या आणि तुमच्या कार्यशैलीचा परिणाम स्पष्ट करण्यात आला आहे.\n७०) हे आव्हान होते की मी आपल्या कार्यापासून दूर जाणार नाही तुम्हाला माझ्याविरुद्ध जे काही करावयाचे आहे, ते तुम्ही करा. माझा विश्वास अल्लाहवर आहे. (तुलनेसाठी पाहा सूरह ११, आयत नं. ५५)\n७१) सीमेचे उल्लंघन करणारे लोक ते आहेत जे एकदा चूक केल्यानंतर पक्षपातीपणा, दुराग्रह आणि हठधर्मीमुळे आपल्या त्याच चूक करण्यावर अडून राहातात. ज्याला मान्य करण्यास एकदा नकार दिला तर त्याविषयी समजावून किंवा उचित तर्क आणि प्रमाण देवूनसुद्धा ते मान्य करीत नाही. अशा लोकांवर शेवटी अल्लाहचा धिक्कार होतो आणि नंतर कधीच सरळमार्गावर येण्याचे सौभाग्य त्यांना लाभत नाही.
महानगरपालिका निवडणुकीतील काँग्रेसची लढत ही न जिंकण्यासाठी केलेले प्रयत्न होते. लंगड्या घोड्यासह मैदानात उतरलेल्या काँग्रेसच्या उमेदवारांनी एकांगी झुंज दिली मात्र नेत्यांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केले. जळगाव : महानगरपालिका निवडणुकीतील काँग्रेसची लढत ही न जिंकण्यासाठी केलेले प्रयत्न होते. लंगड्या घोड्यासह मैदानात उतरलेल्या काँग्रेसच्या उमेदवारांनी एकांगी झुंज दिली मात्र नेत्यांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केले. गेल्या १५ वर्षांपासून सतत एकही जागा न जिंकण्याचा आगळावेगळा विक्रम काँग्रेसने प्रस्थापित केला आहे. जळगाव महापालिका निवडणुकीची जबाबदारी माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे सोपविण्यात आली होती. त्यांनी सुरुवातीला मेळावे घेत येथील काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये जोश निर्माण करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसच्या विजयासाठी आपल्या कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी देण्याचे आवाहन त्यांनी स्थानिक पदाधिकाºयांना केले. मात्र हे आवाहन धुडकावून लावत एकाही पदाधिकाºयाने कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी दिली नाही. पक्ष निरीक्षकांनी देखील स्थानिक पदाधिकाºयांना हात टेकले. काँग्रेसने सुरुवातीपासून या निवडणुकीत आपण किंगमेकर राहणार असल्याचा दावा केला. मात्र त्यासाठी आवश्यक असलेले नियोजन मात्र पदाधिकाºयांकडून झाले नाही. काँग्रेसची बुथ रचना कमकुवत असल्याने पक्षाला सपाटून मार खावा लागला. पक्षाची कोणती ताकद नसताना पोकळ आत्मविश्वास मात्र काँग्रेस पदाधिकाºयांमध्ये मतदानाच्या दिवसापर्यंत होता. काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी सुरुवातीला प्रदेशच्या नेत्यांच्या सभांचे नियोजन केले होते. नंतर मात्र निवडणुकीतील स्थितीचा अंदाज येत गेल्यानंतर प्रदेशच्या नेत्यांनी देखील जळगावकडे पाठ फिरविली. त्याचा परिणाम म्हणून काँग्रेसची एकही मोठी प्रचारसभा झाली नाही. काँग्रेसने १६ जागांवर उमेदवारांना उभे केले. त्यातील सर्वाधिक २ हजार ७६ मते ही जाकीर बागवान यांना मिळाले. त्यांच्या पाठोपाठ रेखा भालेराव यांना १२२६ तर भरत बाविस्कर यांना ११७१ मते मिळाली आहे. उर्वरित सर्वच उमेदवार हे तीन आकडी संख्याही गाठू शकले नाहीत. पूर्वी मुस्लीम व दलित मतदार हे काँग्रेसचे हक्काचे मतदार मानले जात होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस नंतर समाजवादी पार्टी आणि आता एमआयएम यांच्या जळगावातील प्रवेशामुळे हा हक्काचा मतदार काँग्रेसपासून दुरावत चालला आहे.
तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून सुरू झालेली काँग्रेसची भारत जोडो यात्रा आता कर्नाटकातील विविध शहरांमधून जात आहे. दरम्यान, राहुल गांधी म्हैसूरला पोहोचले. तिथे काँग्रेसच्या सभेत भाषण करण्यासाठी ते स्टेजकडे जाऊ लागल्यावर पाऊस सुरू झाला. त्यामुळे त्यांनी पाऊस थांबण्याची वाट पाहिली नाही. भिजतच त्यांनी आपले भाषण चालू ठेवले. राहुल गांधी म्हणाले की, काहीही झाले तरी भारत जोडो यात्रा कोणीही रोखू शकत नाही. भाजप-आरएसएसने पसरवलेला द्वेष आणि हिंसाचार थांबवणे हा आमच्या भेटीचा उद्देश आहे. राहुल गांधींचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर लोक आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करनेही यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. बॉलीवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री स्वरा भास्करने राहुल गांधींचा पावसात भिजतानाचा फोटो शेअर करत लिहिले, 'छान फोटो! कोण आहे फोटोग्राफर? यासोबतच त्यांनी एक कविताही लिहिली.
मुंबई, 26 मे : उष्णतेपासून सुटका मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणात AC चा वापर होऊ लागला आहे. कुलरसाठी आवश्यक तितक्या पाण्याचं नियोजन करता येत नसल्यामुळे घरोघरी आणि प्रत्येक ऑफिसमध्ये एसीचा वापर सर्सास वाढला आहे. एवढंच नव्हेत तर प्रवास करण्यासाठी देखील एसी बसला किंवा एसी कॅबला प्राधान्य दिलं जातं. परंतू, एसीची हवा आपल्या शरीरासाठी किती हानिकारक असते हे तुम्हाला माहित आहे का? सतत एसीच्या संपर्कात राहणाऱ्यांना अनेक आजार होण्याची शक्यता असते. एसी सुरू करण्याआधी सगळी दारे आणि खिडक्या बंद केली जातात, त्यामुळे स्वच्छ आणि मोकळी हवा आपल्या शरीराला मिळतच नाही परिणाणी आपल्या शरीराचा विकास खुंटतो. अन्य साधनांच्या तुलनेत एसमुळे सगळ्यात जास्त थंडावा निर्माण होतो. मानवाचं शरीर एका विशिष्ठ पातळीपर्यंतच थंडी सहन करू शकतं, त्यानंतर त्याचे वाईट परिणाम होतात. बरेचदा एसीच्या थंडाव्यामुळे आपलं शरीर इतकं जास्त गार पडतं, की ते आपल्याला कळत देखील नाही. परिणामस्वरूप हाडांच्या समस्या निर्माण होतात. शरीरावर आलेला घाम लगेच वाळतो, याचबरोबर शरीरातली उष्णता देखील ओढली जाते. शरीरात पाण्याची कमतता निर्माण झाली तरी एसीच्या वातावरणात ती आपल्याला जाणवत नाही. पाण्याचं प्रमाण कमी झालेलं असातानसुद्धा शरीरात तहान भागविली जात नाही. यामुळे हळू-हळू अकाली वृद्धत्व आल्यासारखं शरीरावर सुरकुत्या दिसू लागतात. एकूणच काय तर आणखी वेगवेगळ्या आजरांचा सामना करावा लागतो. त्वचेचे रोगही बळावतता. उष्णतेपासून बचाव करण्यासाठी लावलेल्या एसीमुळे फायदे कमी आणि नुकसान जास्त होतं. अशात आरोग्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे आपल्याला त्याची मोठी किंमत मोजावी लागते. म्हणून एसीचा वापर तरताना त्याच्या परिणामांचीसुद्धा दखल घ्यायला हवी. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
या एकाच देशात भारताला अजूनही कसोटी मालिका जिंकता आली नाही.. - Khaas Re\nया एकाच देशात भारताला अजूनही कसोटी मालिका जिंकता आली नाही..\nभारतीय संघाने विराट कोहलीच्या नेतृत्त्वात ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक मालिका विजय मिळवला. ऑस्ट्रेलिया मध्ये तब्बल ७२ वर्षांनी भारताने मालिका जिंकून इतिहास रचला आहे. भारत हा ऑस्ट्रेलियामध्ये मालिका जिंकणारा आशियातील पहिला संघ बनला आहे.\nकोहलीच्या नेतृत्वात तब्बल ७२ वर्षांनी भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर कसोटी मालिका विजयाचा भीम पराक्रम केला. ४ टेस्ट मॅचच्या मालिकेमध्ये भारताचा २-१ नं विजय झाला.\nभारतानं आत्तापर्यंत इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, न्यूझीलंड, झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज या देशांमध्ये कसोटी मालिका जिंकली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये भारतानं आत्तापर्यंत १२ कसोटी मालिका खेळल्या होत्या पण एकदाही भारताला मालिका जिंकता आली नव्हती. २००३-२००४ साली झालेल्या मालिकेत भारताला मालिका ड्रॉ करण्यात यश आलं होतं. हि मालिका सोडल्यास ऑस्ट्रेलियातल्या इतर सगळ्या मालिकामध्ये भारताला पराभव पत्करावा लागला होता.\nऑस्ट्रेलियामध्ये तर कसोटी मालिका विजय भारताने मिळवला. पण अजूनही एक देश असा आहे ज्यामध्ये भारताला कसोटी मालिका जिंकता आली नाही. तो म्हणजे दक्षिण आफ्रिका. आफ्रिकेत भारताने एकही कसोटी मालिका जिंकली नाही.\nयाशिवाय इतर प्रमुख संघाच्या बाबतीत बघायचं झालं तर भारताने नन्यूझीलंडमध्ये ९ कसोटी मालिका खेळल्या आहेत. त्यापैकी २ मध्ये विजय, ५ मध्ये पराभव आणि २ मालिका ड्रॉ करण्यात भारताला यश आलं होतं. याशिवाय भारताने इंग्लडचे १८ दौरे केले. त्यापैकी ३ मध्ये विजय, १ ड्रॉ आणि बाकी १४ मालिकांत पराभव पदरी पडला.\nवेस्ट इंडिजचे भारताने ११ वेळा दौरे केले. ज्यामध्ये भारताने ४ मालिका विजय मिळवले तर ७ वेळा पराभव झाला. पाकिस्तानमध्ये भारतानं आत्तापर्यंत ७ कसोटी मालिका खेळल्या आहेत. यातली २००३-०४ सालच्या एकमेव मालिकेमध्ये भारताचा विजय झाला. तर ३ मालिका पाकिस्ताननं जिंकल्या आणि ३ मालिका ड्रॉ झाल्या.
मानवी भावना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत जळगाव मोठी भूमिका बजावतात. ते ओळखला जातो भावना जोडलेले आहेत. हे दोन घटक मानवी मानसशास्त्राची पहिल्या रूपे होते. मॅन भावना जगू शकत नाही. त्यांचे अभिव्यक्ती भीती, आनंद, राग किंवा प्रेमळपणा स्वरूपात येतो. भावना आणि भावना मानवी जूळवून घेण्याची प्रक्रिया किंवा त्याचा परिणाम एक मार्ग आणि बाह्य घटक प्रभाव प्रतिक्रिया आहे. भावना काही घटक झाले भावना संबंधित भावना म्हणतात. अशा रूपे अनेक प्रकार आहेत. उच्च भावना, यामधून, बौद्धिक, नैतिक आणि सौंदर्याचा विभागले आहेत. ते ओळखला जातो सार्वजनिक जीवन लिंक आणि त्याच्या भोवती येणार्या घटना माणूस संबंध व्यक्त आहेत. मानवी संगोपन उच्च अर्थ आणि प्रचलित worldview ठरविले. नैतिक भावना करून समाज, कर्तव्य आणि जबाबदारीची जाणीव असते. कर्तव्य भावना घातली आहे व्यक्ती जाणीव व्यक्तिमत्व निर्मिती दरम्यान. हे भावना आणि अनुभव उपस्थिती त्यांच्या कर्तव्ये एक साधी ज्ञान वेगळे. काही कृती आनंद असल्यास, व्यक्ती आनंद अनुभव. वर्तन आणि भावनांना अनुभव संबंधित मूल्यमापन, विवेक म्हणून समजून घेणे. योग्यरित्या कार्यान्वीत क्रिया समाधान शांत विवेक राज्य आहे. मानसिक क्रियाकलाप बौद्धिक भावना आहे. ते विचार आणि मानसिक श्रम प्रक्रिया कनेक्ट केलेले आहेत. या शंका, आश्चर्य, समाधान आणि आत्मविश्वास भावना यांचा समावेश आहे. त्याच्या अभ्यास उपक्रम एक व्यक्ती एक नवीन, अज्ञात तथ्य जाणून घेते. करत असे वाटते की प्रथम भावना, एक आश्चर्य आहे. या घटक नवीन ज्ञान एक प्रोत्साहन आहे. अभ्यास काही पैलू विद्यमान कल्पना पालन नाही, तर यात काही शंका एक भावना आहे. तो चाचणी आणि डेटा पुनरावलोकन प्रोत्साहन देते. परिणाम त्यांच्या समजुती आत्मविश्वास एक अर्थ आहे. पण, हे काम एक परिणाम म्हणून तेथे समाधान आहे. त्यामुळे एकमेकांशी कनेक्ट या भावनिक रूपे सर्व लक्षात ठेवा आणि एका विशिष्ट क्रम तयार करण्यासाठी महत्वाचे आहे. सौंदर्यशास्त्र आणि सौंदर्य समजून मानवी मानसिक विकास एक महत्त्वाचा पैलू आहे. मनुष्याच्या सौंदर्याचा अर्थ अभ्यास आणि तंत्रज्ञान कला, वास्तुकला, किंवा प्रगती कामे योजना परिणाम आहेत. निसर्ग संपर्कात येत या भावना मजबूत अभिव्यक्ती. तो अचूकपणे प्रश्न, मानवाकडून अनेक भावना कसे उत्तर करणे अशक्य आहे. तो प्रत्येकाला नैतिक शिक्षण अवलंबून असते. काही लोक, भावना व्यक्त त्यामुळे स्पष्टपणे नाही. मुख्य ओळख भावनिक गुण प्रकटीकरण मध्ये स्थिर आहे. भावनिक अस्थिर लोक अनेकदा कायम त्रास आणि तत्त्वे नाही. लोक त्यांच्या मानसिक रूपे बदलू. वेगळी कमी भावना सामान्य लोक आहेत. या मत्सर, लोभ, स्वार्थ, इ ते दुर्लक्ष भावना बाह्य प्रकट जगातील सर्वोत्कृष्ट भावनिक प्रकटीकरण नाही. परिस्थिती लोक वेगळ्या प्रतिक्रिया. उपक्रम काही उत्कृष्टतेचे प्रयत्न वाढ देऊ, त्यांच्या गुणवत्ता सुधारणे, की अतिरिक्त प्रोत्साहन देत आहे. इतर सुस्ती निराशा आणि निराशा येत. भावना आणि एक व्यक्ती भावना समाजातील वर्ण आणि वर्तणूक तयार.
मुंबई : आता आपण स्नॅपडीलवर बस अथवा विमानाचे तिकीट बुकिंग करू शकता. स्नॅपडीलने रेडबक्स, जोमॅटो आणि क्लियरट्रिप यांना आपल्या मोबाईल ऍप प्लॅटफॉर्मशी जोडल्यामुळे ग्राहकांना एकाच छताखाली अनेक सुविधा मिळण्यास मदत होणार आहे. नवीन व्यवस्थेनुसार, विमानाची तिकीटे, हॉटेल आणि अन्नपदार्थ मागविण्यासाठी बुकिंग एकाच ऍपमधून करण्यात येणार आहे. यानुसार, कंपनीच्या ग्राहकांना क्लियरट्रिप, जोमॅटो आणि रेडबस यांच्या सुविधा उपलब्ध होण्यासाठी मदत मिळणार आहे. यासाठी स्नॅपडील प्रत्येक बुकिंगवर काही रक्कम आकारणार आहे. सध्याच कंपनीकडून टीव्हीएस एमरल्ड रनवाल ग्रुप्स रियल इस्टेट यांच्याशी करार करण्यात आला आहे.
बंधपत्र लिहून दिल्याने मोक्कातून सुटका! शहर पोलिसांनी चालू वर्षात मागील सहा महिन्यांत मोक्कांतर्गत १०८ गुन्हेगारांवर कारवाई केली आहे. यामुळे मोक्काच्या कारवाईचा मागील दहा वर्षांचा रेकॉर्ड माेडीत निघाला आहे. नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरण, तसेच उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील खून आणि भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खून व त्यानंतर उसळलेल्या दंगलीच्या गुन्ह्यांमधील टोळ्यांसह गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भूमाफियांच्या टोळीने भूखंड बळकाविण्यासाठी वृद्ध भूधारक मंडलिक यांची निर्घृणपणे केलेल्या हत्येप्रकरणी संशयित सराईत गुन्हेगारांवर पाण्डेय यांनी मोक्काची कारवाई केली. त्याचप्रमाणे अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यातील एकूण ३३ गुन्हेगारांवर मोक्कानुसार कारवाईसाठी नावे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडून सुचविली गेली होती. मात्र, सहा गुन्हेगारांनी बंधपत्र लिहून दिल्याने त्यांना दिलासा देत पाण्डेय यांनी २७ गुन्हेगारांवर मोक्कानुसार कारवाईचे आदेश दिले. मात्र, त्यातील सहा गुन्हेगारांनी गुन्हेगार सुधार मेळाव्यात उपस्थित राहून 'आम्ही आमचे वर्तन सुधारणार असून, गुन्हेगारीतून बाहेर पडत सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे वागू' असे बंधपत्र (बॉण्ड) लिहून दिल्याने त्यांना मोक्काच्या कारवाईतून 'क्लीन चिट' दिली गेली. अंबड पोलीस ठाणे हद्दीतील मोक्काच्या कारवाईच्या यादीमधील आकाश विलास जाधव (२४, रा. पंचवटी), श्रीनिवास सुरेंद्र कानडे (२८, रा. कॉलेज रोड), किरण दिनेश नागरे (३८, रा. मखमलाबाद रोड), अजय दिलीप बागूल (३४, रामवाडी), पवन शिवाजी कातकाडे (३४, राणेनगर), रोहित आनंद उघाडे (२९, रा. सिडको) यांना चांगले नागरिक बनण्याची शेवटची संधी पोलिसांनी बंधपत्र लिहून घेत दिली आहे. या सहा युवकांनी यापुढे शहरात कोठडीत कोणत्याही प्रकारचे गैरकृत्य करीत कायदा सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार प्राप्त झाल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाच्या परिस्थिती काळजी घेणे आवश्यक आहे. त्याचसोबत घरात थांबून कोरोनाच्या विरोधात लढा देण्याचे आवाहन सरकारने केले आहे. दुसऱ्या बाजूला कोरोनाबाधित रुग्णांवर डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकिय कर्मचाऱ्यांकडून अहोरात्र उपचार करण्यात येत आहेत. तर दिवसागणिक नव्या कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्याने त्यांची चाचणी करण्यापासून ते उपचारापर्यंत सर्व गोष्टींकडे लक्ष देणे महत्वाचे आहे. याच पार्श्वभुमीवर आता राज्य सरकारने सरकारी, महापालिकांच्या रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांच्या चाचण्या, उपचार आणि जेवणाची सोय मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता कोरोनाबाधित रुग्णांना दिलासा मिळणार आहे. वैद्यकिय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी असे म्हटले आहे की, कोरोनाबाधित रुग्णांच्या चाचण्यांसाठी आता टेस्ट लॅबची संख्या वाढवण्यात आली आहे. तर आता वैद्यकिय महाविद्यालयांत सुद्धा कोरोनाची चाचणी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. सध्या 40 खासगी लॅब असून त्यांची संख्या वाढवून 60 ऐवढी केली जाणारर आहे. या लॅबमधून दिवसाला 7 हजार चाचण्या केल्या जाणार आहेत. त्याचसोबत केंद्र सरकारने अधिक प्रमाणात टेस्ट किट राज्याला पुरवल्या पाहिजेत असे ही अमित देशमुख यांनी म्हटले आहे. त्याचसोबत नागरिकांनी त्यांच्या मध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास तातडीने त्यासंबंधित चाचणी करुन घ्यावी असे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे. (कोरोना विषाणूबद्दल माहितीः पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी 4 जणांना Coronavirus ची लागण; शहरातील बाधितांच्या संख्या 89 वर पोहचली)
मूळ पदव्युत्तर पदवीच अमान्य, मग पीएचडीचे काय? नाशिक : मुक्त विद्यापीठाने विशिष्ट कर्मचाऱ्यांवर मेहरनजर दाखवताना मूळ विषयातील पदवी आणि त्याच्याशी असंबंध एम. ए. , एम. कॉम. , एम. एस्सी. या पदव्युत्तर पदवीच्या आधारे पीएच. डी. पदवीसाठी प्रवेश दिला खरा; परंतु विद्यापीठाच्या संप्रेषण आणि दूरशिक्षण पदवी ही अन्य विद्यापीठाशी समकक्ष नाही. म्हणजे उदरनिर्वाहासाठी कोठेही पदवी दाखविली तर त्याच्या आधारे रोजगार मिळणार नाही. मग अशा पदवीच्या आधारे पूर्ण केलेले शिक्षण आणि त्या आधारे मिळविलेली पीएच. डी. ही बाहेरील उमेदवारांना कितपत उपयुक्त ठरणार? परंतु मुक्त विद्यापीठाने आपल्या सेवांतर्गत आणि विशिष्ट उमेदवारांना या पदवीचा चांगला उपयोग करून दिला आणि त्या आधारे अनेकांना महत्त्वांच्या पदावर नियुक्त केले आहे. वंचितांसाठी स्थापन झालेल्या मुक्त विद्यापीठात जवळपास तीनशे कर्मचारी आहेत; परंतु त्यापैकी शैक्षणिक पदांवर कामे करणाऱ्या आणि सेवेत राहून याच विद्यापीठाच्या पदव्या घेऊन तेथेच पदोन्नतीने स्थायी स्वरूपात नियुक्त होणे हे या विद्यापीठाच्या आजवरच्या प्रशासकीय कारभारातील वैशिष्टच आहे. उच्च शिक्षणासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने काही नियमावली तयार केली आहे; परंतु तीच धाब्यावर बसवून वा ती आपल्या सोयीने वापरून (वाकवून) विद्यापीठाने विशिष्ट अधिकाऱ्यांची मोठी सोय केली आहे. मूळ कोणत्याही विषयात पदवी धारण केल्यानंतर पदव्युत्तर पदवी त्याच विषयांत आणि पीएच. डी. ही त्याच विषयात पूर्ण करणे अपेक्षित आहे. परंतु विद्यापीठातील बहुतांशी प्राध्यापकांनी मूळ विषयातील पदवीनंतर पदव्युत्तर पदवी याच विद्यापीठात घेतली. विद्यापीठाच्या शैक्षणिक सेवा विभागामार्फत एम. ए. , एम. कॉम. आणि एम. एस्सी या संप्रेषण आणि दूर शिक्षणपद्धतीच्या पदव्युत्तर पदव्या आहेत. त्यांना इतर विद्यापीठातील पदव्युुत्तर पदवीची समकक्षता नाही. मात्र विद्यापीठ अनुदान आयोगाच्या १९९३ आणि महाराष्ट्र शासनाच्या १८ मार्च १९९८च्या निर्णयानुसार या पदव्यांना दोन प्रशिक्षण वर्गांची समकक्षता धरण्यात येते. जे अधिव्याख्याता यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील एम. ए. , एम. कॉम, व एम. एस्सी (संप्रेषण आणि दूरशिक्षण क्षेत्रातील) पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण होतील त्यांना शासन आदेशान्वये चार आठवड्यांचे दोन उजळणी प्रशिक्षण पूर्ण करण्याच्या अटीतून सूट देण्यात येते. त्यानुसार मुक्त विद्यापीठातील काही प्राध्यापकांनी या पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण करून सूट मिळवली व याच पदवीच्या आधारे पीएच. डी. ला प्रवेश मिळविला. त्यांनाही विद्यापीठाने विनासायास प्रवेश देऊन पीएच. डी. पदव्या सन्मानपूर्वक प्रदान केल्या आहेत. विशेष म्हणजे एम. ए. , एम. कॉम. आणि एम. एस्सी (संप्रेषण व दूरशिक्षण) या तिन्हींचा अभ्यासक्रम सारखाच असून, त्यातील विषयांची नावेही एकसारखी आहेत. मूल्यमापन पद्धती सारख्याच असून, त्यात कोणताही फरक नाही. मग, विद्यापीठ अशा वेगवेगळ्या नावाने वर पदव्या का सुरू ठेवत आहे, हे अनाकलनीय कोडे विद्यापीठ वर्तुळातील जाणकारांना पडले आहे. या पदव्यांच्या आधारेच रुचा गुजर, सुनंदा मोरे यांच्यासारख्या काही प्राध्यापकांनी हीच पदव्युत्तर पदवी घेऊन त्या आधारे पीएच. डी. ला प्रवेश घेतला. विद्यापीठातील विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे संचालक मनोज किल्लेदार हे एम. ई. इलेक्ट्रीकल्स असताना त्यांनी पीएच. डी. दूरस्थ पदवी संपादन केली आणि त्याचे सर्व लाभ घेतले आहेत. (प्रतिनिधी)
ऑनलाईन धोका, 90 लाख रुपये मिळवण्याच्या लालसेपोटी बेस्ट फ्रेंडची हत्या । Saamana (सामना) अमेरिकेत एका एकवीस वर्षीय तरुणीने ऑनलाईन 90 लाख रुपये मिळवण्याच्या लालसेपोटी आपल्या बेस्ट फ्रेंडची हत्या केल्याचे समोर आले आहे. डेनाली ब्रेम्हर असे तिचे नाव आहे. अलास्कात राहणाऱ्या डेनालीची फेसबुकवर इंडियानाच्या डेरिन शिल्मिलर या तरुणाबरोबर मैत्री झाली. आपण गर्भश्रीमंत असल्याचे डेरिनने डेनालीला सांगितले. डेरिनसारखा श्रीमंत व्यक्ती आपला मित्र असल्याचे डेनालीला अप्रूप वाटत होते. दोघांमध्ये रोज तासंतास गप्पा रंगू लागल्या. याचदरम्यान, डेरिनने डेनालीला तिच्या बेस्ट फ्रेंडची हत्या करण्यासाठी 90 लाख डॉलर ऑनलाईन देण्याची ऑफर दिली. तसेच जर या हत्येचा व्हिडीओ किंवा ऑडिओ दिलास तर तुला 90 लाख डॉलरहून अधिक रक्कम देईन असे आमिषही डेरिनने डेनालीला दिले. एवढे पैसे मिळणार असल्याने डेनाली खूश होती. पैशांसाठी काहीही करण्यास तयार असणाऱ्या डेनालीने अजून चारजणांना या हत्येच्या कटात सामील करून पैशांचे आमिष दाखवले. त्यानंतर तिने तिची बेस्ट फ्रेंड असलेल्या सिंथिया हॉफमैन (19) हिला 2 जून रोजी डोंगरावर फिरण्यासाठी बोलावले. फिरताना सिंथियाला उंचावर नेऊन डेनिया व तिच्या साथीदारांनी तिचे हातपाय बांधले. नंतर तिच्या डोक्यात गोळ्या घालून तिचा मृतदेह नदीत फेकला. डेरिनकडून जास्त पैसे मिळावेत म्हणून या घटनेचा व्हिडीओही डेनियाने काढला व डेरिनला पाठवला. दरम्यान, सिंथिया अचानक बेपत्ता झाल्याने तिच्या घरातल्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर हे प्रकरण समोर आले. न्यायालयाने याप्रकरणी डेनिया व तिच्या साथीदारांना दोषी ठरवले आहे.
मुंबईः जुलै महिन्यातील पहिल्या आठवड्यात मुंबईतील १९ वर्षीय तरुणीसोबत तिच्या चार मित्रांनी बलात्कार केला होता. त्याच तरुणीचा आज (गुरुवार) औरंगाबाद शहरातील एका शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे. याबाबत एका पोलीस अधिकाऱ्याने अशी माहिती दिली आहे की, पीडित तरुणीला २५ जुलैला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. जिचा काल उशीरा रात्री मृत्यू झाला. आता प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांची एक टीम ही औरंगाबादला पोहचणार आहे. बलात्काराची ही घटना तेव्हा समोर आली जेव्हा तरुणीने २४ जुलैला तक्रार केली होती की, तिच्या गुप्तांगात प्रचंड वेदना होत आहे. त्यानंतर तिला २४ जुलैला औरंगाबादमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर तेथील डॉक्टरला संशय आला की, तरुणीसोबत बलात्कार झाली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे डॉक्टरने याबाबत तात्काळ पोलिसांना माहिती दिली . त्यानंतर पोलिसांनी तरुणीला शासकीय रुग्णालयात दाखल केलं. औरंगाबादमधील बेगमपुरा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, सात जुलैला तरुणी ही मुंबईला आली होती. त्याचवेळी तिच्या चार मित्रांनी तिचा वाढदिवस साजरा करायचा ठरवलं होतं. त्यानंतर चौघांनीही केक कापून तिचा वाढदिवस साजरा केला होता. पण त्यानंतर चौघांनीही तिच्यावर बलात्कार केला. दुसरीकडे असं म्हटलं जात आहे की, तरुणीला तिच्या मित्रांनी अमली पदार्थ देऊन नंतर तिच्यावर बलात्कार केली असण्याची शक्यता आहे. याबाबत पोलीस अधिकाऱ्याने माहिती देताना असं म्हटलं की, तरुणी मुंबईहून औरंगाबादला परतली. पण यावेळी तिने मुंबईत आपल्यासोबत काय घडलं याविषयी आपल्या आई-वडिलांना काहीही माहिती दिली नाही. हे प्रकरण मुंबईतील चुनाभट्टी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आलं आहे. याविषयी चुनाभट्टी पोलीस ठाण्याच्या एका अधिकाऱ्याने अशी माहिती दिली की, 'सध्या आम्ही तपास करीत आहोत. पण आतापर्यंत आम्हाला आरोपीची ओळख पटलेली नाही. तसंच आम्हाला कोणताही पुरावा अद्याप सापडलेला नाही. ' दरम्यान, याप्रकरणामुळे मुंबईत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दुसरीकडे आता मृत तरुणीच्या कुटुंबीयांनी नराधम आरोपींनी तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता आरोपींनी शोधून काढण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे.
हे सगळे थांबायचे असेल तर राष्ट्रांनाच बदलावे लागेल. "महासत्ता" हे बिरुदच मुळात मानवी स्वातंत्र्याच्या विरोधात आहे. पाकिस्तानमधल्या दहशतवादी संघटनांचे समर्थक पाहिले तर त्यात पाकचा कमी, अनेक राष्ट्रांचा हात दिसेल. हा सारा लढा जगावर स्वामित्व कोनाचे यासाठीचा आहे, त्याकडे तुकड्यातुकड्यात घडत जाणा-या अमानवीय हिंसेच्या घटनांतुन पाहून चालणार नाही!
जिल्हयातील नऊ नगरपालिकांच्या निवडणुकांमुळे नागपूर शहरातही निवडणूक आदर्श आचारसंहिता लागू झाल्याची चर्चा आहे. मंगळवारी दुपारनंतर विभागप्रमुख्यांच्या बैठकीत पदाधिकारी व प्रशासनासोबत बैठक झाली. यात याबाबत माहिती देण्यात आली. आचारसंहिता लागल्याने सत्तापक्षातच खळबळ उडाली आहे. कारण, आगामी काळात अनेक मोठया प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजन सत्तापक्षाला करायचे होते तसेच, येत्या दोन दिवसात मनपातर्फे दोन मोठया कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निर्णयामुळे मंगळवारीच सायंकाळी महापौर प्रवीण दटके, स्थायी समिती सभापती बंडू राऊत, सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे असलेली वाहने परत केली.